भटकंती - ट्रेक हे माझे व्यसन आहे. संरक्षण दल आणि अवकाश तंत्रज्ञान हे माझे अत्यंत आवडते विषय आहेत. फोटोग्राफी हे माझे पॅशन आहे. ट्रेक, किल्ले, निसर्ग याबरोबर संरक्षण क्षेत्रातील घडामोडी, विविध देशांची संरक्षण व्यवस्था तसंच संरक्षण क्षेत्रातील शर्यतीने जगात झालेले बदल, निर्माण झालेले तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञानातील प्रगती या विषयांवर लिहायला आवडते.
Friday, February 3, 2017
विनाशापासून फक्त 2.30 मिनिट जवळ...
Monday, January 16, 2017
पिनाक 2 / Pinaka 2 सज्ज
पिनाक 2 / Pinaka 2 सज्ज
स्वदेशी multi barrelled rocket launcher पिनाक 2 / Pinaka 2 सज्ज.
काही सेकंदात 12 रॉकेट ते सुद्धा 38 किमी अंतरापर्यंत फेकत काही चौरस किमीचा भाग पूर्ण उध्वस्त करणा-या पिनाक - 1 ची नवी आवृत्ती Pinaka - 2 लष्करात दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकत्याच चांदीपूर - ओडीसा इथे नव्या पिनाक - 2 या नव्या आवृत्तीच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या.
पिनाक दोन / Pinaka - 2 ची वैशिष्ट्ये....
पिनाकची 2 च्या मारक क्षमतेचे अंतर आता दुप्पट म्हणजे सुमारे 76 किमी झाले आहे.
पिनाक 2 मधील रॉकेट हे गायडेड ( मार्गदर्शन करता येणारे ) असणार आहे , दिशा बदलवू शकणारे असणार आहे. म्हणजेच रॉकेटमध्ये एक छोटा कॉम्पुटर असणार जो गरज वाटल्यास रडारद्वारे संदेश घेत नियोजित लक्ष्याच्या मार्गावर असतांना दिशा बदलवू शकेल.
यामुळे समजा पिनाकमधून रॉकेटने लक्ष्याच्या दिशेने झेप घेतली आणि लक्ष्याने जागा बदलायला सुरुवात केली किंवा नवीनच लक्ष्य रडारवर आले तर हवेतल्या हवेत लक्ष्याच्या दिशेने जाणारे रॉकेट काही अंश कलत - दिशा बदलवत सुधारित लक्ष्याचा वेध घेऊ शकणार आहे.
तसंच पिनाक 2 मध्ये गरजेनुसार गायडेड रॉकेट्स आणि unguided रॉकेट्स एकत्र ठेवता येऊ शकतात.
एका पिनाकमधील 12 रॉकेट्स हे अवघ्या चार सेकंदमध्ये डागता येतात.
पिनाक हे अत्याधुनिक त्राता ( Trata ) वाहनावर आरूढ असून एका बॅटरीमध्ये पिनाकची 6 लौंचर्स असतात. म्हणजे समजा सहा पिनाकमधून एकाच वेळी प्रत्येकी 12 म्हणजेच एकूण 72 रॉकेट्स डागता येतात. यामुळे किती मोठा चौरस किमी क्षेत्र नेस्तनाबूत - नष्ट करता येऊ शकते याची आपण कल्पना करू शकता.
पिनाक हे पुण्यातील DRDO म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या Armament Research & Development Establishment, Pune (ARDE) या विभागाने पूर्णपणे स्वबळावर विकसित आणि सिद्ध केलेले आहे.
अशा प्रकारचे अस्त्र प्रत्यक्ष युद्धात / surgical strike सारख्या हल्ल्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते यात शंका नाही.
लवकरच पिनाक 2 ची आवृत्ती लष्करात दाखल होणार आहे.
Sunday, October 2, 2016
धुमकेतूवरची स्वारी..........
30 सप्टेंबर 2016 हा सर्वसामान्यांसाठी नेहमीचा दिवस ठरला असेल मात्र अवकाश संशोधन करणा-या आणि या विषयात स्वारस्य असलेल्यांसाठी नक्कीच नाही. या दिवशी 67P/Churyumov–Gerasimenk या धुमकेतु भोवती, कुठलाही अडथळा न येता दोन वर्ष फिरणा-या युरोपियन स्पेस एजन्सीच्या रोसेटा Rosetta आणि या उपग्रहाने एकुण 12 वर्षाच्या मोहिमेची सांगता करतांना धुमकेतूला धडक देत पुर्णविराम घेतला. या घटनेच्या दोन महिने आधीच या धुमकेतूवर उतरलेल्या Philae या छोटेखाली रोबोटने आपल्या सर्व यंत्रणा बंद करत निरोप घेतला होता.
निमित्त हॅलेच्या धमकेतुचे...
1986 पर्यंत अमेरिका, तेव्हाची सेव्हिएत रशिया अवकाश
संशोधन आणि विविध प्रकारचे उपग्रह पाठवण्यात तरबेज झाले होते. य़ुरोपियन अवकाश संस्था आणि जपान नुकतेच डोके वर काढु लागल्या होत्या.
आणि असं असतांना दर 76 वर्षांनी नियमित पृथ्वीजवळ येणारा हॅलेचा धुमकेतू ही सर्वांसाठी पर्वणीच ठरली. धुमकेतुच्या जगांत अगदी सर्वांना शाळेपासून माहिती असलेल्या हॅलेच्या धुमकेतूचे नाव घ्यावे लागेल, 1986 च्या सुमारास सुमारे 7 कोटी किलोमीटर अंतरावरुन दर्शन देत हॅले धुमकेतू त्याच्या मार्गाने निघुन गेला खरा पण यामुळे धुमकेतुच्या अभ्यासाची दालने धडाधड उघडी झाली.
1986 ची हॅले धमुकेतूची घटना ही अवकाश संशोधन करणा-यांसाठी एक सुवर्णसंधी ठरली होती. म्हणुनच की काय अमेरिका, सोव्हिएत रशिया, जपान आणि युरोपियन स्पेस एजन्सी या चारही संस्थांनी 1984 - 85 या कालावधीमध्ये हॅले धुमकेतूचा अभ्यास कऱण्यासाठी विविध उपग्रह सोडले. त्यामुळे जेव्हा हॅले धुमकेतू पृथ्वीच्या जवळून जात होता तेव्हा रशियाच्या दोन, जपानच्या दोन , युरोपियन स्पेस एजन्सीच्या एक आणि नासा - युरोपियन स्पेस एजन्सीने संयुक्तरित्या तयार केलेला एक उपग्रह अशा एकुण सहा उपग्रहाच्या उड्याच या धुमकेतूच्या दिशेने पडल्या आणि इतर वेळी दुर्बिणीतून दिसणा-या हॅलेबद्दल अतिशय जवळने जाणा-या त्या सहा उपग्रहांनी अभुतपुर्व अशी माहिती जमा केली.
यामध्ये 1986 ला युरोपियन स्पेस एजन्सिच्या Giotto या उपग्रहाने हॅले धुमकेतुपासून फक्त 596 किमी अंतरावरुन जात पहिल्यांदाच धुमकेतुची अतिशय जवळून छायाचित्रे घेतली.
त्यानंतर धुमकेतुच्या अभ्यासाचा जो सिलसिला सुरु झाला तो कायमच राहिला आहे.
नासाने 1999 महत्वकांक्षी अशी Stardust मोहिम आखली. यामध्ये Stardust उपग्रहाने चार वर्षे प्रवास करत 81P/Wild या धुमकेतुच्या 237 किमी अंतरावरुन प्रवास करत धुमकेतुपासून निघालेली धुळ ही अचुक टिपली आणि 2006 ला ती पृथ्वीवर सुखरुप पाठवली. अर्थात अतिशय सुक्ष्म कणांचा अभ्यास करत शास्त्रज्ञांना बहुमुल्य अशी माहिती मिळाली.
तर 2005 च्या नासाच्या मोहिमे कमालच केली. Deep Impact या उपग्रहाने Tempel 1 या धुमकेतूजवळ जात 230 किलो वजनाचा एक impactor किंवा एक वस्तु धुमकेतुवर आपटवली- आदळवली. दरम्यान या वस्तुवर कॅमेरा लावले होते. तेव्हा जस जशी ही वस्तु धुमकेतू जवळ पोहचली धुमकेतूची उत्कृष्ठ छायाचित्रे मिळाली. वस्तु अतिशय वेगाने आदळल्यावर मोठा खड्डा धुमकेतूमध्ये तयार झाला आणि अर्थात मोठ्या प्रमाणात धुलीकण हे बाहेर फेकले गेले. यानिमित्ताने धुमकेतुचा आंतरबार्ह्य अभ्यास करता आला.
रोसेटा - Rosetta
रोसेटा या उपग्रहाने तर कमालच केली, चांद्र विजयाएवढे भव्य काम करुन ठेवले.
2 मार्च 2004 ला युरोपियन स्पेस एजन्सीने
2900 किलो वजनाच्या रोसेटा नावाच्या उपग्रहाला 67P/Churyumov–Gerasimenk या धुमकेतुचा अभ्यास कऱण्यासाठी धाडले. 67P/Churyumov–Gerasimenk हा धुमकेतू आपल्या सुर्यमालेच्या परिघामध्येच सुर्याभोवती प्रदक्षणा घालत असतो. या धुमकेतुच्या गाभ्याचा आकार काहीसा वेडावाकडा आहे, सुमारे 4 किमी त्याची जास्तीत जास्त जाडी असून 1.8 किमी ही रुंदी आहे.
67P/Churyumov–Gerasimenk धुमकेतू 38 किमी प्रति सेकंद या वेगाने सुर्या भोवती लंबवुर्तळाकार प्रदक्षणा घालत असतो. तेव्हा या वेगापर्यंत जाण्यासाठी आणि धुमकेतू जवळ अचुक पोहचण्यासाठी रोसेटाने विविध ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण शक्तिचा आधार घेत वेग वाढवला. यासाठी रोसेटाने सर्वात आधी मार्च 2005 ला पृथ्वी, फेब्रुवारी 2007 ला मंगळ ग्रह, नोव्हेंबर 2007 ला पुन्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणचा फायदा घेत वेग वाढवला, दरम्यान वाटेत येणा-या दोन लघुग्रहांची छायाचित्रे घेतली, एवढंच नव्हे तर Deep Impact मोहिमेतील Tempel 1 धुमकेतुवर आदळवलेल्या वस्तुच्या टक्करीची घटनाही छायाचित्रबद्ध केली.
असा 10 वर्ष अथक प्रवास करत अखेर रोसेटा उपग्रहाने 67P/Churyumov–Gerasimenk या धुमकेतूला ऑगस्ट 2014 ला गाठले. तोपर्यंत रोसेटा आणि धुमकेतू हे पृथ्वीपासून 50 कोटी किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर होते. या मोहिमेची सुत्रे जर्मनीतून हलवली जात होती. विविध प्रकारे संदेश पाठवत रोसेटाचे अंतर कमी करत धुमकेतुच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत रोसेटाने प्रवेश केला आणि 100 बाय 50 किमी अशा लंबवर्तुळाकार कक्षेत धुमकेतु भोवती घिरट्या मारायला सुरुवात केली आणि धुमकेतुची छायाचित्र - माहिती पाठवायला सुरुवात केली. असा पराक्रम करणारे रोसेटा पहिला उपग्रह आणि युरोपियन स्पेस एजन्सी पहिली संस्था ठरली.
त्यानंनतर टप्प्याटप्प्याने उंची कमी करत रोसेटा आणखी धुमकेतुच्या जवळ गेले आणि अखेर 12 नोव्हेंबर 2014 ला या रोसेटावरील 100 किलो वजनाच्या Philae नावाचा रोबोट हा धुमकेतूवर अलगद अवरला ज्याला इंग्रजीत soft landing असे म्हणतात. रोबोट धुमकेतुवर उतरला खरा पण दोन गोलांट्या उड्या मारल्या आणि हा रोबोट सावली असलेल्या भागात पोहचला. बॅटरी असेपर्यंत या रोबोटने मानवी इतिहासात पहिल्यांदाच धुमकेतुच्या पृष्ठभागावरुन धुमकेतुची छायाचित्रे पाठवली. अखेर बॅटरी कमी झाल्यावर या रोबोटने संदेश देणे बंद केले. मात्र त्यानंतर काही दिवसांनतर रोबोटकडुनचे संदेश पुन्हा प्रस्थापित कऱण्यात शास्त्रज्ञांना यश आले.
तेव्हा अशा रितीने रोसेटा आणि त्या रोबोटचा धुमकेतुबद्दलचा अभ्यास जुलै 2016 पर्यंत सुरु होता. त्यानंतर रोबोटची बॅटरीची क्षमता कमी होत गेली आणि रोबोटची सिग्नल यंत्रणा शास्त्रज्ञांनी जड अंत;करणाने बंद केली. तोपर्यंत धुमकेतुबद्दल आवश्यक माहिती ही रोसेटा आणि रोबोटवरील संवेदकांच्या सहाय्याने आणि कॅमेराच्या सहाय्याने मिळाली होती.
रोबोट नंतर रोसेटा उपग्रहाला निरोप देण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि 30 सप्टेंबरपर्यंत रोसेटा उपग्रहाची उंची टप्प्याटप्प्याने कमी करत ते 67P/Churyumov–Gerasimenk धुमकेतूवर आदळवण्यात आले आणि 12 वर्षाच्या मोहिमेची सांगता झाली. यामागे शास्त्रज्ञांचे अथक प्रयत्न, श्रम कारणीभूत होते जे 100 टक्के यशस्वी झाले.
हे सर्व कशासाठी ?...
पुरातन काळापासून ते अगदी आजही आकाशात अचानक अवतरत किमान काही दिवस दर्शन देणा-या धुमकेतूबद्दल भारतातच काय परदेशातही अंधश्रध्दा अजुनही मनांत कायमच्या ठाण मांडून आहेत. या अंधश्रद्धा अजुनही पुसल्या जात नाहीत हे विशेष.
मात्र धुमकेतूचा अभ्यास करणे म्हणजे विश्वाच्या निर्मितीचे तसंच विश्वात असलेल्या विविध मुलद्रव्यांचे अस्तित्व समजुन घेण्यासारखे आहे असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. पृथ्वीवर जन्मलेल्या जीवसृष्टीला धुमकेतू कारणीभूत आहे का, धुमकेतूमध्ये कोणते मुलद्रव्य आहेत, पाणी मग ते बर्फाच्या स्वरुपात आहे का अशा अनेक प्रश्नांचा शोध गेली अनेक वर्ष सुरु आहे. म्हणनुच गेल्या काही वर्षांपासून चंद्र, मंगळ , सुर्य किंवा इतर ग्रहांचा, लघुग्रहांचा अभ्यास करतांना धुमकेतुचाही अभ्यास करण्यावरही भर दिला जात आहे. कारण हे धुमकेतू कित्येक वर्ष अस्तित्वात आहेत, अनेक धुमकेतू हे सुर्यमालेबाहेरुन येतात आणि भेट देऊन कायमचे निघुन जातात. तर काही धुमकेतू आपल्या सुर्यमालेच्या परिघातच फिरत आहेत. तेव्हा मानवी उत्क्रांतीच्याच नव्हे तर विश्व निर्मितीच्या खाणाखूणा या धुमकेतूवर, धुमकेतूच्या निमित्ताने सापडतात का याचा शोध मानव घेत आहे.
आता तर जपान आणि अमेरिका - नासाने लघुग्रहावरील माती पृथ्वीवर परत आणणा-या मोहिमा आखल्या आहेत, तसे उपग्रह रवानाही केले आहेत. आता 2030 -35 पर्यंत चंद्रावर मानवी वसाहत कऱण्याच्या हालचाली नासाच्या सुरु झाल्या आहेत. तर मंगळावर पोहचण्यासाठी नासाने जोरदार मोर्चाबांधणी सुरु केलीये. थोडक्यात आता पृथ्वीबाहेर पाऊल ठेवण्यासाठी नव्हे तर वसाहत कऱण्यासाठी माणसाने पावले टाकायला सुरुवात केली आहे.
आजही लाखो वर्षे पृथ्वीवर संचार असुनही पृथ्वीवरील अनेक गोष्टींची माहिती अजुन मानवाला झालेली नाही त्याचा अविरत शोध - प्रयत्न अजुनही सुरुच आहेत. तेव्हा अवकाशाच्या अनंत अशा पोकळीत, या पोकळीतील ग्रहांवर पाऊल टाकतांना मानवाला अनेक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तेव्हा धुमकेतुचा अभ्यास, धुमकेतुवर रोबोट उतरवणे ही यामध्ये महत्त्वाची हनुमान उडी ठरणार आहे. म्हणनुच रोसेटा - Rosetta मोहिमेचे महत्व अनन्य साधारण आहे.
Friday, May 13, 2016
एका पर्वाची अखेर - सी हैरियर
Thursday, March 24, 2016
व्याघ्र प्रकल्प....एक फार्स ???
व्याघ्र प्रकल्प एक फार्स......म्हणजे व्याघ्र प्रकल्प नकोत का असा त्याचा अर्थ नव्हे. तर एखादे वन किंवा अभायरण्य अट्टहासाने व्याघ्र प्रकल्प म्हणुन जाहिर करायचे आणि जंगल नव्हे तर वाघ बघायला येणा-या पर्यटकांचा लोंढा वाढवायचा आणि सर्व व्यवस्थेने मिळुन बक्कळ पैसा कमवायचा याला विरोध आहे. म्हणुनच काही मुद्दे मांडावयासे वाटतात.
व्याघ्र प्रकल्प का आवश्यक आहेत, किंवा व्याघ्र प्रकल्पांमुळे काय साध्य होते....
सर्वात महत्वाचे म्हणजे व्याघ्र प्रकल्प जाहिर झाल्यावर वन विभागाचे नियम अधिक कडक होतात आणि त्या वनाचेच नाही तर त्या वनाबाहेरील भागालाही संरक्षण मिळते.
केंद्राकडुन बक्कळ पैसा येतो. व्याघ्र प्रकल्पामुळे संरक्षित वनक्षेत्र वाढते, या भागांतील गावांचे पुर्नवसन, व्याघ्र प्रकल्पामधील विकास कामे लवकर पूर्ण होतात.
वनाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी मग वनअधिकारी, वनसंरक्षक, आवश्यक शस्त्र - वाहने यांची संख्या वाढते.
आणि अर्थात जंगलामधील वाघांबरोबर इतर वन्यप्राण्यांनाही संरक्षण मिळते.
व्याघ्र प्रकल्पासाठी आवश्यक घटक कोणता तर अर्थात वाघ
आणि वाघांची संख्या. राज्यात ताडोबा - अंधारी, पेंच, मेळघाट, सह्याद्री, नवेगाव - नागझिरा, बोर असे एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत आणि यामध्ये एकूण वाघांची संख्या 190 च्या घरात आहे. यापैकी ताडोबाचे क्षेत्रफळ 1757 चौरस किमी, महाराष्ट्रातील पेंच 741 चौरस किमी , मेळघाट 2768, सह्याद्री 1165, नवेगाव - नागझिरा 656 तर बोर या नव्यानेच स्थापन झालेल्या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ हे 138 चौरस किमी आहे. यापैकी नवेगांव राष्ट्रीय उद्यान हे 133 चौरस किमी आणि नागझिरा वन्यक्षेत्र हे 152 चौरस किमी आणि आजुबाजुचा भाग मिळून नवेगांव - नागझिरा व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे.
यापैकी पेंच, ताडोबा, सह्याद्री, मेळघाट व्याघ्र प्रकल्प सोडले तर नागझिरा, बोर हे दोन व्याघ्र प्रकल्प ओढूनताणुन केलेले वाटतात किंवा तसा निर्णय घेतलेला वाटतो. राज्यातही यापुढेही काही वन किंवा राष्ट्रीय उद्यानाचा भाग एकत्र करत व्याघ्र प्रकल्प करण्याचा विचार सुरू आहे. हा प्रयत्न काही गैर नाही. पण एखाद्या भागात काही वाघ आढळले तर थेट व्याघ्र प्रकल्प जाहिर करायचा याला काय म्हणायचे.
व्याघ्र प्रकल्पाचा फायदा कोणाला ?
अशा प्रकल्पांचा महत्वाचा फायदा हा ह़ॉटेल व्यावसायिकांना होतो. व्याघ्र प्रकल्प किंवा जवळच्या शहरांत हा व्यवसाय वाढतो. विशेषतः सुट्टीच्या काळात, सिझनच्या काळात हॉटेलचे भाव चढे ठेवले जातात.
पर्यटकांना ने-आण करणारा वाहतूक गाड्यांचा व्यवसाय जोमाने वाढतो. अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात.
हे सगळे करतांना पर्यटक खिसा सहज खाली करतो. कारण त्याला जंगल नाही, जंगलातील इतर प्राणी नाही तर वाघ बघायचा असतो. त्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार असतो.
साधारण 20 चौरस किमी एवढे एका वाघाचे क्षेत्रफळ असले तरी त्याचा संचार हा त्यापेेक्षा कितीतरी जास्त भागामध्ये असता. मात्र ज्या व्याघ्र प्रकल्पांचे कमी क्षेत्रफळ आहे असे नागझिरा - बोर हे ते किती वाघांना सामावून घेऊ शकणार हा प्रश्न आहे. छोट्या क्षेत्रफळामुळे त्या भागांत वाघ दिसणे ही निव्वळ अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण अशा छोट्या व्याघ्र प्रकल्पातून पर्यटकांना फिरण्यासाठी वाटा अत्यंत मर्यादित असतात. अशा ठिकाणी वाघ दिसणे हा एक योगायोग म्हणावा लागेल. त्यामुळे नागझिरा, बोर आणि हो पेंचमध्येही, अशा व्याघ्र प्रकल्पात वाघ बघण्यासाठी गेलेल्यांच्या हाती अनेकदा निराशा येते. मात्र या निमित्ताने वाघ बघण्याच्या नादात ( जंगलातील इतर वन्य प्राणी नाही ) पर्यटकाकडुन भरपूर पैसे खर्च झालेले असतात.
तेव्हा असे माझे मत झाले आहे की छोट्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये या व्याघ्र प्रकल्प या गोंडस नावाच्या खाली सुरू असलेली पर्यटकांची लुबाडणूक थांबवली पाहिजे. व्याघ्र प्रकल्प कशाला साध्या राष्ट्रीय उद्यानात, अभयारण्यात, वनामध्ये जंगल सफारी होऊ शकत नाही का, पर्यटकांना चांगली रहाण्याची सोय उपलब्ध होऊ शकत नाही का, जंगल बघण्याचा आनंद मिळु शकत नाही का.. असे प्रश्न मला पडतात. अर्थात यामध्ये पर्यटकांची मानसिकता बदण्याची गरज आहे. पर्यटकांना वाघ बघायला हवा असतो, मात्र व्याघ्र पर्यटन करताना जंगल सौंदर्याकडे दुर्लक्ष कऱणारी पर्यटकांची मानसिकता तेवढीच घातक आहे.
एवढंच नाही तर व्याघ्र प्रकल्पात खास करुन सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या, गाड्यांची संख्या अचानक वाढलेली असते, प्रमाणाबाहेर गेलेली असती, त्यामुळे जंगलाची शांतता भंग होते, वन्य प्राण्यांना त्रास होतो तो वेगळाच. पर्यटकांच्या संख्येबाबत, गाड्यांबाबत कसलेही तारतम्य बाळगले जात नाहीत. हा सगळा खटाटोप सुरु असतो तो फक्त वाघ बघण्यासाठी, जंगल नाही.
म्हणूनच आपल्या राज्यात पेंच, नागझिरा, बोर हे व्याघ्र प्रकल्प अट्टाहासाखाली सुरु झाले आहेत असे वाटते. त्यापेका साध्या वनांत, अभयारण्यात जंगल सफारी विकसित करणे आणि पर्यटकांची वाघ नाही तर जंगल बघण्याची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. अशा वेळी अनपेक्षितपणे वाघ दिसला तर त्याचा आनंद कदाचित जास्त असेल.
Tuesday, March 8, 2016
" लोणार विवर " दुर्लक्षाचा शाप मिळालेले एक जागतिक पर्य़टन स्थळ
महाराष्ट्रात पर्यटनाला आवश्यक असे काय नाही आहे. घनदाट जंगल आहे, विविध प्रकराच्या जंगलांचे प्रकार आहेत, व्याघ्र प्रकल्प आहेत, सुंदर असा समुद्र किनारा आहे, वाळवंट -ओसाड असा भाग आहेत, थंड हवेची ठिकाणे आहेत, नद्या आहेत, सुंदर अशी धऱणे, तलाव, पाणथळी आणि त्यापरिसरांत वसलेली पक्षी संपदा आहे, इतिहास सांगणारे किल्ले, मंदिरे, राजवाडे, बांधकामे आणि लेणी -शिल्पे आहेत. थो़ड़क्यात बर्फ - बर्फाच्छिदित भाग सोडला तर पर्यटनाला आवश्यक असलेली सर्व मानवनिर्मित, नैसर्गिक ठिकाणे - गोष्टी महाराष्ट्रात आहेत, असं निसर्ग सौदर्य देशातल्या बहुदा कोणत्याच राज्याकडे नसावे. अर्थात हे असल्यामुळे महाराष्ट्र राज्य पर्यंटनाच्या बाबतीत हे भारतात अग्रेसर आहे असं मात्र अजिबात नाहीये. हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या काही मोजक्या पर्यंटन स्थळांचा विकास झाला आहे तर बहुतेक सर्व पर्यटन स्थळांकडे दुर्लक्ष झाले आहे किंवा त्याचा पुरेसा विकास झालेला नाही.
यामध्ये आणखी एका अतिदुर्लक्षित पर्यटन स्थळाचे नाव
घ्यावे लागेल ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील, अशऩीच्या आघातामुळे तयार झालेले आणि जगात अस्तित्वात असलेल्या चारपैकी एक असे निसर्ग निर्मित " लोणार विवर ".
हेच विवर जर मध्यप्रदेश, कर्नाटक किंवा केरळ ,राजस्थानमध्ये असते तर त्या विवराचे आणि परिसराचे सोने केले असते असे दुर्देवाने म्हणावे लागेल, इतके दुर्लक्ष आपण या विवराकडे केले आहे.
बुलढाणा जिल्हयात दक्षिण बाजुला साधारण लोणार गावाला खेटून हे विवर आहे. खऱं तर विवराला खेटून आता छोटेखानी शहर वसले आहे असं म्हंटले पाहिजे. औरंगाबादपासून सुमारे 160 किमी, अकोलापासून 130 आणि बुलढाणापासून 100 किमी अंतरावर हे विवर आहे. साधारण 50 हजार वर्षापुर्वी ( किंवा त्याच्याही आधी ) साधारण 170 ते 200 फुट व्यास असलेली, तब्बल 2 कोटी टन वजनाची अशनी 20 किमी प्रति सेकंद या वेगाने आदळून हे विवर तयार झाल्याचा अंदाज आहे.
Thursday, November 26, 2015
पत्रकारीतेमधील " भटकंती "......
Tuesday, October 6, 2015
जबाबदारी विसरलेले "कडोंमपा"चे सुसंस्कृत नागरिक
जबाबदारी विसरलेले "कडोंमपा"चे सुसंस्कृत नागरिक
दर वेळी शहरांतील बकालपणा, अस्वच्छता, पायाभूत सोयीसुविधा नसणे, वाहतूक समस्या, यासाठी पालिका क्षेत्रातील राजकीय पक्ष, सत्ताधारी पक्ष आणि ( नेहमीच स्वत: ची कातडी वाचवणारे ) प्रशासन यांनाच जबाबदार धरले जाते. मात्र कडोमपातील सध्याच्या अधोगतीला स्वत: ला सुशिक्षित, सुसंस्कृत , मध्यमवर्गीय ( आता काही प्रमाणात उच्च मध्यमवर्ग ) समजले जाणारे नागरीकच जबाबदार आहेत असे म्हंटले तर चुकीचे होणार नाही. कारण धाक ठेवू शकणारा नागरीकांचा दबाव गट नावाचा प्रकारच सध्या कडोमपामध्ये अस्तित्वात नाहीत. किमान वडीलधा-यांनी डोळे वटारावेत आणि धाकामुळे सत्ताधा-यांनी ऐकावे अशीही आता परिस्थिती नाहीये.
मुंबई-पुणे, नाशिक किंवा काही मोजक्या ठिकाणी त्या भागांमध्ये सत्ताधारी आणि प्रशासन यांना धारेवर धरणारे नागरिकांचे गट - संस्था अस्तित्वात आहेत. अशा ठिकाणी एखादा मुद्दा नागरिकच रेटून थेट अंमलात आणायला लावतात. प्रशासन, सत्ताधारी यांनी काही चुका केल्या तर त्यावर रान उठवत निर्णय बदलायला किंवा निर्णय मागे घ्यायला भाग पाडतात. या सर्वांचा पूर्णपणे अभाव कडोमपामध्ये दिसत आहे.. नव्हे तो आहे.
युवा गट, माहिती अधिकाराचा वापर करणार गट ( ब्लैकमेलिंग वाला नाही ), ThinkTank चा गट, बैंकिंग -उद्योग- शिक्षण यामधील विचारवंत - अभ्यासु लोकं, वरिष्ठ नागरिकांचा गट, महिलांचे विविध गट..... असे गट पाहिजेत जे सत्ताधारी, प्रशासन यांच्या संपर्कात राहून पालिकेच्या भागातील निर्णयांमध्ये आपला सहभाग नोंदवतील, चुका सांगतील, चांगल्या निर्णयांचे खुल्या मनाने स्वागतही करतील. असे लोक, अशा संस्था कडोंमपा जरूर आहेत, पण पालिकेला हलवतील, कामाची दखल घ्यायला भाग पाड़तील अशी त्यांची मजल अजिबात नाही. किंबहुना यापैकी काही लोकं, संस्था या एखाद्या विचारसरणीला चिकटुन आहेत. त्यामुळे सक्षम असा नागरीकांचा मोठा दबाव गट कडोंमपा परिसरात तयारच झाला नाही.
त्यामुळेच सत्ताधारी आणि प्रशासन यांचे फावले आहे. विरोधकांनी आधी बेटकुळ्या दाखवल्या ख-या पण यांमधील हवा ही काही महिन्यांतच निघून गेली. कोणी जाब विचारणारा वडीलधारी नसल्याने, दबाव गट नसल्याने गेल्या पाच वर्षांनंतरही कडोंमपा ही आहे तिथेच राहिली आहे. आता काहीच मुठभर लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यामुळे चांगुलपणा टिकून राहिला आहे.
सध्या सेना-भाजप पुन्हा पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांवर - मुद्द्यांवर निवडणुका लढवत आहे. विरोधक म्हणून साफ अपयशी ठरलेले, कमजोर झालेल्या मनसे- कांग्रेस - राष्ट्रवादी या पक्षांना संधी मिळण्याची शक्यता अजिबात दिसत नाही.
निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण जोपर्यन्त डोंबिवलीपासून टिटवाळ्यापर्यन्त पसरलेल्या या कडोंमपामध्ये जाब विचारणारी नागरिकांची सक्षम यंत्रणा तयार होत नाही तोपर्यन्त निवडणुकांमध्ये या सुशिक्षित, मध्यमवर्गीय नागरिकांना गृहीतच धरले जाणार. कारण राजकीय पक्षांना पक्के माहीत आहे की लोकं जाणार कुठे, कोणाला मत देणार.....आम्हांलाच मत देणार.
तेव्हा नागरिकांनी उठा, जागे व्हा, संघटित व्हा अशी म्हणायची वेळ आली आहे.
Wednesday, September 23, 2015
सेलिब्रेशन मंगळयानाच्या यशाच्या वर्षपुर्तीचे..
इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला
#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...
-
#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...
-
#BrahMos #cruisemissile #indianarmedforces #Philippines #indonesia जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताची आणखी एक ओळख म...
-
नुकतीच एक जाहिरात एका मोबाईल कंपनीची टीव्हीवर झळकली होती. यामध्ये एक तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असते, तिला पत्ता माहित नसतो. तेव्हा ...


























