Friday, February 3, 2017

विनाशापासून फक्त 2.30 मिनिट जवळ...



Bulletin Of Atomic Scientist या अमेरिकेतील प्रसिद्ध मासिकने नुकतीच Dooomsday Clock या घडाळ्यातील वेळ अर्ध्या मिनिटाने घटवत 2.30 मिनिट पर्यंत नेली, म्हणजेच 12 ला 2.30 मिनिटे बाकी - इथपर्यंत मिनिट काटा आणून ठेवला. गेल्या 63 वर्षातील सर्वात निचांकी वेळ - स्थिती ठरली आहे. जगात राष्ट्रवादाबद्दल वाढत चाललेली अतिरेकी विचारसरणी, डोनाल्ड ट्रम्प यांनी अणू बॉम्बच्या शस्त्रसाठ्याबद्दल व्यक्त केलेले विचार आणि वातावरणातील बदल यावर शास्त्रज्ञांनी मांडलेल्या विचारांबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासकीय विभागांनी दाखवलेली असमर्थता... यामुळे doomsday clock हे आणखी अर्ध्या मिनिटाने कमी करत 12 च्या जवळ 2.30 मिनिट पर्यंत सरकवण्यात आले. हा एक जगाला मोठा धोका देणारा जणू भोंगाच या घडाळ्याने वाजवला असे म्हंटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

काय आहे doomsday clock ?
1945 ला अणुबॉम्बचा वापर प्रत्यक्ष युद्धात झाल्यावर आपण जगापूढे नेमके काय पान वाढून ठेवले आहे याचा साक्षात्कार - कल्पना - भान हे अणुबॉम्ब बनवणा-या Manhattan प्रकल्पामध्ये काम करणा-या काही शास्त्रज्ञांना आले. अणुऊर्जा नियंत्रणाबाहेर गेली तर काय होऊ शकते, या सुप्त ताकदीचे धोके काय आहेत हे प्रत्यक्ष लक्षात आल्यावर शास्त्रज्ञांना धक्काच बसला. एवढंच नाही तर अणुबॉम्ब तयार होण्याची अत्यंत खार्चीक प्रक्रिया, लागणारे उच्च प्रशिक्षित मनुष्यबळ, कालावधी यांमुळे एका शस्त्राबरोबरच तयार झालेल्या एका पांढरा अजस्त्र हत्तीच्या व्यापाची कल्पनाही आली.

तेव्हा या प्रकल्पातील काही शास्त्रज्ञ एकत्र आले आणि अणुऊर्जेबद्दल ( नव्या राक्षसाबद्दल ) ची माहिती समाजापूढे सोप्या वैज्ञानिक भाषेत ठेवावी असा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी bulletin of atomic scientist हे मासिक काढण्याचा निर्णय घेतला. 1947 च्या पहिल्याच अंकात या मासिकाच्या पृष्ठभागावर एक घड्याळ दाखवले ज्यामध्ये 12 च्या जवळ मिनिट काटा सात मिनिट अंतरावर दाखवण्यात आला.

याचा अर्थ हा की 12 वाजता सर्वनाश ( doomsday ) होणार आहे आणि यापासून जग हे 7 मिनिटे हे दूर आहे. त्यावेळी 1947 ला सुरु झालेले शीतयुद्ध,  तेव्हा अमेरिके सारख्या एकमेव देशाकडे असणारे जगातील सर्वात महाभयानक अणुबॉम्बचे अस्त्र, यांमुळे आक्रमक झालेली अमेरिका, अस्वस्थ सोव्हिएत रशिया...तेव्हा या सर्वांमुळे जग विनाशापासून 7 मिनिटे दूर असल्याचा सांकेतिक संदेश शास्त्रज्ञ या घडाळ्याच्या माध्यमातून देत होते, त्यांनी तो दिला.

खरं तर doomsday clock हे एक जागतिक संकटाची माहिती देणारे, जागतिक शांततेची / अशांततेची स्थिती दर्शवणारे एक प्रतिकात्मक घड्याळ आहे. या घड्याळ्यात 12 वाजता सर्वनाश होणार असे प्रतिकात्मक संगितले आहे. तर घडाळ्यातील मिनिट काटा 12 च्या म्हणजेच सर्वनाशाच्या किती जवळ येऊन ठेपला आहे, सर्वनाशाला किती वेळ बाकी आहे याची माहिती देतो.

bulletin of atomic scientist चे वैज्ञानीक वर्षातून दोनदा भेटतात आणि जागतिक परिस्थितीचा आढावा घेत मिनिट काट्याची स्थिती बदलवण्याबाबत निर्णय घेतात. किंवा एखादी घटना म्हणजे छोट्या युद्धासारखी घटना, 9/11 सारखा अतिरेकी हल्ला, जगावर प्रभाव टाकणा-या व्यक्तीचा मृत्यू.... अशा प्रमुख घटना लक्षात घेऊन मिनिट काट्याबाबत निर्णय घेतला जातो.


Doomsday Clock ची स्थित्यंतरे
1947 ला मिनिट काटा हा 12 या वळेपासून 7 मिनिट  
दूर होता म्हणजेच 12 ला 7 कमी होते. 1949 ला सोव्हिएत रशियाने घेतलेल्या पहिल्या अणूबॉम्ब चाचणीनंतर हा मिनिट काटा चार मिनिटांनी कमी करत 12 पासून 3 मिनिट अंतरापर्यंत आणून ठेवला. कारण जगात ख-या अर्थाने जगात शीतयुद्धाने जोर पकडला होता.

सूर्यामध्ये जी अणूस्पंदने होत अणूस्फोट होत असतात, तीच प्रक्रिया अमेरिकेने अणू बॉम्बच्या चाचणीद्वारे 1952 ला करून दाखवली . एवढेच नाही तर विविध क्षमतांच्या अणूबॉम्बच्या चाचण्यांची मालिका यशस्वी केली.  त्यामुळे पुन्हा एकदा doomsday clock एका मिनिटाने घटवत 2 मिनिट पर्यंत आणले गेले.  जग विनाशापासून 2 मिनिट वर येऊन ठेपले असा त्याचा अर्थ होता. या घड्याळानुसार जग धोक्याच्या पातळीवर सर्वात जवळ आले होते.

1962 चा क्युबाचा क्षेपणास्त्र पेचप्रसंग हा फक्त काही दिवसांत खरं तर तासांत संपला. जगाने सुटकेचा निश्वास टाकला.त्यामुळे घड्याळ बदवण्याची वेळच आली नाही.

अशी स्थित्यंतरे 1991 पर्यंत कमी अधिक प्रमाणात सुरु होती. 1991 ला सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्याने शीत युद्ध संपले आणि doomsday clock ने निश्वास टाकला आणि मिनिट काटा तब्बल 17 मिनिटवर येऊन स्थिरावला.  म्हणजेच 12 ला 17 मिनिटे कमी.

खरं तर शीत युद्ध संपल्याने अणू बॉम्ब / हल्ल्याची शक्यता संपल्यातच जमा होती. मात्र एव्हाना पर्यावरण बदलाचा नवा राक्षस जगासमोर येऊन ठेपला होता.

जागतिक पर्यावरण परिषदा, सत्ता गाजवू पहाणा-या राष्ट्रांच्या भूमिका, इंधनाचा वाढता वापर, बदलते हवामान, वारंवार येणारा दुष्काळ - पूर, या सर्वांमुळे प्रभावित होणारी अर्थव्यवस्था...यांमुळे bulletin of atomic scientist च्या शास्त्रज्ञांनी पर्यावरण हा विषय गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली आणि मग पुन्हा मिनिट काटा हा 12 च्या दिशेने सरकायला सुरुवात झाली.


सध्या घड्याळाचा मिनिट काटा कोठे आहे ??
जानेवारी 2017 ला अमेरिकेत सत्तांतर झाल्यावर bulletin of atomic scientist च्या वैज्ञानिकांनी घड्याळाची स्थिती ठरवण्याबाबत बैठक घेतली आणि मिनिट काटा हा आधीच्या वेळेने अर्धा मिनिट कमी करत 12 ला 2.30 मिनिट बाकी असतांना येऊन ठेवला.

1947 पासूनची ही दुस-या क्रमांकाची, 12 या वेळेपासून सर्वाधिक कमी वेळ असलेली स्थिती ठरली आहे.
याचा स्पष्ट अर्थ हा आहे की वाचाळ अशा डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ताग्रहण केल्यावर जग अधिकच संकटाच्या खाईत लोटले गेले आहे. हा संदेश तोही दस्तुरखुद्द अमेरिकेमधल्याच bulletin of atomic scientist या मासिकाने दिला आहे हे विशेष.


आता पूढे काय ??
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यावर पण शपध घेण्याच्या आधी डोनाल्ड महाशयांनी नौदलाची आणि अणू बॉम्ब साठ्याची संख्या वाढवणार असल्याचे जाहीरच करून टाकले. अमेरिकेच्या अवाढव्य नौदलाचा ताफा 250 वरून दुप्पट नेण्याचा मानस डोनाल्ड यांनी बोलून दाखवला. थोडक्यात त्यांची युद्धपिपासू भूमिकाच यावरून स्पष्ट झाली.

यामुळे जगात विचारवंत, बुद्धिजीव वर्गाच्या जवाबदारीमध्ये वाढ झाली आहे. जागतिक शांतता धोक्यात येणार अशी पावले - निर्णय डोनाल्ड आणि त्यांच्या टीमकडून उचलण्याआधी यांना रोखण्याचे आव्हान या लोकांसमोर असेल.

अतिरेकी राष्ट्रवाद तर अनेक ठिकाणी वाढत चालला आहे, मग भारतही यामध्ये मागे नाही. तेव्हा अशा राष्ट्रवादाला लगाम घालण्याची जवाबदारी त्या देशांतील नागरीकांचीही आहे.

पर्यावरणाचे भान राखतांना प्रगत राष्ट्रांकडून मागास राष्ट्रांवर थोपवले जाणारे अतिरेकी निर्णय ही सुद्धा एक नवीन समस्या निर्माण झाली आहे, त्यालाही पायबंद घालणे आवश्यक आहे.

तेव्हा 2.30 मिनिटांवर आलेला विनाश थोपवण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. धोंक्याची घंटा वाजवली गेली आहे....

Monday, January 16, 2017

पिनाक 2 / Pinaka 2 सज्ज


पिनाक 2 / Pinaka 2  सज्ज

स्वदेशी multi barrelled rocket launcher पिनाक 2 / Pinaka 2  सज्ज.

काही सेकंदात 12 रॉकेट ते सुद्धा 38 किमी अंतरापर्यंत फेकत काही चौरस किमीचा भाग पूर्ण उध्वस्त करणा-या पिनाक - 1 ची नवी आवृत्ती Pinaka - 2 लष्करात दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकत्याच चांदीपूर -  ओडीसा इथे नव्या पिनाक - 2 या नव्या आवृत्तीच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या.

पिनाक दोन / Pinaka - 2 ची वैशिष्ट्ये....

पिनाकची 2 च्या मारक क्षमतेचे अंतर आता दुप्पट म्हणजे सुमारे 76 किमी झाले आहे.

पिनाक 2 मधील रॉकेट हे गायडेड ( मार्गदर्शन करता येणारे ) असणार आहे , दिशा बदलवू शकणारे असणार आहे. म्हणजेच रॉकेटमध्ये एक छोटा कॉम्पुटर असणार जो गरज वाटल्यास रडारद्वारे संदेश घेत नियोजित लक्ष्याच्या मार्गावर असतांना दिशा बदलवू शकेल.

यामुळे समजा पिनाकमधून रॉकेटने लक्ष्याच्या दिशेने झेप घेतली आणि लक्ष्याने जागा बदलायला सुरुवात केली किंवा नवीनच लक्ष्य रडारवर आले तर हवेतल्या हवेत लक्ष्याच्या दिशेने जाणारे रॉकेट काही अंश कलत - दिशा बदलवत सुधारित लक्ष्याचा वेध घेऊ शकणार आहे.

तसंच पिनाक 2 मध्ये गरजेनुसार गायडेड रॉकेट्स आणि unguided रॉकेट्स एकत्र ठेवता येऊ शकतात.

एका पिनाकमधील 12 रॉकेट्स हे अवघ्या चार सेकंदमध्ये डागता येतात.

पिनाक हे अत्याधुनिक त्राता ( Trata ) वाहनावर आरूढ असून एका बॅटरीमध्ये पिनाकची 6 लौंचर्स असतात. म्हणजे समजा सहा पिनाकमधून एकाच वेळी प्रत्येकी 12 म्हणजेच एकूण 72 रॉकेट्स डागता येतात. यामुळे किती मोठा चौरस किमी क्षेत्र नेस्तनाबूत - नष्ट करता येऊ शकते याची आपण कल्पना करू शकता.

पिनाक हे पुण्यातील DRDO म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या Armament Research & Development Establishment, Pune (ARDE) या विभागाने पूर्णपणे  स्वबळावर विकसित आणि सिद्ध केलेले आहे.

अशा प्रकारचे अस्त्र प्रत्यक्ष युद्धात / surgical strike सारख्या हल्ल्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते यात शंका नाही.

लवकरच पिनाक 2 ची आवृत्ती लष्करात दाखल होणार आहे.

Sunday, October 2, 2016

धुमकेतूवरची स्वारी..........



30 सप्टेंबर 2016 हा सर्वसामान्यांसाठी नेहमीचा दिवस ठरला असेल मात्र अवकाश संशोधन करणा-या आणि या विषयात स्वारस्य असलेल्यांसाठी नक्कीच नाही. या दिवशी 67P/Churyumov–Gerasimenk या धुमकेतु भोवती, कुठलाही अडथळा न येता दोन वर्ष फिरणा-या युरोपियन स्पेस एजन्सीच्या रोसेटा Rosetta आणि या उपग्रहाने एकुण 12 वर्षाच्या मोहिमेची सांगता करतांना धुमकेतूला धडक देत पुर्णविराम घेतला. या घटनेच्या दोन महिने आधीच या धुमकेतूवर उतरलेल्या  Philae या छोटेखाली रोबोटने आपल्या सर्व यंत्रणा बंद करत निरोप घेतला होता. 

ही मोहिम म्हणजे चंद्रावर मानवाने ठेवलेल्या पहिल्या पाऊल इतकीच महत्त्वाची ठरली कारण एका धुमकेतू भोवती एक कृत्रिम उपग्रह फिरत धुमकेतूचा अभ्यास करत रहाणे, एवढंच नाही तर धुमकेतूवर छोटेखानी रोबोट उतरवणे आणि या दोन्ही गोष्टींमुळे धुमकेतूची आंतबार्ह्य माहिती समजण्यास मदत होणे ही गोष्टी मानवी इतिहासात मैलाचा दगड ठरावी अशीच झाली आहे.


निमित्त हॅलेच्या धमकेतुचे...

 1986 पर्यंत अमेरिका, तेव्हाची सेव्हिएत रशिया अवकाश
संशोधन आणि विविध प्रकारचे उपग्रह पाठवण्यात तरबेज झाले होते. य़ुरोपियन अवकाश संस्था आणि जपान  नुकतेच डोके वर काढु लागल्या होत्या.

आणि असं असतांना दर 76 वर्षांनी नियमित पृथ्वीजवळ येणारा हॅलेचा धुमकेतू ही सर्वांसाठी पर्वणीच ठरली. धुमकेतुच्या जगांत अगदी सर्वांना शाळेपासून माहिती असलेल्या हॅलेच्या धुमकेतूचे नाव घ्यावे लागेल, 1986 च्या सुमारास सुमारे 7 कोटी किलोमीटर अंतरावरुन दर्शन देत हॅले धुमकेतू त्याच्या मार्गाने निघुन गेला खरा पण यामुळे धुमकेतुच्या अभ्यासाची दालने धडाधड उघडी झाली.

1986 ची हॅले धमुकेतूची घटना ही अवकाश संशोधन करणा-यांसाठी एक सुवर्णसंधी ठरली होती. म्हणुनच की काय अमेरिका, सोव्हिएत रशिया, जपान आणि युरोपियन स्पेस एजन्सी या चारही संस्थांनी 1984 - 85 या कालावधीमध्ये हॅले धुमकेतूचा अभ्यास कऱण्यासाठी विविध उपग्रह सोडले. त्यामुळे जेव्हा हॅले धुमकेतू पृथ्वीच्या जवळून जात होता तेव्हा रशियाच्या दोन, जपानच्या दोन , युरोपियन स्पेस एजन्सीच्या एक आणि नासा - युरोपियन स्पेस एजन्सीने संयुक्तरित्या तयार केलेला एक उपग्रह अशा एकुण सहा उपग्रहाच्या उड्याच या धुमकेतूच्या दिशेने पडल्या आणि इतर वेळी दुर्बिणीतून दिसणा-या हॅलेबद्दल अतिशय जवळने जाणा-या त्या सहा उपग्रहांनी अभुतपुर्व अशी माहिती जमा केली.

यामध्ये 1986 ला  युरोपियन स्पेस एजन्सिच्या Giotto  या उपग्रहाने हॅले धुमकेतुपासून फक्त 596 किमी अंतरावरुन जात पहिल्यांदाच धुमकेतुची अतिशय जवळून छायाचित्रे घेतली.

त्यानंतर धुमकेतुच्या अभ्यासाचा जो सिलसिला सुरु झाला तो कायमच राहिला आहे.

नासाने 1999  महत्वकांक्षी अशी Stardust  मोहिम आखली. यामध्ये Stardust उपग्रहाने चार वर्षे प्रवास करत 81P/Wild  या धुमकेतुच्या 237 किमी अंतरावरुन प्रवास करत धुमकेतुपासून निघालेली धुळ ही अचुक टिपली आणि 2006 ला ती पृथ्वीवर सुखरुप पाठवली. अर्थात अतिशय सुक्ष्म कणांचा अभ्यास करत शास्त्रज्ञांना बहुमुल्य अशी माहिती मिळाली.

तर 2005 च्या नासाच्या मोहिमे कमालच केली. Deep Impact या उपग्रहाने Tempel 1 या धुमकेतूजवळ जात 230 किलो वजनाचा एक impactor किंवा एक वस्तु धुमकेतुवर आपटवली- आदळवली. दरम्यान या वस्तुवर कॅमेरा लावले होते. तेव्हा जस जशी ही वस्तु धुमकेतू जवळ पोहचली धुमकेतूची उत्कृष्ठ छायाचित्रे मिळाली. वस्तु अतिशय वेगाने आदळल्यावर मोठा खड्डा धुमकेतूमध्ये तयार झाला आणि अर्थात मोठ्या प्रमाणात धुलीकण हे बाहेर फेकले गेले. यानिमित्ताने धुमकेतुचा आंतरबार्ह्य अभ्यास करता आला.


रोसेटा - Rosetta

रोसेटा या उपग्रहाने तर कमालच केली, चांद्र विजयाएवढे भव्य काम करुन ठेवले.

2 मार्च 2004 ला युरोपियन स्पेस एजन्सीने
2900 किलो वजनाच्या रोसेटा नावाच्या उपग्रहाला 67P/Churyumov–Gerasimenk या धुमकेतुचा अभ्यास कऱण्यासाठी धाडले. 67P/Churyumov–Gerasimenk  हा धुमकेतू आपल्या सुर्यमालेच्या परिघामध्येच सुर्याभोवती प्रदक्षणा घालत असतो. या धुमकेतुच्या गाभ्याचा आकार काहीसा वेडावाकडा आहे, सुमारे 4 किमी त्याची जास्तीत जास्त जाडी असून 1.8 किमी ही रुंदी आहे.

67P/Churyumov–Gerasimenk  धुमकेतू 38 किमी प्रति सेकंद या वेगाने सुर्या भोवती लंबवुर्तळाकार प्रदक्षणा घालत असतो. तेव्हा या वेगापर्यंत जाण्यासाठी आणि धुमकेतू जवळ अचुक पोहचण्यासाठी रोसेटाने विविध ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण शक्तिचा आधार घेत वेग वाढवला. यासाठी रोसेटाने सर्वात आधी मार्च 2005 ला पृथ्वी, फेब्रुवारी 2007 ला मंगळ ग्रह, नोव्हेंबर 2007 ला पुन्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणचा फायदा घेत वेग वाढवला, दरम्यान वाटेत येणा-या दोन लघुग्रहांची छायाचित्रे घेतली, एवढंच नव्हे तर  Deep Impact मोहिमेतील  Tempel 1  धुमकेतुवर आदळवलेल्या वस्तुच्या टक्करीची घटनाही छायाचित्रबद्ध केली.

असा 10 वर्ष अथक प्रवास करत अखेर रोसेटा उपग्रहाने 67P/Churyumov–Gerasimenk या धुमकेतूला ऑगस्ट 2014 ला गाठले. तोपर्यंत रोसेटा आणि धुमकेतू हे पृथ्वीपासून 50 कोटी किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर होते. या मोहिमेची सुत्रे जर्मनीतून हलवली जात होती. विविध प्रकारे संदेश पाठवत रोसेटाचे अंतर कमी करत धुमकेतुच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत रोसेटाने प्रवेश केला आणि 100 बाय 50 किमी अशा लंबवर्तुळाकार कक्षेत धुमकेतु भोवती घिरट्या मारायला सुरुवात केली आणि धुमकेतुची छायाचित्र - माहिती पाठवायला सुरुवात केली. असा पराक्रम करणारे रोसेटा पहिला उपग्रह आणि युरोपियन स्पेस एजन्सी पहिली संस्था ठरली.

त्यानंनतर टप्प्याटप्प्याने उंची कमी करत रोसेटा आणखी धुमकेतुच्या जवळ गेले आणि अखेर 12 नोव्हेंबर 2014 ला या रोसेटावरील 100 किलो वजनाच्या Philae नावाचा रोबोट हा धुमकेतूवर अलगद अवरला ज्याला इंग्रजीत soft landing असे म्हणतात. रोबोट धुमकेतुवर उतरला खरा पण दोन गोलांट्या उड्या मारल्या आणि हा रोबोट सावली असलेल्या भागात पोहचला. बॅटरी असेपर्यंत या रोबोटने मानवी इतिहासात पहिल्यांदाच धुमकेतुच्या पृष्ठभागावरुन धुमकेतुची छायाचित्रे पाठवली. अखेर बॅटरी कमी झाल्यावर या रोबोटने संदेश देणे बंद केले. मात्र त्यानंतर काही दिवसांनतर रोबोटकडुनचे संदेश पुन्हा प्रस्थापित कऱण्यात शास्त्रज्ञांना यश आले.

तेव्हा अशा रितीने रोसेटा आणि त्या रोबोटचा धुमकेतुबद्दलचा अभ्यास जुलै 2016 पर्यंत सुरु होता. त्यानंतर रोबोटची बॅटरीची क्षमता कमी होत गेली आणि रोबोटची सिग्नल यंत्रणा शास्त्रज्ञांनी जड अंत;करणाने बंद केली. तोपर्यंत धुमकेतुबद्दल आवश्यक माहिती ही रोसेटा आणि रोबोटवरील संवेदकांच्या सहाय्याने आणि कॅमेराच्या सहाय्याने मिळाली होती.

रोबोट नंतर रोसेटा उपग्रहाला निरोप देण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि 30 सप्टेंबरपर्यंत रोसेटा उपग्रहाची उंची टप्प्याटप्प्याने कमी करत ते 67P/Churyumov–Gerasimenk  धुमकेतूवर आदळवण्यात आले आणि 12 वर्षाच्या मोहिमेची सांगता झाली. यामागे शास्त्रज्ञांचे अथक प्रयत्न, श्रम कारणीभूत होते जे 100 टक्के यशस्वी झाले.


हे सर्व कशासाठी ?...

पुरातन काळापासून ते अगदी आजही आकाशात अचानक अवतरत किमान काही दिवस दर्शन देणा-या धुमकेतूबद्दल भारतातच काय परदेशातही अंधश्रध्दा अजुनही मनांत कायमच्या ठाण मांडून आहेत. या अंधश्रद्धा अजुनही पुसल्या जात नाहीत हे विशेष.

मात्र धुमकेतूचा अभ्यास करणे म्हणजे विश्वाच्या निर्मितीचे तसंच विश्वात असलेल्या विविध मुलद्रव्यांचे अस्तित्व समजुन घेण्यासारखे आहे असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. पृथ्वीवर जन्मलेल्या जीवसृष्टीला धुमकेतू कारणीभूत आहे का, धुमकेतूमध्ये कोणते मुलद्रव्य आहेत, पाणी मग ते बर्फाच्या स्वरुपात आहे का अशा अनेक प्रश्नांचा शोध गेली अनेक वर्ष सुरु आहे. म्हणनुच गेल्या काही वर्षांपासून चंद्र, मंगळ , सुर्य किंवा इतर ग्रहांचा, लघुग्रहांचा अभ्यास करतांना धुमकेतुचाही अभ्यास करण्यावरही भर दिला जात आहे. कारण हे धुमकेतू कित्येक वर्ष अस्तित्वात आहेत, अनेक धुमकेतू हे सुर्यमालेबाहेरुन येतात आणि भेट देऊन कायमचे निघुन जातात. तर काही धुमकेतू आपल्या सुर्यमालेच्या परिघातच फिरत आहेत. तेव्हा मानवी उत्क्रांतीच्याच नव्हे तर विश्व निर्मितीच्या खाणाखूणा या धुमकेतूवर, धुमकेतूच्या निमित्ताने सापडतात का याचा शोध मानव घेत आहे.

आता तर जपान आणि अमेरिका - नासाने लघुग्रहावरील माती पृथ्वीवर परत आणणा-या मोहिमा आखल्या आहेत, तसे उपग्रह रवानाही केले आहेत. आता 2030 -35 पर्यंत चंद्रावर मानवी वसाहत कऱण्याच्या हालचाली नासाच्या सुरु झाल्या आहेत. तर मंगळावर पोहचण्यासाठी नासाने जोरदार मोर्चाबांधणी सुरु केलीये. थोडक्यात आता पृथ्वीबाहेर पाऊल ठेवण्यासाठी नव्हे तर वसाहत कऱण्यासाठी माणसाने पावले टाकायला सुरुवात केली आहे.

आजही लाखो वर्षे पृथ्वीवर संचार असुनही पृथ्वीवरील अनेक गोष्टींची माहिती अजुन मानवाला झालेली नाही त्याचा अविरत शोध - प्रयत्न अजुनही सुरुच आहेत. तेव्हा अवकाशाच्या अनंत अशा पोकळीत, या पोकळीतील ग्रहांवर पाऊल टाकतांना मानवाला अनेक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तेव्हा धुमकेतुचा अभ्यास, धुमकेतुवर रोबोट उतरवणे ही यामध्ये महत्त्वाची हनुमान उडी ठरणार आहे. म्हणनुच रोसेटा - Rosetta मोहिमेचे महत्व अनन्य साधारण आहे.

Friday, May 13, 2016

एका पर्वाची अखेर - सी हैरियर




लढाऊ विमान म्हंटले की मोठी धावपट्टी आणि धावपट्टीवरुन गगनभेदी आवाज करत उड्डाण घेणारे लढाऊ विमान अनेकांनी बघितले असेलच. मात्र एक असे एक लढाऊ विमान आहे खऱं तर होते असे म्हणावे लागले की ते जागेवरुनच हवेत झेप घेऊ शकत होते, तसंच जमिनीवर उतरू शकत होते. या विमानाला धावपट्टीची आवश्यकता नव्हती. 

हो असे विमान म्हणजे सी हॅरियर. अमेरिका -इंग्लंड यांनी संयुक्तरित्या विकसित केलेले लढाऊ विमान नुकतेच भारतीय नौदलाच्या ताफ्यातून निवृत्त झाले. आयएनएस हंसा या गोव्यातील विमानतळावर सी हॅरियर विमानांचा तळ होता. INAS 300 असा या सी हॅरियरच्या ताफ्याचा ओळख क्रमांक होता. सी हॅरियर लढाऊ विमनांना सन्मानाने अखेरचा निरोप देण्यात आला. त्याची जागा आता जगात अतिशय ताकदीच्या समजल्या जाणा-या Mig -29 K या लढाऊ विमानाने घेतली आहे. सी हैरियरच्या निमित्ताने भारतात एका लढाऊ विमानाचे एक पर्व संपले असे म्हणायला हरकत नाही. 

आपण इंग्लडकडुन सेकंड हॅन्ड म्हणजेच इंग्लंडच्या नौदलाने वापरलेली 23,000 टन वजनाची एचएमएस हर्मिस ही विमानवाहू युद्धनौका 1983 ला विकत घेतली. तिचे नामकरण आपण आयएनएस विराट असे केले. या युद्धनौकांवर नवे तंत्रज्ञान असलेली लढाऊ विमाने ठेवण्याचा निर्णय आपण घेतला आणि अत्यंत वैशिष्ट्युपुर्ण रचना असलेली सी हॅरियर लढाऊ विमाने आपण विकत घेतली.  





सी हॅरियर - 1960 च्या दशकांत काम लढाऊ विमानाचे पण उड्डाण हेलिकॉप्टरसारखे असे विमान तयार करण्याचे प्रयत्न काही देशांमध्ये सुरु होते. काही देशांनी अशा पद्धतीचे प्रायोगिक विमान बनवलेही.मात्र त्याचे स्वरुप हे प्रायोगित विमानांपुरतेच राहीले. मात्र अमेरिका आणि इंग्लंड यांनी संयुक्तिकरित्या सी हॅरियर हे लढाऊ विमान नुसते बनवले नाही तर त्याचे तंत्रज्ञान यशस्वी करुन दाखवले. दोन्ही देशांच्या संरक्षण दलात ते मोठ्या संख्येने दाखलही झाले. यामुळे भारतासारख्या काही देशांनी अशी लढाऊ विमाने विकतच घेतली.

सी हॅरियर ज्या पद्दतीने काम करु शकते ते बघणे -माहित करुन घेणे  
काहीसे मनोरंजक आहे. लढाऊ विमानाच्या ज्या भागातून इंधनाद्वारे वापरलेली ऊर्जा बाहेर फेकली जाते तो विमानाचा भाग हव्या त्या दिशेला वळवता येईल असे तंत्रज्ञान या लढाऊ विमानात आहे. त्यामुळे सी हॅरियर ज्या ठिकाणी उभे असते त्याच ठिकाणाहून सी हॅरियर त्याचे इंजिन पुर्ण ताकदीने सुरु करत हवेत वर उचलेले जाते आणि मग उर्जा बाहेर पडणारा इंजिनाचा मागचा भाग हव्या त्या दिशेला वळवून सी हॅरियर हवेत सुर मारत संचाराला सुरुवात करते. तसंच जेव्हा जमिनीवर उतरायचे असेल तेव्हा याच पद्धीतीने सी हॅरियर जमिनीवर उतरु शकते. अर्थात या दोन्ही प्रक्रियेमध्ये सी हॅरियरचे इंधन मात्र जरा जास्त वापरले जाते.

विशेष म्हणजे विमानवाहू युद्धनौका ज्या ठिकाणी लढाऊ विमानांसाठी धावपट्टी ही काही मीटर म्हणजे जेमतेम 100 मीटर लांबीची असते अशा ठिकाणी सी हॅरियर हा एक उत्तम पर्याय ठरला आहे. म्हणूनच इंग्लंड, भारत, स्पेन, थायलंड आणि अमेरिका यांच्या नौदलांनी हे वैशिष्टयपुर्ण असे लढाऊ विमान वापरले. 

लढाऊ विमान हे ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने प्रवास करु शकते. मात्र सी हॅरियरचा हा तेवढा वेग गाठू शकत नसले तरी एका दमात 2500 किमीपर्यंत अंतर कापण्याची सी हॅरियरची क्षमता होती. इतर लढाऊ विमानांपेक्षा सी हॅरियरचा वेग काहीसा कमी असल्यानं समुद्रात टेहेळणी, नौदलाच्या ताफ्यांचे संरक्षण, बॉम्बफेक कऱण्यासाठी अशा मोहिमांसाठी सी हॅरियरचा हमखास वापर केला गेला. 
इंग्लंडचे अर्जेंटिना विरुद्धची फॉकलंड बेटची लढाई, दोन्ही आखाती युद्धांमध्ये, युगोस्लावियाच्या युद्धात या सी हॅरियरचा चांगलाच वापर केला गेला, सी हॅरियरने चांगली कामगिरी बजावली.
अर्थात काळाच्या ओघात सी हॅरियरचे तंत्रज्ञान जुनाट झाले होते. आपल्याकडे 26 सी हॅरियर नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली होती. यापैकी तब्बल डझनभर सी हॅरियरना अपघातांना सामोरे जावे लागले. तसंच नौदलाच्या गरजा बदलल्या, नवे तंत्रज्ञान असलेल्या विमानवाहू युद्धनौका आल्या, पुढच्या काळात येणार आहेत. त्यामुळे सी हॅरियरना निरोप देण्यात आला आहे.
सध्या फक्त अमेरिकेच्या मरिन कॉर्प्समध्ये सी हॅरियर सेवेत आहेत. तेही काही महिन्यांत बाद होणार आहेत. या सी हॅरियरची जागा आता तशाच पद्धतीचे काम करणाारे अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचें, स्टेल्थ रचना असलेले F-35 हे लढाऊ विमान घेत आहे.   

असं असलं तरी वैशिष्ट्यपुर्ण क्षमतेमुळे, त्या पद्धतीचे पहिले ठरलेले लढाऊ विमान सी हैरियर काहीसे वेगळे ठरते आणि म्हणुनच यापुढच्या काळातही ते लक्षात राहिलं. 

जाता जाता सी हैरियरच्या करामती दाखवणारे हे दोन विडीयो... https://goo.gl/mGXxJ5 आणि https://goo.gl/6paeJD



Thursday, March 24, 2016

व्याघ्र प्रकल्प....एक फार्स ???



व्याघ्र प्रकल्प एक फार्स......म्हणजे व्याघ्र प्रकल्प नकोत का असा त्याचा अर्थ नव्हे.  तर एखादे वन किंवा अभायरण्य अट्टहासाने व्याघ्र प्रकल्प म्हणुन जाहिर करायचे आणि जंगल नव्हे तर वाघ बघायला येणा-या पर्यटकांचा लोंढा वाढवायचा आणि सर्व व्यवस्थेने मिळुन बक्कळ पैसा कमवायचा याला विरोध आहे. म्हणुनच काही मुद्दे मांडावयासे वाटतात.


व्याघ्र प्रकल्प का आवश्यक आहेत, किंवा व्याघ्र प्रकल्पांमुळे काय साध्य होते....

सर्वात महत्वाचे म्हणजे व्याघ्र प्रकल्प जाहिर झाल्यावर वन विभागाचे नियम अधिक कडक होतात आणि त्या वनाचेच नाही तर त्या वनाबाहेरील भागालाही संरक्षण मिळते.

केंद्राकडुन बक्कळ पैसा येतो. व्याघ्र प्रकल्पामुळे संरक्षित वनक्षेत्र वाढते, या भागांतील गावांचे पुर्नवसन, व्याघ्र प्रकल्पामधील विकास कामे लवकर पूर्ण होतात.

वनाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी मग वनअधिकारी, वनसंरक्षक, आवश्यक शस्त्र - वाहने यांची संख्या वाढते.

आणि अर्थात जंगलामधील वाघांबरोबर इतर वन्यप्राण्यांनाही संरक्षण मिळते.


व्याघ्र प्रकल्पासाठी आवश्यक घटक कोणता तर अर्थात वाघ
आणि वाघांची संख्या. राज्यात ताडोबा - अंधारी, पेंच, मेळघाट, सह्याद्री, नवेगाव - नागझिरा, बोर असे एकूण सहा  व्याघ्र प्रकल्प आहेत आणि यामध्ये एकूण वाघांची संख्या 190 च्या घरात आहे.  यापैकी ताडोबाचे क्षेत्रफळ 1757 चौरस किमी, महाराष्ट्रातील पेंच 741 चौरस किमी , मेळघाट 2768, सह्याद्री 1165, नवेगाव - नागझिरा 656 तर बोर या नव्यानेच स्थापन झालेल्या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ हे 138 चौरस किमी आहे. यापैकी नवेगांव राष्ट्रीय उद्यान हे 133 चौरस किमी आणि नागझिरा वन्यक्षेत्र हे 152 चौरस किमी आणि आजुबाजुचा भाग मिळून नवेगांव - नागझिरा व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे.

यापैकी पेंच, ताडोबा, सह्याद्री, मेळघाट व्याघ्र प्रकल्प सोडले तर नागझिरा, बोर हे दोन व्याघ्र प्रकल्प ओढूनताणुन केलेले वाटतात किंवा तसा निर्णय घेतलेला वाटतो. राज्यातही यापुढेही काही वन किंवा राष्ट्रीय उद्यानाचा भाग एकत्र करत व्याघ्र प्रकल्प करण्याचा विचार सुरू आहे. हा प्रयत्न काही गैर नाही. पण एखाद्या भागात काही वाघ आढळले तर थेट व्याघ्र प्रकल्प जाहिर करायचा याला काय म्हणायचे.

व्याघ्र प्रकल्पाचा फायदा कोणाला ?

अशा प्रकल्पांचा महत्वाचा फायदा हा ह़ॉटेल व्यावसायिकांना होतो. व्याघ्र प्रकल्प किंवा जवळच्या शहरांत हा व्यवसाय वाढतो. विशेषतः सुट्टीच्या काळात, सिझनच्या काळात हॉटेलचे भाव चढे ठेवले जातात.

पर्यटकांना ने-आण करणारा  वाहतूक गाड्यांचा व्यवसाय जोमाने वाढतो. अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात.

हे सगळे करतांना पर्यटक खिसा सहज खाली करतो. कारण त्याला जंगल नाही, जंगलातील इतर प्राणी नाही तर वाघ बघायचा असतो. त्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार असतो.

साधारण 20 चौरस किमी एवढे एका वाघाचे क्षेत्रफळ असले तरी त्याचा संचार हा त्यापेेक्षा कितीतरी जास्त भागामध्ये असता.  मात्र ज्या व्याघ्र प्रकल्पांचे कमी क्षेत्रफळ आहे असे नागझिरा - बोर हे ते किती वाघांना सामावून घेऊ शकणार हा प्रश्न आहे. छोट्या क्षेत्रफळामुळे त्या भागांत वाघ दिसणे ही निव्वळ अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण अशा छोट्या व्याघ्र प्रकल्पातून पर्यटकांना फिरण्यासाठी वाटा अत्यंत मर्यादित असतात. अशा ठिकाणी वाघ दिसणे हा एक योगायोग म्हणावा लागेल. त्यामुळे नागझिरा, बोर आणि हो पेंचमध्येही, अशा व्याघ्र प्रकल्पात वाघ बघण्यासाठी गेलेल्यांच्या हाती अनेकदा निराशा येते. मात्र या निमित्ताने वाघ बघण्याच्या नादात ( जंगलातील इतर वन्य प्राणी नाही ) पर्यटकाकडुन भरपूर पैसे खर्च झालेले असतात.

तेव्हा असे माझे मत झाले आहे की छोट्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये या व्याघ्र प्रकल्प या गोंडस नावाच्या खाली सुरू असलेली पर्यटकांची लुबाडणूक थांबवली पाहिजे. व्याघ्र प्रकल्प कशाला साध्या राष्ट्रीय उद्यानात, अभयारण्यात, वनामध्ये जंगल सफारी होऊ शकत नाही का, पर्यटकांना चांगली रहाण्याची सोय उपलब्ध होऊ शकत नाही का, जंगल बघण्याचा आनंद मिळु शकत नाही का.. असे प्रश्न मला पडतात. अर्थात यामध्ये पर्यटकांची मानसिकता बदण्याची गरज आहे. पर्यटकांना वाघ बघायला हवा असतो, मात्र व्याघ्र पर्यटन करताना जंगल सौंदर्याकडे दुर्लक्ष कऱणारी पर्यटकांची मानसिकता तेवढीच घातक आहे.

एवढंच नाही तर व्याघ्र प्रकल्पात खास करुन सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या, गाड्यांची संख्या अचानक वाढलेली असते, प्रमाणाबाहेर गेलेली असती, त्यामुळे जंगलाची शांतता भंग होते, वन्य प्राण्यांना त्रास होतो तो वेगळाच. पर्यटकांच्या संख्येबाबत, गाड्यांबाबत कसलेही तारतम्य बाळगले जात नाहीत. हा सगळा खटाटोप सुरु असतो तो फक्त वाघ बघण्यासाठी, जंगल नाही.

म्हणूनच आपल्या राज्यात पेंच, नागझिरा, बोर हे व्याघ्र प्रकल्प अट्टाहासाखाली सुरु झाले आहेत असे वाटते. त्यापेका साध्या वनांत, अभयारण्यात जंगल सफारी विकसित करणे आणि पर्यटकांची वाघ नाही तर जंगल बघण्याची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. अशा वेळी अनपेक्षितपणे वाघ दिसला तर त्याचा आनंद कदाचित जास्त असेल. 

Tuesday, March 8, 2016

" लोणार विवर " दुर्लक्षाचा शाप मिळालेले एक जागतिक पर्य़टन स्थळ



महाराष्ट्रात पर्यटनाला आवश्यक असे काय नाही आहे. घनदाट जंगल आहे, विविध प्रकराच्या जंगलांचे प्रकार आहेत, व्याघ्र प्रकल्प आहेत, सुंदर असा समुद्र किनारा आहे, वाळवंट -ओसाड असा भाग आहेत, थंड हवेची ठिकाणे आहेत, नद्या आहेत, सुंदर अशी धऱणे, तलाव, पाणथळी आणि त्यापरिसरांत वसलेली पक्षी संपदा आहे,  इतिहास सांगणारे किल्ले, मंदिरे, राजवाडे, बांधकामे आणि लेणी -शिल्पे आहेत. थो़ड़क्यात बर्फ - बर्फाच्छिदित भाग सोडला तर पर्यटनाला आवश्यक असलेली सर्व मानवनिर्मित, नैसर्गिक ठिकाणे - गोष्टी महाराष्ट्रात आहेत, असं निसर्ग सौदर्य देशातल्या बहुदा कोणत्याच राज्याकडे नसावे. अर्थात हे असल्यामुळे महाराष्ट्र राज्य पर्यंटनाच्या बाबतीत हे भारतात अग्रेसर आहे असं मात्र अजिबात नाहीये. हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या काही मोजक्या पर्यंटन स्थळांचा विकास झाला आहे तर बहुतेक सर्व पर्यटन स्थळांकडे दुर्लक्ष झाले आहे किंवा त्याचा पुरेसा विकास झालेला नाही.

यामध्ये आणखी एका अतिदुर्लक्षित पर्यटन स्थळाचे नाव
घ्यावे लागेल ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील, अशऩीच्या आघातामुळे तयार झालेले आणि जगात अस्तित्वात असलेल्या चारपैकी एक असे निसर्ग निर्मित " लोणार विवर ".

हेच विवर जर मध्यप्रदेश, कर्नाटक किंवा केरळ ,राजस्थानमध्ये असते तर त्या विवराचे आणि परिसराचे सोने केले असते असे दुर्देवाने म्हणावे लागेल, इतके दुर्लक्ष आपण या विवराकडे केले आहे.

बुलढाणा जिल्हयात दक्षिण बाजुला साधारण लोणार गावाला खेटून हे विवर आहे. खऱं तर विवराला खेटून आता छोटेखानी शहर वसले आहे असं म्हंटले पाहिजे. औरंगाबादपासून सुमारे 160 किमी, अकोलापासून 130 आणि बुलढाणापासून 100 किमी अंतरावर हे विवर आहे. साधारण 50 हजार वर्षापुर्वी ( किंवा त्याच्याही आधी ) साधारण 170 ते 200 फुट व्यास असलेली, तब्बल 2 कोटी टन वजनाची अशनी 20 किमी प्रति सेकंद या वेगाने आदळून हे विवर तयार झाल्याचा अंदाज आहे.

ब्रिटीश अधिकारी जे ई अलेक्झांडर या इंग्रजी - लष्करी अधिका-याने 1823 मध्ये हजारो वर्षापुर्वी तयार झालेल्या या विवराचा शोध लावला. प्रत्यक्ष लोणार विवराचा परिघ हा सुमारे आठ किलोमीटर आहे तर सर्व बाजुंनी 60 ते 70 अंश उतार असलेल्या विवरामध्ये 100 मीटर उतल्यावर साधारण चार किलोमीटरचा परिघ असलेले आणि समुद्राच्या पाण्यापेक्षा काही पट खारे असलेले खा-या पाण्याचे सरोवर आहे. या विवराची खोली सुमारे 150 मीटर आहे तर प्रत्यक्ष सरोवराची खोली काही मीटर म्हणजे 5-6 मीटर आहे. 

या विवरामध्ये सरोवरच्या परिसरांत चांगले वन- जंगल असून या सान्निध्यात 12 पुरातन म्हणजे किमान हजार वर्षापुर्वी बांधलेली 12 अप्रतिम शिल्पाकृती मंदिरे भले मोडकळीला आलेली का असेना पण ऊन वारा खात अजूनही तग धरून आहेत.    

अग्निजन्य खड़कातील या विवरामध्ये विविध प्रकारच्या क्षारची अगदी रेलचेल आहे. या भागातील क्षार, या भागात असणारे जीवाणु, झाडे, प्राणी संपत्ती हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरू शकेल एवढी संपन्नता या विवरामध्ये आहे.

लोणार विवर, यामधील सरोवर आणि विवरामध्ये सरोवराच्या काठावर असलेली मंदिरे या व्यतिरिक्त लोणार गावांमध्ये काही ठिकाणे ही न चुकता भेट द्यायला पाहिजेत अशी आहेत.

लोणार विवराकड़े येणारा पाण्याचा एकमेव धावता स्त्रोत म्हणजे " धार " नावाचे ठिकाण जे गावाच्या वेशिवर लोणार विवराच्या एका बाजूला आहे. हे धार ठिकाण अप्रतिम मंदिर आणि शिल्पांनी बांधून टाकले गेले आहे.

आवर्जून पहावे असे लोणार गावांतील दैत्यसूदन मंदिर. चालुक्य काळात 12 व्या शतकांत हे मंदिर बांधले गेले असावे असा अंदाज आहे. मंदिरात प्रखर अशा नजरेची विष्णुची मूर्ति असून संपूर्ण मंदिर हे शिल्पांनी सजलेले आहे. विशेष म्हणजे मैथुन शिल्पेही या ठिकाणी पहायला मिळतात. या मंदिराचे वर्णन , अभ्यास हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल इतके हे मंदिर अप्रतिम आहे.

मोठा मारोती. गावाच्या बाहेर साधारण 9 फुट लांबीच्या झोपलेल्या म्हणजे आडवा असलेल्या हनुमान मंदिराचे ठिकाण आहे. खरं तर या ठिकाणाला धार्मिक स्थळाचे स्वरूप प्राप्त झाले असले तरी हनुमान मूर्तिचा दगड किंवा तो परिसर विशेष चुंबकीय क्षेत्र दाखवतो. लोणार विवराच्या आघाताच्या वेळी चुंबकीय गुणधर्म असलेल्या अशनीचा काही भाग हा सध्या हे मंदिर असलेल्या ठिकाणी जाऊन पडला असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

हिंदू, जैन, मोगल, मराठा आणि इंग्रज अशा विविध शासकांचे राज्य या लोणारमध्ये गेल्या हजार शतकांपासून होते. त्यामुळे त्या त्या राज्यकर्त्यांच्या खुणा या शिल्पे, मंदिरे आणि बांधकामांच्या स्वरुपात लोणार कमी अधिक प्रमाणात अस्तित्वात आहेत.

मग एवढ़या सगळ्या गोष्टि असतांना लोणारमध्ये पर्यटक खो-याने येत असतील आणि त्यांच्यासाठी सोयीसुविधा असतील असे आपल्याला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे.



लोणार विवराच्या बाबतीत पर्यटकांच्या दृष्टिने काय कमतरता आहेत...

1... सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोणार विवर हे महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर आहे का असा प्रश्न पडतो, त्याची प्रसिद्धि झाली आहे का अशी शंका घ्यायला जागा आहे, कारण याची माहितीच नाही अशी परिस्थिति आहे. किंवा अशनी अघातामुळे तयार झालेले विवर यापलीकडे याची तोंड ओळख देखील कोणाला नाही.

2...लोणारकड़े येणारे रस्ते कमी अधिक प्रमाण म्हणजे साधारण असा दर्जा राखून आहेत.

3...लोणार गावांत विवराबद्दल माहिती कुठे मिळेल, गाईड कुठे मिळेल याची चौकशी करावी लागते.

4...विवराबद्दल शास्त्रोक्त आणि परिसरातील इतिहासाबद्दल माहिती देणारी पुस्तिका मिळत नाही. MTDC त्यांच्या हॉटेलमध्ये रंगीत अशी थ्री फोल्ड मिळते. त्यामध्ये तर लोणार विवर आणि परिसराबद्दल अत्यंत त्रोटक अशी माहिती आहे.

5... प्रत्यक्ष लोणार विवर बाहेरून बघण्यासाठी,लोणार view साठी 
काही भाग - जागा मुद्दामुन विकसित करायला पाहिजेत. त्याचा अभाव आहे.

6...लोणार विवरामध्ये उतरण्यासाठी एकमेव वाट - मार्ग आहे. तो दगडांनी बांधलेला होता पण आता नसल्यातच जमा आहे. तेव्हा balance चे कौशल्य आजमावत खाली उतरावे लागते.

7...प्रत्यक्ष विवराच्या ठिकाणी जातांना माहिती देणा-या फलकांचा अभाव आहे.

8....विवरामध्ये वाटेचा शेवटचा टप्पा तर भूस्खलन झाल्याने गायब आहे. म्हणजे मातीच्या ढिगा-यावरुनच आपण खाली उतरतो.

9...विवरामधील सरोवराच्या काठावर मोडकळीस आलेल्या पण अप्रतिम शिल्पाकृति असलेल्या 12 मंदिराची माहिती कुठेही नाही.

10...लोणार गावांतील मंदिर - शिल्पाकृति बघण्यासाठी माहिती फलक आणि दिशादर्शक फलकांचा अभाव आहे.

11....लोणार गावांमध्ये किंवा किमान लोणार विवराच्या बाजूला असलेल्या लोकवस्तीमध्ये हागणदारी मुक्त, स्वच्छ अभियान वगैरे राबवण्याची नितांत आवश्यकता आहे.

12.... अगदी महत्त्वाचे म्हणजे लोणार विवराबद्दल गावातील लोकांना आस्था आहे का असा प्रश्न हा सर्व परिसर फिरल्यावर पडतो. जर आस्था असती तर हा परिसर शासनाच्या मदतीशिवाय कधीच सुशोभित आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयी सुविधांसह केव्हाच विकसित झाला असता.

तेव्हा लोणारच्या बाबतीत महाराष्ट्राने कर्मदरिद्रीपणा दाखवला आहे असं म्हंटले तर ते चुकीचे ठरणार नाही. म्हणूनच जागतिक पर्यटन स्थळ होईल अशी क्षमता असतांनाही लोणार विवर दुर्लक्षित राहिले आहे असेच म्हणावे लागेल.





Thursday, November 26, 2015

पत्रकारीतेमधील " भटकंती "......






" जे न देखे रवी ते देखे कवि " असे म्हणतात, यामध्ये थोडीशी सुधारणा करत एक पत्रकार म्हणून म्हणावे लागेल " जे न देखे जनी ते देखे आम्ही ". खरं तर सर्वसामान्यांना जेथे शिरकाव करता येणार नाही, जाता येणार नाही, कल्पनाही करता येणार नाही तेथे जाण्याची, अनुभव घेण्याची संधी पत्रकारांना मिळते. कारण हे क्षेत्रच असे आहे की बातमीच्या निमित्ताने असा विनासाय प्रवेश सहज पदरांत पडतो. त्यातच न्यूज़ चैनलमध्ये काम करत असल्याने फील्ड वर्क हे अनिवार्य ठरते. कारण कैमेरामनसह घटनेच्या ठिकाणी पोहचणे, घडलेल्या घडामोडींचा वृत्तांत दृश्यांसह चैनेलच्या माध्यमातून लोकांपर्यन्त पोहचवणे किंवा विशेष कार्यक्रम करत ती घटना, बातमीचा गर्भितार्थ दाखवणे हे आलंच. न्यूज़ चैनेल हे दृकश्राव्य माध्यम आसल्याने त्याची ताकद, प्रभाव अर्थात मोठा आहे. त्यामुळे वृत्तपत्र, मासिक या माध्यमांपेक्षा न्यूज़ चैनलमधून पत्रकारीता करतांना “ भ्रमंती “ ही काहीशी जास्तच ठरलेली आहे, मग पत्रकारांच्या भाषेत कोणतेही बीट ( विषय ) का असेना.

संरक्षण हा विषय आधीपासून आवडता असल्याने आणि वरिष्ठांनी विश्वास टाकल्याने संरक्षण विषय बातम्या कव्हर करायची संधी पत्रकारीता सुरु केल्यापासूनच मिळाली. संरक्षण क्षेत्रातील घडामोडी कव्हर करण्यासाठी खरं तर दिल्ली हे सर्वात उत्तम ठिकाण. पण मुंबईमध्ये काम करत असल्याने पश्चिम नौदलाचे मुख्यालय असलेल्या मुंबई आणि परिसरातील नौदलाच्या घडामोडी अनेकदा कव्हर करण्याची संधी मिळाली.

या निमित्ताने 2007 च्या जानेवारीमधील INS Viraat मध्ये रहाण्याची आणि प्रवास करण्याची मिळालेली संधी स्वप्नवत् अशीच होती.

प्रणव मुखर्जी यांच्याकडून ए के ऍंथोनी यांनी संरक्षण मंत्रीपदाचा भार स्वीकारुन काही आठवडे झाले होते. जानेवारी 2007मध्ये ऍंथोनी नौदल सामर्थ्याचा आढावा घेणार होते. आम्ही पत्रकार गोव्यात पोहचलो. दुस-या दिवशी कारवारच्या भव्य नौदल तळावर पोहचलो. ( भविष्यात आशियातील सर्वात मोठा नौदल तळ ). या ठिकाणी पोटात काही रणगाडे आणि सैनिक वाहून नेण्याची क्षमता असलेल्या INS Shardul या landing warship ( किना-यावर सैन्य उतरवण्याची क्षमता असलेली युद्धनौका ) चा नौदलात दाखल करण्याचा कार्यक्रम संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला.

त्यानंतरचा प्रवास , घड़ामोडी या स्वप्नवत अशाच होत्या. या नौदलाच्या तळावरच्या " सी किंग " या नौदलाच्या हेलीकॉप्टमध्ये बसलो आणि तब्बल 40 मिनिटे प्रवास करत भर समुद्रात INS Viraat वर उतरलो. तेव्हा गोव्यासमोरच्या खोल समुद्रात कोठेतरी होतो. दुपार झाली होती.

जमिनीवर हेलिकॉप्टरने उतरणे आणि समुद्रात युद्धनौकेवर उतरणे यात जमीन आस्मानचा फरक आहे. कारण काहीसा वेग पकडलेली युद्धनौका समुद्रात काही प्रमाणात का होईना हेलकावे खात असते. म्हणजेच जिथे हेलिकॉप्टरला उतरावयाचे आहे तो प्लेटफॉर्म अस्थिर असतो. त्यातच वारा हा हेलिकॉप्टरचे गणित चुकवु शकतो. तेव्हा हेलिकॉप्टर पायलटची चांगलीच कसोटी लागत असते.

आणि काहीसे तसेच झाले. जेव्हा हेलिकॉप्टर विराटवर उतरणार होते तेव्हा वा-याची दिशा आणि वेग बदलला आणि त्यामुळे पायलटने काही मीटर उंचीवरुन उतरण्याची जागा बदलवत सुरक्षित लैंडिंग केले.  हा सर्व थरार प्रत्यक्ष अनुभवत देशाच्या सर्वात शक्तिशाली युद्धनौका विराटमध्ये दाखल झालो. या ठिकाणी आमची चक्क रहाण्याची व्यवस्था केली होती. अगदी प्रत्येकाला वेगळी रुम, रुममध्ये गरजेच्या सर्व सुविधा. फ्रेश झालो सकाळपासूनच्या कार्यक्रमांमुळे काहीसा थकवा आला होता. अर्धा तास झोपही काढली आणि त्यानंतर जेवण झाल्यावर 4च्या सुमारास डेकवर आलो.

ऍंथोनी यांना नौदलाच्या सामर्थ्याची झलक दाखवण्यात आली. नौदलाची महत्त्वाच्या युद्धनौका, विमाने, हेलिकॉप्टर हे संरक्षण मंत्र्यांना सलामी देत ‘ विराट ‘ च्या जवळने गेल्या. नौदलाच्या या महत्त्वाच्या हा शस्त्रसांभाराचे याची देही याची डोळा अगदी मनोसोक्त दर्शन झाले. 

त्यानंतर संध्याकाळ झाली असतांना पुन्हा विराटच्या पोटात गेलो, नौदल अधिकारी यांच्यांशी मनोसोक्त गप्पा मारल्या. रात्री जेवण झाल्यावर १० च्या सुमारास पुन्हा डेकवर आलो आणि वातावरणाने थक्क झालो.
भर समुद्रात जोरदार थंड वारा, साक्षीला पौर्णिमेचा चंद्र आणि आम्ही विराटच्या डेकवर. काय वातावरण असेल तुम्हीच कल्पना करा. अशा वातावरणात शत्रुपक्षच्या क्षेपणास्त्राला हवेतच भेदता येईल अशा " बराक " क्षेपणास्त्राची चाचणी, यशस्वी चाचणी आम्ही बघितली.

असा स्वप्नवत प्रवास सुरु असतांना रात्रीची झोपही छान लागली आणि दुस-या दिवशी सकाळी थेट १० वाजता डेकवर य़ेत सुर्यनारायणाचे दर्शन घेतले. तोपर्यंत आम्ही उरणच्या समोर भर समुद्रात पोहचलो होतो. पुन्हा सी किंग हेलिकॉप्टरमध्ये बसलो आणि कुलाबा इथल्या नौदलाच्या हेलीकॉप्टर तळावर उतरलो. जवळच ऑफिसला पोहचलो बातमी फ़ाइल केली.

तर असा हा स्वप्नवत असा प्रवास होता. मात्र या निमित्ताने १५०० अधिकारी-नौसेनिक कार्यरत असलेल्या विराटला खूप जवळुन बघता आले, तिची कार्यपद्धती माहिती झाली. नौदलाचे बलस्थान विराटला का म्हणतात ते समजले.

अशीच भटकंती २००६ ला “ Defense Correspondent Course “ करण्याच्या निमित्ताने झाली. संरक्षण बीट कव्हर कऱणा-यांसाठी हा कोर्स म्हणजे संरक्षण दलाबदद्लचा दृष्टीकोन अधिक डोळस कऱणारा असतो. कोर्सची सुरुवात नौदलाचे दक्षिण मुख्यालय कोची पासून झाली. त्यानंतर देशाच्या पुर्वोत्तर राज्यांच्या वाटेवर असलेला भारतीय वायू दलाचा महत्त्वाचा हवाई तळ “ बागडोग्रा ” आणि लष्कराचे एक मुख्य ठिकाण जम्मु या ठिकाणी आमच्या कोर्समधील शिकवण्या पार पडल्यावर शेवटचे चार दिवस Forward Areas मध्ये घालवण्यासाठी आम्ही पुंछ-राजौरी या ठिकाणी निघालो.

२००६ चा काळ हा काश्मिरमधील दहशतवादाला ओहोटी  
लागण्यास सुरुवात होण्याचा होता. असं असलं तरी आम्हा कोर्सच्या पत्रकारांसाठी असलेल्या सुरक्षेमध्ये तसुभरही फरक पडला नव्हता. या संरक्षणातच भारत पाक सीमेवरचे पुंछ बघितले आणि गावांत फेरफटका मारत अनुभवले. त्यानंतर राजौरीच्या छोट्या वायू दलाच्या तळावर पोहचलो. रामा राघोबा राणे असे त्या छोट्या विमानतळाचे नाव. १९४७ च्या भारत पाक युद्धात राजौरी पाकच्या ताब्यात गेले होते. राजौरीपर्यंतचा भुसुरुंगाच्या अडथळ्याचा बनलेला रस्ता खुला कऱण्यात आणि राजौरी पुन्हा जिंकण्यात राणे यांनी अद्वीतीय कामगिरी बजावली होती. या कामगिरीमुळे त्यांना परमवीरचक्र हा सर्वोच्च लष्करी सम्नानाने गौरविण्यात आले. तर हा सर्व इतिहास माहित झाला, या परिसराला जाण्याची संधी मिळाली.


या प्रवासातला थरारक अनुभव पुढे आला. PoK म्हणेजच पाक व्याप्त काश्मिरच्या सीमेवर असलेल्या वीर भद्रेश्वर या लष्करी ठाण्याला जाण्याची संधी मिळाली. हे सुद्धा ठिकाण १९४७ भारत पाक युद्धात पाकिस्तानने जिंकले होते जे आपण परत मिळवले. या ठिकाणी जातांना आम्हाला आमचे मोबाईल फोन, कॅमेरे सुरक्षेच्या कारणांमुळे जमा कऱण्यात आले. त्यानंतर एक टेकाड चढत प्रत्यक्ष लष्करी बंदोबस्ताच्या ठिकाणी पोहचलो आणि समोर बघताच थक्क झालो. खाली, टेकाडपासून काही किमी अंतरावर पाकव्याप्त काश्मिरमधील गाव वसलेले होते. समोरच्या टेकाडावर PoK मध्ये पाकिस्तानी लष्कराचे अस्तित्व स्पष्टपणे दिसत होते. तेथे चक्क मोबाईल टॉवर होते. म्हटले पाक लष्करातील जवान थेट घरच्यांशी मोबाईलवर बोलत असतील. तर एक जवान म्हणाला ते आहेच पण भारतात घुसलेल्या दहशतवाद्यांशी संपर्कातही रहाता येते. आता बोला..... 
दोन टेकाड्यांच्या मध्ये साधारण 5 किमीचे अंतर होते. या मधून भारत पाकची LoC गेली होती. तर जवानांना विचारले नक्की कोठुन.... तर जवानाने खाली एका मोठ्या झाडाकडे बोट दाखवले, ती आहे आपली LoC. त्या झाडाच्या अलीकडे म्हणजे काही बांधकाम दिसत आहे का असे एका जवानाने आम्हाला विचारले तेव्हा बराच वेळ निरखून बघितल्यावर जमिनीवर बांधकाम दिसले. जवान म्हणाला ते आपले बंकर. तर झाडाच्या पलिकडे म्हणजेच PoK च्या हद्दीत जमिनीवर पुन्हा नीट निरखल्यावर बांधकाम दिसले, तो पाकिस्तानचा बंकर. दोन बंकरमधील अतंर जेमतेम २०० मीटर . म्हणजे प्रत्यक्ष गोळीबाराच्या वेळी काय अवस्था होत असेल याची कल्पना केलेली बरी.  जवान म्हणाले आत्ता तुम्ही डोके वर काढून या भागांत किमान फिरु शकतात मात्र आधी शक्य नव्हते. कारण रोज गोळीबार, मोर्टरचा हल्ला होत दिवाळी साजरी व्हायची. या ठिकाणी. २००३ पासून शस्त्रबंदी लागू केल्यावर अर्थात या घटना घडत नाहीत. तर असे हे पाकव्याप्त काश्मिरचे, सीमावर्ती भागाचे, दहशतवादाची भिती घेत जगणा-या नागरीकांचे, सतत दडपणाखाली राहत आपले कर्तव्य चोख बजावणा-या जवानांचे दर्शन या कोर्सच्या दरम्यान झाले.  


 विज्ञान हा एक माझा आवडता विषय. यानिमित्ताने कितीतरी वेळा भाभा अणु संशोधन केंद्रात जाण्याचा योग आला. तिथेही विविध विभागांत बातम्यांच्या निमित्ताने भ्रमंती झाली. या केंद्रात काम कारणा-या लोकांनाही आपला विभाग सोडून दुस-या विभागात किंवा जागेत जायची परवानगी नाही. मात्र पत्रकार असल्याच्या निमित्ताने या सवलतीचा मी फायदा घेत बहुतेक सर्व भागांत मनोसोक्त बातमीनिमित्त फेरफटका मारला. 

भाभा अणु संशोधन केंद्र म्हंटल्यावर डोम आकाराची एक वास्तू पटकन आठवते. भारत-कॅनडा यांनी संयुक्तरित्या उभारलेला हीच ती CIRUS नावाची अणु भट्टी. १९७४  आणि ९८ च्या अणु चाचण्यासाठी आवश्यक ते संशोधन याच ठिकाणी करण्यात आलं , काही प्रमाणत अणुइंधन येथुनच मिळवण्यात आलं. तर ही अतिभव्य अशी ही CIRUS अणु भट्टी आतमधून बाहेरुन बघता आली. 

मंगळयान मोहिमेच्या कव्हरेजच्या निमित्ताने श्रीहरीकोटाला जाण्याचा योग आला. इस्त्रो ज्या ठिकाणाहून उपग्रह अवकाशात धाडते ती जागा,ते ठिकाण बघता आले. श्रीहरीकोटा हे आंध्र प्रदेशमध्ये असले तरी चैन्नईहून जाणे सोईस्कर पडते. चैन्न्ईपासुन १२० किमी अंतर. रस्ता चांगला असल्याने प्रवासही चांगला होतो. श्रीहरीकोटा हे एक बेट असुन त्यावरुन उपग्रह प्रक्षेपणाचा कार्यक्रम पार पडला जातो. भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेली ही ठिकाणे बघता आली, अनुभवता आली.

तेव्हा बातीमदारी करतांना अनेक ठिकाणी फिरण्याची संधी मिळाली. 
 पंढरीची वारी चक्क दोनदा कव्हर करण्याचा अविस्मरणीय अनुभव घेता आला. 26 जुलैच्या पावसानंतर रायगडमधील पुर परिस्थिति आणि पावसाने केलेला आघात कव्हर करता आला.  भारताने २००७ ला २०-२० वर्ल्ड कप जिंकल्यावर विमानतळ ते वानखेडे मैदान असा धोनी ब्रिगेडची जल्लोष यात्रा अगदी जवळून कव्हर करायाचा अनुभव मिळाला. सर्वसामान्यांनी न बघितलेली कोकण रेल्वेचे सिद्ध तंत्रज्ञान असलेली स्काय बसची सफऱ कऱण्याची संधी मिळाली.
माझ्यासारखे अनेक पत्रकार त्यांच्या विविध विषयांमुळे, एखाद्या विषयावरील प्रभुत्वामुळे, वेेगवेगळ्या भागात भ्रमंती करुन आले आहेत आणि करत आहेत. कोणी कोयना धरण आतून बघितले, कोणी नक्षलवाद्यांची मुलाखत घेतली, कोणी मुख्यमंत्र्यांबरोबर दिवसभर दौरा केला, कोणी कोकण रेल्वेचा अभ्यास केला, कोणी केदारनाथवर आलेले निसर्ग संकट कव्हर केले, कोणी बोईंगच्या विमाननिर्मितीच्या अवाढव्य कारखान्याला भेट दिली तर कोणी दुष्काळी भागांचे वृत्तांकन दुष्काळ खरा अनुभवला.

अर्थात बातमीदारीनिमित्त आपसुक झालेली ही भ्रमंती ज्ञानात भर टाकणारी ठरलीच पण समाजातील वास्तव समजण्यास, वास्तवाचे भान आणण्यास, शहाणे होण्यात आणि अर्थात पत्रकारिता डोळस करण्यात मदतीची ठरली.

Tuesday, October 6, 2015

जबाबदारी विसरलेले "कडोंमपा"चे सुसंस्कृत नागरिक

जबाबदारी विसरलेले "कडोंमपा"चे सुसंस्कृत नागरिक

दर वेळी शहरांतील बकालपणा, अस्वच्छता, पायाभूत सोयीसुविधा नसणे, वाहतूक समस्या, यासाठी पालिका क्षेत्रातील राजकीय पक्ष, सत्ताधारी पक्ष आणि ( नेहमीच स्वत: ची कातडी वाचवणारे ) प्रशासन यांनाच जबाबदार धरले जाते. मात्र कडोमपातील सध्याच्या अधोगतीला स्वत: ला सुशिक्षित, सुसंस्कृत , मध्यमवर्गीय ( आता काही प्रमाणात उच्च मध्यमवर्ग ) समजले जाणारे नागरीकच जबाबदार आहेत असे म्हंटले तर चुकीचे होणार नाही. कारण धाक ठेवू शकणारा नागरीकांचा दबाव गट नावाचा प्रकारच सध्या कडोमपामध्ये अस्तित्वात नाहीत. किमान वडीलधा-यांनी डोळे वटारावेत आणि धाकामुळे सत्ताधा-यांनी ऐकावे अशीही आता परिस्थिती नाहीये.

मुंबई-पुणे, नाशिक किंवा काही मोजक्या ठिकाणी त्या भागांमध्ये सत्ताधारी आणि प्रशासन यांना धारेवर धरणारे नागरिकांचे गट - संस्था अस्तित्वात आहेत. अशा ठिकाणी एखादा मुद्दा नागरिकच रेटून थेट अंमलात आणायला लावतात. प्रशासन, सत्ताधारी यांनी काही चुका केल्या तर त्यावर रान उठवत निर्णय बदलायला किंवा निर्णय मागे घ्यायला भाग पाडतात. या सर्वांचा पूर्णपणे अभाव कडोमपामध्ये दिसत आहे.. नव्हे तो आहे.

युवा गट, माहिती अधिकाराचा वापर करणार गट ( ब्लैकमेलिंग वाला नाही ), ThinkTank चा गट, बैंकिंग -उद्योग- शिक्षण यामधील विचारवंत - अभ्यासु लोकं, वरिष्ठ नागरिकांचा गट, महिलांचे विविध गट..... असे गट पाहिजेत जे सत्ताधारी, प्रशासन यांच्या संपर्कात राहून पालिकेच्या भागातील निर्णयांमध्ये आपला सहभाग नोंदवतील, चुका सांगतील, चांगल्या निर्णयांचे खुल्या मनाने स्वागतही करतील. असे लोक, अशा संस्था कडोंमपा जरूर आहेत, पण पालिकेला हलवतील, कामाची दखल घ्यायला भाग पाड़तील अशी त्यांची मजल अजिबात नाही. किंबहुना यापैकी काही लोकं, संस्था या एखाद्या विचारसरणीला चिकटुन आहेत. त्यामुळे सक्षम असा नागरीकांचा मोठा दबाव गट कडोंमपा परिसरात तयारच झाला नाही.

त्यामुळेच सत्ताधारी आणि प्रशासन यांचे फावले आहे. विरोधकांनी आधी बेटकुळ्या दाखवल्या ख-या पण यांमधील हवा ही काही महिन्यांतच निघून गेली. कोणी जाब विचारणारा वडीलधारी नसल्याने, दबाव गट नसल्याने गेल्या पाच वर्षांनंतरही कडोंमपा ही आहे तिथेच राहिली आहे. आता काहीच मुठभर लोकप्रतिनिधी,  प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यामुळे चांगुलपणा टिकून राहिला आहे.

सध्या सेना-भाजप पुन्हा पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांवर - मुद्द्यांवर निवडणुका लढवत आहे. विरोधक म्हणून साफ अपयशी ठरलेले, कमजोर झालेल्या मनसे- कांग्रेस - राष्ट्रवादी या पक्षांना संधी मिळण्याची शक्यता अजिबात दिसत नाही.

निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण जोपर्यन्त डोंबिवलीपासून टिटवाळ्यापर्यन्त पसरलेल्या या कडोंमपामध्ये जाब विचारणारी नागरिकांची सक्षम यंत्रणा तयार होत नाही तोपर्यन्त निवडणुकांमध्ये या सुशिक्षित, मध्यमवर्गीय नागरिकांना गृहीतच धरले जाणार. कारण राजकीय पक्षांना पक्के माहीत आहे की लोकं जाणार कुठे, कोणाला मत देणार.....आम्हांलाच मत देणार.

तेव्हा नागरिकांनी उठा, जागे व्हा, संघटित व्हा अशी म्हणायची वेळ आली आहे.

Wednesday, September 23, 2015

सेलिब्रेशन मंगळयानाच्या यशाच्या वर्षपुर्तीचे..



स्वतंत्र भारताच्या इतिहासात असे काही सुवर्णक्षण किंवा घटना आहेत की ज्यामुळे देशामध्ये निर्णायक बदल झाले, जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, त्यामुळे देशातील धोरणात्मक बदल झाले. मग यामध्ये आणिबाणी, दोन अणुचाचण्या, मनमोहन सिंह यांच्या आर्थिक सुधारणा अशा काही घटनांचा उल्लेख जरुर करावा लागेल. यामध्ये मंगळयानमोहिमेचे नाव घ्यावे लागेल.

देशाची दळणवळण, संदेशात्मक, हवामान, संरक्षणात्मक बाबतींमधील गरज अवकाश संशोधनाच्या माध्यमातून भागवतांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने वेगळ्या गोष्टिकड़े लक्ष द्यायला सुरुवात केली. ती म्हणजे चांद्रयान आणि मंगळयांसारख्या मोहिमा हाती घेतल्या, एवढेच नाही तर त्यात पहिल्याच प्रयत्नात यशही मिळवले.

24 सप्टेंबरला 2014 ला भारताचे मंगळयान मंगळ ग्रहाभोवती घिरटया घालू लागले. आत्तापर्यन्त एकूण 51 मोहिमा मंगळ ग्रहासाठी विविध राष्ट्रांनी खर्ची केल्या पण यापैकी फक्त 40 टक्के मोहिमा म्हणजे जेमतेम 20 मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. यापैकी पहिल्याच प्रयत्नात अमेरिका नाही, रशिया नाही, यूरोपीयन स्पेस एजेंसुद्धा यशस्वी झाल्या नाहीत. चीन आणि जपानची याने मंगळपर्यन्त पोहचलीच नाहीत. मात्र भारताने ते केले तेही अवघ्या 450 कोटी रुपयांत. हेच करण्यासाठी अमेरिका, रशिया आणि यूरोपियन स्पेस एजेंसीला त्यांच्या मोहिमांकरता 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले होते.

या यशस्वी मंगळयानाच्या मोहिमेने काही गोष्टि साध्य झाल्या आहेत....


इस्रोच्या अवकाश तंत्रज्ञान आणि कौशल्याची जगाने दखल घेतली, वाहवा केली.

इस्रोला परग्रह मोहिमांचा मोलाचा अनुभव मिळाला जो पुढील मोहिमांमध्ये कामाला येणार आहे.

पृथ्वीपासून मंगळ मोहिमेसारख्या अतिदुरच्या मोहिमांसाठी आवश्यक असलेली यंत्रणा तयार झाली.

यशामुळे सरकारचा इस्रोकड़े बघण्याचा दृष्टिकोन बदलला , प्रोत्साहन मिळाले, आता अधिक निधी सहज मिळू लागला आहे.
सर्वसामान्य जनतेचाही इस्रोकड़े बघण्याचा दृष्टिकोन बदलला.

यशामुळे इस्रोला हुरुप मिळाला, आत्मविश्वास वाढला, आता आणखी अशा मोहिमांच्या आखणीला सुरुवात झाली आहे.

मंगळयानाने एक वर्षात बराच माहितीचा खजिना गोळा केला आहे. त्याचा अभ्यास सुरु आहे. थोडक्यात अवकाश संशोधनाची एक वेगळी शाखा यामुळे विकसित होणार आहे , ज्यामध्ये भारत खुपच मागे आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवकाश मोहिमा दिवसेंदिवस खार्चिक होत असतांना स्वस्तात आणि यशस्वीरित्या उपग्रह पाठवणारा देश म्हणून भारताची ओळख झाली आहे, तेवढा विश्वास भारताने जगात कमावला आहे. म्हणून फ्रांस , जर्मन, इंग्लण्डसारखे प्रगत देश आणि इंडोनेशिया, ब्राझील, मलेशियासारखे पुढे येणार देश भारताच्या मदतीने उपग्रह पाठवत आहेत.

म्हणूनच जगाच्या पटलावर भारताचे खणखणीत नाणे वाजवणा-या मंगळयान मोहिमेला एक वर्ष झाले आणि याकाळात असे महत्वपुर्ण बदल घडले असल्याने या यशाचे सेलिब्रेशन करायला हवे.

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...