Friday, July 22, 2011

अवकाशातील कचरा ( Space Debris )



वकाशातील कचरा

विविध प्रकारचा कचरा मग तो घनकचरा असो, कारकाखान्यातून रसायनमिश्रीत तयार झालेला टाकावू द्रव पदार्थ असो, ई-कचरा असो किंवा किरणोत्सारी कचरा असो. कच-याचे विविध प्रकार आणि त्यामुळे निर्माण होणा-या समस्या आता सर्वच देशांची डोकेदुखी बनत चाललेल्या आहेत. विकसित किंवा भारत-चीन सारख्या विकसनशील देशात तर ई-कचरा आणि त्याची विल्हेवाट ही एक नवीन गंभीर समस्या बनली आहे. त्यात आता नव्या कच-याची भर पडत चालली आहे, तो म्हणजे अवकाशातील कचरा. या कच-यामुळे अवकाश कार्यक्रम हाती घेतलेल्या देशांची झोप उडण्यासारखी परिस्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे.

अर्थात अवकाशातील कचरा पृथ्वीबाहेरील वातावरणात, पृथ्वीच्या भोवती तयार होत असल्याने सर्वसामान्यांना याचा थेट फटका अजून तरी बसलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य याबद्दल अद्याप अनभिज्ञ आहेत.  

वकाशातील कचरा कसा तयार होतो?

१९५७ मध्ये सोव्हिएत रशियाने स्फुटनिक हा पहिला कृत्रिम उपग्रह पाठवला आणि विज्ञानाचे  नवे दालनच खुले झाले. त्यापोठापाठ अमेरिकेनेही तोडीसतोड स्पर्धक म्हणून उडी घेतली. त्यानंतर इंग्लंड, कॅनडा, इटली, फ्रान्स, चीन, भारत अशा एकूण 53 देशांनी स्वबळावर किंवा दुस-या देशांच्या मदतीने आत्तापर्यंत तब्बल 6,500 पेक्षा अधिक विविध प्रकारचे उपग्रह सोडले आहेत. तर २५० पेक्षा जास्त मानवसहीत अवकाश मोहिमा आत्तापर्यंत झाल्या आहेत.


प्रक्षेपकाचे अवशेष

या सर्व मोहिमांत विविध प्रकारचे प्रक्षेपक किंवा रॉकेट वापरले जातात. साधारण तीन ते चार टप्प्यात रॉकेटमधील इंधनाचे ज्वलन होते. एका टप्प्याचे ज्वलन झाले की रॉकेटचा तो भाग मुख्य भागापासून वेगळा होतो आणि पुढच्या टप्प्याचे ज्वलन सुरु होते. हे भाग पृथ्वीच्या साधारण 160 किलोमीटरच्या वर राहिल्यास सहसा पृथ्वीवर परतत नाहीत. तर ते त्या उंचीवर पृथ्वीभोवती फिरत रहातात.

अनेकदा उंचावर गेल्यावर एखाद्या टप्पा पार करतांना किंवा सुरू होतांना दुर्घटना होते आणि रॉकेटचा स्फोट होतो त्यामुळेही अंतराळ कच-यात वाढ होते. तर काही मानवी मोहिमां काही उपकरणे Space Walk  करतांना नियंत्रणातून सुटू ती अवकाशात गेल्याच्याही घटना आहेत. उदा. प्रसिद्ध अंतराळवीरंगना सुनिता विल्यम्सच्या हातून स्पेस वॉक करतांना कॅमेरा निसटला होता आणि तो आता पृथ्वीच्या कक्षेभोवती फिरत आहे.  

वापरात नसलेले कृत्रिम उपग्रह 

कृत्रिम उपग्रहांचा कार्यकाल हा काही महिन्यांपासून ते 10 ते 15 वर्षांपर्यंत निश्चित केलेला असतो. सुरुवातीच्या मोहिमांमध्ये उपग्रह हे अनेकदा भरकटले जायचे किंवा हव्या त्या कक्षेत पाठवण्यास अपयश यायचे. त अनेक उपग्रहांचा कार्यकाल संपल्यावर त्याचा वापर बंद केला जायचा. असे अनेक वापरात नसलेले उपग्रह, भरकटलेले उपग्रह आजही पृथ्वीभोवती विविध कक्षेतून फिरत आहेत.





उपग्रह विरोधी चाचण्या

शीतयुद्धाच्या काळात टेहळणी, हेरगिरी उपग्रहांमुळे अमेरिका आणि रशिया देशांची झोप उडाली होती. चेह-याचा फोटो काढता येईल, गाडीची नंबर प्लेट वाचता येईल इतक्या उत्कृष्ट प्रतिचे फोटो घेणारे उपग्रह या काळात विकसित झाले. हे उपग्रह पृथ्वीभोवती घिरट्या घालत शत्रुच्या एकेक हालचाल टिपत असत. तेव्हा असे उपग्रह नष्ट करणारे तंत्रज्ञान सोव्हिएत रशिया, अमरिकेने विकसित केले त्याला उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र या नावाने ओळखले जाऊ लागले. चीनने 2007 ला चाचणी घेऊन त्यांचा वापरात नसलेला आणि 865 किलोमीटर उंचीवरुन भ्रमण करणारा एक कृत्रिम उपग्रह जमिनीवरुन क्षेपणास्त्र डागून नष्ट केला. मात्र त्यामुळे गोल्फ बॉलच्या तुकड्यापासून अनेक मोठ्या आकाराचे असे 2,000 पेक्षा कितीतरी जास्त तुकडे अवकाशातच विखुरले गेले आणि या तुकड्यांपासून विविध उपग्रहांना धोका निर्माण झाला.  


उपग्रहांची टक्कर

एक अशक्यप्राय घटना 10 फेब्रुवारी 2009 ला घडली. अमरिकेचा वापरात असलेला इरिडियम-33 हा दळणवळण उपग्रह आणि रशियचा कार्यकाल संपलेला कोसमोस-2251 ह्यांची 789 किलोमीटर उंचीवर टक्कर झाली. यामुळे 1740 पेक्षा जास्त तुकडे होत मोठा कचरा अवकाशात पसरला. वापरात नसलेल्या रशियाच्या उपग्रहाची कक्षा बदलली गेल्याने हा अपघात झाला. या कच-यामुळे इतर उपग्रहांना, अवकाश मोहिमांना धोका निर्माण झाल्याची भिती व्यक्त होत आहे. अशा घटना अवकाश कचरा निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात.


वकाश कच-याचे प्रमाण आणि व्याप्ती 



साधारण 160 किलोमीटरपासून ते 2000 किलोमीटर अंतरापर्यंतच्या उंचीला Low Earth Orbit  असे म्हणतात. बहुतेक सर्व उपग्रह, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक या कक्षेत फिरत आहेत. या भागात कच-याचे प्रमाण सर्वाधिक आहे. किंबहुना ९८ टक्के अवकाश कचरा हा याच भागात असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. १ सेंटीमीटरपेक्षा कमी आकाराच्या लांबीचे लक्षावधी तुकडे, १ सेमी ते १० सेमी पर्यंतच्या आकाराचे सुमारे ५ लाख तुकडे आणि  १० सेमीपेक्षा जास्त लांबीचे १९,००० तुकडे यात असावेस असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

यापैकी फिरण्याची कक्षा आणि वेग माहीत असलेल्यांची तुकड्यांची संख्या आहे फक्त ९,०००. ( या ज्ञात कच-याचे वजन तब्बल ५,५०० टनाच्या घरात असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.म्हणजेच अवकाश कच-यातील कितीतरी म्हणजे ९८ टक्क्यांपेक्षा जास्त वस्तुंची अद्याप महितीच उपलब्ध नाही. याचा अर्थ अपघात झाल्यावरच, घटना घडल्यावर किंवा फिरणारा अज्ञात तुकडा जवळ आल्यावर अनेक तुकड्यांची माहिती होते.

अमेरिकेने  १७ मार्च १९५८ ला पाठवलेला Vanguard 1 नावाचा उपग्रह म्हणजे अवकाशात माणसाने पाठवलेली आणि अस्तित्वात असलेली सर्वात जूनी वस्तू ठरली आहे. १९६४ ला या उपग्रहाशी संपर्क तुटला. ही वस्तु आजही पृथ्वीभोवती प्रदक्षणा घालत असून पुढील २४० वर्षे अवकाशात राहील असा अंदाज आहे.

अवकाश कचरा धोकादायक का ?

Low Earth Orbit  मधील फिरणारे तुकडे, वापरात नसलेले उपग्रह यांचा वेग हा ७ ते ८ किलोमीटर प्रति सेकंद एवढा प्रचंड असतो. एवढा प्रचंड वेग असल्यानेच हे अवशेष पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे खेचले जात नाहीत आणि कित्येक महिने-वर्षे फिरत रहातात. एवढ्या वेगाने फिरणारा तुकडा, वस्तु जेव्हा दुस-या गोष्टीवर आदळेल तेव्हा तीचे कल्पनेपलिकडे नुकसान होणार यात शंका नाही. त्यातच मानवी अवकाश मोहिमेदरम्यान असं काही विपरित घडलं तर! ही भितीची टांगती तलवार शास्त्रज्ञांच्या मानेवर नेहमी असणार. उपग्रहांना तर या अपघातांचा धोका कायम असतो. त्यामुळे काही कोटींचा उपग्रह आणि कित्येक कोटी खर्च करुन पूर्ण झालेली अवकाश मोहयावर क्षणार्धात पाणी फिरू शकते. एकवेळ हा फटका सहन करता येईल, पण तो उपग्रह दळववळण(Communication ), दूरसंवेदक उपग्रह(Remote Sensing )  असेल, तर त्याचा कितीतरी मोठा फटका हा पृथ्वीवरील संबंधित व्यवसायाला बसेल. म्हणनूच हा अवकाशातील कचरा सर्वच अवकाश मोहिमांसाठी आता एक आव्हान ठरला आहे.

तर Low Earth Orbit च्या वर किंवा भुस्थिर उपग्रहाच्या उंचीपर्यंत असलेल्या अवकाश कच-याचा वेग हा काहीसा कमी म्हणजे २ किलोमीटर प्रति सेकंद एवढा असतो. तरीही तो धोकादायक झालाच.

साधारण ६०० किलोमीटरपर्यंतच्या उंचावरचे अवशेष पृथ्वीच्या दिशेन खेचले जातात. मात्र त्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागतो. त्यापेक्षा उंचावरचे तुकडे हे निदान काही शतके पृथ्वीभोवती फिरत रहाणार. ज्यांचा वेग विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी असतो ते पृथ्वीकडे खेचले जातात आणि वातावरणात जळून नष्ट होतात. मात्र पृथ्वीवर पडणारा तुकडा हा मोठा असेल तर तो वातावरणात नष्ट न होता पृथ्वीवर कोसळून माणासाचे, संपत्तीचे नुकसान करू  शकतो.

हे सर्व धोके मानव निर्मिती आहेत. मात्र हा धोका इथेच थांबत नाही. अवकाशात भरकटलेले आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामध्ये सापडलेले अनेक लघुग्रह पृथ्वीभोवती फिरत असतात. त्याचा आकार हा लहान तुकड्यापासून काही मीटर मोठा एवढा असतो. तेव्हा हा सुद्धा एक प्रकारे निसर्ग निर्मित पण मानवाच्या दृष्टीने कचरा असून तो अवकाश मोहिमांसाठी धोकादायक ठरला आहे.


अपघात होऊ नये यासाठी जास्त दणकट आणि जाड जादा धातूचा थर देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पण तो एक तात्त्पुरता उपाय ठरत आहे, कारण मोठा तुकडा आदळला तर अपघात निश्चित आहे. पण जड धातूचा थर वापरल्याने उपग्रहाचे वजन वाढत असून समस्या वाढली आहे. 
        

अवकाश कच-यामुळे नुकसान

१२ जुलै १९८९ ला इंग्लडने अवकाशात पाठवलेला  Olympus - 1 हा त्या वेळचा सर्वात मोठा दळणवळण उपग्रह एका छोट्या लघुग्रहाचा तुकडा आदळल्याने निकामी झाला.

24 जुलै 1996 ला Cerise नावाचा फ्रान्सचा छोटा कृत्रिम हेरगिरी उपग्रह ( Micro Satellite ) हा Arian Rocket चा तुकडा आदळल्याने  निकामी झाला. 


रशियाचा Express AM11 नावाच्या उपग्रहाने २००६ मध्ये एका अज्ञात वस्तुची अवकाशात धडक बसल्याने कक्षा बदलली होती. सुदैवाने त्यामध्ये नुकसान झाले नाही आणि उपग्रहाला परत त्याच्या कक्षेत आणण्यात आले.


सप्टेंबर १९९१ ला रशियाच्या कॉसमॉस-९५५ या उपग्रहाचा कचरा मार्गात आल्याने अपघात टाळण्यासाठी अमेरिकेच्या स्पेस शटलला जागा बदलणे भाग पडले होते.


PayLoad Assist Model हा अमेरिकेच्या रॉकेटचा एक भाग. याचा आकार हा एका १०० लीटरच्या पाण्याच्या टाकीपेक्षा जरा मोठा आहे. १२ जानेवारी २००१ ला सौदी अरेबियाच्या वाळवंटात PayLoad Assist Model चा पूर्ण भाग अवकाशातून पडला. हा भाग ज्या रॉकेटवर बसवलेला होता ते रॉकेट एक कृत्रिम उपग्रह सोडण्यासाठी १९९३ ला सोडण्यात आला  होता . म्हणजे आठ वर्षे पृथ्वीभोवती फिरत राहिल्यावर या (महा) भ्हागाने भागाने सुदैवाने कोणाला न इजा होता जमीन गाठली.

आणखी एक धक्कादायक घटनेची नोंद २७ मार्च २००७ ला झाली. चिली देशाचे एक प्रवासी विमान(AirBus A340), २७० प्रवाशांना घेत प्रशांत महासागरावरुन चिली ते न्युझीलंड असा प्रवास करत होते. तेव्हा वैमानिकाने Sonic Boom (ध्वनीपेक्षा जास्त वेगाने एखादी वस्तू गेल्यावर जो आवाज निर्माण होतो त्याला सोनिक बूम म्हणतात) ऐकायला आला. नंतर माहिती मिळाली की, रशियाचा निकामी झालेला एक हेरगिरी उपग्रह आणि त्याचे अवशेष हे प्रशांत महासागरात विमानपासून 8 किलोमीटरच्या परिघात कोसळले. थोडक्यात काय एक मोठी दुर्घटना टळली.

वकाशातील कच-यामुळे माणसाला दुखापत झाल्याची आत्तापर्यंत एकच घटना घडली आहे. 1997 ला अमेरिकेतील Oklahoma या ठिकाणी एक महिला 10 बाय 13 सेंटिमीटर आकाराचा एक धातूचा तुकडा लागून जखमी झाली. धातूचा अभ्यास केल्यावर समजले की 1996 Delt 2 या रॉकेटद्वारे एक उपग्रह सोडण्यात आला होता, त्या रॉकेटचा हा तुकडा होता.

एवढच नाही तर अमेरिकने महत्वकांक्षी अपोलो मोहीम हाती घेण्यापूर्वी अंतराळातील कचरा किंवा लघुग्रहांद्वारे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेतली होती. त्यासाठी एक विशेष मोहीम आखत काही मोठे सोलर पॅनल असणारे उपग्रह सोड तुकड्यापासून होणा-या आघाताचा अभ्यास केला होता.


स्पेस शटलला अनेकदा अंतराळातील तुकड्यांचा आघात सहन करावा लागला आहे. अर्थात त्याने मोठे नुकसान झाले नसले तरी दणकट काचेवर काही मिलीमीटर तर इतर भागांवर डोळ्याने दिसतील एवढे मोठे व्रण किंवा खड्डे झालेले आहेत. २००६ ला अटलांटिस या स्पेस शटलच्या वाहकाला काही सेंटीमीटर एवढा खड्डा अवकाश कच-यातील एक एज्ञात तुकडा आदळल्याने झाला होता.

अंतराळ कचरा हो नये यासाठी कायदा

बोटावर मोजता येईल एवढ्याच देशांनी स्वबळावर उपग्रह पाठवण्याचे कौशल्य मिळवले आहे.
यात रशिया, अमेरिका, फ्रान्स, जपान, चीन, इंग्लंड, भारत, युक्रेन आणि इराण यांचा समावेश आहे. असे असले तरी वकाश कचरा होऊ नये यासाठी सर्वसामावेशक असा कायदा अजून अस्तित्वातच आलेला नाही. अमेरिकेचे नासा, युरोपियन युनियन ह्यांनी काही नियम ठरवले आहेत. मात्र बाकीचे देश यापासून दूर आहेत किंवा या संकटाच्या गांभीर्याची जाणीव त्या देशांना अद्याप व्हायची आहे.

अमेरिका आणि युरोपमधील राष्ट्रे जेव्हा कृत्रिम उपग्रह पाठवता तेव्हा त्यामध्ये विशेष रचना केलेली असते, जास्त इंधन असते. त्यामुळे जेव्हा उपग्रहाचा कार्यकाल संपतो तेव्हा त्या उपग्रहावरील इंजिनाने उपग्रहाची दिशा बदलली जाते आणि तो पृथ्वीच्या दिशेने येत वातावरणात जळून नष्ट होतो.

तसंच या देशांमध्ये अवकाश मोहीम अमलात आणतांना कमीत कमी कचरा कसा होईल याकडे विशेष लक्ष दिले जाते.

वकाश कच-यावर नजर

वकाश कच-यावर नजर ठेवण्यासाठी जगात काही देशांमध्ये विविध यंत्रणा, रडार, दुर्बिणी कार्यरत आहेत. त्यात प्रामुख्याने अमेरिकचे US Strategic Command  ही यंत्रणा जगभरातून विविध ठिकाणाहून अवकाशात नजर ठेवते. खरे ही यंत्रणा तर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे  जी पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाऊन परततात.), उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र, उपग्रहातून होणार हल्ला यांच्यावर नजर ठेवण्यासाठी आहे. मात्र त्याचा दुहेरी म्हणजे अवकाशातील कच-यावर लक्ष ठेवण्यासाठी वापर केला जातो.

तर ESA Space Debris Telescope (स्पेन), TIRA(System)(जर्मनी),  GodlStone Radar      (अमेरिका),  Haystack Radar(अमेरिका), Cobra Dane Radar(अलास्का-अमेरिका) अशा विविध ठिकाणच्या यंत्रणा अवकाशातील कच-यावर नजर ठेवून आहेत.

अवकाश मोहिमांमध्ये वाढ

गेल्या १० वर्षात अवकाश मोहिमांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्वबळावर उपग्रह सोडण्यासाठी काही देश प्रयत्न करत आहेत. चांद्र मोहिमांकडे सर्वांचे लक्ष लागले असून अमेरिका  तर चंद्रावर वसाहत स्थापण्याच्या दृष्टीने हलचाल करत आहे. भारत, जपानसारखे देश अवकाशात मानवी मोहम आखण्याच्या तयारीआहेत. चीन तर स्वतःचे अवकाश स्थानक बनवण्याच्या मागे लागला असून, बक्कळ पैसा असेल तर Space Tourism ही शक्य झाले आहे व त्याला सुरुवातही झाली आहे. ( अर्थव्यवस्था अडणीत असलेला ) रशिया तर पैसा उभारण्यासाठी Space Tourism ची अवकाश मोहिमेत मदत घेत आहे. अमेरिकेने तर अवकाश मोहिमांसाठी खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. यामुळे २०१६ पर्यंत अवकाशात जाऊन काही मिनिटे अवकाशाची सफर घडवत परत जमिनीवर येईल असे विमान एक खाजगी कंपनी तयार करेल असा अंदाज व्यक्त होत आहे.

थोडक्यात काय तर येत्या काही वर्षात प्रवासी विमानांच्या उड्डाणांप्रमाणे अवकाश मोहिमा आखल्या जातील अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे अवकाश कच-यात भरच पडण्याची भिती व्यक्त होत असून, या कच-यामुळे भविष्यातील अवकाश मोहिमांनाही अधिक धोका निर्माण होईल. म्हणून अवकाश कच-यावर आत्तापासून नासासारख्या संस्थांने गंभीरपणे विचार करायला सुरुवात केलीये. .

Wednesday, July 20, 2011

चेचन्या- रशियाचे धुमसते काश्मिर


नागालॅडच्या क्षेत्रपळापेक्षा थोडे कमी क्षेत्रफळ असलेले  रशियातील चेचन्या राज्य ( 15,300 चौरस किमी )  रशियाची डोकेदुखी बनले आहे. रशियाच्या विविध भागात, किंवा सरकारी स्थळांच्या इथे अधुनमधुन अपहरण , बॉम्बस्फोट असा तडाखा दे चेचन्याच्या बंडखोरांनी ( की स्वातंत्र्यवीर!नी ) ( स्वातंत्र्य ? ) लढा सुरु ठेवला आहे. रशियाला दणका देण्यासाठी अल कादाची मदत घेण्यापर्यंत ही लढाई पोहचली होती.

जगात गाजललेल्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या विविध ओलिस नाट्याला या काळात रशियाला सामोरे जावे लागले ते चेचन्यातील बंडखोरांमुळे. यामध्ये एकदा तर चेचन्या बंडखोरांनी एकाच वेळी 2000 पेक्षा जास्त नागरिकांना तब्बल 9 दिवस ओलिस ठेवले होते.

रशियाच्या एकदम दक्षिणेला कॅस्पियन समुद्राजवळ असलेल्या चेचन्यात गेले काही महिने वातावरण जरी शांत दिसत असले तरी बंडखोर संधीची वाट पाहत आहेत. यामुळे रशियाला चेचन्यामधील हालचालींकडे बारीक लक्ष ठेवावे लागत आहे.


धर्मयुद्ध

चेचन्यातील वाद किंवा लढाई म्हणा ही थेट एका धर्माविरुद्ध दुसरा धर्म अशी आहे. चेचन्यातील एकुण लोकसंख्येपैकी ( सुमारे १२ लाख ) ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही सुन्नी मुस्लिम आहे. स्वतंत्र राष्ट्राची मागणी ही काही सोव्हिएत महासत्ता कोसळल्यानंतर करण्यात आली नसून ती २०० वर्षे जुनी आहे. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात रशियाने जेव्हा साम्राज्यविस्ताराला सुरुवात केली तेव्हा कॉकस्यस पर्वत रांगेच्या परिसरातील चेचन्या आणि आजुबाजुचा भाग टाचेखाली आणला. तेव्हापासून तिथल्या इस्लाम नेत्यांनी रशियाविरुद्ध मैदानात उडी घेतली आहे.

१९१७ला जेव्हा रशियन लाल क्रांती झाली तेव्हा चेचन्या आणि आजुबाजुच्या भागातील लोकांना एक आशेचा किरण निर्माण झाला. मात्र १९२२ ला सोव्हिएत रशियाचा हुकुमशहा स्टॅलिनने अल्पावधीतच रशियाच्या संपूर्ण भागात आपली जरब बसवली आणि चेचन्या आणि भागातील बंडखोरांना डोके वर काढण्याची संधीच दिली नाही.  

नागरिकांमध्ये असंतोष

१९४१ ला हिटलरच्या नाझी जर्मनीने रशियाचा घास घेण्यासाठी आक्रमण केले. सोव्हिएत रशियाच्या आतमध्ये घुसत जर्मन फौजांनी स्टॅलिनग्राडला धडका द्यायला सुरुवात केली, तेव्हा चेचन्याच्या बंडखोरांनी संधी साधली. गुप्तपणे नाझी जर्मनीला मदत करायला सुरुवात केली. मात्र हा आनंद बंडखोरांसाठी अल्पवधीचा ठरला. महाकाय रशियन सैन्याने पलटवार करत निर्णायकरित्या नाझी जर्मनीला मागे रेटले आणि जर्मनीला रशियाच्या सीमेबाहेर हुसकावत थेट बर्लिनपर्यंत मजल मारली. या धामधुमीत स्टलिनला चेचन्या परिसराकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. मात्र महायुद्ध संपताच स्टॅलिनने बंडखोरांच्या साफसफाईची मोहिम हाती घेत चेचन्या आणि परिसरावर पूर्ण ताबा मिळवला. मात्र याचा फटका मोठ्या प्रमाणात नागरिकांना बसला. हजारो नागरिकांचे शिरकाण केले गेले आणि देशोधडीला लावले गेले. ५० वर्षे सोव्हिएत रशियावर अंकुष ठेवणा-या हुकुमशहा जोसेफ स्टॅलिनचा १९५३ ला मृत्यु झाला तेव्हा नागरिक आणि  चेचन्याच्या नेत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

रिक्त झालेल्या अध्यक्षपदाची जागा घेतली निकिता क्रुश्चेव्ह ह्यांन. नागरिकांचा विश्वास मिळवावा यासाठी क्रुश्चेव्हने De-Stalinization प्रक्रियेला सुरुवात केली. याच अर्थ जो तणाव, भय स्टॅलिनच्या काळात होते ते जरा निवळण्यासाठी प्रयत्न केले. विखुरलेल्या चेचन्या परिसरातील लोकांना परत त्या भागात जाण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र चेचन्याच्या जनतेचा आनंद हा फार काळ टिकला नाही. १९५६ पासन क्रुश्चेव्हने संपुर्ण चेचन्या आणि परिसराचे पद्धशीरपणे रशियाकरण करायला सुरुवात केली. धर्म वगळता भाषेपासून ते प्रशासकीय कामकाजापर्यंत रशियाची तत्वे या मुस्लिम भागात राबवायला सुरुवात केली. त्यामुळे पुन्हा एकदा असंतोष चेचन्याच्या जनतेमध्ये पसरला. मात्र कम्युनिस्ट सोव्हिएत रशियाच्या पोलादी पडद्यापुढे कोणाचे काही चालले नाही.


नवी आशा

अखेर १९९०-९१ ला सोव्हिएत रशिया कोसळला आणि त्याची १५ शकले झाली. आता संधी गमवायची नाही असा निर्धार करत चेचन्या भागातील बंडखोरांनी रशियाविरुद्ध सशस्त्र लढा द्यायला सुरुवात केली. सुरुवातीची दोन वर्षे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी रशियाची धडपड सुरु होती, त्यामुळे चेचन्यामध्ये रशियाला फार लक्ष देता आले नाही. मात्र त्यानंतर अध्यक्ष बोरिस येल्तसिन ह्यांनी १९९४ ला रशियन फौजेला पूर्ण ताकदनीशी उतरवले आणि पहिले चेचन्या-रशिया युद्ध सुरु झाले.



पहिले चेचन्या-रशिया युद्ध

१९९४ ते १९९६ काळात झालेल्या पहिल्या युद्धात सुमारे ३०,००० पेक्षा जास्त सशस्त्र चेचन्या बंडखोरांशी सामना करण्यासाठी रशियाने ७० हजार पेक्षा जास्त सैन्य चेचन्या परिसरात उतरवले. या रक्तरंजित लढाईत एक लाखापेक्षा जास्त नागरिक मारले गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो.  या लढाईत १५,००० पेक्षा जास्त बंडखोर मारले गेले, तर रशियाला ५,००० पेक्षा जास्त सैनिक गमावावे लागले. मोठे नुकसान झाल्याने चेचन्या बंडखोरांनी एक पाऊल मागे येत १९९६ ला रशिया सरकारशी समझोता केला. चेचन्याला पूर्ण स्वातंत्र्य देण्यास स्पष्ट नकार देत रशियाने बंडखोरांच्या नेत्यांना नमते घ्यायला लावले.

दरम्यान 1997 नंतर चेचन्या आणि परिसरातील बंडखोरांनी इस्लामिक इंटरनॅशनल ब्रिगेड स्थापन केली. यामध्ये परदेशी मुजाहिद्दीन (धर्मयोद्धे ) मोठ्या प्रमाणात होते. त्यांनी पद्धतशीरपणे चेचन्या आणि परिसरात आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली. तोपर्यंत रशियात अध्यक्ष येल्तसिनची जागा व्लादिमीर पुतिन या धडाडीच्या नेत्याने घेतली होती. रशियाची आर्थिक बाजू सावरण्याच्या कमिगरीचे ओझे असलेल्या पुतिन ह्यांनी बंडखोरांचा कायमचा नायनाट करण्यासाठी पाऊल उचलले.


दुसरे चेचन्या युद्ध

तब्बल 10 वर्षे म्हणजे 1999 ते 2009 चाललेले हे युद्ध म्हणजे रशियाने बंडखोरांना ठेचुन काढण्यासाठी उचललेले पाऊल होय. रशियाने त्याच्या लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टरचा पुरेपुर वापर केला. अचूक बॉम्बफेक करत बंडखोरांचे कंबरडे मोडले. अखेर पुतिन आणि त्यांच्यानंतर आलेल्या मेदवेदेव अध्यक्षांच्या आक्रमक धोरणामुळे बंडखोरांनी पुन्हा थेट लढाईचे नाव काढले नाही. या लढाईत 7,000 पेक्षा जास्त रशियाचे सैन्य, 16,000 पेक्षा जास्त बंडखोर आणि 45 हजारापेक्षा जास्त नागरिक मारले गेले. हा आकडा पहिल्या लढाईपेक्षा कमी असला तरी यामध्ये बहुतेक सर्व चेचन्याचा प्रदेश उद्ववस्त झाला.

तेव्हापासून चेचन्यामध्ये लोकशाही स्थापन करण्यात आली असून स्वतंत्र राज्याचा देण्यात आला आहे, नियमित निवडणुका होत आहेत. असं असलं तरी चेचन्यात रशियन सैन्याचा जागता पहारा असून रशियात अधेमधे बंडखोर बॉम्बस्फोट करत अस्तित्व दाखवत असतात.

ब्युड्योन्नोव्स्क ओलिस प्रकरण

पहिले चेचन्या युद्ध सुरु असतांना चेचन्याला लागून असलेल्या ब्युड्योन्नोव्स्क शहरात जून 1995 मध्ये चेचन्या बंडखोरांनी रशियाला पहिला हिसका दाखवला. सुमारे 300 पेक्षा जास्त बंडखोरांनी ब्युड्योन्नोव्स्क शहरांत विविध मार्गाने घुसत तब्बल 2000 पेक्षा जास्त नागरिकांना ओलिस ठेवले. चेचन्याला ताबडतोब स्वातंत्र्य मागणी बंडखोरांनी केली. चेचन्याच्या बाहेर तोही अशा ओलिस पद्धतीने बंडखोरांचा उपद्रव पोहचेल अशी कल्पनासुद्धा रशियाने केली नव्हती. युद्ध सुरु असल्याने रशियाने काही मागण्या मान्य करण्याची तयारी दाखवली. मात्र बंडखोरांनी एक-एक ओलिसांना मारायला सुरुवात केल्यावर रशियाने तीन दिवसांनंतर देशांतंर्गत सुरक्षा बघणा-या विशेष सुरक्षा दलाला आत घुसवले. त्यानंतर झालेल्या धुमश्चक्रीत 140 पेक्षा जास्त नागरिक ठार झाले तर 400 पेक्षा जास्त जखमी झाले.

किझलेयर- पेर्वोमायस्कोये ओलिस प्रकरण

जानेवारी 1996 मध्ये 300 पेक्षा जास्त चेचन्या बंडखोरांनी चढाई करत किझलेयर आणि पेर्वोमायस्कोये या चेचन्याजवळील दोन गावातील 2200 पेक्षा जास्त नागरिकांना तब्बल 9 दिवस ओलिस ठेवले. नागरिकांच्या सुटकेसाठी रशिया 9 दिवस प्रयत्न करत होती. अखेर रशियाच्या सैनिकांनी हल्लाबोल करत नागरिकांची सुटका केली. यामध्ये फक्त 35 बंडोखोर मारले गेले , तर इतरांनी पळ काढला. 50 पेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले.

बेसलॅन शाळा ओलिस घटना

चेचन्याजवळील एका बेसलॅन शहरात सप्टेंबर 2004 मध्ये 30 ते 35 चेचन्या बंडखोरांनी तिथल्या एका शाळेत घुसत 1100 पेक्षा जास्त नागरिकांना ओलिस ठेवले. शाळेमध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही गर्दी केली होती. तीन दिवस चाललेल्या या ओलिस नाट्याचा बिमोड करण्यासाठी रशियाने संयम संपेपर्यंत वाट पाहिली. अखेर रशियन सैन्याने धडक कारवाई करत बंडखोरांचा बिमोड केला. पण या कारवाईत 300 पेक्षा जास्त विद्यार्थी-पालक मारले गेले, तर 700 पेक्षा जास्त जखमी झाले.

मास्को नाट्यगृह ओलिस घटना

ऑक्टोबर 2002 मध्ये मास्को नाट्यगृह इथे झालेले ओलिस प्रकरण सर्वात गाजले. वर उल्लेख केलेले सर्व ओलिस नाट्य हे चेचन्याच्या परिसरात घडली होती. मात्र यावेळी चेचन्याच्या बंडखोरांची मजल रशियाच्या मध्यवर्ती भागात तेही राजधानीत धुमाकुळ घालण्यापर्यंत गेली. राजधानीमुळे असलेली विविध परदेशी प्रसारमाध्यमे, यामुळे या ओलिस नाट्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यातच रशियाने सुटका करण्यासाठी वापरलेल्या अजब मार्गामुळे हे ओलिस नाट्य गाजले.

30 ते 35 सशस्त्र बंडखोरांनी मास्को मधल्या सरकारी नाट्यगृहात घुसत 800 पेक्षा जास्त नागरिकांना ओलिस ठेवले. राजधानीतच हा प्रकार घडल्याने रशियाची चांगलीच नाचक्की झाली. एकही मागण्या मान्य न करता नेहमीप्रमाणे बंडखोरांना चिरडायचे याची पक्की मनधारणा रशियाच्या प्रशासकांनी केली. कुठल्या प्रकारे कारवाई करता येईल याच्यावर तीन दिवस डोकेफोड केल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा वायू नाट्यगृहातील वातानुकुलित पसरवायचा अशी योजना नक्की करण्यात आली. या वायुद्वारे व्यक्ति 20-30 मिनिटात बेशुद्ध पडणार होती. रशियाच्या विशेष सैन्य दलाने हा वायू सोडला, त्याचा फारसा फायदा झाला नाही. बंडखोर आधीच सावध झाले होते. त्यांनी नाट्यगृहात मोठी स्फोटके लावत नाट्यगृहाच्या एका कोप-यात आश्रय घेतला. 30 मिनिटे वाट बघितल्यावर विशेष सैन्य दलाने नाट्यगृहात जोरदार मुसंडी मारत बंडखोरांना ठार केले. यामध्ये काही नागरिक मृत्युमुकी पडले मात्र विशिष्ट वायुमुळे श्वसनाला अडथला होत मरणा-या नागरिकांचे प्रमाण जास्त होते. यामुळे रशियाला जगभारातून मोठी टीका सहन करावी लागली. 130 पेक्षा जास्त नागरिक यामध्ये मरण पावले.

असे टीचभर चेचन्या महाकाय, बलाढ्य रशियाचे जणु धुमसतं काश्मिर झाले आहे.  


इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...