Monday, August 19, 2019

'मंगल मिशन' चित्रपट, एक Disaster.....



चित्रपटात लिबर्टी घेत आहोत असं एकदा सुरुवातीला स्पष्ट केल्यावर काहीही करता येतं, काहीही दाखवायला चित्रपट निर्माते मोकळे. हे एका अर्थानं चुक नाही. मात्र काहीही पण दाखवतांना काही मुलभूत गोष्टी चुकीच्या दाखवू नयेत एवढीच अपेक्षा. जर 'मंगल मिशन' हा चित्रपट जर स्वतः मंगळयानाने बघितला तर तो स्वतः मंगळ ग्रहावर आपटून आत्महत्या केल्याशिवाय रहाणार नाही असं चित्रपट बघितल्यावर वाटतं. 

अर्थात मंगळ मोहिम ही अभिमानास्प्द आहे यात दुमत असण्याचा प्रश्नच येत नाही. जगांत या मोहिमेचे कौतूक झालं आहे. त्यातच चांद्रयान -२ मोहिम ताजी असतांना या चित्रपटावर आणखी उड्या पडतील. मात्र माझा चष्मा वेगळा असल्यानं अशा मोहिमांबद्दल किंवा इस्त्रोबद्दल कदाचित गैरसमज, एक वेगळंच चित्र इस्त्रोबद्दल लोकांच्या मनात तयार होण्याची भिती वाटते.   

सुरुवातीला चित्रपटातील काही चांगल्या गोष्टींवर लिहीतो. 

१..प्रत्यक्ष उपग्रह प्रक्षेपण करतानाची प्रक्षेपकाची - रॉकेटची हालचाल वगैरे हे सर्व अत्यंत उत्तम प्रकारे उभं केलं आहे. सर्वसामान्यांच्या भाषेत अगदी हॉलीवुड वगैरे यांच्या तोडीचे. 

२.. किमान अशा वेगळ्या विषयांवर चित्रपट होत आहेत याचे स्वागतच केलं पाहिजे. 

3.. तुलनेत जास्त वजनाचा उपग्रह मंगळग्रहाकडे कसा पाठवायचा हे ( विद्या बालनने ) गोफणीचा वापर करत अत्यंत सोप्या भाषेत सांगितलं - समजावलं आहे याबद्दल चित्रपट निर्मात्यांचे अभिनंदनच. मंगळ मोहिमेच्या वेळी इस्त्रोने साधं अनिमेशन देण्याचे कष्ट घेतले नव्हते. जी चुक आता चांद्रयान -२ मोहिमेच्या वेळी सुधारली आहे. असो...

४..ही मोहिम कशी अत्यंत कमी खर्चात पार पडली हे ठसवण्यात किंवा लोकांना सागंण्यात चित्रपट यशस्वी झाला आहे त्याबद्दल कौतुकच केलं पाहिजे.  

आता गडबडीच्या गोष्टी....

१.. मुंबई आणि परिसरात लोकलने प्रवास करणारी गृहिणी ही सकाळी लवकर उठून भाजी वगैरे करत जेवण करते, घर आवरते, रिक्षा पकडून रेल्वे स्टेशन गाठते, लोकल पकडते, ऑफिसला पोहचते आणि पोहचल्यावर कॉम्प्युटरचे बटन ऑन करते. कित्ती सोपं ना. तसंच काहीसं विद्या बालन करते. चित्रपटाची सुरुवातच विद्या बालनच्या धावपळीने आहे. म्हणजेच घर आवरुन जेवण तयार करुन धावत धावत स्वतःची गाडी काढत, ट्रॅफिकमधून वाट काढत इस्त्रोचे ऑफिस गाठते आणि रॉकेट ( GSLV MK 3 ) उडवण्याच्या कामाला लागते. Countdown च्या शेवटच्या क्षणी शेवटचे काही सेकंद असतांना घाईघाईने का होईना ओके म्हणते आणि मोहिम पुढे सरकते.....( आणि मग ओम फट स्वाहा ). 

इतकं रॉकेट - प्रक्षेपकाचे प्रक्षेपण करणं सोपं असतं का ?  GSLV MK3 सारख्या रॉकेटचे प्रक्षेपण हा किमान ४५ दिवसांचा एक मोठा व्यायाम असतो. शास्त्रज्ञ तर शेवटचे काही तास कुटुंबियांपासून कटाक्षाने दूर असतात, २४ तास रॉकेटच्या  development कडे लक्ष ठेवले जात असते. एखादा छोटा पक्षी, उंदीरही गडबड करु शकतो. रॉकेटचे प्रक्षेपण हे दिवाळीतला अग्नीबाण सोडल्यासारखे सोप्प दाखवलं आहे. 

२..मंगळयान मोहिम ही इस्त्रोची एक दुय्यम मोहिम होती असं या चित्रपटात दाखवलं आहे. जे अत्यंत चुकीचं आहे. इस्त्रो ही अत्यंत professional पद्धतीने काम करणारी सरकारी संस्था आहे हे सर्वात आधी लक्षात घेतलं पाहिजे. एखादी मोहिम जाहिर करतांना तिचे लक्ष्य, दुरगामी परिणाम, भविष्यातील उपाययोजना यांचा अत्यंत काटेकोर असा विचार केलेला असतो. त्यामुळे ही एक दुय्यम मोहिम नव्हती तर एक पृथ्वीपासून अत्यंत दूर - परग्रहावरची पहिली मोहिम होती, एक महत्वकांक्षी अशी इस्त्रोसाठी मोहिम होती. 

३.. या चित्रपटात मंगळयान मोहिमेला बजेट खूपच कमी देण्यात आले होते किंवा कमी पैशात काहीही करुन भागवा असं सांगितल्याचं दाखवलं आहे. हे एक दुसरं माझ्या मते Disaster आहे. उलट चांद्रयान -१  मोहिमेचा एक यशस्वी टप्पा पार पाडल्यावर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडयात २००८ ला तत्कालिन इस्त्रोचे प्रमुख जी माधवन नायर यांनी मंगळ ग्रहावर उपग्रह पाठणार असल्याचं जाहिर केलं होतं. पुढील ३ वर्ष या मोहिमेचा अत्यंत काटोकर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासासाठी आवश्यक बजेट देण्यात आले होते. त्यानंतर १५ ऑगस्ट २०१२ ला लाल किल्ल्यावर भाषण करतांना तत्कालिन पंतप्रधान मनोमहन सिंह यांनी ही मोहिम २०१३ मध्ये प्रत्यक्ष होणार असल्याचं जाहिर केलं. लगेचच या मोहिमेसाठी आवश्यक पैसेही देण्यात आले. कमी बजेटमध्ये भागवा असं दाखवल्यानं लोकं काय बोध घेत असतील, त्याच्या मनांत आपण काय ठासवत आहोत याची मला भिती वाटते. 

चांद्रयान -२ मोहिम जी आत्ता सुरु आहे ती त्यावेळी म्हणजे २०११-१२ होणं अपेक्षित होतं, जी काही कारणांनी पुढे ढकलण्यात आली. तेव्हा चांद्रयान -२ मोहिमेसाठी असलेला पैसा हा मंगळयान मोहिमेसाठी वळवण्यात आला असं चित्रपटांत दाखवण्यात आलं. हे अत्यंत हास्यास्पद आहे. हे काही PWD खातं नाही की इकडच्या रस्त्यासाठी दिलेला पैसा हा दुसऱ्या रस्त्याच्या कामासाठी वळवून वापरला गेला.   

४..आणखी एक...चित्रपटांत मंगळयान ही दुय्यम मोहिम दाखवली असल्यानं या मोहिमेवर काम करण्यासाठी मळकट-कळकट-प्रचंड धुळ असलेली जागा देण्यात आली. मग महिला शास्त्रज्ञांनी पदर कंबरेला कोसत जागा साफ केली. सर्व शास्त्रज्ञांनी रंगरंगोटी करत जागा चकाचक केली, एवढी केली की तिथे आलेला ( मंगळयान मोहिमचा प्रमुख ) अक्षय कुमारला धक्का बसतो. वगैरे वगैरे......हे बघुन मी खाली पडायचाच बाकी होतो. ही साफसफाई बघितल्यावर मंगळयान प्रकल्पावर प्रत्यक्ष काम केलेल्या शास्त्रज्ञांची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायला आवडेल.😀😂😁.  पण त्यापेक्षा आपण लोकांच्या मनांत किती चुकीचं भरवत आहोत, एक चुकीचं मत तयार करत आहोत याची भिती वाटते.   

५.. या चित्रपटांत दुय्यम ठरवलेल्या मंगळयान मोहिमेकरता इस्त्रोच्या विविध विभागाकडून ज्युनियर शास्त्रज्ञ दिले जातात. हे सुद्धा एक हास्यास्पद गोष्ट आहे. मंगळ ग्रहावर यान पाठवण्याचा अनुभव अर्थात इस्त्रोकडे कोणाकडे नसला तरी विविध मोहिमांमध्ये गेली काही वर्षांचा अनुभव असलेले अनुभवी शास्त्रज्ञ या मोहिमेकरता वळवण्यात आले हे सत्य आहे. 

६.. आता एक तांत्रिक गोष्ट. विद्या बालन ही मंगळयान हा उपग्रह बनवणाऱ्या प्रकल्पाची प्रमुख म्हणून या चित्रपटात दाखवली आहे. म्हणजेच उपग्रह कसा असला पाहिजे, त्यावर कोणती उपकरणे असली पाहिजेत, उपग्रहांत इंधन किती असलं पाहिजे, उपग्रहात काय सुधारणा केल्या पाहिजेत वगैरे वगैरे यावर लक्ष ठेवणार. यासाठी विद्या बालनच्या हाताखाली वेगवेगळ्या टीम आहेत.

तर अक्षय कुमार हा संपुर्ण मंगळयान प्रकल्पाचा प्रमुख आहे. म्हणजेच हा उपग्रह कसा असला पाहिजे, या प्रकल्पाचे बजेट कसं असलं पाहिजे, कोणत्या रॉकेटद्वारे हा उपग्रह सोडला पाहिजे, नेमकी तारिख वेळ काय असली पाहिजे, आवश्यक कोणत्या पुरक यंत्रणा या मोहिमेसाठी विकसित केल्या पाहिजेत वगैरे वगैरे गोष्टी अक्षय कुमार बघणार असतो. 

त्यातच उपग्रहाचे रॉकेटद्वारे प्रक्षपित करणे ही एक स्वतंत्र गोष्ट आहे. रॉकेट तयार कऱणे, त्याची जोडणी करणे, इंधन भरणे आणि योग्य वेळी प्रक्षेपित करणे यासाठी एक वेगळी यंत्रणा राबत असते. नेमकी याच ठिकाणी एक गल्लत या चित्रपटात करण्यात आली आहे. 

विद्या बालनचे काम हे उपग्रह बनवून तो रॉकेटच्या निर्मात्यांकडे सोपवणे आणि उपग्रह अवकाशात गेल्यावर त्याच्याकडून काम करवून घेणे एवढं आहे. 

इथे रॉकेटच्या प्रक्षेपणाच्या प्रक्रियेत उगाचच विद्या बालन आणि तिच्या टीमला मध्ये घुसवण्यात आले आहे. हे बघिल्यावर इस्त्रोच्या टीमने, मंगळयानच्या टीमने कपाळावर नक्कीच हात मारला असेल. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जर उद्या डंपिंग ग्राऊंडला जाणाऱ्या गाड्यांची मोजदाद करायला सुरुवात केली तर कसं वाटेल तसंच काहीसं इथे दाखवण्यात आलं आहे.

७..आणखी एक भयानक तांत्रिक चूक....उपग्रहाचे रॉकेट - प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण करतांना विविध गोष्टींसह हवामानाचा अंदाज ही गोष्ट गृहीत धरलेली असते आणि त्यानुसारच नक्की वेळ ठरवली जाते. अगदी खूप धुवाधार पाऊस पडत असेल, सुर्यप्रकाश नसल्यानं अंधार झाला असेल, जोरदार वारे वाहत असतील तर वीजा चमकणे याचे प्रमाण बघितले जाातेे, वाऱ्याचा वेग कमी होण्याची वाट बघितली जाते. सुर्यप्रकाश नाही, जोरात पाऊस पडत आहे म्हणून प्रक्षेपण कधी थांबवलं जात नाही. नेमकं हेचं इथे दाखवलं आहे. म्हणजे पाऊस पडत आहे, सुर्यप्रकाश नाही म्हणून मंगळयानचे प्रक्षेपण थांबवले जाते आणि सर्वजण आपापल्या घरी जायला निघतात, अक्षय कुमार गाडीत बसतो आणि अचानक पाऊस थांबतो - सुर्यप्रकाश अवतरतो आणि मग पुन्हा सर्वजण धावाधाव करत कंट्रोल रुममध्ये येतात आणि रॉकेटचे प्रक्षेपण करतात. हे बघितल्यावर हसावं की रडावं अशी अवस्था माझी झाली होती. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी काय झाली असेल कल्पना पण करवत नाही. 

असं अचानक वाटलं म्हणून धावत धावत जाऊन रॉकेटचे प्रक्षेपण कधी केले जात नाही.

या सात गंभीर चुका आहेत पण त्याचबरोबर या चित्रपटात ज्युनियर शास्त्रज्ञ शर्मन जोशी कसा कुंडलिवर विश्वास ठेवणारा आहे, त्याच्या लग्न पत्रिकेत मंगळ ग्रह कसा मारक आहे हे दाखवण्यात आले आहे. हे कशासाठी...हवामाना विभाग जसा एक टिंगल टवाळीचा विषय झाला आहे तसं इस्त्रोबाबात करायचं आहे का असा प्रश्न पडतो.   

या चित्रपटात मंगळयान उपग्रहाची प्रमुख विद्या बालन देवाची प्रार्थना करतांना दाखवली आहे. अर्थात सर्वापलिकडे देव असतो, श्रद्धा नावाचा भाग असतो वगैरे सांगण्याचा हा साळसूद असा प्रयत्न आहे. नास्तिक असल्यानं मला हे सर्व हास्यास्पद वाटते. 

चित्रपटात एक सिन आहे ज्यामध्ये एक बैठक सुरू असते, इस्रोचे प्रमुख ही बैठक घेत असतात. बैठकीत अचानक मंगळयान प्रकल्पाचा प्रमुख अक्षय कुमार घुसतो आणि TV वर सुरू असलेली ब्रेकिंग news दाखवतो. चीनचा मंगळ ग्रहासाठी असलेला उपग्रह हा उड्डाण करतानाच रॉकेटचा स्फोट झाल्याने नष्ट झालेला असतो. तेव्हा चीन स्पर्धेत नाहीये आता भारताला चांगली संधी आहे असं अक्षय कुमार पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हे सर्व हास्यास्पद आहे. मुळात इस्रो ही संस्था चीनबरोबर स्पर्धा करत आहे ना कोणत्या देशाशी. जगात अवकाश तंत्रज्ञानामध्ये जे बदल विकास होत आहे त्यामध्ये मागे रहाता कामा नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पद्धतशीरपणे पावले टाकत आहे. एखाद्या घटनेने किंवा ब्रेकिंग news ने असं काही धोरण लगेच ठरवले जात नसते.

अपोलो -१३ सारखा अप्रतिम चित्रपट, नुकताच आलेला The martian, Gravity सारखे चित्रपट असो किंवा इतर अवकाश मोहिमांवर आधारलेले हॉलीवूडचे चित्रपट असो यामध्ये मसाला जरुर मारला आहे, मात्र हे चित्रपट साकारतांना मुळ अवकाश तंत्रज्ञानातील संकल्पनांना, नियमांना कुठेही धक्का लावलेला नाही. उलट ज्या संकल्पना सर्वससामान्यांच्या कल्पनेच्या पलिकडे आहेत, डोक्याचा भुगा होईल अशा गोष्टी सांगणारे Interstellar सारखे चित्रपट तर अप्रतिमच म्हणावे लागतील.

आपल्याकडे अवकाश तंत्रज्ञानाच्या ज्ञानाबद्दल तशी बोंब आहे. इस्त्रोला तर आजही अशा गोष्टी सर्वसामान्यांना सांगाव्याशा वाटत नाहीत. किमान ही चूक चांद्रयान २ मोहिमेच्या निमित्ताने सुधारली गेली आहे असं म्हणावं लागेल. जी काही अवकाश तंत्रज्ञानाबद्दल माहिती लोकांकडे उपलब्ध आहे ती केवळ खगोल मंडळ सारख्या विविध संस्थांच्या कामामुळे किंवा मोहन आपटे यांच्यासारख्या काही लेखकांमुळे.  

असं असतांना मंगल मिशनसारखे चित्रपट काही चुकीच्या संकल्पना ठोकपणे दाखवत असतील तर अशा चित्रपटांवर टीकाच केली पाहिजे. 

तुम्हाला काय वाटते ?



Wednesday, July 10, 2019

नौदल आणि हवामानाचा अंदाज



आपण परदेशातील हवामानाच्या विशेषतः पावसाच्या अंदाजाबाबत ऐकून असतो. अमुक वेळेला पाऊस पडणार आहे असं तिथे काही तास आधीच हवामान विभागातर्फे सांगितलं जातं आणि तिथली लोकं त्यावर विश्वास ठेवतात आणि पाऊस खरोखर पडतोही.

मला आपल्या देशात, आपल्या नौदलाबद्दल आलेला अनुभव सांगतो आणि मग प्रश्न पडतो की सर्वसामान्याला नौदलासारखी अचूक माहिती का मिळत नाही, का दिली जात नाही.

निमित्त होतं नौदलाच्या पाणबुडीच्या शाखेच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होत असल्याचं. काही मोजक्या पत्रकारांना - वृत्त वाहिन्यांना मुंबईत नौदलाच्या तळावर पार्क केलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पाणबुड्यांमध्ये जायची संधी मिळाली होती. ऑगस्टचा शेवटचा आठवडा होता, नेमका दिवस आठवत नाही, 29 जुलै 2017 असावा.

साधारण 10 वाजता आम्हाला नौदल तळावरील पाणबुडीचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी नेण्यात आले. बाहेर जोरात पाऊस पडत होता. सुरुवातीला पाणबुडी ताफ्याचे कमांडर यांच्याशी पाणबुडीच्या ठिकाणी वार्तालाप ( वेळ 11 ते 12.30 ),  त्यानंतर जेवण ( 2 वाजेपर्यंत ) मग प्रत्यक्ष पाणबुडीला भेट ( 2 ते 4 )  असा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. 

दिल्लीतील नौदल मुख्यालयाकडून मोठ्या मुश्किलीने परवानगी काढत या सर्व भेटीचे नियोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे संबंधित नौदल जनसंपर्क अधिकारी भलतेच खुश होते आणि अर्थात प्रत्येक कोनातून पाणबुडी बघायला मिळणार असल्याने आम्हीही भलतेच खुश होतो.असो....

10.45 झाले तरी पाऊस अजिबात थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. सर्व जण म्हणत होते आता वेळ वाया जाणार. तेवढ्यात एक नौदल अधिकारी म्हणाला पाऊस थांबेल 11 नंतर. आणि खरंच 11. 10 च्या सुमारास पाऊस कमी झाला आणि त्यानंतर पूर्णपणे थांबला. 

आम्ही सुरक्षेचे सोपस्कार पार पाडत 11.30 च्या सुमारास पाणबुड्यांच्या ठिकाणी पोहचलो. रशियन बनावटीच्या सिंधुघोष आणि जर्मन बनावटीच्या शिशुमार वर्गातील पाणबुड्या नौदल तळावर पार्क केलेल्या होत्या. खरं तर अनेकदा नौदल तळावर विविध कार्यक्रमांसाठी गेलो असतांना या पाणबुड्या अनेकदा बघितल्या होत्या, मात्र त्या दिवशी प्रत्यक्ष पाणबुडीवर जायची संधी मिळणार होती.

आम्ही पोहचल्यावर काही मिनिटात तेथे पाणबुडी ताफ्याचे कमांडर दाखल झाले. पाणबुड्यांवर वार्तालापाचा सोपस्कार पार पडला. तो सुरू असतांना एक हलका पाऊस आला, एक मिनिटाकरता...कमीच. तिथे कुठेच आसरा घ्यायची सोय नसल्याने आणि सोबत कॅमेरा वगैरे उपकरणे असल्याने जरा पळापळ झाली खरी. एक अधिकारी म्हणाला जाईल पाऊस लगेच...पाऊस थांबलाही. 

तोपर्यंत एक वाजत आला होता, आम्ही मुख्यालयात परतलो आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. 

पाणबुडीवर जायचे असल्याने सर्वांनी जेवण दीडच्या आतच उरकले होते, सर्वजण जाण्यासाठी तयार होते. मात्र पाऊस काही थांबला नव्हता. 1.45 झाले तरी पाऊस थांबवण्याची चिन्हे नव्हती. आम्हा सर्वांचीच अस्वस्थता वाढत होती. नौदल जनसंपर्क अधिकारी किंवा इतर अधिकारी मात्र शांत होते. 

नंतर जणू 'चमत्कार' झाला 1.50 नंतर पावसाचा जोर कमी झाला आणि काही मिनिटात पाऊस थांबला देखील. लगेच आम्ही मुख्यालयाच्या इमारतीमधून बाहेर पडलो आणि बसने पाणबुड्यांच्या ठिकाणी पोहचलो आणि आपापल्या कव्हरेज मध्ये व्यस्त झालो.

दोन्ही पाणबुड्यांच्या आतबाहेर आमची धावपळ सुरू होती. बाहेर उभा असतांना अचानक माझे लक्ष BSE इमारतीच्या परिसराकडे गेले. BSE इमारत आणि RBI इमारतीच्या परिसरात आकाशात मोठ्या प्रमाणात काळे ढग जमा झाले होते. म्हंटलं आता पाऊस येणार आता. तर नौदल अधिकाऱ्याने क्षणार्धात सांगितले नाही येणार. म्हंटलं कसं काय ?. तर अधिकारी म्हणाला जोरदार वाऱ्याची दिशा ही नौदल तळाच्या समुद्राकडून जमिनीच्या दिशेने आहे. हे वारे ढगांना पुढे घेऊन जातील, त्या भागातही पाऊस पडणार नाही. आणि खरंच तसं झालं, त्या भागातील अंधार किंवा मोठाले ढग हे पुढे सरकले. उलट दूरवर ढग पांगल्याचेच बघायला मिळाले. 

संध्याकाळचे 4 चे पाच वाजले. आम्ही काही पाणबुडी सोडायला तयार नव्हतो. शेवटी नौदल अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघून आम्हीच आटोपते घेतले.

पाणबुड्यांवर एवढा वेळ घालवता आल्याने, पाणबुडीला आतून बाहेरून बघता आल्याने आम्ही सर्व भलतेच खुश होतो. 

पावसाने उघडीप दिल्याने हे सर्व करता आले असल्याचं मत सर्वांचेच झालं होतं. एकजण म्हणाला पावसाने चांगलीच साथ दिली आपल्याला.

तेवढ्यात हे सर्व नियोजन करणारा अधिकारी म्हणाला की पावसाचे दिवस, पावसाची वेळ बघूनच हे सर्व नियोजन केलं होतं. त्यावरूनच आजचा दिवस आणि वेळ ठरवण्यात आलं होतं. ज्या वेळेत पाऊस पडणार नव्हता त्याच वेळेतच ही visit ठेवण्यात आली होती.

थोडक्यात नौदल हे हवामान विभागाच्या माहितीचे विश्लेषण करुन कसा उपयोग करते हे पटकन कळून आले, प्रत्यक्ष अनुभवता आले. खरं तर नौदलात हवामान विभागा संदर्भात एक कक्ष असतो, प्रत्येक युद्धनौकेवर - प्रत्येक नौदल तळावर स्वतंत्र अधिकाऱ्यांची यंत्रणा यासाठी कार्यरत असेत. हवामान विभागाकडून येणारी माहिती, त्याचे विश्लेषण करणारी एक स्वतंत्र यंत्रणा नौदलकडे असते. शस्त्रास्त्र विभागाएवढाच या हवामान विभागाबद्दल नौदल हे गंभीर असते. 

म्हणूनच दुसऱ्या महायुद्धातील दोस्त राष्ट्रांची D Day मोहीम नॉर्मेंडी लँडिंग मोहिम यशस्वी झाली. यामध्ये हवामानाचा अचूक अंदाज हा महत्त्वाचा ठरला. 

पुढील प्रत्येक तासाच्या हवामानाच्या बदलाच्या माहितीवरच युद्धनौकांची आगेकूच अवलंबून असते. मग हे नौदल करू शकतं मग अशी माहिती विश्लेषणात्मक माहिती सर्वसामान्यांना का उपलब्ध होत नाही ? 

इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट सामन्यात पाऊस पडणार आहे की नाही याबद्दलचा अंदाज 100 टक्के अचूक ठरतो. मग आपल्याकडे हवामानाच्या अंदाजाबद्दल का बरे अशी माती खाल्ली जाते. यावर एक टिपिकल उत्तर हवामान विभागाचे आहे, आपला मान्सुनचा पाऊस बेभवशाचा असतो, लहरी असतो वगैरे....अशी उत्तर कितीपत पचवायची, किती सहन करायची याला मर्यादा आहेत. 

भरगच्च पगार घेणाऱ्या, अत्याधुनिक उपग्रह दिमतीला असलेल्या, चांगल्या सोई सुविधा असलेला हवामान विभागात 'अंदाज' या शब्दाला काहीच अर्थ राहिलेला नाही असं म्हणायची वेळ का येते हा खरा प्रश्न आहे.

९ जुलैचा मुसळधार पावसाचा अंदाज आदल्या दिवशी ऐकल्यावर आणि त्या दिवशी घामाच्या धारा सहन केल्यावर हे लिहायचा नुसता खटाटोप केला आहे. 

Monday, June 3, 2019

नवा भिडू, नवं राज्य....मात्र आव्हान तेच


नवा भिडू, नवं राज्य....मात्र आव्हान तेच

गेली ५ वर्ष ( एनडीए -१ ) देशाच्या संरक्षण विभागात अनेक बदल बघायला मिळाले. पहिली गोष्ट म्हणजे संरक्षण मंत्री सतत बदलत होते. सुरुवातीला अरुण जेटली, मनोहर पर्रिकर, पुन्हा अरुण जेटली, निर्मला सितारमण असे संरक्षण मंत्री बदलत होते. मनोहर पर्रिकर यांना अडीच वर्षे मिळाली तरी त्यांचा शेवटचा काळ हा आजारपणातच गेला. सीतारमण यांना दिड वर्ष मिळाली, पण तोपर्यंत लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या होत्या.

दुसरा बदल म्हणजे डोकलाम प्रकरण आणि सर्जिकल स्ट्राईक घटना. ही प्रकरणे आक्रमकपणे हाताळल्याबद्दल पुरेपर मार्क हे संरक्षण विभागाला द्यायलाच हवेत.

तिसरा बदल म्हणजे गेली अनेक वर्षांची वन रॅक वन पेन्शन ही मागणी पुर्ण झाली. 

याबरोबर राफेल करार, नव्या युद्धनौकांची बांधणीचा निर्णय, रशियाकडून भाडे तत्वावर अणु पाणबुडी घेण्याचा निर्णय, एस-४०० ही क्षेपणास्त्र भेदी प्रणालीचा करार, स्वदेशी बनावटीच्या आक्रमक श्रेणीतील अणु पाणबुडीच्या निर्मितीला परवानगी असे काही महत्त्वाचे निर्णय झाले. अमेरिकेकडुन हलक्या वजनाची तोफा ( M-777 Howitzer ) घेण्याचा निर्णय याच सरकारच्या काळांत झाला. बोफोर्स नंतर सुमारे ३० वर्षांनी पहिल्यांदाच नवीन तोफा संरक्षण दलानं ताफ्यात दाखल करुन घेतल्या. तर स्वदेशी बनावटीची, बोफोर्सच्या तोडीची 'धनुष' तोफही याच काळांत लष्करात दाखल झाली. K -9 वज्र नावाची तोफ या काळांत दाखल व्हायला सुरुवात झाली.

नवीन शस्त्रास्त्र खरेदी प्रणालीची अंमलबजावणीही या सरकारच्या काळांत सुरु झाली हे विशेष. 

उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी या आणखी एक महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख करावा लागेल. 

स्वदेशी मिनी जीपीस प्रणाली या सरकारच्या काळांत कार्यान्वित झाली ज्याचा संरक्षण दलाला मोठा फायदा होत आहे. 

असं असलं तरी आता नवीन संरक्षण मंत्री राज नाथ सिंह यांच्यापुढे काही आव्हाने जरुर आहेत. कारण एखादा देश १०० टक्के शस्त्रसज्ज कधीच होऊ शकत नाही, परिस्थीतीनुसार सतत बदल हे करावेच लागतात. चीन - पाकिस्तान आणि दहशवतवाद यांसारखे आव्हान लक्षात घेता, सद्य परिस्थिती लक्षात घेता भारतासारखा देश १०० शस्त्रसज्ज होण्याच्या दृष्टीने कैक मैल दुर आहे.

तेव्हा देशाच्या  संरक्षण क्षेत्रात शस्त्रसज्जजेच्या दृष्टीने काय बदल अपेक्षित आहेत ते बघुया.... 

१.. Light Utility Helicopter - विविध कामांकरता वापरली जाणारी हलक्या वजनाची हेलिकॉप्टर. लष्कर, हवाई दल, नौदल, तटरक्षक दल या चारही संरक्षण दलाच्या विभागांसाठी या हेलिकॉप्टरची नितांत आवश्यकता आहे. सध्या आपल्याकडे फ्रान्सचे तंत्रज्ञान असलेली चिता, चेतक ही हेलिकॉप्टर आहेत. याबाबातचे तंत्रज्ञान  १९६० दशकांतील असले तरी आपण वेळोवेळी सुधारणा केल्या आहेत. मात्र बदलत्या परिस्थतीनुसार आता नव्या हेलिकॉप्टरची नितांत आवश्यकता आहे. दोन पायलटसह एकुण पाच जणांना वाहुन नेण्याची क्षमता असलेले Utility Helicopter हेलिकॉप्टर कुठल्याही वातावरणात गस्त घालु शकते. टेहळणी करणे, शोध आणि सुटकेच्या मोहिमा पार पाडणे, अवघड आणि छोट्या जागी उतरण्याची Utility Helicopter ची क्षमता आहे. संरक्षण दलाने Ka -226 या रशियाच्या हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी करार केला असला तरी गेली ५ वर्षे तो कागदावरच आहे. काही महिन्यांपूर्वी चर्चेत असलेल्या एचएएल ( HAL ) ने Light Utility Helicopter बनवले असुन त्याच्या चाचण्या पुर्ण होत आहेत. स्वदेशी काय रशियाचे तंत्रज्ञान असलेले हेलिकॉप्टर काय, अशा Light Utility Helicopter ची मोठ्या प्रमाणात नितांत गरज आहे, या हेलिकॉप्टरच्या निर्मितीला सुरुवात होणे नितांत गरजेचे आहे.

२.. Multipurpose Medium Weight Helicopter - नौदलासाठी बहुउद्देशीय हेलिकॉप्टरची आवश्यकता आहे. सध्या युद्धनौका आहेत पण त्यावर पुरेशी हेलिकॉप्टर नाहीत अशी अवस्था आहे.  

३..पाणबुड्या - भारताच्या तीनही बाजुला पसरलेला अथांग महासागर, या भागातून होणारी व्यापारी जलवाहतुक लक्षात घेता या भागावर वर्चस्व ठेवणे ही एक आव्हामात्मक गोष्ट आहे. यासाठी मोठा पाणबुडयांचा ताफा भारताकडे असणं आवश्यक आहे. सध्या भारताकडे १३ डिझेल इलेक्ट्रिक तत्वावर काम करणाऱ्या पाणबुड्या आणि २ अणु उर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या ताफ्यात आहे. सामरिक दृष्ट्या ही संख्या २४ पेक्षा कितीतरी जास्त असणं आवश्यक आहे. तेव्हा नवीन पाणबुडयांच्या निर्मितीवर भर देणे आवश्यक आहे.

४..विमानवाहू युद्धनौका - संरक्षण दल किंवा या क्षेत्रातील विशेतज्ञानुसार भारतीय नौदलाकडे किमान ३ आणि जास्तीत जास्त ५ विमानवाहू युद्धनौका असणे आवश्यक आहे. सध्या भारताकडे एकच विमानवाहु युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य आहे. तेव्हा विमानवाहु युद्धनौकांच्या बांधणीबाबत निर्णय घेणे गरजेचं आहे. 

५..लढाऊ विमानं - भारताकडील शेजारी शत्रु पक्ष लक्षांत घेता देशाकडे किमान ४२ लढाऊ विमानांचा ताफा - Squadron असणं आवश्यक आहे. ( एका ताफ्यात सुमारे १६ ते २० लढाऊ विमानं असतात ). सध्या आपण ३० पर्यंत खाली आलो आहेत. तेव्हा नवी लढाऊ विमाने लवकर दाखल करुन घेणे ( राफेल, तेजस ) आणि नव्या लढाऊ विमानाांच्या समावेशाबाबत निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

६..युद्धनौका - सध्या विविध गोदींमध्ये युद्धनौका बांधणीचा कार्यक्रम धडाक्यात सुरु आहे, इतका की पुढची पाच वर्षे नवीन ऑर्डर द्यायला जागाच नाहीये. असं असलं तरी स्वबळावर संपुर्ण देशी बनावटीची मोठी युद्धनौका बांधून सेवेत दाखल होईपर्यंत ७ ते १० वर्ष जातात. तेव्हा युद्धनौका बांधणींचा कालावधी कमी करणं आवश्यक आहे. 

७..तोफा - क्रिकेटमध्ये catches win matches असं म्हणतात तसं युद्धात artillery wins wars असं म्हणतात. लष्करात M-777 Howitzer आणि धनुष या तोफा दाखल होत असल्या तरी किमान २००० पेक्षा विविध नव्या तंत्रज्ञानाच्या तोफांची आवश्यकता आहे.

८..रणगाडे - स्वदेशी बनावटीचा अवाढव्य अर्जुन - २ असो किंवा रशियाच तंत्रज्ञान असलेला  टी - ९० रणगाडा असो, शस्त्रसज्जता म्हणून मोठ्या संख्येने रणगाड्यांची गरज आहे.  

९.. युद्धासाठी सिद्ध दारुगोळ्याची कमतरता हाही गेल्या काही वर्षात सातत्याने चर्चिला जाणारा विषय आहे.   

या व्यतिरिक्त नव्या रायफलच्या मागणी पासून शस्त्रांचे नुतनीकरण ही सदासर्वकाळ सुरु रहाणारी प्रक्रिया आहे, जी वेळोवेळी पुर्ण करणे आवश्यक आहे.

मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षात संरक्षण दलाचे बजेट हे आकड्याने जरी वाढले असले तरी अर्थसंकल्पात याची टक्केवारी ही २ टक्क्याच्या खाली घसरली. भारतासारख्या देशाने भौगोलिक, राजकीय, सामरिक परिस्थिती लक्षात घता संरक्षण दलाच्या बजेटचा आवाका हा चार टक्क्याच्या वर ठेवणे अपेक्षित असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे.

आजही लष्कर, नौदल, वायु दल, तटरक्षकमध्ये अनेक जागा रिक्त आहेत. सर्जीकल स्ट्राईक नंतर लष्कराकडे जाण्याचा ओढा वाढला आहे असं कुठेही ऐकीवात नाही. तेव्हा करियर म्हणून संरक्षण दल हे पहिल्या पाच क्रमांकात जेव्हा येईल तेव्हाच रिक्त जागांचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल. याकरता सरकार काय करतं त बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

या व्यतिरिक्त उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी, सर्जिकल स्ट्राईक यासारख्या आणखी कोणत्या वेगळयाच घटना घडतील, संरक्षणाच्या दृष्टीकोनातून कोणते वेगळे राजकीय डावपेच येत्या काळांत आखले जातील याचा अंदाज लावणे कठीण आहे.

तेव्हा बघुया विद्यमान नवे संरक्षण मंत्री किती प्रभाव पाडतात ते, बघुया 'अनुभवी' मोदी सरकार काय काय करतं ते.

Saturday, May 4, 2019

नौदलासाठी नवे हेलिकॉप्टर

AEW म्हणजेच Airborn Early Warning And Control क्षमता असलेली रशियन बनावटीची Kamov - 31 हेलिकॉप्टर विकत घेण्याचा निर्णय Defence Acquisition Council (DAC) ने घेतला आहे.   

10 हेलिकॉप्टर नौदल ताफ्यात प्रत्यक्ष करार झाल्यावर दाखल होणार आहेत. या व्यवहारासाठी सुमारे 3600 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

या हेलिकॉप्टरचे मुख्य वैशिष्टय म्हणजे यावरील असलेल्या वैशिष्टयपूर्ण रडारामुळे भर समुद्रात 150 किमी परिघातील लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन वगैरे शोधणे सहज शक्य होणार आहे. तसंच 200 किमी परिघातील पाण्यावरील जहाजे, युद्धनौका यांचा ठाव घेणे शक्य होणार आहे. हवेत उड्डाण करतांना एवढ्या अंतरावरील शत्रू पक्षाच्या हालचालीबद्दल रडारद्वारे मिळालेली माहिती ही 250 किमी अंतरावरील स्वतःच्या युद्धनौकेकडे पाठवण्याची क्षमता या Kamov -31 मध्ये आहे.

अशा हेलिकॉप्टरमुळे नौदलाच्या मारक क्षमतेत भविष्यात मोठी भर पडणार आहे हे निश्चित.

Thursday, April 25, 2019

आता चांद्रयान - २ मोहिम जुलैमध्ये होणार.....




इस्त्रोची महत्वकांक्षी चांद्रयान -२  मोहिम पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही मोहिम जुलै महिन्यात होईल अशी अपेक्षा आहे. 

याआधी ही मोहिम गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये होणं अपेक्षित होतं. मात्र त्यानंतर जानेवारी २०१९ ही नवी वेळ जाहिर करण्यात आली. त्यानतंर पुन्हा एकदा तांत्रिक समस्यांचे कारण सांगत एप्रिल महिन्यात चांद्रयान -२ मोहिम होणार असल्याचं जाहिर करण्यात आलं. मात्र आता पुन्हा एकदा ही मोहिम पुढे ढकलण्यात आली असून आता जुलै महिन्यात चांद्रयान -२ हे अवकाशात झेपावेल अशी अपेक्षा आहे.
चांद्रयान -२ चे संपुर्ण वजन हे सुमारे 3,887 किलो एवढे आहे. यामध्ये चंद्राभोवती फिरणा-या यानाचे वजन हे २,२७९ किलो एवढं आहे. चंद्रावर उतरणा-या लॅडरचे वजन हे १,४७१ किलो एवढं आहे. ( लॅडरचे नाव देशाच्या अवकाश मोहिमेचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावरुन 'विक्रम' असं ठेवण्यात आलं आहे. )  तर या लॅडरच्या पोटातून बाहेर पडत चांद्र भुमीवर संचार करणा-या रोव्हरचे वजन सुमारे ३० किलो आहे. ( या रोव्हरचे नाव 'प्रज्ञान' असं ठेवण्यात आलं आहे. )

आता उशीर होण्यास नेमकं काय झालं ?  

इस्राईलमधील एका खाजगी कंपनीचे चांद्रयान हे नुकतेच चंद्राच्या दिशेने पाठवण्यात आले होते. त्या यानातील लॅडर हा चांद्र भुमिवर अलगद उतरणार ( Soft landing ) होता. ११ एप्रिलला नियोजन केल्याप्रमाणे हा लॅडर मुख्य यानापासून वेगळा झाला खरा मात्र तो चंद्रावर अलगद उतरण्याएवजी चंद्राच्या भुमिवर आदळला, थोडक्यात मोहिम अपयशी झाली. जर ही मोहिम यशस्वी झाली असती तर रशिया, अमेरिका आणि चीन या ३ देशांनंतर चंद्रावर अलगद यान उतरवण्याचा मान इस्राईलला मिळाला असता, ते सुद्धा त्या देशाच्या खाजगी कंपनीला, म्हणजेच चंद्रावर उतरणारी जगातील पहिली खाजगी कंपनीची ती मोहिम ठरली असती. असो.......

तर या अपयशामुळे म्हणे इस्त्रोने चांद्रयान -२ च्या लॅडरची पुन्हा तांत्रिक तपासणी केली असता त्यामध्ये आणखी काही सुधारणा करणे आवश्यक असल्याचं लक्षात आलं. म्हणून ही चांद्रयान - २ मोहिम पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. नेमक्या तांत्रिक कारणाबाबात अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही..सर्व काही... गुप्त गुप्त...

गंमत म्हणजे चांद्रयान -२ मोहिम समोर उभी ठाकली असतांना सर्वसामान्यांना या मोहिमेबद्दल फारच त्रोटक माहिती उपलब्ध आहे. या मोहिमेची, उपकरणांची, यानाची अधिकृत छायाचित्रे देखील उपलब्ध नाहीत, चांद्रयामन - २ मोहिमेचे साधे एनिमेशन देखील नाही. याउलट अवकाश विज्ञान हे सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय करणा-या नासाकडे बघा. एखादी मोहिम सुरु होण्याच्या दोन वर्षे आधीपासून नासा एवढी माहिती पुरवतात की प्रत्यक्ष मोहिम सुरु होतांना लोकांचा सहभाग हा लक्षणीय असतो, जनजागृती मोठ्या प्रमाणात असते.

तेव्हा सध्याची चांद्रयान -२ मोहिम जी इस्रोची आहे, सर्वसमान्यांची नाही, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुप्तता बाळगण्यात आली आहे, ती मोहिम आता आणखी पुढे ढकलण्यात आली आहे.  



Thursday, February 28, 2019

मिग-२१ का सरस ठरले ?



२७ फेब्रुवारीला एलओसी(लाईन ऑफ कंट्रोल) जवळच्या 'नौशेरा'च्या आकाशात भारत आणि पकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये जोरदार सामना झाला. १९७१ नंतर प्रथमच दोन्ही देशांची लढाऊ विमाने खऱ्या अर्थाने एकमेकांना भिडली. १९९९ च्या कारगिल लढाईत आपल्या लढाऊ विमानांमध्ये, विशेषतः 'मिग -२९'मध्ये असलेल्या लांब पल्ल्यांच्या हवेतल्या हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रामुळे, पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी सीमेजवळ येण्याचे धाडस केले नव्हते.

मात्र 'नौशेरा'त सकाळी १० च्या सुमारास पाकिस्तानच्या काही लढाऊ विमानांनी घुसखोरी करत लष्कराच्या ठिकाणांवर 'बॉम्ब'हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच भारतीय लढाऊ विमानांनी सुखोई -३ एमकेआय, मिग-२१ आणि मिराज -२००० या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना अटकाव केला. त्यामुळे पाकिस्तानी लढाऊ विमानांनी सीमजवळ कसेबसे बॉम्ब टाकले आणि पळ काढला. तोपर्यंत भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या लढा विमानांवर हल्ला चढवला. यामध्ये मिग -२१(बायसन) ने आर-७३ हे क्षेपणास्त्र डागत 'एफ -१६'('एफ सिक्सटीन' या नावाने उल्लेखले जाते) हे लढाऊ विमान पाडले. पाकिस्तानचे एफ-१६ हे भारताच्या हद्दीत घुसले होते याचा पुरावा नुकताच संरक्षण दलाने सादर केला. एफ-१६ जे क्षेपणास्त्र वाहुन नेऊ शकते त्या AMRAAM  या हवेतल्या हवेत लक्ष्यभेद करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राचे काही भाग पत्रकार परिषदमध्ये दाखवण्यात आले. या एका AMRAAM क्षेपणास्त्राने भारताचे मिग -२१ पाडले असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर दुस-या AMRAAM चा नेम चुकला आणि ते भारतीय हद्दीत पडले.

काय आहे AMRAAM?Advance Medium Range Air to Air Missile - AMRAAM हे अमेरिकेच्या कंपनीने बनलेले क्षेपणास्त्र आहे. हे Beyond Visual Range प्रकारातील   क्षेपणास्त्र आहे. म्हणजेच दृष्टीक्षेपात न येणारे लक्ष्य भेदण्याची क्षमता AMRAAM यामध्ये आहे. एखादे लक्ष्य लढाऊ विमानाच्या रडारवर दिसताच AMRAAM क्षेपणास्त्र त्यावर 'लॉक' केले जाते आणि डागले जाते. मग ते AMRAAM आपोआप त्यामध्ये असलेल्या छोट्या रडारच्या सहाय्याने लक्ष्याचा माग ते नष्ट करते. AMRAAM ची क्षमता ५० ते १६० किमीपर्यंत मारा करण्याची आहे. त्यातच AMRAAM हे ध्वनीच्या पाच पट वेगाने प्रवास करते म्हणजेच सर्वसाधारण लढाऊ विमानाच्या जास्तीत जास्त वेगापेक्षा दुप्पट वेगानं प्रवास करते. सर्व प्रकारच्या वातावरणात हवेतील लक्ष्य भेदण्याची क्षमता या AMRAAM मध्ये आहे हे विशेष. त्यामुळे AMRAAM क्षेपणास्त्र असलले लढाऊ विमान अत्यंत घातक – शक्तीशाली मानले जाते. याच AMRAAM ने मिग-२१ (बायसन) चा वेध घेतला असं सध्या सांगितले जात आहे.

काय आहे R-73? – हे रशियन बनावटीचे हवेतल्या हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. याच पल्ला ३० किमीपर्यंत असून ध्वनीच्या २.५ पट वेगाने आर -७३ प्रवास करु शकते. जेव्हा नौशेराच्या आकाशात भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचे युद्ध सुरू होते, तेव्हा मिग-२१ ने आर-७३ हे क्षेपणास्त्र डागले ज्याने पाकिस्तानच्या एफ-१६ चा वेध घेतला.

R-73 आणि AMRAAM मध्यो कोण सरस असा प्रश्न विचारला तर दोन्ही क्षेपणास्त्रे ही पल्ला आणि वेग यामध्ये वेगवेगळ्या पातळीवर आहेत. असे असले तरी AMRAAM हे निश्चितच R-73 पेक्षा सरस आहे.

आता तुलना F-16 आणि Mig -21 Bison ची. यामध्ये एफ-16 हे निश्चितच अत्याधुनिक आहे. याचा सुमारे २००० किमीचा पल्ला असून ध्वनीच्या दुप्पट वेगानं प्रवास कऱणारं, एक इंजिन असलेलं लढाऊ विमान आहे. या लढाऊ विमानात असणारा संगणक हा मिनी सुपर कॉम्प्युटर आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

तर मिग-२१ बायसन ही भारतीय वायू दलामध्ये असलेल्या राहिलेल्या मिग-२१ ची सर्वात अत्याधुनिक आवृत्ती असून ही लढाऊ विमाने २०२१-२२मध्ये वायु दलाच्या सेवेतून निवृत्त केली जाणार आहेत. एक इंजिन असलेल्या मिग-२१ चा पल्ला सुमारे १५०० किमी असून ध्वनीच्या दीडपट वेगानं जाण्याची क्षमता आहे.

तेव्हा पाकिस्तानचे लढाऊ विमान एफ-१६ हे निश्चितच भारतीय वायू दलाच्या मिग-२१ बायसन पेक्षा सरस  आहे.

आता मुद्दा राहिला तो एवढी आधुनिकता असतांना आपल्या मिग-२१ ने पाकिस्तानचे एफ-१६ कसं काय पाडले याचा. याचं उत्तर एकच....अत्याधुनिकता कितीही असो तुमच्याकडे असलेले शस्त्र कसे आणि किती कौशल्याने वापरले जाते त्यावर त्याची संहारकता ठरते. एफ-१६ हे आपल्या मिग-२१ पेक्षा वरचढ असुनही निव्वळ आपल्या वैमानिकाच्या कौशल्यामुळे आपल्या मिग-२१ ने पाकिस्तानच्या एफ-१६ वर मात केली. आपण एक मिग-२१ गमावले असले तरी त्यांचे एफ-१६ पाडणे हे आपल्यासाठी दुप्पट गुण मिळवण्यासारखे आहे. 

१९७१ च्या आमनेसामने लढाईनंतर पुन्हा एकदा भारतीय वायू दल हे पाकिस्तान वायू दलापेक्षा वरचढ ठरले आहे. 

 amitjoshi101@gmail.com



इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...