Wednesday, August 8, 2012

आईच्या गाव्वात....झोझिला पास

जम्मू- श्रीनगर-लेह-मनाली असा बाईकवरुन प्रवास करण्याचा घाट गेली पाच वर्षे मी मनात घालत होतो पण प्रत्यक्षात काही येत नव्हते. सुट्टी मिळत नव्हती , पैशांचे नियोजन काही होत नव्हते, काही ना काही निमित्त दरवर्षी व्हायचे. अखेर पाच वर्षांची भक्ती पणाला लागली आणि चक्क जेवढी प्रवासाला आवश्यक होती तेवढी सुट्टी मिळाली. मात्र बाईकवर काट मारावी लागली कारण पैशांचे नियोजन हाताबाहेर जात होते.

श्रीनगरवरुन द्रास, कारगील स्मारक, कारगील, लेह, पेंगाँग लेक, नुब्रा व्हॅली, लेह-मनाली असा प्रवासाचा बेत नक्की झाला. म्हणजे माझा मित्र मनिष मेहेंदळेने वर आखलेल्या टूरवर माझे नाव मी दोन महिने आधीच नोंदवले. बाईक नाही तर निदान फोर व्हिलरने का होईना प्रवास करायचा, या भागातील निसर्ग सौंदर्य याची देही याची डोळा बघायचे, प्रवासातील अनिश्चितेचा थरार अनुभवायचा यासाठी मी मनातून कधीच तयार झालो होतो.

जम्मूला स्वराज एक्सप्रेसने पोहचलो. अंगात जरा जास्ती कंड होता म्हणून सरकारने कंत्राट दिलेल्या सरकारी कम खाजगी बसने ( एसी बसने नाही ) श्रीनगरला निघालो. जम्मू-श्रीनगर प्रवासात शक्य असलेल्या सर्व अनिश्चितता मी अनुभवल्या. दरड कोसळल्याने एक तास बस थांबली, ठीक ठीकाणी जम्मु काश्मिर वाहतूक पोलिस घेत असलेली लाच, अरुंद रस्ते, एकीकडे उजवीकडून छातडावर येणारा डोंगर आणि खोली बघण्याची हिंमत न होणारी डावीकडची चिनाब नदीची दरी, जवाहर टनेल नंतर जम्मूतून काश्मिरमध्ये प्रवेश केल्याने वाढलेला गारवा, त्यानंतर  श्रीनगरपर्यंत मार्गावर लष्कराचा खडा पहारा  असा अनुभव घेत श्रीनगरला पोहचलो.

 श्रीनगर फिरणे वगैरे झोकात झाले आणि 22 जुलैला ख-या अर्थाने प्रवासाला सुरुवात झाली. बर्षाच्छादित हिमालयाचे अजस्त्र डोंगर, बाजूने जोराने वहाणा-या नद्या बघत,प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण सोनमर्ग आणि त्यानंतर अमरनाथ यात्रेकडे नेणारा बालतागचा तळ पार करत कधी घाट चढायला सुरुवात केली हे कळलेच नाही. घाटाच्या वरतून बालतागचे फोटो काढत असतांना हाच तो झोझीला पास म्हणजे झोझीला घाट असल्याचं मित्राने सांगितले. काहीसा जोरदार वारा, थंड हवा अनुभवत गाडी घाट वरती चढत होती आणि बालतागच्या तळावरील माणसे,  तंबू मुंगीपेक्षा लहान किंवा दिसेनाशी होतांना दिसत होती. मात्र घाट चढतांना तळाला गेलेला बालतागचा तळ बघून धडकी भरायला लागली.

एव्हाना उजवीकडे खाली खोलवर असलेला बालतागचा तळ मागे पडला, गाडी आणखी डोंगराच्या कुशीत आत वळली आणि पुढे काय पान वाढून ठेवले आहे याची कल्पना आली. जेमतेम एक ट्रक जाईल एवढा रस्ता, डावीकडे छाती पुढे काढणारा डोंगर तर आ वासून गिळू पहाणारी-- कदाचीत फुटांमध्ये मोजली तरी समजणार नाही एवढी उजवीकडची खोल दरी अंगावर काटा आणत होती.



साधारण 9 किलोमीटर लांबीचा, 11,649 फुट उंचीवरचा आणि मुख्य म्हणजे काश्मिर - लडाख भागाला जोडणारा हा झोझीला पास ह्रदयाचे ढोके वाढवणार हे घाट चढतांना सुरुवातीलाच लक्षात आले.

डोक्याच्यावर असलेल्या डोंगराच्या भागावर आपण वेडेवाकडी, दिर्घ वळणे घेत कसे पोहचू शकतो हीच गोष्ट  उलगडत नव्हती. थो़ड्या वेळापूर्वी ज्या चढ्या रस्त्यावरुन आपली गाडी धापा टाकत वर चढत होती तो रस्ता आता चक्क पायाखाली खोलवर दिसतो ही गोष्ट धडकी भरवणारी होती.


बहुतेक प्रत्येक वळणावर, मोक्याच्या ठिकाणी लष्कराचे जवान या अवघड रस्त्याचे वाहतूक नियंत्रण करतांना दिसत होते. शक्य होईल तिथे एका बाजूच्या गाड्यांना थांबवून दुस-या बाजूच्या गाड्यांना वाट मोकळी करुन देत होते. खरं तर या मोक्याच्या ठिकाणी अतिरेक्यांचा शिरकाव होऊ नये यासाठी जाडजूड लष्करी ड्रेस अंगावर बाळगत, हातात रायफली सज्ज ठेवत आपले जवान या झोझीला पासचे संरक्षण करत  होते. आम्ही हात हलवत त्यांना अच्छा किंवा टाटा म्हणा अभिवादन करत होतो तेव्हा त्यांना किती आनंद होत होता हे त्यांच्या चेह-यावरुन स्पष्ट समजत होते. सतत चौकस नजरेने पहाणी करणा-या, कडाक्याच्या थंडीत दिवसभर सतत उभे रहाणा-या, जराशी चूक होऊ नये याचा ताण मनावर झेलणा-या या जवानांची काय अवस्था होत असेल याची आपल्याला कधीच कल्पना करता येणार नाही. त्यामुळे आपल्यासारखे  नागरीक जेव्हा हात हलवतात तेव्हा त्यांना किती आनंद होतो हे तिथे जाऊनच अऩुभावावे लागेल.

डोळ्यात न मावणारा उंच डोंगरांचा आणि खोल द-यांचा पॅनारॉमिक व्ह्यू  मी कॅमे-यात 18-55 च्या लेन्सने  किती तरी वेळा टिपत होतो. पण त्या फोटोला वास्तवाची सर कधीच येणार नाही. दूरवर झोझीला पासचे टोक दिसत होते आणि तिथून येणारी लष्करी वाहने, खाजगी ट्रक टिचभरपण वाटत नव्हती. घाटाचे ते पॅनारॉमिक व्ह्यु डोळ्याने बघतांना अक्षरशः शक्क झालो होतो.

गाडी अर्थात हळुहळु घाट वर चढत होती. गाडीच्या मधल्या रो च्या सीटवर डावीकडे बसलो होतो. डावीकडे-उजवीकडे वळणे घेत प्रवास सुरु होता. घाट चढत असतांना काही मिनिटे गाडी थांबवावी लागली. कारण डोळ्यासमोर काही फुट अंतरांवर डावीकडच्या डोंगर उतारावरुन दगड धोंडे आणि माती म्हणजेच दरड खाली पडतांना बघितली आणि छातीत धस्स होणे म्हणजे काय असते ते अऩुभवले. दगडांचा आकार छोटा असला तरी शेवटी दरड ती दरड. अवघी  
काही मिनीटे गाडी थांबली खरी , पुढे असलेल्या ट्रकने जोरात एक्सेलेटर मारत ट्रक पुढे काढला आणि त्याच वेगाने आमच्या गाड्या पण निघाल्या. मी तर डावीकडे बसलो होतो, त्यामुळे दगडाने मलाच पहिले गाठले असते, भितीने डावीकडच्या उतारावरील प्रत्येत दगडाकडे बघत कोण खाली येत नाही ना याकडे माझे संपूर्ण लक्ष होते. माझा डावा हात गाडीच्या खिडकीवर होता, तेव्हा मनिषने सांगितले की हात आतमध्ये घे आणि काच बंद कर, ताबडतोब काच बंद झाली. आमची गाडी पुढे गेली आणि जीव भांड्यात पडला.

असे एकदा नव्हे दोनदा झाले.

या झोझीला पासवर काही ठराविक अंतरावर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने ( बीआरओ ) रस्ता मोकळा करण्यासाठी जेसीबी सारखी यंत्रे ठेवलेली दिसतील. मे-जून महिन्यात या यंत्राना हा रस्ता मोकळा करण्याचे काम सारखे करावे लागते. रस्ता वाहतूकीसाठी सुरळित ठेवण्यासाठी बीआरओ जेवढे कष्ट घेते त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. 

थक्क करणारा हा प्रवास शेवटी घाटाच्या टोकाला एका वळणावर येऊन पोहचला. तिथे एका लष्करी अधिका-याचे छोटे स्मारक होते. कॅप्टन एक. सी. वधेरा असे त्याचे नाव. त्या वळणालाच " कॅप्टन कर्व्ह " असे देण्यात आले आहे. 1954 च्या वर्षात हिवाळा संपतांना म्हणजे मे नंतर, म्हणजे बर्फ वितळत असतांना या अधिका-याने हा झोझीला पास चा रस्ता वाहतूकीसाठी खूला करतांना अपार मेहनत घेतली. मात्र त्या वळणावरुन जात असतांना त्याची जीप खाली दरीत कोसळली आणि त्यात त्याला मरण आले. म्हणनु त्याचे त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आले आहे.

मात्र अशीही माहिती मिळाली की हा रस्ता खूला केल्यावर या मार्गावरुन पहिली गाडी माझी जाईल अशी अपेक्षा त्यांने ठेवली होती. मात्र वरिष्ठांनी मात्र असे त्याला करु दिले नाही, त्यामुळे  म्हणे त्यांने गाडी खाली दरीत लोटली. काहीही असो असा अवघड रस्ता ते सुद्धा त्या काळी खुला करणे म्हणजे  किती दिव्य आहे हे घाट पार करतांना आम्हाला चांगलेच समजले होते.

यापेक्षा थराररक गोष्ट म्हणजे 1948 च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये "ऑपरेशन बायसन " या नावाने भारतीय सैन्याने झोझीला पास, द्रास, कारगील जिल्हा परत मिळवला. यामध्ये थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्या वेळी ऑक्टोबर महिन्यात याच रस्त्याने भारतीय सैन्याने अमेरिकन बनावटीचे हलक्या वजनाचे स्टुअर्ट टँक म्हणजे रणगाडा झोझीला पासने चढवत द्रासमध्ये आणले.  ऑक्टोबर म्हणजे बर्फ पडायला सुरुवात झाली असणार. आत्ताच्या तुलनेत त्या काळी रस्ता खुला करण्याच्या पद्धतीमध्ये जमीन अस्मानचा फरक असणार. म्हणजे रस्ता नुसता खुला करणे नाही तर 14 टन वजनाचे हे रणागाडे वरती चढवणे तेही हिवाळा सुरु झाला असतांना हे किती कर्म कठिण, संयमाची परिक्षा पहाणारे असेल याची आपण कल्पनासुद्धा करु शकणार नाही. अर्थात हे अशक्य ते शक्य भारतीय सैन्याने करुन दाखवले. एवढ्या उंचीवर टँक आलेले बघुन पाकिस्तानी सैन्याला तेव्हा चांगलाच धक्का बसला असणार. अर्थात हा भाग भारताने परत जिंकला हे काही वेगळे सांगायला नको.

डोळ्यात न मावणारा हा घाट-पास अखेर संपला. लगेचच पुढे सपाटी लागली, रस्ताही चांगला लागला. असं असलं तरी दोन्ही बाजूला उंच डोंगराची साथ काही संपत नव्हती. लगेचच झोझीला पास चा बोर्ड लागला, ' वेलकम टू लडाख रिजन 'असा  बोर्ड बघितल्यावर आम्ही फोटो काढण्यासाठी पुन्हा थांबलो.

त्याच्याच पुढे काही अंतरावर एक लष्करी ट्रक उभा होता. अतिरेक्यांनी या परिसरात तीन किमीच्या परिघात काही एलईडी पेरलेले असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी जॅम करण्याची यंत्रणा या ट्रकमध्ये होती. या यंत्रणेचे नियंत्रण करणारा जवान हा बीड जिल्ह्याचा होता. त्याच्याशी काही वेळ गप्पाही मारल्या. तेव्हा त्याने दिलेली माहिती पुढीलप्रमाणे......लष्कररीदृष्ट्या हा पास अत्यंत महत्त्वाचा आहे. अमरनाथ यात्रेमुळे आणि लडाखमध्ये येणा-या पर्यंटकांमुळे या मार्गावर मोठी ये-जा असते. त्यामुळे या झोझीला पासवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असते. अतिरेक्यांचा धोका पूर्वी या मार्गावर होता, मात्र गेल्या काही वर्षातील लष्करी कारवायांमुळे आता हा मार्ग सुरक्षित झाला आहे. तरीही या मार्गा वर लष्कराचा खडा पहारा ठेवावा लागतो......द्रासकडे जाणारा मार्ग खुला आणि सुरक्षित ठेवावा लागतो.

आमचा प्रवास झाला तो जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात , नक्की तारीख सांगायची तर 22 जुलै, म्हणजे बर्फ वितळल्यानंतर आम्ही प्रवास करत होतो. वातावरण स्वच्छ होते, म्हणजे अगदी दूरवरचे सहज  दिसत होते. हे मुद्दाम सांगायचे कारण की जर तुम्ही मे किंवा जून महिन्यात याच भागातून प्रवास केला तर परिस्थिती वर सांगितल्यापेक्षा आणखी भयानक नक्कीच असणार... नाही असेलच. कारण त्या महिन्यांत नुकतंच बर्फ वितळायला सुरुवात झालेली असते. रस्त्यावर बर्फ मिश्रीत चिखल असतो, त्यावरुन गाडी रेटायची म्हणजे एक दिव्यच असते. गाडी अनेकदा चिखलात फसते, घसरते. तेव्हा इथे चुकीला क्षमा नाही, अंदाज बरोबरच आला पाहिजे, चुकता कामा नाही. खरं तर तुम्हाला आजुबाजुचे अनेकदा दिसत नाही. कारण धुके आणि कधीकधी पाऊस यामुळे तुमच्या बाजूला किती खोल दरी आहे याचा अंदाज तुम्हाला लावता येता नाही. कधी कधी अज्ञानात सुख असते असं म्हणतात, ते खरं या ठिकाणी उपयोगी पडेल. तुमच्या आजुबाजुला काय आहे याची जाणीव न झाल्याने प्रवास फक्त रस्त्याकडे बघत होतो.

तेव्हा अशा या झोझीला पास चा टप्पा मग तो कुठल्याही महिन्यात पार कराल, त्याच्या दुस-या टोकाला पोहचाल तर तुम्हीही म्हणाल " आईच्च्या गावात...झोझीला पास ".......




   

Saturday, June 30, 2012

" आनंदवारी"तील काही सुखद अनुभव.....


माझे मनीची आवडी, पंढरपूरा नेईन गुढी
पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले

पांडुरंगाच्या भक्तीमध्ये बुडालेल्या ज्ञानदेवांना वारीचे कसे वेध लागायचे असे त्यांच्या या अभंगातून दिसून येते. ज्ञानदेवांप्रमाणे पायी वारी करणा-या लाखो वारक-यांच्या मनाची स्थिती अशीच काहीशी असते.
वारकरी म्हणजे वारी करणारा. वारीचा अर्थ फे-या घालणारा किंवा त्यापेक्षा ठराविक मार्गाने ये-जा करणारा. तेव्हा जो असा फे-या घालतो तो वारकरी होतो. तुळशीची माळ गळ्यात घातली की वारी करायचीच असे काहीसे बंधन त्या व्यक्तिवर असते. वर्षात वारी केली नाही तर चैन पडत नाही, वारी ही केलीच पाहिजे, चालत जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतलेच पाहिजे अशी पक्की मनात धारणा असलेला लाखो लोकांचा वर्ग आज या महाराष्ट्रात आहे.
म्हणुनच ज्येष्ठ महिना लागण्याच्या आधीच लाखो लोकांची वारीला जाण्याची लगबग सुरु होते. आजही बहुतांश वारकरी हे शेतकरी आहेत. त्यामुळे शेतीच्या पेरणीची सुरुवातीची कामे उरकून वारकरी वारीसाठी सज्ज होतो. तर इतर वारकरी आपल्या कामधंद्याच्या एका महिन्याचं नियोजन करत वारीची तयारी करतात. देहू आणि आळंदीला लाखो वारक-यांचे जथ्थे धडकायला सुरुवात होते. एरवी काही हजार वस्तींची लोकसंख्या असलेली ही गावे माणसांच्या लगबगीने , गर्दीने भरुन जातात. गेल्या ५० वर्षात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याबरोबर विविध संतांच्या पालख्यांचीही भर पडली आहे. त्यामुळे पंढरपूरपर्यंत या संतांच्या पालख्या पोहचेपर्यंत,
वारी जशी पुढे सरकते तसतसे वारक-यांची संख्या वाढत जाते, पंढरपूरपर्यंत पोहचेपर्यंत ही संख्या १० लाखांच्या घरात जाते. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गोल आणि उभे रिंगण बघण्यासाठी मोठी गर्दी होते. रिंगणामध्ये धावणारा अश्व, मानाचे घोडे, रिंगण घालणारे पताकाधारी, महिला हे सुद्धा गर्दी खेचतात. माऊलींच्या पालखीचा दिवे घाटाचा टप्पा, तुकाराम महाराजांच्या पालखीचा रोटी घाटातील प्रवास बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत असते. एवढंच नाही तर इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमुळे ही वारी आता घराघरांत पोहचली आहे. वारी माहित नसलेले, चतुर्थीप्रमाणे फक्त आषाढी एकादशी निमित्त उपास करणा-यांनाही वारीचे आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे एक दिवस का होईना वारीत सहभागी होणा-यांची संख्या वाढायला लागली आहे,  पुणे ते सासवड असा एक दिवस प्रवास करणारा मोठा वर्ग पुणे आणि पुणे परिसरात आहे.

अशी ही आनंदवारी २१-२२ दिवसांची एक छोटेखानी शाळा आहे. जीवनात कसे वागायचे , जीवनाचे तत्वज्ञान म्हणजे काय, सेवा करतांना सुख मिळते म्हणजे नक्की काय होते, राग – मत्सर कसा विसरायचा, त्यासाठी काय करायचे हे सगळे वारी शिकवते, वारीमध्ये शिकायला मिळते. लोकं भोळी भाबडी कशी असतात, दुस-याला मदत करण्यास कशी तत्पर असतात, आपल्या ताटातील घास दुस-याला काढून कशी देतात याचा पुरेपुर अनुभव वारीमध्ये घेता आला, या लोकांना जवळुन बघण्याचे जणु भाग्यच लाभले. २००९ ला वारी कव्हर करण्याची संधी मिळाली आणि या वर्षी पुन्हा वारीला जाण्याचा योग आला. वारीमध्ये आलेले विविध अनुभव बघितले तर वारी पुन्हा पुन्हा, दर वर्षी करायची असेच ठरवले आहे. 
या दोन्ही कव्हरेजच्या दरम्यान आलेले काही सुखद अनुभव सर्वांना सांगावासे वाटतात.
१३ जून, २०१२ ला ज्ञानेश्वर पाऊंलीच्या पालखीने संगमवाडी रोडमार्गे मुख्य पुणे शहरांत प्रवेश केला. संगमवाडी रोड हा अगदी मोठा, प्रशस्त अगदी सहा पदरी रस्ता आहे. रस्ताच्या दोन्ही बांजूना काही भाग वगळता रुंद असे फुटपाथ आहेत. सकाळपासून वारकरी मोठ्या संख्येने या रस्त्याने पुण्यात दाखल होत होते. मी पण कव्हरेजसाठी त्या भागांत फिरत होतो. वारकरी दाखल होणार असल्याच्या निमित्ताने रस्ते , फुटपाथ अगदी चकाचक होते. असेच काही वारकरी चालत होते, त्यापैकी एका महिलेला फुटपाथवर एका बाटलीचा काचेचा एक मोठा तुकडा दिसला. तो तुकडा असल्याचं तिच्या लक्षात येईपर्यंत ती काही पावले पुढे गेली होती. ती थांबली परत मागे फिरली, तो काचेचा तुकडा उचलला आणि फुटपाथच्या बाजूला असलेल्या भितींवर तो पडणार नाही या बेताने ठेवला आणि ती पुढे निघुन गेली. खरं तर तो तुकडा फुटपाथवर भिंतीच्या बाजूला होता. बहुतेक सर्व वारकरी हे रस्त्यावरुन चालत होते. कोणाच्या पायाला लागण्याची शक्यताही नव्हती. तरीही आपल्यामागे येणा-या कोणाच्या पायाला इजा होऊ नये यासाठी तीने ही काळजी घेतली. कदाचीत इतर दिवशी एखाद्या नागरीकाला तो तुकडा दिसला असता तर त्याने लक्ष दिले नसते, तो पुढे निघुन गेला असता. मात्र या निमित्ताने आपल्याबरोबर दुस-याच्याही जीवाला जपण्याची वारक-यांची वृत्ती दिसून आली.

ज्येष्ठ अष्टमीला आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. आळंदीच्या घाटावरुन थेट प्रक्षेपणाच्या तयारी करण्यासाठी आम्ही आमच्या ओबी व्हॅन्स आदल्या दिवशी रात्री घाटावर पार्क करण्यासाठी निघालो. घाटवर घेऊन बघतो तर धडकीच भरली. हजारो वारकरी आपल्या सामानासह हजर आहेत, कोणी जेवत आहेत, कोणी भजनं करत आहेत तर कोणी झोपले आहेत. गाडी दुस-या टोकाला न्यायची असल्याने वारक-यांना जागेवरुन उठवल्याशिवाय दुसरा उपाय नव्हता. तेव्हा प्रत्येक वारक-यासमोर हात जोडून माऊली , जरा दोन मिनीटाकरता उठता का ? “  अशी विनंती करायला सुरुवात केली. तेव्हा चेह-यावर कुठलाही आडकाठी न आणता वारक-यांनी उठत गेले आणि चक्क 400-450 लोकांना उठवत आम्ही अवघ्या काही मिनिटांच गाडी घाटाच्या दुस-या टोकाला नेऊन उभी केली. हे सगळे शक्य झाले ते हात जोडून विनंती केल्यामुळे नाही तर आम्ही त्यांच्यासाठी उच्चारलेल्या माऊली या शब्दाने. माऊली हा वारीमधील एक परावलीचा शब्द आहे. तुम्ही कोणालाही माऊली नावाने हाक मारलीत की समोरचा तत्पर तुमच्याकडे लक्ष देतो, तुमचे म्हणणे ऐकतो, तुम्हाला शक्य असेल तेवढी मदतही करतो. याचं कारण आपण माऊली शब्द उच्चारतांना जणू देवाचे नाव घेतो, पांडुरंगाचे नाव घतो, संत ज्ञानेश्वरांचे नाव घेतो अशी वारक-यांचा श्रद्धा आहे. त्यामुळे वारीत माऊली या शब्दाची जादू प्रत्येक ठिकाणी, प्रत्येत पावलावर अनुभवायला मिळते.            

वारीमध्ये सर्व वयोगटातील लोकं सहभागी होत असतात. विशेषतः ५० पेक्षा जास्त वयाच्या वारक-यांचा भरणा जास्त असतो. जीवनात सर्व जवाबदा-या पार पडलेले आणि नेहमीच्या आयुष्यातून निवृत्तीकडे झुकणारे, विश्रांतीकडे घेऊ पहाणार-या लोकांची संख्या लक्षणीय असते. मात्र माऊलींच्या दिवे घाटातील प्रवासाच्या कव्हरेजमध्ये भेटलेल्या इस्लामपूरच्या लक्ष्मीबाई वाडेकर आजीचा पायी प्रवास बघुन चक्करच यायची वेळ आली. इस्लामपूरच्या या लक्ष्मीबाई आजींचे वय होते १०० आणि त्याची वारी करण्याची वेळ होती ५० वी. त्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर ५० वर्षापूर्वी मालक म्हणजे नवरा गेल्यावर इतरांचे बघुन वारीला सुरुवात केली. अजुनही या आजी दर वर्षी वारीचा प्रवास पायी करत आहेत आणि हे शक्य झाले ते पांडुरंगाच्या कृपेने असे ते नमस्कार करत सांगतात. वारीला आल्याशिवाय करमत नसल्याचे त्या सांगतात. लक्ष्मीबाई आजी दिवे घाट चक्क पायी चढल्या. घाट चढल्यावर थकवा वगैरे काही आला नाही असे ते आवर्जुन सांगतात. इतरांबरोबर गवळण, भजन अगदी खणखणीत आवाजात म्हणतात. चालतांना त्यांना आधारीसाठी कोणाला धरावे लागत नाही. चालण्याचा वेगही इतर वारक-यांना लाजवेल असा होता. धन्य त्या लक्ष्मीबाई आजी आणि त्यांची भक्ती.

असाच एक वेगळा अनुभव बारामती जवळ असलेल्या काटेवाडी गावात आला. निर्मल ग्रामपंचायतचा आदर्श ठरलेले काटेवाडी गाव तसे छोटे. तुकाराम महाराजांची पालखी दुपारच्या विसाव्याला थांबली. त्यामुळे साधारण एक लाखभर वारकरी तरी त्या गावात आणि त्या परिसरात जेवायला गेले. कव्हरेज करतांना चांगलीच धावपळ झाल्याने मी घाम पुसत पाणी पित चालत होतो. एका तासाने त्याच गावातील रस्त्यावर आगळेवेगळे असे मेंढ्यांचे गोल रिंगण होणार असल्याने त्याच्या कव्हरेजच्या तयारीची जुळवाजुळव मनातल्या मनात सुरु होती. तेव्हा अचानक एका माणासाने अहो चॅनेलवाले अशी हाक मारली. मी थांबलो, ती व्यक्ती गावातील एक रहिवासी होती, ती माझ्याकडे आली आणि जेवायला चला असा आग्रह करु लागली. खरे तर जाम भूक लागली होती, पण वेळ नव्हता आणि गाव छोटे असल्याने गावात असलेली सर्व टपरीवजा दुकाने तसेच पालखीबरोबर आलेली फिरती दुकाने वारक-यांनी भरली होती. त्यामुळे जेवायला उशीर होणार होता. म्हणतात ना देव धावून आला अगदी तसेच झाले. मी नकार दिला आणि पुढे खूप काम असल्याचे सांगितले. अहो माऊली, दोन घास खाऊन घ्या. खायला किती वेळ लागतो , असे आग्रहाने सांगत ती व्यक्ती काही माझा हात सोडायला तयार नव्हती. त्याच्या घरी आलो तर बघतो तर काय त्याच्या छोटेखानी घरात ५०-६० वारकरी जेवत होते. तेव्हा त्यांना म्हटले की अहो, तुम्ही त्रास कशाला घेत आहात . आधीच तुमच्याकडे माणसे खूप आहेत. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली   अहो तुमची धावपळ पालखी येत असतांना बघत होतो. असे उपाशीपोटी राहू नका . लगेचच माझ्यापुढे ताट आणून ठेवले. मी सुद्धा खूप भूक लागली असल्याने पटापट जेवलो, त्यानंतर त्यांचे आभार मानायला गेलो तर आकाशाकडे बघत विट्ठलाची कृपा असे म्हणत हात जोडले. तुम्ही उपाशी राहू नये यासाठी धडपडणा-या अशा व्यक्ती अनपेक्षितपणे तुम्हाला वारीमध्ये भेटत रहातात.
नाशिक जिल्ह्यातल्या कुठल्याशा गावातून आलेल्या एका व्यक्तीचा वारीचा प्रवास बघुन मनातून हेलावून गेलो. त्या वक्तीचे नाव आठवत नाही, ती व्यक्ती म्हणजे साधारण ४५ वर्षाचा धडधाकट पुरुष होता. तो आपल्या ७०-७५ वयाच्या आईला खांद्यावर बसवून नेत होता. खांद्यावर बसवून नेण्याचं कारण म्हणजे आईला वारी ही गाडीतून नव्हे तर पायीच करायची होती. मात्र वय झाल्याने दृष्टी अधू झाली होती, शरीर पुरेसे साथ देत नव्हते. मात्र वारी करायची इच्छा आहे. तेव्हा आईची इच्छा आधुनिक जगातला हा श्रावण बाळ असा पूर्ण करत होता.

वारीमध्ये समोरच्या व्यक्तिचा आदर राखण्यासाठी नमस्कार – चमत्कार किंवा धन्यवाद म्हणण्याऐवजी त्याच्या पाया पडण्याची प्रथा आहे. अगदी तुम्ही देवाचे दर्शन घेऊन आला असाल तर वारकरी तुमच्या हमखास पाया पडतात. कारण तुमच्या पाया पडलो म्हणजे नमस्कार देवाला पोहचला असे वारकरी मानतात. २००९ ला आषाढी एकादशीला पांडुरगाचा पहाटेचा अभ्यंग स्नानाचा कार्यक्रम कव्हर करुन मी मंदिराबाहेर पडलो. अर्थात विठ्ठलाचे दर्शन आम्हाला सहज मिळाले होते. मंदिराबाहेर प्रचंड गर्दी होती. तेथे असलेल्या काही महिलांच्या लक्षात आले की आम्ही म्हणजे चॅनेलवाले विठ्ठलाचे दर्शन घेऊन आले आहेत. मी फोनवर बोलत असल्याने काहीसा मागे राहिलो होतो. तेव्हा झटकन एक महिला पुढे आली आणि काही कळायच्या आत माझ्या पाया पडली. हे बघून दोन-चार महिला पुढे आल्या आणि माझ्या पाया पडल्या. हे बघुन गर्दीत असलेल्या माहिला, पुरुष वारकरी यांची माझ्या पाया पडणण्याची एकच धावपळ सुरु झाली. किमान ५०-६० वारकरी माझ्या पाय पडण्यासाठी धडपडत होते. एवढ्या लोकांना बघून मी पूरता गोंधळून गेलो. या लोकांना कसे थांबवावे हेच मला समजेना. त्यांच्या नमस्काराचा कसाबसा स्वीकार करत मी तेथून अशरक्षः पळ काढला. वारकरी भोळे भाबडे कसे असतात याचा पुरेपुर अनुभव मी तिथे घेतला.

अशी ही वारी.. अनुभवसंपन्न करणारी, दुस-यांसाठी जगायला शिकवणारी, भोबड्या वागणुकीचा अनुभव, भक्तीचे एक अनोखे रुप दाखवणारी....वारी...सर्वांनी किमान एकदा तरी जरुर करावी.



Saturday, May 5, 2012

अग्नी-५ , आता पुढे काय ?



19 एप्रिल २०१२ ला ओडिसा जवळील  व्हीलर बेटांवरुन आठ वाजून दोन मिनिटांनी अग्नि -५ या पहिल्या आंतरखंडीय मारा करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राने अवकाशात झेप घेतली. ५० टन वजनाचे अग्नि क्षेपणास्त्र  50 मीटर एवढा आगीचा झोत मागे सोडत गर्जना करत अरबी समुद्रातील नियोजीत लक्ष्याच्या ठिकाणी निघाले. 22 मिनीटात ते लक्ष्याच्या ठिकाणी अचूक पोहचले. या क्षेपणास्त्राची चाचणी म्हणजे Text Book Launch असे वर्णन डीओरडीओच्या शास्त्रज्ञांनी केली, म्हणजेच जशी चाचणीची आखणी केली होती अगदी तसेच घडले.

अग्नी -5 च्या चाचणीने काय साध्य झाले ?

1..... अग्नी -5 हे क्षेपणास्त्र 5000 किमी ते 5800 किमी एवढ्या अंतरापर्यंत मारा करु शकते. 
        यामुळे संपूर्ण चीन,  जवळपास सर्व रशिया ( उत्तरे-पूर्वेकडचा भाग नाही ) , इस्त्राईलच्या पुढचा सिरिया,
        अर्धा युरोप, आफ्रिकेचा केनिया, इकडे जपान , ऑस्ट्रेलिया पासून काही अंतरावरचा भाग एवढा 
        विस्तिर्ण भाग आवाक्यात आला. त्यामुळे  फक्त चीन नाही तर वेळ पडल्यास एवढ्या भागांतील देशांवर 
        वचक ठेवण्याची क्षमता यामुळे प्राप्त झाली. 

२..... अग्नी -५ हे क्षेपणास्त्र ५००० किमीचे अंतर गाठतांना साधारण मधल्या पल्ल्याच्या वेळी सुमारे 600 
        किमी एवढी उंची गाठते. अग्नी -५ च्या यशस्वी चाचणीमुळे Reentry Technology मध्ये आपल्याला यश
        आले. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जात पुन्हा वातावरणात प्रवेश करतांना क्षेपणास्त्राचा वेग प्रचंड असतो.
        यातच वातावरणाशी घर्षण झाल्याने क्षेपणास्त्र हवेतच जळुन नष्ट होण्याचा धोका असतो. मात्र आपण  
        ही अवघड चाचणी यशस्वी केली. क्षेपणास्त्राचा शेवटचा टप्पा 300 किमीच्या उंचीवर संपला. 
        स्फोटकं असलेला क्षेपणास्त्राचा भाग वातावरणातील उष्णतेचा कुठलाही परिणाम न होता नियोजित
        ठिकाणी कोसळला. वातावरणात प्रवेश करुन परत येतांना टिकून रहाणा-या विशिष्ट धातूंच्या निर्मिती 
        कसोटीला उतरली. या  धातूचा फायदा भविष्यातील मानवी मोहिमांकरता होणार आहे.

३..... गरज पडल्यास या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने आपण एक टन वजनापर्यंतचा छोटा 
        उपग्रह अवकाशात सोडू शकतो.

४...... अग्नी -५ क्षेपणास्त्र प्रवासादरम्यान ६०० किमी पर्यंतची उंची गाठते. या उंचीवर किंवा या कक्षेत 
         साधारण टेहळणी उपग्रह , पृथ्वीची छायाचित्र काढणारे उपग्रह, पृथ्वीच्या वातावरणाचा
         अभ्यास करणारे उपग्रह असतात. तेव्हा अग्नी -५ च्या चाचणीने या उंचीवरील एखादा उपग्रह
         नष्ट करण्याची क्षमता भारताला प्राप्त झाली आहे.

५.....अग्नी- ५ मुळे एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झालीये. कारण एक टन 
        वजनाची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमात अग्नी -५ ची आहे. म्हणजेच शेवटच्या टप्प्यात  ५० ते अगदी 
        २५०  किलोटन क्षमतेचे  एक ते चार अणु बॉम्ब ठेवू शकतो. हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर
        टाकलेल्या अणु बॉम्बची क्षमता प्रत्येकी १५ ते २० किलोटनच्या आसपास होती. यावरुन अग्नी- ५ ची 
        विध्वंसक  क्षमता किती आहे याचा अंदाज येऊ शकतो. मुख्य म्हणजे असा मारा हे  Multiple 
         Independently Targetable Reentry च्या तंत्रामुळे शक्य होतो. हे तंत्रज्ञान अग्नी -५ मध्ये वापरता 
        येऊ शकते. त्यामुळे गरज पडल्यास एकाच वेळी विविध शहरांवर मारा करता येऊ शकतो.

या गोष्टींमुळे अग्नी -५ ची यशस्वी चाचणी हा देशाच्या संरक्षण व्यवस्थेत एक मैलाचा दगड मानली गेली आहे. पुढील २- ते ३ वर्षात आणखी दोन -तीन चाचण्या अग्नी -५ च्या घ्याव्या लागतील.  म्हणजेच सर्व काही सुरळित झाले तर २०१५ पर्यंत अग्नी -५ चा भारताच्या संरक्षण दलामध्य़े समावेश व्हायला हरकत नाही. 


मात्र चाचणी यशस्वी झाली तरी भारतासमोरील आव्हाने अजुनही कायम 


१......भारताचा एक नंबरचा शत्रू म्हणुन ओळखल्या जाणा-या चीनकडे DF-41 हे १५,००० किमी पर्यंत मारा
        करणारे अति दिर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. यामुळे चीन जगाच्या कुठल्याही भागात यामुळे मारा करु 
        शकतो. पण त्याचबरोबर पाण्याखालून मारा करणारे JL-2 हे तब्बल ८,००० किमी पर्यंत मारा करणारे
        क्षेपणास्त्र आहे. आपण आत्ता कोठे ५,००० पर्यंत चाचणीच्या स्वरुपात मजल मारली आहे. त्यामुळे
        आपल्यासाठी दिल्ली अजुन दूर आहे असंच म्हंटलं पाहिजे.

२..... अणु पाणबुडीचा अभाव - भारत आणि चीनचे युद्धाची ठिणगी यापुढे समुद्रातल्या घडामोडींवरुन पडेल
        अशी म्हणण्य़ासारखी परिस्थिती पुढील काही वर्षात उद्भवू शकते. या लढाईत अणु पाणबुडी महत्त्वाची
        भुमिका बजावणार आहे. आपल्याकडे आयएनएस चक्र -२ ही १० वर्ष भाडेतत्त्वार वापरली जाणारी अणु
        पाणबुडी दाखल झालीये. चीनकडे विविध आकाराच्या १० पाणबुड्या आहेत. येत्या पाच वर्षात आणखी
        ६ पाणबुड्या चीन नौदलात दाखल करुन घेणार आहे. भारत आयएनएस अरिहंत या पहिल्या स्वदेशी
        अणुपाणबुडीची चाचणी घेत आहे. या चाचणींवर पुढील अणु पाणबुड्यांच्या बांधणी कार्यक्रम अवलंबून 
        रहाणार आहे.

३..... विमानवाहू युद्धनौका - भारताकडे एक आयएनएस विराट विमानवाहू युद्धनौका आहे, आयएनएस  
        विक्रमादित्य २०१२ च्या अखेरीस दाखल होत आहे. तर स्वदेशी बनावटीची युद्धनौका दाखल व्हायला 
        किमान २०१५ उजाडणार आहे,मात्र याबद्दल सुद्धा साशंकता आहे.उलट चीन एक विमाननावाहू युद्धनौका ,
       जी रशियाकडून विकत घेतली होती ती २०१३-१४ ला दाखल करणार आहे. तर चीन स्वदेशी बनावटीची 
        विमानवाहू युद्धनौका २०१५ पर्यंत दाखल करणार आहे. विशेष म्हणजे चीनच्या विमानवाहू युद्धनौका
        या भारतापेक्षा जास्त मोठ्या असणार आहेत. म्हणजेच विमाने, हेलिकॉप्टर वाहून नेण्याची क्षमता 
        चीनकडे जास्त असेल. मात्र चीनचा युद्धनौका बांधण्याचा वेग लक्षात घेतला तर २०२० पर्यंत भारत या 
        विमानवाहू युद्धनौकांच्या क्षमतेमध्ये आणि संख्येमध्ये मागे रहाणार आहे हे निश्चित.

४.....पुढील युद्धे ही उपग्रहांच्या क्षमतेवर, उपग्रह वापरण्याच्या कौशल्यावर लढली जाणार आहेत. तेव्हा 
       अवकाशातील उपग्रह नष्ट केला तर युद्धाचे पारडे सहज फिरवले जाऊ शकते. उपग्रह नष्ट करण्याची
       म्हणजेच उपग्रह विरोधी प्रणाली ही महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिका, रशिया आणि चीन या फक्त तीन
       देशांकडे ही यंत्रणा आहे. भारताच्या अग्नी -५ कडे ही क्षमता असली तरी त्याची चाचणी अजुन घेतली
       गेलेली नाही. तेव्हा या क्षमतेची चाचणी आवश्यक असून ही प्रणाली कार्यरतही होणे गरजेचे आहे.
       
तेव्हा अग्नी -५ ची चाचणी झाली म्हणजे आपण ( चीनपेक्षा ) अतिशय ताकदवान झालो असे काहीही नाही. संरक्षण दल मजबूत करण्यासाठी भारताला अजुन बरचा पल्ला गाठायचा आहे. कारण एकीकडे पाकिस्तानकडे लक्ष ठेवायचे आहे तर दूसरीकडे ( अमेरिकेशी टक्कर द्यायला निघालेल्या ) चीनसमोर दंड थोपटून भारताला उभे रहावे लागणार आहे. ( भारत - चीन ह्यांच्या संरक्षण दलाच्या सामर्थ्याची तुलना करणारा माझा ब्लॉग वाचावा ). चीनएवढी क्षमता नाही तर स्वतःचे संरक्षण करत चीनला टक्कर देण्याएवढे सामर्थ्य वाढवणे भारतासाठी येत्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताकडे विकसित होणारी क्षेपणास्त्र भेदी प्रणाली हीच एकमेव जमेची बाजु आहे. कारण ही यंत्रणा कार्यरत झाल्यावर शत्रू पक्षाचे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र हवेत नष्ट करणे भारताला शक्य होणार आहे. ( छुपे उद्योग करणा-या ) चीनकडे अजुन तरी ही क्षमता नाही आहे किंवा त्याने तसे दाखवण्याचा प्रयत्नही केलेला नाही. थोडक्यात अग्नी- ५ ची चाचणी हा प्रोत्साहन वाढवणारा एक टप्पा आहे. अग्नी - 5 ची नुसती चाचणी झाली असतांना भारताच्या ( छुप्या ) महत्त्वकांक्षी " सूर्या  " या प्रकल्पाबद्दल चर्चाही सुरु झाली आहे. सुर्या क्षेपणास्त्रचा पल्ला हा ८,००० ते १०,००० च्या घरात असेल अशी चर्चा आहे. असे असले तरी भारताला अजुन बराच पल्ला गाठायचा आहे............        

Friday, May 4, 2012

आता भारताची मंगळावर स्वारी



16 मार्च 2012 ला सादर झालेल्या अर्थसंकल्पात माझ्या मते जगाचे लक्ष वेधुन घेणारी गोष्ट कोणती असेल तर प्रणव मुखर्जी ह्यांनी इस्त्रोसाठी  6715 कोटी रुपयांची केलेली आर्थिक तरतूद. गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल २२८३ कोटी रुपये म्हणजे जवळपास ५० टक्के रक्कम वाढवून दिली गेलेली आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये मंगळ मोहिमेसाठी १२५ कोटी रुपये दिलेत. अर्थसंकल्पातील माहितीनुसार भारत २०१३ च्या नोव्हेंबरमध्ये मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी २५ किलो वजनाचा एक उपग्रह पाठवणार आहे.

खरं ही बातमी विज्ञान प्रेमींसाठी एक सुखद धक्काच आहे. कारण चांद्रयान-१ च्या यशस्वी मोहिनेनंतर २०१३-१४ वर्षासाठी चांद्रयान -२ मोहिमेची आखणी भारत म्हणजेच इस्त्रो-भारतीय अंतराळ संशोधन संस्था करत होती. यामध्ये चंद्राभोवती फिरणारा एक उपग्रह पाठवला जाईल. मग त्यामधुन एक रोवर म्हणजे छोटेखानी गाडी चंद्रावर फिरणार. दगड-मातीचे नमुने गोळा करणार आणि परत पृथ्वीवर आणणार. या मोहिमेबद्दल सर्वांना उत्सुकता असतांना इस्त्रोने मंगळ मोहिम गुपचूप अर्थसंकल्पातून जाहीर करुन सर्वांना सुखद धक्का दिला आहे. कारण 2014-15 नंतर मंगळ मोहिम करण्याचा विचार सुरु होता.

तेव्हा मंगळ मोहिमेचे एवढे महत्व काय, आपल्याला चंद्र फारसा माहित नसतांना आपण मंगळाकडे का वळत आहोत, नक्की कोणावर आपण कुरघोडी करणार आहोत, या मोहिमेचा आपल्याला भविष्यात काय फायदा होऊ शकतो या गोष्टी जाणून घेऊयात.

पृथ्वीसदृष्ट परिस्थीती मंगळावर

मंगळ आणि पृथ्वीचे वातावरण ह्यांच्यात थोडं का होईना साम्य आहे. मंगळावर वातावरण तेही विविध स्तरांचं असलेले अस्तित्वात आहे. मंगळाच्या वातावरणात ९५ टक्के कॉर्बन डायऑक्साईड, २.७ टक्के नायट्रोजन, ०.१३ टक्के ऑक्सिजन आहे. सर्वात मुख्य म्हणजे मंगळाच्या ध्रुवांवर गोठलेल्या अवस्थेत तसंच स्फटिकांच्या रुपात पाणी अस्तित्वात असल्याचं शास्त्रज्ञांचं ठाम मत आहे. या गोष्टी भविष्यात मानवी वस्ती मंगळ ग्रहावर करण्यास मोठ्या प्रमाणात अनुकुल आहेत. कारण आज ना उद्या पृथ्वीवरील वातावरण प्रदुषित झालेले असेल, अफाट लोकसंख्या झालेली असेल त्यामुळे पृथ्वीबाहेर वस्तीसाठी जागा शोधणे मानवासाठी अपरिहार्य असेल.


मंगळावरच्या मोहिमा

शीतयुद्धाला सुरुवात झाल्यावर सोव्हिएत रशिया आणि अमेरिका ह्यांचा सर्वच क्षेत्रात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा आटापीटा सुरु होता. रशियाने १९६० ला दोन कृत्रिम उपग्रह मंगळाकडे पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र अवकाशात झेप घेण्यापूर्वीच त्यांच्या रॉकेटचा स्फोट झाला. १९६२ च्या सुमारास एक उपग्रह मंगळाच्या जवळून गेला आणि अगदी थोडी माहिती पाठवली. मात्र ख-या अर्थाने मंगळाभोवती फिरणारा कृत्रिम उपग्रह पाठवला तो अमेरिकेने. १३ नोव्हेंबर १९७१ ला मरिनर-९ हा कृत्रिम उपग्रह मंगळाभोवती घिरट्या घालू लागला. तर बरोबर १४ दिवसांनी रशियाचा मार्स-२ हा उपग्रह मंगळाभोवती फिरु लागला.

तर २००१२ पर्यंत अमेरिकेच्या वायकिंग १ आणि २ , मार्स पाथफाईंडर, मार्स ओडिसी, स्पिरिट, ऑप्युचर्निटी, फोनिक्स अशा विविध मोहिमा यशस्वी केल्या. यामध्ये काही उपग्रहांनी मंगळाची छायाचित्रे घेतली, काही मोहिमांमध्ये मंगळावर छोटी चालणारी गाडी उतरवली गेली, मातीचे नमुने घेतले, असंख्य प्रयोग केले आणि प्रचंड माहिती मिळवण्यात अमेरिकेला म्हणजेच नासाला यश आले. मंगळावरच्या मातीचे प्रकार, मातीमध्ये आढळणारी खनिजे, वातवरणातील विविध वायुंचे अस्तित्व, वातावरणात होणारे बदल, ऊन-वारा याचे प्रमाण, धुळीचे वादळ अशी असंख्य माहिती मिळवली गेली. त्यामानाने रशियाची फक्त एकच मोहिम यशस्वी झाली. तर युरोपियन स्पेस एजन्सीला एका बहुउद्देशीय उपग्रह मोहिमेत 2007 ला मंगळाची छायचित्रे काढण्यात यश आले. जपानने मंगळाभोवती एक कृत्रिम उपग्रह पाठवला होता. मात्र मंगळाजवळ पोहचल्यावर काही तांत्रिक बिघाडाने ही मोहिम फसली. चीन, 2011 ला रशियाच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने एक कृत्रिम उपग्रह मंगळाकडे पाठवणार होता. मात्र रशियाचा प्रक्षेपक उड्डाण करताच कोसळल्याने चीनची मंगळ मोहिम पृथीवरच संपली.

भारताच्या मंगळ मोहिमेने काय साध्य होणार आहे ?

भारत जो उपग्रह मंगळाकडे पाठवणार आहे, तो उपग्रह नक्की कसा असेल, चांद्रयान प्रमाणे कोणत्या देशांची  कोणती उपकरणे उपग्रहावर असतील,  अशा अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. मात्र चांद्रयान- 1 प्रमाणे विविध देशांची उपकरणे असणार हे नक्की आणि मंगळावर भारताचे अस्तित्व उमटेल अशीच मोहिम असणार हे सुद्धा नक्की समजले जात आहे. मंगळ ग्रहाची छायाचित्रे घेण्याबरोबर, वातावरणाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न होईल असे उपलब्ध झालेल्या माहितीवरुन दिसत आहे.मंगळ मोहिमेमुळे पुढील काही गोष्टी साध्य होणार आहेत.

1.....चंद्रापेक्षा लांब, दुस-या भाषेत सांगायचे म्हणजे एखाद्या ग्रहावर कृत्रिम उपग्रह पाठवण्याचा अनुभव
       भारताला मिळेल. हे करतांना विविध उपकरणांची तयारी, त्याचा अनुभव आपल्याला मिळणार आहे.

2..... या अनुभवाचा उपयोग सुर्याचा अभ्यास करण्यासाठी " आदित्य " हा उपग्रह पाठवतांना होणार आहे.

3.....मोहिमेमुळे भारताचे जगात नाव होईलच आणि आपल्या तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढेल.

4.....मोहिम यशस्वी पार पडली तर जपान आणि चीनवर आपण कुरघोडी करण्यात यशस्वी होऊ.

5..... भारतात मंगळ किंवा त्यानंतर इतर ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी वेगळी शाखा तयार होईल. लोकांचा
        सहभाग वाढेल.

6.....चांद्रयान- 2 मोहिमेसाठी भारतीय अंतराळ शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास वाढेल.

7......सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारचा ( मठ्ठ राज्यकर्त्यांचा ) इस्त्रोकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल.
        आणखी कितीतरी पैसा भविष्यातील मोहिमांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल.

भारताला मंगळ लागू दे

अमेरिकेची म्हणजे नासाची  2020 ला चंद्रावर मानवी मोहिम, 2025 ला एखाद्या लघुग्रहावर आणि 2030 ला मंगळावर मानवी मोहिम आखण्याची तयारी सुरु आहे. अमेरिकेचा या क्षेत्रातील जोर बघता 4-5 वर्ष जास्त पकडली तरी ते सहज साध्य होईल. रशिया ही क्षमता बाळगुन आहे पण त्यांच्याकडे प्रश्न आहे पैशाचा. युरोपियन स्पेस एजन्सी, जपान आणि चीन ह्यांना या बाबतीत मोठा पल्ला गाठायचा आहे. मात्र या देशांनी त्या दिशेने प्रयत्नही सुरु केले आहेत.

तेव्हा या शर्यतीत भारत मागे रहायला नको. भारताच्या अंतराळ संशोधन शास्त्रज्ञांनी ही गोष्ट आधीच ओळखली आहे. म्हणून 2030 वर मंगळावर नासाचा अंतराळवीर उतरत असतांना भारत नुसत्या बघाच्या भुमिकेत नसेल. भारताकडे तोपर्यंत मंगळाबद्दल चांगली माहिती जमा झालेली असेल, या उद्देशाने आत्तापासून तयारी शास्त्रज्ञांनी सुरु केलीये.

पत्रिकांवर विश्वास ठेवण्या-यांच्या दृष्टीने पत्रिकेत मंगळ असणे ही गंभीर गोष्ट असते. ग्रहांची शांती करायला लागते, अनेक पथ्य, जप वगैरे करावे लागतात. मात्र भारताच्या पत्रिकेला हा मंगळ ग्रह मात्र जरुर लागू दे. तेव्हा ही मंगळ मोहिम यशस्वी होऊ दे अशी शुभेच्छा शास्त्रज्ञांना देऊया.  

Saturday, March 31, 2012

भारतातील दोन भूकंप



गेल्या तीन महिन्यात भारत दोन मोठ्या भूकंपांना सामोरा गेला. या भूकंपाची रिश्टर स्केलवर कोठेही नोंद झाली नाही. मात्र या भूंकपामुळे निर्माण झालेल्या कंपनांनी भारतीय राजकारण, प्रशासन व्यवस्था ढवळून निघाली. 13 जानेवारीला 2012 ला भारतीय अवकाश विभागाने चार आजी-माजी ज्येष्ठ अंतराळ संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ आणि प्रशासकांना पुढील अनिश्चित काळासाठी सरकारी नोकरीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आणि संबंधित सुचना पत्राद्वारे महत्त्वाच्या सरकारी विभागांना पाठवली. तर लष्करप्रमुखांनी दि हिंदू या दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्वतःला 14 कोटी रुपये लाच देण्याच प्रयत्न केला गेल्याची हादरवणारी माहिती सांगितली.

प्रसार माध्यमांनाद्वारेच ही माहिती बाहेर येताच दोन मोठे भुकंपाचे धक्के लोकशाहीला जाणावले. यापैकी पहिल्या भूकंपामुळे आत्तापर्यंत वाद, भ्रष्टाचार, पैशाची हाव यापासून दूर असलेलं, जगात अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानाची प्रगतीमुळे ओळखले जाणारे भारतीय अंतराळ संशोधन केंद्र म्हणजेच इस्त्रो वरपासून खालपर्यत हादरले. शास्त्रज्ञ हे भ्रष्टाचारापासून दूर असतात या ठाम समजुतीला यामुळे तडे गेले.

तर दुस-या घटनेमध्ये एका लष्कर प्रमुखापर्यंत दलाल पोहचतात आणि करार आपल्या पदरात पडावा यासाठी त्यांनाच लाच देण्याचा प्रयत्न करतात. यामुळे लष्कराच्या किती वरच्या स्तरापर्यंत दलाल पोहचले आहेत, भ्रष्टाचाराने लष्कर कसे पोखरले आहे याचा अंदाज यायला लागतो.


इस्त्रोमधील गडबड

इस्त्रोमधील वादाला सुरुवात झाली ती नोव्हेंबर २००९ पासून. या महिन्यात के. राधाकृष्णन ह्यांनी चांद्र मोहिम यशस्वी करणा-या माधवन नायर ह्यांच्याकडून सुत्रे हातात घेतली. नायर ह्यांच्या काळात झालेल्या एका कराराची त्यांनी फेरतपासणी करायला सुरुवात केली. २००५ मध्ये इस्त्रोने त्याची विपणन कंपनी असलेल्या " अंतरिक्ष " कंपनीमार्फत बंगलोर इथल्या " देवास " इथल्या कंपनीशी करार केला. भविष्यात सोडल्या जाणा-या दोन उपग्रहाचे 90 टक्के ट्रान्सपॉडर, ज्याची S बँड फ्रिक्वेन्सी होती, ती नाममात्र भाड्याने  देवासला दिली गेली. हा करार करतांना कुठल्याही स्पर्धात्मक निविदा न मागवता करार करण्यात आला. नाममात्र भाडे आणि निविदा नाही , नेमक्या या दोन गोष्टींमुळे वाद सुरु झाला.

 नाममात्र भाडे का आकारण्यात आले, देवास कंपनीला का झुकते माप देण्यात आले, निविदा का काढल्या गेल्या नाहीत असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. यामध्ये कळस केला ते सरकारने. सहा महिन्यांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या समित्या नेमल्या. त्याचे अहवाल हे दोन टोकाचे होते. एका अहवालात माधव नायरसह सगळ्यांना निर्दोष सांगण्यात आलं, कराराने सरकारचे नुकसान झाले नसल्याचं म्हंटलं. तर दुस-या अहवालात नायर कंपनीकडे बोट दाखवण्यात आलं.

यामुळे अवकाश विभागाने इस्त्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर, ए. भास्करनारायण इस्त्रोचे सचिव, के.आर.श्रीधरमूर्ती अंतरिक्ष कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, के. एन. शंकरा इस्त्रोच्या उपग्रह विभागाचे माजी प्रमुख ह्यांना पुढील अनिश्चित काळासाठी सरकारी पदे उपभोगण्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

लष्करातील गडबड

क्षेपणास्त्रे. रडार, रॉकेट लॉन्चर सारखे अत्यंत महत्त्वाची उपकरणे, शस्त्रास्त्रे वाहून नेण्यासाठी तर त्राता कंपनीचे बनवलेला ट्रक वापरला जातो. 1500 च्या वर असे ट्रक भारतीय लष्कर वापरते. तेव्हा आणखी 600 ट्रकचा करार तोही स्वस्तात होण्यासाठी लष्करप्रमुखांना लाच देण्याची हिंमत दलालांनी दाखवली. ही गोष्ट स्वतः लष्करप्रमुखांनी मुलाखतीमध्ये उघड केली.

मात्र यावरुन काही प्रश्न उपस्थित होतात. लाच देणा-याविरोधात ताबडतोब तक्रार दाखल का केली नाही, या संदर्भातील माहिती संरक्षण मंत्र्यांना का दिली नाही, किंवा माहिती दिली असेल तर मग कारवाई संदर्भात ताबडतोब पावले का उचलायला लावली नाहीत, दलालांचे जाळे किती पसरले आहे याचा शोध का घेतला गेला नाही. लष्करप्रमुखांची माहिती त्यामुळे अनेक प्रश्नांना जन्म देऊन गेली आहे.


प्रतिमा मलिन होत आहे

या दोन्ही घटनांबद्दल लिहायचे कारण की भारतातील अत्यंत प्रतिष्ठित अशा अवकाश संशोधन संस्था आणि लष्कर या संस्थाकडे आता संशयाच्या नजरेने बघितले जाऊ लागले आहे.

 संदेशवहन आणि दळवळण उपग्रहांमध्ये जगात सर्वात्तम तंत्रत्रान म्हणून भारताकडे बघितले जाते, इस्त्रोकडे बघितले जाते. इस्त्रोमुळे अविकसित राष्ट्रांना स्वस्तात अवकाशात उपग्रह पाठवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय उपग्रहांनी घेतलेल्या माहिती फायदा जगातील अनेक देशांना होत आहे. चांद्रयान मोहिमेमुळे तर भारताने अवकाश तंत्रज्ञानात आघाडी घेतली आहे. भविष्यात अमेरिका आणि रशियाशी या क्षेत्रात टक्कर देण्यासाठी चीनबरोबर भारतही सज्ज  होत आहे. अनेक महत्वकांक्षी मोहिमांची आखणी इस्त्रो करत आहे. अशा या  इस्त्रोमध्ये किंवा इस्त्रोशी संलग्न संस्थांमध्ये काम करणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते.

असं असतांना जानेवारीतील घटनेमुळे एक डाग इस्त्रोला कायमचा बसला आहे. आता शास्त्रज्ञही पैशासाठी काहीही करतात अशी म्हणण्यासारखी, आरोप करण्यासाठी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनमानसातील इस्त्रोबद्दल असलेली प्रतिमा मलिन होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. दुर्देवाने आणखी असाच काही वाद निर्माण झाला तर इतर सरकारी विभागांप्रमाणे हाही विभाग भ्रष्टाचारीत आहे असा कायमचा समज लोकांच्या मनात तयार होईल.

गेल्या वर्षाच्या पश्चिम बंगालमधील सुखना जमीन घोटाळ्यामुळे लष्करातील भ्रष्टाराची लक्तरे वेशीवर टांगता टांगता राहिली. लष्कराने वेळीच कारवाई करत प्रकरणाला पुर्णविराम दिला. बोफोर्स तोफांचा खटला हा संरक्षण दलापेक्षा त्याच्या बाहेर असलेल्या व्यक्तिंनी केलेल्या दलालांमुळे लक्षात राहिला. मात्र या प्रकरणात लष्करावर बोट दाखवण्यात आले नाही. एवढंच नाही तर जर्मन पाणबुडी प्रकरण, केंद्र सरकारने ब्लॅकलिस्ट केलेल्या अनेक परदेशातील युद्दसाहित्य पुरवठा करणा-या कंपन्या असो संरक्षण दलातील भ्रष्टाचार किंवा प्रकरणे समोर आली पण योग्य ती कारवाई केल्यामुळे. त्यामुळे संरक्षण दलाच्या इज्जतीला धक्का पोहचला नव्हता.

मात्र लष्कराच्या प्रत्येक विभागात भ्रष्टाचार पसरला आहे. शत्रू पक्षाला आस्मान दाखवू पहाणारे लष्कर आता स्वतःच दलालांच्या वेढ्यात सापडले आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं लष्करप्रमुखांच्या वक्तव्यावरुन दिसून येते.समोरची व्यक्ति लष्करात आहे असं समतजातच त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो,एक प्रकारची आदराची भावना निर्माण होते. मात्र लष्कर प्रमुखांच्या व्यक्तव्याने ही आदराची भावना आता कमी होण्याची शक्यता आहे.

तेव्हा वर उल्लेख केलेल्या दोन्ही प्रकरणांचे भविष्यात काहीही होईल. एकतर प्रकरणे निकालात काढली जातील, संबंधित व्यक्तिंवर, कंपनीवर कारवाई होईल किंवा राजकीय प्रकरणांप्रमाणे ही प्रकरणे काही दिवस चर्चेत रहातील आणि नंतर विसरली जातील. एक मात्र खरं ही या प्रकरणांमुळे संरक्षण दल आणि इस्त्रो या संस्थांकडे बोट दाखवायला सुरुवात झाली आहे.

भारतात अणु ऊर्जा विभाग, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, भारत इलेट्रॉनिक्स लिमिटेड अशा कितीतरी एकापेक्षा एक तंत्रज्ञान, संशोधन आणि विकासात भर घालणा-या जगातील नामवंत संस्था, कंपन्या आहेत. एवढीच देवाकडे प्रार्थना की लष्कर, इस्त्रो या संस्थांना लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी ह्यां संस्थापासून दूर राहू दे. नाहीतर जे काही भारतात चांगले आहे त्यांच्यावरचाही सर्वसामान्यांचा विश्वास उडून जाईल.

Sunday, March 11, 2012

सह्याद्रीतल्या वाकड्या वाटा



हल्ली ट्रेक सगळेच जण करतात. असं लिहायचं कारण पुस्तकांच्या रुपात ज्ञात-अज्ञात किल्ले, लेणी, निसर्गात लपलेल्या सौंदर्याच्या माहितीचा खजिनाच आता उपलब्ध झाला आहे. त्यातच एस.टी.सह आता स्वतःच्या गाड्या घेऊन या ठिकाणी सहज पोहचता येते. सर्वात म्हणजे रोजच्या कामाच्या गडबडीतून थोडंसं फ्रेश होण्यासाठी लोकं फिरण्यासाठी त्यापेक्षा ट्रेकसाठी वेळ काढणे जास्त पसंत करत आहेत.त्यामुळे ट्रेकचे प्रमाणे कितीतरी पटीने वाढले आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे.

पण किल्ले, लेणी किंवा निसर्गातील लपलेली सौंदर्यस्थळे विशेषतः सह्याद्रीच्या बाबतीत बोलयाचे झाले तर दुर्गम भाग असे काही आता फारसे राहिलेले नाही. यामुळे सर्वच ठिकाणी आता शनिवार-रविवारी गर्दी दिसून येते, त्या ठिकाणी बाजार भरल्यासराखं वाटतं. याचा अर्थ फक्त ट्रेकर्स लोकांनी या ठिकाणी जावे आणि आनंद लुटावा असा नाही. सांगायचा उद्देश हा की त्या ठिकाणचे वैशिष्ट्य किंवा वेगळेपण जाणून घेण्याच्या फंदात फारसे कोणी पडतांना दिसत नाही.

उदा.सर्वपरिचित कर्नाळा किल्ला. एक दिवसाच्या ट्रेकसाठी, नवख्यांसाठी, सर्व गटातील लोकांसाठी, मन फ्रेश करणारा एकदम सोपा आणि उत्तम असा ट्रेक. लोकं अभयारण्यात जातात, आरडाओरडा, गोंधळ करत त्यांची पिकनिक एन्जॉय करतात. कर्नाळा किल्ल्यावर जातात, थंड टाक्यातील पाणी पितात, क्वचित एखाद्यामुळे मधमाश्यांची पोळी डिस्टर्ब होतात, तेव्हा होणारी पळापळही अनुभवतात. मात्र हा  सुमारे १५० उंचीचा कर्नाळा सुळका निसर्गाने बनवला तरी कसा याचा कोण विचार करत नाही. कर्नाळा हे राज्यात पक्षीअभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे, मात्र सध्या तेथे पक्षी शोधायला कष्ट पडतात एवढी त्यांची संख्या कमी झालेली आहे याकडे कोणी लक्ष देत नाही. कर्नाळा किल्ल्यावर येण्यासाठी आणखी किती वाटा आहेत याची कोणी चौकशी करत नाहीत.

थोडक्यात आज ट्रेक भरपूर होत आहे, ट्रेकर्सची संख्या वाढली आहे. मात्र  ट्रेकला जातांना वाकड्या वाटेचा, वाकड्या विचारांचा कोणी विचारच करतांना दिसत नाही. अर्थात खरा ट्रेक करणारा ह्याला अपवाद आहे. तो भटकंती करतांना नेहमीच वेगळ्या वाटा धुंडाळत असतो. प्रत्येक ट्रेकमध्ये नवीन काहीतरी मग ते स्वतःमधले ,भेट देणा-या ठिकाणामध्ये शोधत असतो. तो आनंद खरा ट्रेकर, गिर्यारोहक घेत असतो. असा वेगळा मार्ग निवडणा-या ट्रेकर्समध्ये एक वेगळी गोष्ट असते. ट्रेकर्सच्या भाषेत त्याला कंड किंवा खाज म्हणतात. तेव्हा या अशी कंड किंवा खाज असणा-या ट्रेकर्सना मनोमन सलाम ठोकत सह्याद्रीतील काही वेगळे ट्रेक किंवा वेगळ्या वाटा, त्याची वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. यापैकी काही ट्रेक मी केलेले आहेत, बरेचसे करायचे आहेत. तुम्ही काही वेगळ्या वाटा लिहिल्यात तर त्या मलाही माहित होतील.

बोरिवलीचे नॅशनल पार्क
नॅशनल पार्कला प्रत्येकजण एकदा का होईना गेला असेल.जाणा-यांपैकी अर्ध लोकं कान्हेरी लेण्यांपर्यंत जातात.  व्याघ्र-सिंह सफारी झाली, नौका विहार झाला, कान्हेरी लेणी बघितल्या की संपली आपली नॅशनल पार्कची सफर. मात्र  नॅशनल पार्कच्या विरुद्ध बाजूने म्हणजे मुलूंडच्या दिशेने कान्हेरी लेणीपर्यंत येण्यात वेगळी मजा आहे. साधारण तीन तासांची तंगडतोड एका चांगल्या मळलेल्या पायवाटेने करावी लागते. वाटेवर इंग्रजांनी एका टेकडीवर 1930 च्या सुमारास बांधलेला बंगला दिसतो. आजही बाथटप तिथे अस्तित्वात आहे. छप्पर उडालं असलं तरी भिंती आजही मजबूत आहेत. ह्याला भूताचा बंगला असेही म्हणतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बंगल्यासमोर तुळशी तलाव, विहार तलाव, पवई तलाव आणि दूरवर हिरानंदानीच्या इमारती वातावरण स्वच्छ असेल तर सहज दिसतात. कान्हेरी लेणी इथून दीड तासाच्या चालीवर आहेत. थोडी खाज जास्त असेल तर वाट वाकडी करुन घोडबंदर रस्त्यावरसुद्धा उतरता येईल. अर्थात या भागातील वाटा माहीत असाव्यात, खूप चालायची मानसिक तयारी पाहिजे.

आंबोली घाट ( जुन्नर )
जुन्नर जवळच्या दुर्ग-ढाकोबा करतांना जुन्नर किंवा कुकडेश्वर मंदिरामार्गे सगळेजण जातात. मात्र ढाकोबा जवळचा आंबोली घाटाचा मार्ग फारसा कोणाला माहित नाही. विशेषतः पावसाळ्यानंतर या मार्गाने ट्रेक करतांना निसर्गसौदर्य पाहून वेड लागते.


हरिश्चंद्र गड
गिर्यारोहकांची पंढरी म्हणुन ओळखला जाणारा अहमगनगर,ठाणे आणि पुणे ह्यांच्या सीमेवरचा हा किल्ला. खरं तर किल्ल्यापेक्षा हा निसर्ग सौंदर्याने ओळखला जातो. माळशेज घाटावर असलेल्या खुफी फाट्यावरुन अनेक गिर्यारोहक जातात. काहीशी अवघड अशा नळीची वाटही हल्ली बरेच लोकं करतात. मात्र साधले घाटाची वाट, पाचनईची वाट फार कमी गिर्यारोहक  आजमावतात.


ताम्हिणी घाट ते लोणावळा
पावसाळ्यात धबधबे अंगावर घेणारा ताम्हिणी घाट बघतांना वेड लावतो. तेव्हा इथपर्यंत आलात तर आणखी पूढचा , थोडासा आडवळणाचा प्रवास करायचा. घाट चढल्यावर साधारण पाच किमीनंतर एक वाट डावीकडे फुटते. तांबडा भाग दिसणारा भाग म्हणजे कच्चा रस्ता. त्या व्यतिरिक्त हिरवा रंग, याशिवाय दुसरे काहीही दिसणार नाही. धुके या प्रवासाची मजा वाढवतात. 20-25 किमीनंतर ही वाट पक्की बनत अम्बी व्हॅली, कोरीगड, आयएनएस शिवाजी करत लोणावळ्यात उतरते.

राजमाची ते भिमांशकर
राजमाची किल्ला, कुंडलेश्वर मंदिरमार्गे ढाक बहिरी, त्यानंतर कसुर पठार,कुसुर गाव, आंध्र तलाव, वांद्रे खिंड अशी दलमजल करत भिमाशंकरला पोहचता येतं. वाटेत पेठ किल्ल्याचे वेगळ्या कोनातून सुंदर दर्शन होते.

तोरणा ते रायगड किल्ला
रायगड किल्ला गाठायला अनेक वाटा आहेत. मात्र तोरणा ते रायगड किल्ला करण्याची मजा काही औरच.
तोरणा गड , भट्टी गाव आणि त्यानंतर सिंगापूरची नाळ किंवा बोराट्याची नाळ अशा वाटेने रायगडकडे कूच करता येते.

कावळा किल्ला 
वंरधा घाटाच्या माथ्यावर सभोवतालचे रक्षण करण्यासाठी कावळ्यासारखी नजर चोहोकडे ठेवणारा किल्ला म्हणजे कावळा किल्ला. किल्लाकडे गाठतांना वरंधा घाटापेक्षा जवळच असलेल्या शिवथर घळ कडून किल्ला गाठण्याची मजा काही औरच आहे. पारमाची गाव आणि  नाव्हीणी सुळका समोर ठेवत कावळा किल्ला गाठता येतो. शेवटच्या टप्प्यात खडा चढ असणारी वाट दमछाक करते.

सवाष्णीचा घाट 
वैशिष्टपूर्ण अशा डाईक रचनेचा तेलबैला किल्लावरुन प्रसिद्ध सुधागड गाठण्यासाठी सवाष्णीचा घाट हा चागलं घामटं काढणारा मार्ग आहे. गच्च झाडी असलेल्या या वेगळ्या मार्गाने सुधागड गाठण्याची मजा काही औरच.

चांदोली अभयारण्य
मनुष्य वस्ती लांबवर असलेले निसर्गाने भरभरून दिलेले, जंगलसंपत्तीने अत्यंत संपन्न असे हे चांदोली अभयारण्य.  देवरुख किंवा सगमेश्वर मार्गे चांदोली अभयारण्य गाठण्यात मजा काही वेगळीच आहे. प्रचितगड, भैरवगड किल्ले या अभयारण्याच्या काठावर वसलेले आहेत. वारण नदीचा उगम असलेला कंधार धबधबा निव्वल अप्रतिम, तोही याच अभयारण्यात होतो. वन्य प्राण्यांची अगदी रेलचेल आहे. ज्वालामुखीच्या वेळी तयार झालेले लाव्हारसाचे गोळे नंतर थंड झाले . ते या भागात कित्येक  चौरस किलोमीटर पसरलेले आहेत. तो भाग सडा या नावाने ओळखला जातो. चांदोली अभयारण्यात मुक्काम करत घाटमाथा ओलांडत पाटण गाठतांना जी तंगडतोड करावी लागते त्यामुळे ट्रेकिंगची खरी झिंग अनुभवता येते.

माहूली किल्ला
ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच , शिवपदस्पर्शाने पावन झालेला,  जंगलाने वेढलेला , आसनगांव-शहापूरजवळचा माहूली किल्ला. किल्ल्यावर जायला सध्या एकच प्रचलित मार्ग आहे तो म्हणजे शिडीची वाट. पण त्यापेक्षा किल्ल्यावर असलेल्या महादरवाज्याची वाट काळाच्या ओघात पुसली गेलेली आहे. त्या वाटेने गड सर करण्याची मजा वेगळीच आहे. त्याचबरोबर कल्याण दरवाजाची वाटही आता नष्ट झालेली आहे. प्रस्तरारोहण करणारे भिडू बरोबर असेल तरच या वाटेला जावे.

 सिद्धगड ते भिमाशंकर
सिद्धगड किल्ल्यावर प्रवेश करतांना लागणा-या प्रवेश द्वारपासून सिध्दाची लिंगीच्या बाजूला असलेल्या खिंडीतून कोंडवळ गावाच्या पूढे तंगडतोड करत घोडेगावकडून येणा-या डांबरी रस्त्यावर पोहचायचे आणि भिमाशंकर गाठायचे.प्रचंड तंगडतोड करायला लावणारी ही वाट भिमाशंकरला जातांना आजमावायला हरकत नाही.

अहूपे घाट
पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याची पूरेपूर अनुभूती देणारा अहुपे घाट. मुरबाडच्या पुढे गोरखगड किल्ल्याच्या जवळ असलेला घाट पावसाळ्यात फक्त चढायचा आणि परत उतरायचा. बस्स. पण या द्रविडी प्राणायाम करतांना पाऊस ,धुके ह्यांच्या अनुभूती ही वेड लावणारी, थकवा घालवणारी ठरते.

राजमाची किल्ला
पावसाळ्यातील लोणवळाजवळ असलेला राजमाची किल्ल्याचा ट्रेक तर आता प्रसिद्ध झाला आहे. धो धो पाऊस, धुक्याच्या लपाछपीचा खेळ या भागात ट्रेक करतांना तर स्वर्गीय आंनद देतो. मात्र या किल्ल्याच्या जवळ किंवा मनरंजन बालेकिल्ल्यच्या अगदी समोर असलेल्या उल्हास व्हॅलीचा ट्रेक जरुर करावा. खंडाळा घाटातील रेल्वेच्या प्रवासात एका विशिष्ट ठिकाणी उतरावे आणि समोरची दरी शब्दशः उतरावी आणि उल्हास नदीचा उगमापर्यंत पोहचावे.

अशा सह्याद्रीत कितीतरी माहित असलेल्या, माहित असुनसुद्धा नाव नसलेल्या वेगळ्या वाटा आहेत. सह्याद्रीतील एखाद्या कोप-यात किंवा किल्ल्यावर पोहचतांना या वाकड्या वाटांचा वापर करावा. म्हणजे  लोकांची गर्दी टाळता येते. नवी वाटेने जांताना, नवी वाट शोधतांना संपूर्ण कसब पणाला लागते. दरवेळी अशी वेगळी वाट वेगळा अनुभन देऊन जाते. आपल्या नेहमीच्या किल्ल्याचे, निसर्गस्थळाचे आपण न पहिलेले वेगळे दर्शन घडवते. प्रत्येक किल्ल्यावर, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ऋतुमध्ये जाण्यात वेगळीच मजा आहे. तशीच मजा वेगळ्या, नवीन वाटेने वेगवेगळ्या दिवसांत जाण्यात आहे. मी माझ्या मित्रांबरोबर सायकलने हे किल्ले, लेणी पालथे घातले आहेत.हा सह्याद्री जन्मभर फिरत राहिलो तरीसमाधान होणार नाही इतका समृद्ध आहे. अशा या सह्याद्रीतील आनंदवारीत भटकतांना  " वाकड्या " वाटेने जाण्यात खरे समाधान आहे.  


Friday, February 3, 2012

आता अखेरचा राम राम " मिग-२१ " ला





उडत्या शवपेट्या किंवा Flying Coffins अशी कुप्रसिद्धी मिळवलेले, मिग -२१ हे लढाऊ विमान, अखेर भारतीय वायू दलाच्या सेवेतून बाद होणार आहे. खरे तर २००६ च्या सुमारास मिग-२१ बायसन ( Bison )  ही मिग-२१ ची शेवटची आणि आधुनिक आवृत्ती २०१७ ला बाद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय वायू दलाचा कणा असलेल्या या लढाऊ विमानाची जागा कोण घेणार याचा निर्णय मात्र काल परवापर्यंत झाला नव्हता.

अखेर ३१ जानेवारी २०१२ ला या संदर्भातली बातमी दिल्लीहून वायू दलाच्या मुख्यालयातून आली. फ्रान्स देशातील Dassault Aviation या कंपनीने बनवलेले राफेल / Rafale हे अत्याधुनिक लढाऊ विमान मिग-२१ ची जागा घेणार आहे. या निमित्ताने भारत संरक्षण दलातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खरेदी करण्यासाठी सज्ज झाला आहे. खरं तर ही एक मोठी बातमी होती, मात्र काही निवडक इंग्रजी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या वगळता फारशी याची कोणी दखल घेतली नाही. या संदर्भातील विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.

मिग-२१ एक चमत्कार

शीतयुद्ध सुरु झाल्यावर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांनी संरक्षण दलात पूर्ण ताकद लावत अचाट क्षमतेची शस्त्रात्रे जन्माला घातली, मिग-२१ हे लढाऊ विमान हे त्यामधील रशियाचे एक अपत्य. १९५५ पहिल्या मिग-२१ ने अकाशात झेप घेतली. विशेष म्हणजे ५५ वर्षे उलटली तरी आजही अनेक देशांमध्ये हे लढाऊ  विमान त्या देशातील संरक्षणाची जवाबदारी पार पाडत आहे. ध्वनीच्या दुप्पट वेगाने जाण्याची थक्क करणारी क्षमता , शत्रू प्रदेशात घुसत अचूक बॉम्बफेक करण्याची क्षमता ,गरज पडल्यास हवेतच शत्रू पक्षाच्या लढाऊ विमानांशी लढण्याची क्षमता यामुळे मिग-२१ हे १९५५ ते १९८० पर्यंत जगातील सर्वात धोकादायक, आक्रमक लढाऊ विमान म्हणुन ओळखले जात होते. त्या काळात मिग-२१ ने आकाशात अक्षरशः राज्य केले असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. छोट्याशा आकाराच्या या लढाऊ विमानाचा पल्ला १००० किलोमीटरपर्यंत मर्यादीत होता, मात्र ध्वनीच्या दुप्पट वेगाने जाणारे आणि सर्वात जास्त प्रमाणात निर्माण केलेले लढाऊ विमान म्हणून मिग-२१ ओळखले जाते. आत्तापर्यंत तब्बल ११,००० पेक्षा जास्त मिग-२१ विमानांची निर्मिती करण्यात आलेली आहे. चीनने मिग-२१ ची कॉपी करत Chengdu J-7 हे लढाऊ विमान तयार केले. या विमानानेसुद्धा निर्मितीमध्ये २००० चा आकडा पार केला. तब्बल ५० पेक्षा जास्त देशांनी मिग-२१ ला आपल्या वायू दलात सहभागी करुन घेतले. छोटेखानी विमान, त्या काळातील उत्कृष्ठ विमानातील रडार , चालवण्यास अत्यंत सोपी अशी लढाऊ विमानांची यंत्रणा आणि रचना, ध्वनीपेक्षा दुप्पट वेग यामुळे मिग-२१ लढाऊ विमान विविध देशांच्या हवाई दलामध्ये लोकप्रिय ठरले. यावरुन मिग-२१ चे महत्व लक्षात येते.

भारताच्या हवाई दलाचा कणा मिग -२१ 

 १९५९ ला सोव्हिएत रशियाच्या हवाई दलामध्ये मिग-२१ चा समावेश झाला. १९६२ ला झालेल्या भारत - चीन युद्धात भारताचा मानहानीकारक पराभव झाला. संरक्षण दलाच्या आधुनुकिकरणाकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष हे या पराभवाचे एक प्रमुख कारण होते. म्हणनूच लष्कराचे आधुनुकिकरण करतांना भारताने रशियाकडे मदत मागितली. तो काळ अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा होता. भारत तेव्हा अलिप्त राष्ट्रांचा मोरक्या होता. भारतासारखा एक मोठा लोकशाही देश आपल्याकडे काही मदत मागत आहे हे बघताच रशियाने धडाधड मदतीची दारे खुली केली. तेव्हापासून भारताच्या संरक्षण दलावर रशियाचा प्रभाव पडला तो आजतागायत कायम आहे. आजही भारतीय संरक्षण दलातील ७० टक्के शस्त्रास्त्रे ही रशियन बनावटीची आहेत, यावरुन त्या काळापासून किती मोठ्या प्रमाणात रशियाने मदत करायला सुरुवात केली असेल याचा अंदाज येतो.

अखेर १९६३ ला  पहिल्या मिग-२१  चा भारताच्या वायू दलात समावेश झाला. पहिल्या पाच वर्षातच ६० पेक्षा जास्त मिग-२१ F या प्रकारची लढाऊ विमाने रशियाने भारताला दिली. रशियाने त्यानंतर आणखी एक पाऊल पुढे टाकत भारताला मिग-२१ लढाऊ विमान बनवण्याचे तंत्रज्ञान हस्तांतरीत केले. यानंतर भारतामध्ये नाशिक जवळच्या ओझर इथल्या कारखान्यातून हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीने मिग-२१ च्या निर्मितीला धडाक्यात सुरुवात केली. मिग-२१ चा समावेशाचा खरा फायदा झाला तो १९७१ च्या पाकिस्तान युद्धात. मिग-२१ ने पाकिस्तानच्या वायू दलाची १० पेक्षा जास्त लढाऊ विमाने पाडली, एवढंच नाही तर पूर्व पाकिस्तान ( बांगलादेश ) आणि पश्चिम पाकिस्तान ( पाकिस्तान ) च्या हवाई क्षेत्रात पूर्णपणे वर्चस्व ठेवण्याची कामगिरी मिग-२१ ने अत्यंत यशस्वीपणे पार पडली.

यामुळेच मिग-२१ हे लढाऊ विमान भारतीय वायू दलाचा कणा बनले. बदलत्या काळानुसार ओझर इथे मिग-२१ विमानाच्या विविध आधुनिक आवृत्या बाहेर पडल्या. मिग- २१ ती कामगिरी इथेच थांबत नाही. १९९९ च्या कारगील युद्धात द्रास, कारगील भागात घुसखोरी करत मोक्याच्या शिखरांवर दबा धरुन बसलेल्या पाकिस्तानच्या लष्कराच्या खंदकांवर बॉम्बफेक करण्याची कामगिरी मिग-२७ बरोबर मिग-२१ वर सोपवली गेली होती हे विशेष. एवंढच नाही तर त्याचवेळी ऑगस्ट मध्ये गुजरातच्या कच्छमध्ये टेहळणीसाठी घुसलेले पाकिस्तानच्या नौदलाचे Atlantique हे टेहळणी विमान भारतीय वायू दलाच्या मिग-२१ FL या लढाऊ विमानाने क्षेपणास्त्र डागत पाडले. यामध्ये 16 पाकिस्तानचे नौसैनिक आणि अधिकारी ठार झाले.

भारताचा विस्तार, शेजारील शत्रू लक्षात घेता विविध प्रकारची लढाऊ विमाने भारतीय वायू दल बाळगतो. मिग- २१ हे वजनाने हलके (  साधारण ७ टन वजनाचे ) , आकाराने लहान, ध्वनीच्या दुप्पट वेगाने जाणारे, हवेत लढू शकणारे- जमिनीवर हल्ला करु शकणारे बहुउपयोगी विमान आहे. विमानाचा पल्ला हा १००० कि.मी पर्यंत मर्यादीत असल्याने पाकिस्तानच्या सीमेजवळच्या हवाई तळांवर ही विमाने भारत तैनात करतो. या गुणवैशिष्ट्यांमुळे मिग-२१ हे भारतीय वायू दलाचा कणा बनून राहिले आहे.

उडत्या शवपेट्या

मिग-२१ ची वर उल्लेख केलेली गुणवैशिष्ट्ये असली तरी एक काळी बाजूही या मिग-२१ च्या इतिहासात नोंदवली गेली आहे. भारताने आत्तापर्यंत तब्बल ९४६ मिग-२१ विमाने १९६३ पासून वापरली आहेत. यापैकी निम्म्यापेक्षा जास्त विमाने ही अपघातामध्ये नष्ट झाली आहेत. ही गोष्ट एवढी धक्कादायक आहे की जगात कुठल्या वायुदलात एखाद्या विमानाचा एवढा अपघात झाला नसावा.या अपघांतामध्ये कोट्यावधी रुपयांचे मिग नष्ट तर झालेच पण अत्यंत मौल्यवान अशा २०० पेक्षा कितीतरी जास्त पायलटचा जीव आपण गमावला आहे. याची अनेक कारणे आहेत.

तंत्रज्ञान आणि वेग 
मिग-२१ चा वेग हा त्या काळात लढाऊ विमानांमध्ये सर्वात जास्त होता. त्या काळाला अनुसरुन तंत्रज्ञानही विकसित करण्यात आले. मात्र अनेकदा वेग आणि तंत्रज्ञान यांचा ताळमेळ ठेवता आला नाही. या दोन दगडांवर पाय ठेवत विमान चालवण्याची कसरत पायलटला पार पाडावी लागत असे. यामुळे अपघात होत राहिले. विमानाचा आकार छोटा, उडण्याचा वेग जास्त यामुळेही मिग-२१च्या हवाई विज्ञानात काही समस्यांना सामोरे जावे लागले. हे सुद्धा अपघाताचे निमित्त ठरले.

सुट्या भागांची समस्या
१९५५ च्या काळातील तंत्रज्ञानानेयुक्त लढाऊ विमान १९९० नंतरही वापरत होता. त्यामुळे सुट्या भागांच्या समस्येला नेहमीच तोंड द्यावे लागले. तसंच लढाऊ विमानाला लागणारे सुटे भाग जसेच्या तसे  निर्माण  करण्यास अपयश आले. यामुळे १९९० च्या काळात मिग-२१ ला मोठ्या प्रमाणात अपघातांना सामोरे जावे लागले. मिग-२१ च्या प्रत्येक दशकातील इतिहास बघितला तर सर्वात जास्त अपघात १९९० च्या दशकांत झाला.

प्रशिक्षण विमानांची कमतरता
लढाऊ वैमानिकाला विविध वेग असलेल्या विमानातून प्रशिक्षण द्यावे लागते. भारतीय वायू दलाकडे  HPT-32 Deepak आणि  HPT-16 Kiran ही प्रशिक्षण देणारी विमाने आहेत. मात्र यांचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा कितीतरी कमी आहे. लढाऊ वैमानिक बनतांना प्रत्येक वैमानिकाला मिग- २१ चे सारथ्य करावे लागते. तेव्हा कमी वेगाच्या प्रशिक्षण देणा-या विमानातून अचानक वेगवान आणि तुलनेत काहीसे किल्ष्ट तंत्रज्ञान असलेले मिग-२१ सांभाळावे लागते. यामुळेच मिग-२१ च्या अपघातामध्ये नवशिक्यांचे प्रमाण लक्षणीय आहे हे विशेष.

मानवी चूका
काळाच्या तुलनेत जुनाट तंत्रज्ञान असलेले लढाऊ विमान चालवतांना चुका होणारच. त्यामुळे अनेकदा मिग-२१ च्या अपघातामध्ये पायलटच्या चुकांमुळे अपघात होत असतात. अर्थात पायलटही काटेकोरपणे, लढाऊ विमान चालवण्याची समीकरणे पक्की डोक्यात ठेवून स्वार झालेला असतो. तरीही जुनाट तंत्रज्ञाद्व सांभाळत लढाऊ विमान हाकतांना नाईलाजाने चूका होतातच. पायलटच्या चुकांमुळे झालेल्या मिग-२१ च्या अपघाताचे प्रमाणही नजरेत भरण्याएवढे आहे.


मिग -२१ बाद होणार २०१७ ला


अशा रितीने चर्चेत राहिलेले मिग-२१ ची मिग-२१ Bison ही अत्याधुनिक आवृत्ती 2000 च्या सुमारास बाहेर काढण्यात आली. मिग-21 Bison हे विमान इतके प्रभावशाली ठरले की अमेरिकेनेही तोंडात बोटे घातली. अमेरिकेबरोबरच्या हवाई दलाच्या अभ्यासात मिग-21 Bison ने F-16  या अमेरिकेच्या लढाऊ विमानाला चितपट केले. आता हे मिग-२१ Bison टप्प्याटप्प्याने 2017 पर्यंत बाद करणार आहोत.

मिग-२१ ची जागा नव्या ताज्या दमाच्या लढाऊ विमानाने 1990 च्या दशकात घ्यावी यासाठी भारताने १९८३ ला Light Combat Aircraft ( LCA ) तयार करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. 15 वर्षात मिग-21 ची जागा घेणारे विमान भारतीय वायू दलात दाखल होईल आणि 2005 - 10 पर्यंत सर्व मिग-21 विमाने बाद करु असा भारताचा आराखडा होता. मात्र  LCA म्हणजेच तेजस असे ज्याचे नामकरण करण्यात आले ते  अजुनही पुर्णपणे तयार झालेले नाही. 2013 ला ते वायु दलात दाखल होईल. त्याचे पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरु होण्यासाठी आणखी काही वर्षे जाणार आहेत.

भारतीय वायू दलाने ही गोची वेळेआधीच ओळखून 2000 पासून प्रयत्न करायला सुरुवात केली. यासाठी एखाद्या देशाकडून विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव वायू दलाने तयार केला. मात्र बोफोर्स सारखा घोटाळा होऊ नये यासाठी भारत सरकारने जागतिक निविदा काढण्याच निर्णय घेतला.

संरक्षण दलातील सर्वात मोठा खरेदी-करार


2006 ला अखेर भारतीय वायू दलाने मिग-21 ची जागा घेण्यासाठी हलक्या वजनाची, बहुउपयोगी विमानांसाठी जागतिक निविदा काढल्या. या निविदेत 126 लढाऊ विमाने खरेदी करण्याच प्रस्ताव होता. त्या काळी या कराराची किंमत होती 42,000 कोटी रुपये म्हणजेच 4,20,00,00,00,000 म्हणजे 11 अब्ज डॉलर्स एवढी होती. एवढा मोठा करार असल्याने जगातील सहा बलाढ्य संरक्षण दलातील कंपन्या गुडघ्याला बाशिंग लावून भारताकडे धावल्या.

या निमित्ताने बोईंग कंपनीचे F-18 Super Hornet, लॉकहिड मार्टिनचे F-16, रशियातील मिग चे Mig-35, स्वीडनच्या साबचे Gripan, युरोपियन युनियनच्या EADS चे Eurofighter Typhoon आणि फ्रान्सच्या Dassault Aviation या कंपनीचे राफेल / Rafale हे विमान शर्यतीत उतरले. तब्बल ६०० पेक्षा जास्त भारताला आवश्यक असलेल्या लढाऊ विमानांच्या गोष्टींची पूर्तता होणे गरजेचे होते. या सर्व लढाऊ विमानांच्या चाचण्या २००८ पासून सुरु होत्या. वाळवंटाचा उष्ण प्रदेश , लेह-लडाखचा अति उंचावरचा थंड परिसर, दक्षिणेकडचा दमट भाग अशा विविध ठिकाणी या सर्व लढाऊ विमानांच्या चाचण्या घेण्यात आल्या. अखेर या शर्यतीत अखेर Dassault Aviation या कंपनीने बनवलेल्या राफेल / Rafale ने बाजी मारली. नुकत्याच झालेल्या सिरीया युद्धातही या विमानाने चांगली कामगिरी केली. म्हणनूच राफेल विमानाला भारतीय वायू दलाने आणि मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय हितसंबंध जपण्यासाठी भारत सरकारने फ्रान्समधील या लढाऊ विमानाची निवड केली.

आता निविदा काढल्यानंतर ६ वर्ष उलटत असताना या कराराची किंमत ७०,००० कोटी रुपये म्हणजे १७ अब्ज डॉलर्सच्या घरात पोहचली आहे. भारताच्या संरक्षण दलाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा खरेदी करार ठरणार आहे. जगात आर्थिक मंदी आली असतांना या खरेदी कराराने  Dassault Aviation ला एक प्रकारे जीवदानही मिळाले आहे हे विशेष. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राफेल हे लढाऊ विमान गेली १० वर्षे फ्रान्सबाहेर विविध देशांमध्ये विकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र एकही देश हे विमान खरेदी करण्यासाठी पुढे आला नाही. भारताबरोबर होणा-या करारामुळे या विमानाचे आंतरराष्ट्रीय स्थान टिकून रहाण्यास मदत होणार आहे.

पुढील सहा महिन्यात या संदर्भात करारावर स्वाक्ष-या होतील. २०१३-१४ च्या सुमारास पहिली १८ विमाने फ्रान्स भारताकडे सोपवेल. त्यानंतर करारातील तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या अटीनुसार भारत बाकीची विमाने भारतातच बनवेल. आणखी ६६ विमाने विकत घेण्याची तरतूदही या करारामध्ये आहे. या करारामुळे मिग-२१ सेवेतून बाद करण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असून त्याची जागा अत्याधुनिक राफेल विमान घेईल आणि मिग-२१ भारतामध्ये इतिहास जमा होईल.


Sunday, January 29, 2012

स्वागत " आयएनएस चक्र " चे




  

                                आयएनएस चक्र 

सरंक्षण दलात कुठलेही एखादे मोठे नवीन शस्त्र म्हणजे लढाऊ किंवा मालवाहू विमान, रणगाडा किंवा युद्धनौका दाखल करुन घेतले जाते तेव्हा अगदी वाजत गाजत, समारंभाद्वारे सेवेत दाखल करुन घेण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो. विशेषतः तो रणगाडा, लढाऊ विमान किंवा युद्धनौका पहिल्यांदाच दाखल होणार असेल तर संरक्षण मंत्र्यांपासून संरक्षण दलाचे सर्वोच्च अधिकारी कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित रहातात. मात्र 23 जानेवारीला 2012 ला रशियाच्या दक्षिण-पूर्व भागातील व्लदिवोस्तोक या शहरातील नौदल तळावर झालेला कार्यक्रम हा अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडला. भारताचे रशियातील राजदूत याच्यांसह भारत आणि रशियाच्या नौदालातील काही मोजके वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचा सोपस्कार मुद्दामहून साध्या पद्धधतीने पार पाडला गेला कारण या कार्यक्रमाचा फार गाजावजा भारताला करायचा नव्हता. मात्र या कार्यक्रमाचे भारताच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. कुठलीही प्रसिद्धी न करता आयएनएस चक्र-२नावाची अणु ऊर्जेवर चालणारी पाणबूडी सेवेत दाखल करुन घेत भारतीय नौदलाने आपल्या सामर्थ्यात अत्यंत मोलाची भर टाकली. अणु ऊर्जेवर चालणा-या पाणबुड्या असलेल्या जगातील अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन या बलाढ्य देशांच्या पंक्तीत आता भारताने मानाचे स्थान मिळवले आहे.

आयएनएस चक्र चे महत्व जाणून घेण्याआधी या पाणबुडीची वैशिष्ट्ये जाणून घेऊ.

आयएनएस चक्र-2 ची वैशिष्ट्ये
1993 ला रशियाने  ‘ K-152 Nepra ‘  नावाची अकूला-2 जातीमधील अणु पाणबुडी बांधायला घेतली. मात्र त्या काळात अडचणीत असलेल्या आर्थिक
परिस्थितीमुळे रशियाने हे काम अर्थवट सोडून दिले. त्यानंतर 2004 ला भारताने रशियाशी लेल्या कराराने अर्धवट राहिलेले बांधकाम पुन्हा सुरु झाले. अखेर 2009 ला K-152 Nepra ‘  रशियाच्या नौदलात दाखल झाली. आणखी काही चाचण्या घेत भारतीय नौदलाने ही अणु ऊर्जेवर चालाणारी पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल करुन घेतली. आयएनएस चक्र - 2 असे या पाणबुडीचे नामकरण करण्यात आले असून यापुढील 10 वर्षे भाडेतत्वावर ही पाणबुडी भारत वापरणार आहे.   

या संपूर्ण व्यवहारासाठी तब्बल 5,000 कोटी रुपये भारताने मोजले आहेत. 8,000 टन वजनाची ही पाणबुडी समुद्रात जास्तीत जास्त 600 मीटर खोलीपर्यंत जाऊ शकते. एवढेच नाही तर पाण्याखाली ताशी 60 किलोमीटर वेगाने जाण्याची क्षमता आहे. 300 किलोमीटर पर्यंत मारा करु शकणारी Klub-S  ही क्रुझ क्षेपणास्त्रे या पाणबुडीवर आहेत. म्हणून कमी अंतरावर हल्ला करणा-या वर्गातील ही पाणबुडी जगामध्ये सर्वात वेगवान आणि अत्यंत धोकादायक म्हणून ओळखली जाते. विविध अधिका-यांह एकुण 73 नोसैनिक या पाणबुडीवर असतील. पाण्याच्या पृष्ठभागावर न येता सलग 100 दिवस पाण्याखाली संचार करण्याची क्षमता हे या पाणबुडी सर्वात मोठे वैशिष्टये.

या आधी 1988-91 दरम्यान भारताने चार्ली जातीमधील अणु पाणबुडी तीन वर्षासाठी सोव्हिएत रशियाकडून भाड्याने घेतली होती. तेव्हा त्या पाणबुडीचे नाव आयएनएस चक्र असे ठेवण्यात आले होते. म्हणून आता दाखल केलेल्या नव्या अणु पाणबुडीचे नाव आयएनएस चक्र - 2 असे ठेवण्यात आले आहे. 


आयएनएस चक्र-2 चे महत्व
भारताचा नंबर एक शत्रू बलाढ्य चीनकडे एक नाही दोन नाही तर तब्बल 10 अणु र्जेवर चालणा-या                                       पाणबुड्या आहेत. तर विविध जातीच्या डिझेलवर चालणा-या तब्बल 52 पाणबुड्या आहेत.     
                          
पाकिस्तानकडे एकही अणु पाणबुडी नसली तरी Air Independent Propulsion  म्हणजेच डिझेल यंत्रणेपेक्षा अधिक चांगल्या क्षमतेने कार्यरत असणा-या 3 पाणबुड्या आहेत. त्या तुलनेत भारताकडे डिझेलवर चालणा-या फक्त 14 पाणबुड्या आहेत. त्यामध्ये सुद्धा फक्त निम्म्या पाणबुड्या या पूर्ण क्षमतेने सुरु असल्याचे म्हंटले जात आहे. चीनची ताकद आणि त्याने उभारलेले आव्हान लक्षात घेता भारतीय नौदल पाणबुड्यांच्या ताकदीमध्ये चीनच्या कितीतरी  पिछाडीवर आहे. भारताच्या तीनही बाजूला असलेला समुद्र लक्षात घेता आपल्याला 30 पाणबुड्यांची नितांत आवशक्यता असल्याचे सरंक्षण तज्ञांचे म्हणणे आहे. नियोजीत कार्यक्रमानूसार 2015 ते 2020 दरम्यान भारतीय नौदलात 12 नवीन डिझेलवर चालणा-या पाणबुड्या दाखल होणार आहेत. मात्र तोपर्यंत 14 पैकी निम्म्या पाणबुड्या सेवेतून बाद होणार आहेत. थोडक्यात 2020 मध्येसुद्धा भारतीय नौदलाच्या डिझेलवर चालणा-या पाणबुड्यांच्या संख्येमध्ये आणि ताकदीत फारसा फरक पडणार नाही.

आयएनएस चक्र -2 च्या समावेशामुळे नौदलाची पाणबुड्यांच्या प्रहार क्षमतेत दुपटीने वाढ झाली आहे. चक्रमुळे तीनही बाजूला असलेल्या अथांग समुद्रात नुसत्या अस्तित्वाने वचक ठेवण्याची क्षमता आता भारताला मिळाली आहे. दीर्घकाळ पाण्याखाली राहत अचूक, वेगवान आणि दूरपर्यंत हल्ला करण्याचे सामर्थ्य भारतीय नौदलाला प्राप्त झाले आहे. चीनच्या हिंदी महासागरातील मुक्त संचाराला थोडा का होईना अटकाव करण्याचे सामर्थ्य चक्रच्या सामवेशामुळे भारताला मिळाले आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय नौदलात भविष्यात 
दाखल होणा-या अणु पाणबुड्यांना हाताळण्याचे कौशल्य प्राप्त करण्याची संधी, क्षमता चक्रमुळे उपलब्ध होणार आहे. सध्या भारत स्वबळावर बांधण्यात आलेलल्या आयएनएस अरिहंत  या पहिल्या अणु ऊर्जेवर चालणा-या पाणबुडीच्या चाचण्या घेत आहे. 6,000 टन वजनाच्या अरिंहतसारख्या आणखी तीन पाणबुड्या बांधल्या जाणार आहेत. तर अरिहंतपेक्षा काहीशा मोठ्या आकाराच्या म्हणजे 8,000 टन वजनाच्या चार पाणबुड्या बांधणार असल्याची जोरात चर्चा आहे. तेव्हा या अणु पाणबुड्यांना चालवण्याचा अनुभव हा आयएनएस चक्रमुळे आपल्याला मिळणार आहे. कारण अणु ऊर्जेवर असलेल्या पाणबुड्या पूर्ण क्षमतेने चालवणे हे अत्यंत किल्ष्ट, आव्हानात्मक, अत्यंत अवघड आणि तितकेच धोकादायक काम असते. सर्व काही सुरळीत झाले तर 2020 पर्यंत स्वबळावर बांधलेल्या किमान 8 अणु पाणबडुया भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होतील असा अंदाज आहे.   

अरिहंत आणि अरिहंतपेक्षा जास्त वजनाच्या पाणबुड्यांवर 750 किलोमीटर पासून ते 6,000 किलोमीटर मारा करणारी लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्रे तैनात केली जाणार आहेत. अरिहंत जातीच्या पाणबुड्यांच्या समावेशामुळे भारताला तिस-या ठिकाणाहून हल्ला करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे. भारताकडे जमिनीवर 150 किलोमीटरपासून ते 3,500 किलोमीटपर्यंत मारा करणारी विविध पल्ल्याची पृथ्वी आणि अग्नी क्षेपणास्त्रे आहेत. लवकरच 6,000 कि.मीपर्यंत हल्ला करु शकणा-या अग्नी-५ ची चाचणी केली जाणार आहे. तर सुखोई आणि मिराज-2000 या लढाऊ विमानांकडे अणुबॉम्ब वाहून नेत तो शत्रू प्रदेशात टाकण्याची क्षमता आहे. थोडक्यात जमीन आणि हवेतून हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झाली असतांना अरिंहत पाणबुड्यांच्या समावेशामुळे पाण्याखालून शेवटचा पण निर्णायक मारा करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे.

शीतयुद्धाच्या काळात तर सोव्हिएत रशियाने संरक्षणासाठी सर्वात जास्त विश्वास हा तर अणु  पाणबुड्यांवर टाकला होता. तब्बल 100 पेक्षा जास्त विविध प्रकारच्या अणु पाणबुड्या सोव्हिएत रशियाकडे होत्या. अमेरिका आणि सोव्हिएत रशियाच्या अणु पाणबुड्या परस्परदेशांभोवती सतत गस्त घालत असायच्या 24 तास हाय अलर्टवर असयाच्या. सध्या रशियाकडे साधारण 29 विविध प्रकराच्या अणु पाणबुड्या, अमेरिकाकडे तब्बल 75, चीनकडे 10, फ्रान्सकडे 10, इंग्लडकडे 11  अणु पाणबुड्या आहेत. यावरुन संबधित देशांचा संरक्षणासाठी अणु पाणबुड्यांवर असलेला विश्वास दिसून येतो.  

भारताच्या पश्चिमेकडे होमुर्झ आणि एडनचे आखात आहे, तर पूर्वेकडे मलाक्काचे आखात आहे. जगातील 60 टक्क्यांपेक्षा जास्त तेलाची आणि इतर मालाची वाहतूक या सागरी भागातून होते. या भागावर वर्चस्व ठेवत अमेरिका भारतासह जगातील बलाढ्य देशांना शह देण्यासाठी महाबलाढ्य चीन त्याच्या नौदलाची ताकद वेगाने वाढवत आहे. यासाठी अणु पाणबुडी हे चीनचे एक मोठे हत्यार असणार आहे. त्यामुळे भारतानेही चीनला उत्तर देण्यासाठी अणु पाणबुड्या बांधण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. म्हणुनच आयएनएस चक्र - 2 चा भारतीय नौदलातील समावेश हा या मार्गातील पहिली पायरी ठरली आहे.

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...