Monday, December 28, 2009

" साल्हेर " महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला



" साल्हेर किल्ला " माझा सर्वात आवडता किल्ला.  विविध वैशिष्ट्ये मग ती भौगोलिक असो किंवा ऐतिहासिक असो, महाराष्ट्रीतील सर्वात उंच किल्ल्याचा मानकरी "साल्हेरं"   असल्यानं माझ्या भटकंतीमध्ये याचं स्थान सर्वात पहिलं आहे.

साल्हेर किल्ला नाशिक जिल्ह्यात बागलाण भागात गुजरात सीमेवरच्या डांग जिल्ह्याला खेटून   भक्कमपणे उभा आहे.  साल्हेरची उंची 1567 मीटर( 5141 फूट ) एवढी आहे.  कळसूबाईनंतर ( उंची 1646 मीटर- 5400 फूट ) धाकट्या भावाचा मान साल्हेरकडे जातो.  साल्हेर सर करण्यासाठी मुख्य चार मार्ग आहेत.

1....साल्हेरगावातून चढाई --  नाशिकहून सटाणामार्गे ताहराबाद गाठावयचे. तिथून ताहराबाद-मुल्हेर-साल्हेरवाडी असा एसटीने एक तास प्रवास करत पायथ्याशी असलेल्या साल्हेरवाडी गावांत पोहचता येते.  तिथूनच साल्हेरच्या पश्चिमेकडून ( फोटोमधील बाजू) तीन तासात चढाई करता येते.

2....वाघांबेमार्ग  --  ताहराबाद साल्हेरवाडी मार्गावर साल्हेरवाडीच्या अलिकडे तीन किलोमीटरवर वाघांबे गाव आहे. या गावातून साल्हेर आणि बाजूला असलेल्या सालोटा किल्ल्याच्या खिंडीतून अडीच तासांमध्ये चढाई करता येते.

3....माळदर मार्गे -- सटाणाहून माळदरला जाण्यासाठी एसटी उपलब्ध आहे. मात्र हा मार्ग फारसा वापरात नाही. अर्थात घुमकड्डांना कुठलीही वाट चालते.( फोटोच्या मागील बाजूकडून चढाईचा मार्ग ).

4....बिलिमोरा मार्गे  --  मुंबईपासून साडेचार तासाच्या प्रवासावर पश्चिम रेल्वे मार्गावर गुजरातमध्ये बिलिमोरा हे छोटेसं जंक्शन आहे. बहुतेक सर्व पॅसेंजर गाड्या इथं थांबतात. या ठिकाण उतरून  32 किलोमीटरवर असलेले वाघाई गाव गाठत साल्हेरवाडीपर्यंत पोहचता येते.

साल्हेर किल्ल्याचे फक्त फोटो अनेक वर्ष पुस्तकात बघत आलो होतो आणि साल्हेरच्या इतिहासाबद्दल वाचत आलो होतो. मात्र साल्हेरचा ट्रेक करायचा योग काही येत नव्हता.  मात्र 2006 च्या डिसेंबरमध्ये असा योग आला. फक्त साल्हेर नाही तर एका दमात आजुबाजुचे किल्ले पालथे घालण्याचा  बेत नक्की झाला.  साल्हेरबरोबर त्याला खेटून उभा असलेला " सालोट ", महाभारतापासून उल्लेख असलेला बागुल राजाची( सन 1300 ते 1600 )   राजधानी असलेला आणि मुख्य म्हणजे तलवारीच्या मुल्हेरी मुठेसाठी प्रसिद्ध असलेला " मुल्हेर" किल्ला, मुल्हेरचा साथीदार " हरगड " किल्ला तसंच जैन धर्मीयांचं तिर्थक्षेत्र मांगी-तूंगी सुळके ह्यांची भटकंती घालण्याचा बेत आखला. माझ्याबरोबर माझे दोन तरूण सहकारी वामन कदम काका ( वय 65) आणि रमेश राणे ( 48) सहभागी झाले.

31 डिसेंबरला नाशिकला रात्री एक वाजता ठाणे-नंदूरबार एसटी पकडली आणि कडाक्याच्या थंडीत पहाटे पाच वाजता ताहराबादला उतरलो. एसटी स्टॅडच्या बाहेर असलेला चहावाल्याकडे चहा पित थंडीवर मात करण्याचा प्रयत्न सुरु केला. डोंबिवलीतील थंडी किती किरकोळ आहे याचा चांगलाच अनुभव ट्रेकच्या पहिल्याच दिवशी आला. सकाळी आठ वाजता ताहराबादहून साल्हेरवाडीला जाणारी एसटी पकडली आणि साडेनऊ वाजता साल्हेरवाडीत उतरलो. हॉर्न सोडून सर्व काही वाजणा-या एसटीच्या प्रवासाचा अनुभव म्हणजे धमालच होती.


पाणी, बिस्किटे भरत सॅक पॅक केली आणि चढाईला सुरुवात केली. साल्हेरचा अजस्त्र कडा अक्षरशः अंगावर चाल करुन येत असल्यासारखा वाटत होता.  वेडेवाकडी वळणं घेत दगडात कोरलेले तीन दरवाजे आणि सुंदर कोरीव पाय-या चढत तीन तासांत अखेर साल्हेर किल्ल्यावर पोहचलो.



गेली अनेक वर्ष ऊन-वारा सोसूनसुद्धा हे  दरवाजे, या पाय-या अजुनही सुस्थितीत आहेत , टिकाव धरुन आहेत.   हे सर्व पार केल्यावर किल्याच्या पठारावर पोहचलो. एका बाजूला पठार आणि दुस-या बाजूला आणखी साल्हेरचा उंच भाग नजरेस पडला. पठारावर एक तलाव दिसतो त्याला " गंगासागर " नावानं ओळखतात.  या तलावाचं पाणी काही महिने चक्क दुधाळ रंगाचं असतं म्हणुन ह्या तलावाला दुधी तलावंही म्हणतात. काही अज्ञात नैसर्गिक कारणामुळं या तलावाचं पाणी काही महिने दुधाळ रंगाचं असतं. पठारावर तलावाच्या बाजूला रेणूका मातेचं मंदिर आणि भग्नावस्थेत असलेलं गणेश मंदिरही लक्ष वेधुन घेतं होतं. तलाव, मंदिर मनोसोक्त, चारही बाजूंनी बघितल्यावर घड्याळ्यात सहज बघितले तेव्हा एक 12 वाजल्याचं लक्षात आलं.  तेव्हा मुक्काची व्यवस्था करण्यासाठी आम्ही गुहांमध्ये शिरलो आणि चपापलो.  सर्व गुहा शेणानं भरली होती, किल्ला चढून चांगलीच दमछाक झाली होती. थकवा जाणवत असतांना कामाला लागलो ती गुहा साफ करायला. रहाण्यापूरती जागा साफ केली पाठीवरचं सॅकचं ओझं काढलं आणि जेवण करायला घेतलं,  भूक भागवली आणि थोडा आराम केला.


त्यानंतर तीन वाजता उठलो, आवरा आवर करत आम्ही तडक निघालो ते किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर जायला. अर्ध्या तासातच किल्लाचा माथा गाठला तर लक्षात आलं की अरे इथंही एक पठार आहे. पठाराच्या पूर्व बाजूला परशूरामाचं मंदिर आणखी एका छोट्या टेकडीवर तग धरुन उभं आहे. पुन्हा एकदा  भराभर पावलं चालत अखेर सह्याद्रीतल्या या सर्वोच्च किल्ल्याचा माथा गाठला. सूर्य मावळायला अजुन बराच वेळ होता. तेव्हा पुस्तकं चाळत किल्ल्याच्या इतिहासात  डोकवायला सुरुवात केली.

साल्हेर किल्ला ओळखला जातो तो परशूरामाची तपोभूमी म्हणून.  जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वतःसाठी भूमी  मिळवण्यासाठी सागराला मागे हटवण्यासाठी परशूरामांनी बाण मारला तो याच भूमीवरुन असा संदर्भ मिळतो.

पण त्यापेक्षा  साल्हेर किल्ला लक्षात रहातो या भागात झालेल्या मराठ्यांच्या पहिल्यावाहिल्या मैदानी लढाईमुळे. 1671 च्या सुमारास शिवाजी महाराजांनी बागलाण भागात मोहिम उघडली आणि या भागातील सर्व किल्ले जिंकून घेतले. यामुळं खवळलेल्या दिल्लीतील औरंगजेबानं 20 हजार घोडेस्वारांसह एक लाखापेक्षा जास्त फौजफाटा पाठवला. प्रतारराव सरनौबतांच्या  नेतृत्वाखाली मराठ्यांची एका लाख 20 हजारांची सेना मुघलांना भिडली. मराठ्यांच्या इतिहासात पहिल्यांदाचा गमिनी कावा सोडून मैदानावर तुंबळ लढाई झाली. मराठ्यांनी 10 हजार मावळे गमावले मात्र मुगलांची अर्ध्यापैक्षा जास्त फौज कापून काढली आणि मोगलांना सळो की पळो करुन सोडलं. सहा हजार पेक्षा जास्त घोडे, उंट, सव्वाशे हत्ती आणि मोठा खजिना मराठ्यांच्या हाती लागला. या मैदानी लढाईतील विजयानं शिवाजी महाराजांच्या कारकिरर्दीत एक सोनेरी पान लिहिलं गेले. सुरतच्या मार्गावर साल्हेरचा बागलण परिसर येत असल्यानं महाराजांनी हा भाग जिंकत सुरतवर आपली दहशत ठेवली.


इतिहास वाचता वाचता संध्याकाळ कधी झाली ते समजलंच नाही. सूर्य नारायण झपाझप अस्ताला जात होता. माणसांची गर्दी, लोकवस्ती जवळपाससुद्धा नसल्यानं एक भयाण शांतता होती. मात्र सोसाट्याचा वारा अधुनमधुन आवाज करत शांतता भंग करु पाहत होता. सूर्य अस्ताला जात असतांना भगव्या रंगाची छटा दर मिनिटाला रंग बदलं होती.  ती रंगाची अनोखी उधळण आजही मनात कायम घर ठेवून आहे. गंमत म्हणजे हे सर्व बघत असतांना फोटो काढयचा राहून गेला एवढं मी भान विसरलो होतो. सूर्य अस्ताला गेल्यावर एक वेगळीच शांतता भरून राहिली. अंधार पडायच्या आत खाली उतरून गुहेत आलो आणि रात्रीच्या जेवणाच्या कामाला लागलो.


दुस-या दिवशी सालोटा गाठायचा होता, तेव्हा साल्हेरच्या पूर्वकडे निघालो. काही पाण्याच्या छोट्या टाक्या, घरांच्या अवशेषांची पहाणी करत साल्हेरच्या पूर्व टोकाला पोहचलो. आता सालोटा व्यवस्थीत नजरेस दिसत होता. मात्र  या वाटेवर  डाव्या बाजूला तीव्र उतार, तर उजव्या हाताला अनेक गुहांची रांगच सुरु झाली होती. त्यानंतर कोरीव दरवाज्यांची कोरीव पाय-यांची मालिका सुरु झाली. 

अवघड उतार पाय-या कोरत सोपा केला होता. झपाझप उतरायला सुरुवात केली पण पाय-या काही संपता संपेना.   साल्हेरच्या विविधतेचं ते रुप डोळ्यात साठवत समोरंच असलेल्या सालोटा किल्ल्याकडे निघालो. अर्ध्या तासातंच सालोटा गाठला आणि सालोटा चढाईला सुरुवात केली. अर्धा किल्ला चढून जात असतांना सहज मागे बघितलं आणि साल्हेरचा एक वेगळं रुप बघुन धडकीच भरली.  किल्लाच्या या वाटेनं कसं काय आम्ही उतरलो असा विचार करु लागलो कारण उतार प्रचंड तीव्र दिसत होता.
मात्र पाय-या आणि दरवाज्यांच्या सुंदर आखणीनं, बांधणीनं ही वाट सोपी करुन टाकली होती. साल्हेर आता अजुनच अवाढव्य, अजस्त्र असा दिसत होता. परशुरामाचं मंदिर तर अगदी सुईच्या टोकासारखं दिसत होतं. किल्ल्याच्या या पूर्व बाजूवर दोन्ही बाजूंनी तीव्र उतार आणि या उतारावर अत्यंत कौशल्यानं बांधलेली आडवी वाट स्पष्ट दिसत होती. एकंदरितच साल्हेरचं हे वेगळं रुपडं आणखीनच मनात घर करुन बसलं.  पुन्हा पुन्हा साल्हेरचं रुप डोळ्यात साठवंत सालोटा बघण्यासाठी तंगडतोड करायला सुरुवात केली.

सालोटा किल्ला झाला, दोन दिवसांत मुल्हेर झाला, बाजुचा हरगड झाला, वेळेअभावी मांगीतूंगी बाजूला ठेवत पुन्हा येईन तुला बघायला असं सांगत ताहाराबादला परतलो.  आता या ट्रेकला तीन वर्ष उलटली पण अजुनही साल्हेर काही मनातून हटत नाहीये. पुन्हा कोणी साल्हेरला येतो का असं विचारलं तर एका पायावर तयार होईल एवढा तो माझा आवडता किल्ला झाला आहे.

Sunday, December 20, 2009

भारताची संरक्षण दलातील सर्वात मोठी खरेदी

भारतीय संरक्षण दल सर्वात मोठ्या खरेदी व्यवहारासाठी होतंय  सज्ज




भारतीय वायू दलातील लढाऊ विमानांची कमतरता भरुन काढण्यासाठी भारत आत्तापर्यंतची सर्वात मोठी संरक्षण दलातील खरेदी करण्यासाठी सज्ज होत आहे.  तब्बल 42 हजार कोटी रुपये किंमतीची 126 लढाऊ विमाने ( मल्टीरोल कॉम्बक्ट एअरक्राफ्ट - बहूउद्देशी लढाऊ विमाने - MRCA  )  विकत घेण्याचा करार करण्यासाठी भारतीय वायू सेनेची चाचपणी सुरु आहे. ( या व्यवहारात आणखी 76 विमाने विकत घेण्याचा पर्याय आहे ). या खरेदीमुळं भारतीय वायू दलाच्या सामर्थ्यात मोलाची भर पडणार आहे.  ( नवीन विमान खरेदीमुळं -  सुमारे 200 विमानांमुळे 10 स्क्वॉड्रनची भर पडणार )
पण काय आहे  या व्यवहारात......ते आपण बघू.....


वायू दलाची सध्याची स्थिती......

भारताचं भौगोलिक स्थान लक्षात घेता आणि पाकिस्तान-चीन सारखे पारंपारिक शत्रू समोर ठेवुन संरक्षण दलाची आखणी करण्यात आलीये. विशेषतः भारतीय वायू दलासाठी लढाऊ विमानांचे 44 स्क्वॉड्रन निश्चित करण्यात आले आहेत. ( मालवाहू विमान, हेलिकॉप्टर यांचे स्क्वॉड्रन वेगळे ). मात्र  जून्या विमानांची वेगानं निवृत्त होणारी संख्या तसंच भारतीय बनावटीचं ' तेजस ' हे लढाऊ विमान दाखल होण्यासाठी लागणार वेळ लक्षात घेता भारतीय वायू दल सध्या बिकट परिस्थीतीतून जात आहे.

सध्या भारतीय वायू दल फक्त 34  लढाऊ विमानांचं स्क्वॉड्रन ( खरी गरज 44 स्क्वॉड्रनची ) ऑपरेट करत असुन गेल्या 50 वर्षात कधी नव्हे एवढी ही संख्या कमी आहे.  एका स्क्वॉड्रनमध्ये 12 ते 18 लढाऊ विमाने असतात. त्यानूसार वायू दलाकडे अंदाजे 680 लढाऊ विमाने आहेत. यापैकी चार रशियन बनावटीची ( मिग-21, मिग-27, मिग-29, सुखोई-30 एमकेआय),  इंग्लडचं एक (  जग्वार ) आणि फ्रेंच बनावटीचं एक ( मिराज -2000 ) अशी सहा प्रकारची लढाऊ विमाने आहेत.


भारतीय बनावटीचे ' तेजस '


लाईट कॉम्बॅक्ट एकरक्राफ्ट म्हणजेच एलसीए( LCA) या स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान तयार करण्याच्या  प्रकल्पाला 1982 च्या सुमारास मान्यता मिळाली.  हलक्या वजनाचं ( सुमारे 8.5 टन )  सुपरसोनिक ( ध्वनीपेक्षा जास्त वेग ) विमानाची निर्मिती DRDO च्या सहाय्यानं करण्याचं निश्चित करण्यात आलं. मिग-21  या भारतीय वायू दलाचा कणा असलेल्या लढाऊ विमानाची जागा  एलसीए 1990 च्या दशकांत घेणार होतं. मात्र ह्या विमानाचं पहिलं उड्डाण व्हायला 2001 चं वर्ष उजाडलं. ( तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी विमानाचं नामकरण                ' तेजस ' असं केलं ) .  तेव्हापासून आत्तापर्यंत या विमानांची चाचण्यांच्या पलिकडे प्रगती झाली नाही.    ' तेजस ' वायू दलात दाखल 2012 पर्यंत दाखल होईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.  तोपर्यंत वेगानं मिग-21 या  वेगानं निवृत्त होत आहेत.  मिग-21 च्या सतत होणा-या अपघातांमुळे उडत्या शवपेट्य़ा असंही नाव त्याला मिळालं. वारंवार अपघातामुळे मिग-21 सेवेतून निवृत्त  करण्यावर वायू दलावर दबावही वाढत आहे. 

एकंदरितच मिग-21 ची जागा भरु काढू शकणा-या विमानाची कमतरता असल्यानं नाईलाजानं भारतीय वायू दलाला बाहेरुन विमान विकत घेण्याचा निर्णय घ्यावा लागला.



कोण आहे खरेदी व्यवहाराच्या शर्यतीत...

भारतीय संरक्षण दलाची वाढती गरज लक्षात घेता शस्त्रास्त्राच्या बाजारपेठेतील सहा बड्या कंपन्या शर्यतीत उतरल्या आहेत.

    देश                           लढाऊ विमान                                        कंपनी
अमेरिका                 एफ-18 सुपर हॉर्नेट                             बोईंग कंपनी     
अमेरिका                 एफ-16 फायटिंग फाल्कन                   लॉखहिंड मार्टीन
फ्रान्स                      डझॉल्ट रायफेल                                 डझॉल्ट एव्हिएशन
युरोप                      युरोफायटर टायफुन                            युरोप एव्हिएशन 
स्वीडन                   जीएअस 39 ग्रीपन                              स्वीडीश एरोस्पेस
रशिया                    मिग-35                                               मिकोयेन


प्रत्येक देशाने विमानाबद्दलची माहिती, तंत्रज्ञान हस्तांतरण बद्दलचे निष्कष यापूर्वीच सादर केले आहेत.  सध्या या विविध सहा लढाऊ विमानांच्या चाचण्या युध्दपातळीवर सुरु आहेत.  दक्षिण भारतात उष्ण हवामान, हिमालय पर्वताच्या प्रदेशात थंड तसंच समुद्रालगतचं दमट हवामान, वाळंवटातील अतिशय उष्ण आणि मौसमी पाऊस असं बहुअंगी वातावरण भारतात आहे. तेव्हा या सर्व वातावरणात पुर्णपणे टीकाव धरणं विमानाला अतिशय आवश्यक आहे.  या विविध वातावणांमध्ये सहा लढाऊ विमानांच्या चाचण्या सुरु आहेत.  सर्व निकषांवर उतरणा-या सहा पैकी एका विमान कंपनीशी 2011 च्या मध्यात खरेदी करार होईल अशी अपेक्षा आहे.

खरेदी करारनुसार 126 पैकी पहिली 18 विमाने कंपनी स्वतः बनवून देईल तर उर्वरित सर्व विमानं भारतात तंत्रज्ञान हस्तांतरण केल्यावर बनवणार आहे.  76 अधिक विमानं बनवण्याचा पर्यायही ठेवण्यात आलाय.  2017 पर्यंत ही नवीन विमान वायू दलात मिग-21 ची जागा घेतील असं वेळापत्रक निश्चित करण्यात आलंय.

त्यानुसार 2017 पर्यंत भारतीय वायू दलातील स्क्वॉड्रनची संख्या 44 पर्यंत जाणार आहे.  मधल्या काळात 'तेजस'  दाखल होईल. त्याचबरोबर रशियाशी पाचव्या पीढीतील, स्टेल्थ बनावटीचं ( रडारवर चटकन दिसू न शकणारं ) लढाऊ विमान आपण विकसित करत आहोत. तेही 2017 पासून दाखल व्हायला सुरुवात होणार आहे.

तेव्हा ख-या अर्थानं 2017 नंतर वायू दल विविध लढाऊ विमानांच्या समावेशामुळं सक्षम होणार आहे. ही विमानं बहुउद्देशीय असणार आहेत. म्हणजे टेहळणी करण्याची, शत्रू पक्षाच्य़ा प्रदेशात जात वर्चस्व राखण्य़ाची, हवेतल्या हवेत लढाई करण्याची आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याची अशा विविध क्षमता या लढाऊ विमानांत असणार आहे.      


खरेदीचे जागतिक पटलावर महत्व


भारतीय संरक्षण दलात केंद्र सरकारनं कधीच हस्तक्षेप केला नाही  म्हणजेच अधिका-यांच्या नियुक्त्यांपासुन ते खरेदी व्यवहारापर्यंत सर्वकाही हे संरक्षण दलातील नियमानुसार संरक्षण दलातील अधिका-यांनीच केले. ( बोफोर्स, बराक क्षेपणास्त्र घोटाळा अर्थात ह्याला अपवाद ).

मात्र या 42 हजार कोटी रुपयांच्या खरेदीवर केंद्र बारीक लक्ष ठेवून आहे. गेल्या काही वर्षात भारताचे अमेरिकेबरोबर संबंध चांगलेच सुधारले आहेत.  अणु ऊर्जा करार हे त्याचेच उदाहरण. अमेरिकेच्या दोन कंपन्या या शर्यतीत असल्यानं अमेरिका भारतावर दबाब आणत आहे.  अणु ऊर्जा करार तुम्हाला( भारताला ) अनुकूल असा झाल्यानं आता आमचे ऐका अशी भुमिका पडद्यामागे अमिरेकनं घेतली आहे.   हा करार झाल्यानं आणखी शस्त्रास्र विक्रीचे अनेक मार्ग खुले होणार आहेत.  त्यातच सी-130 ही सहा मालवाहू विमाने देण्याचा करार भारताशी झालाय. सी-17 या अवाढव्य मालवाहू विमानांचा करार करण्याबाबत हालचाली जोरात सुरु आहेत.  त्यामुळं  या विमान खरेदीवरुन अमेरिकेनं जोरदार लॉबिंग सुरु केलीये.

1962 च्या सुद्धापासून भारतानं रशियाला आपला मोठा भाऊ मानत कित्येक संरक्षण दलातील करार त्याच्याबरोबर केले. सध्या वायू दल , नौदल आणि लष्कर ह्यांच्यातील एकुण 70 टक्के सामग्री रशियन बनावटीची आहे यावरुन रशिया भारतासाठी किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येतं.  आता एवढ्या मोठ्या विमान खरेदीसाठी रशियाही गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलं आहे.  कारण त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यास या करारामुळं मोठा हातभार लागणार आहे. मात्र गेली काही वर्ष भारताची अमेरिकेबरोबर सुरु झालेली जवळीक लक्षात घेता रशिया  मात्र भारतावर काहीसा नाराज आहे. त्यामुळं हा खरेदी व्यवहार अमेरिकेबरोबर झाल्यास हा भरवशाचा मित्र कायमचा दुरावला जाण्याची भिती भारताला वाटते.

शीतयुद्ध काळातसुद्धा भारताचे फ्रान्सबरोबर संबंध सलोख्याचे होते. अमेरिकेनंतर भारताशी अणु करार करणारा फ्रान्स हा पहिला देश होता.  एवढ्या मोठ्या खरेदीमुळं भारतीय बाजारपेठेत उतरण्याची संधी मिळणार असल्यानं फ्रान्स जोरदार प्रयत्न करत आहे.

स्वीडनचं ग्रीपन  आणि युरोपीयन देशांचे युरोफायटर विमान शर्यतीत आहे.  दोन्ही देशांना हा करार करत भारतीय बाजारपेठेत पाय रोवायचे आहेत.

एकंदरितच भारताच्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या शस्त्रास्र खरेदीसाठी अनेक देश टपलेले आहेत.  मात्र भारतीय वायू दल सक्षम होण्यासाठी हा करार होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भारताचे घटती स्क्वॉड्रनची संख्या चिंताजनक निश्चितच आहे.  कारण पाकिस्तान ( 25 स्क्वॉड्रन) ,  चीन ( 80 स्क्वॉड्रन-अंदाजे ) आपल्या वायू दलाच्या सामर्थ्यात वेगानं भर टाकण्याचा प्रयत्न करत आहे. लढाईतील  तत्वानूसार वायु दलाकडे शत्रुपक्षाच्या निदान  दीडपट ( लढाऊ विमानं ) असणं आवश्यक आहे. निदान पाकिस्तानच्या वरचढ आणि चीनच्या तोडीस तोड रहाण्यासाठी हा बुहउद्देशीय लढाऊ विमानांचा करार वेळेत पूर्ण होणं भारतासाठी गरजेचं आहे.          


Wednesday, December 9, 2009

सुखोई-३० एमकेआय भारताचे ब्रम्हास्त्र

तारीख - ३० एप्रिल २००९. ठिकाण पोखरण-राजस्थान. भारतीय वायूदलाच्या सुखोईला अपघात. एक पायलट ठार तर एक जखमी.
३० नोव्हेंबर २००९ आणखी एक सुखोई जैसलमेरजवळ कोसळलं. दोन्ही पायलट सुरक्षित.

एखाद्याला वाटेल या बातम्या काय नेहमीसारख्या आहेत, वायू दलातील विमानांना अपघात होतच असतात, त्यात नवीन काय ते.
मात्र वायूदलाचं ब्रम्हास्त्र असेलल्या आणि जगातील आघाडीच्या लढाऊ विमानांपैकी एक म्हणुन गणल्या जाणा-या सुखोईला झालेला हा अपघात होता. 1996 ला वायू दलात दाखल झालेलं आणि आत्तापर्यंत एकही अपघाताला सामोरं न गेल्यानं सुखोई हे वायू दलातील सर्वात सुरक्षित मुख्य म्हणजे सर्वोत्तम लढाऊ विमान समजले जात होते. मात्र या दोन अपघातांनी वायूदल अक्षरक्षः हादरलं. दोन्ही अपघातानंतर वायू दलानं अपघाताचं कारण शोधण्यासाठी एक स्वतंत्र चौकशी समिती बसवली आहे. अर्थात अपघाताची नक्की कारणं समजली असून पुन्हा सुखोईची हवाई भरारी सुरुही झाली आहे।


1996 ला वायू दलात दाखल झालेलं सुखोई ध्वनीच्या वेगाच्या सुमारे अडीचपट वेगानं जात मिरवत आकाश दणाणुन ठेवत आलं आहे. चीनला शह देणारे आणि फक्त एका जातीच्या विमानांच्या आधारे पाकिस्तानच्या वायू दलाला झोपवण्याची क्षमता अशी या सुखोईची खरी ओळख आहे.

फक्त आपल्या देशातच नव्हे तर शत्रूपक्षाच्या हवाई क्षेत्रात संचार करत तिथे निर्विवाद वर्चस्व ठेवण्याची क्षमता सुखोई-30 एमकेआय या लढाऊ विमानात आहे. जर अणु हल्ला करायचा झाल्यास तर एका दमात अधिक इंधन टाक्यांसह किंवा हवेतल्या हवेत इंधन भरत तब्बल आठ हजार किलोमीटरचा टप्पा गाठत शत्रूप्रदेशात अणु बॉम्ब टाकून सुखोई परत येऊ शकते.
सुखोईत असलेल्या क्लिष्ट संगणक प्रणाली आणि हल्ला कऱण्याची क्षमता व्यापक असल्यानं सुखोई-30 एमकेआय विमानाच्या कॉकपीटमध्ये दोन पायलटला जागा देण्यात आलीये. पुढे बसलेला पायलट विमानाचं सारथ्य करतो आणि रडारावर येणा-या माहितीचं विश्लेषण करुन निर्णय घेतो. तर मागे बसलेला पायलट विविध क्षेपणास्त्र आणि बॉम्ब डागण्याचं आणि संदेशवहनाचं काम करतो.


बहुरंगी-बहूआयामी रडार

एकाच वेळी 16 विविध ठिकाणी किंवा 16 टार्गेटवर नजर ठेवून प्रतिहल्ला चढवण्याची, शत्रूला उत्तर देण्याची क्षमता सुखोईत आहे. हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर अचुक मारा करण्याची क्षमता सुखोईत आहे. हे शक्य झालंय ते NIIP N011M Bars (Panther) या सुखोईच्या नाकावर- पुढच्या भागात बसवलेल्या रडारमुळे.


याची संगणक प्रणाली म्हणजे एक मिनी सुपर कॉप्म्युटरसारखी काम करते. हे रडार चोहोबाजुनी काम करत आकाशातील आणि जमिनीवरील प्रत्येक गोष्टीची नोंद करत त्याचे विश्लेषण पायलटपर्यंत पोहचवतो. यामुळे पायलटला चटकन आपले लक्ष्य काय आहे हे अचुक ओळखता येते आणि आपली पुढची व्ह्युहात्मक दिशा लगेच ठरवता येते. कारण युद्धात प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो.
एकाच वेळी आकाशात 200 किलोमीटरपर्यंत आणि जमिनीवर 60 किलोमीटरपर्यंत बारीक नजर ठेवण्याची क्षमता सुखोईची आहे. कुठलाही सुक्ष्म सिग्नल, इलेक्ट्रोमॅग्निटक व्हेव्ज सुखोई पकडु शकतो. म्हणुनच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.रेड्डी ह्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यावर ब्लॅक बॉक्समधुन येणारा संदेश मिळावा यासाठी खराब हवामानात असतांना सुखोईला पाचारण करण्यात आले होते.



फ्लाय बाय वायर / Fly By Wire

सुखोई लढाऊ विमानातील सर्वात अत्याधुनिक प्रणाली म्हणजे Fly By Wire / फ्लाय बाय वायर ही व्यवस्था. फक्त एक बटन दाबत सेंसरर्सद्वारे संदेश वहन करत एखादं काम करण्याची रचना म्हणजे Fly By Wire.
उदा.एक हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागायचे आहे. तेव्हा पायलट आपल्या रडारवर शुत्रपक्षाचं विमान शोधतो. मग विमान शत्रुपक्षाच्या दिशेत वळवतो, विशिष्ठ उंची गाठतो आणि मग क्षेपणास्त्र डागतो. यासाठी पायलटला प्रत्येक प्रकार करतांना डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवायला लागायचं. पूर्वी हे सर्व सुरळित पार पाडण्यासाठी प्रत्येक बटानांच्यादरम्यान संदेशवहनासाठी विविध वायरींच क्लिष्ट जाळं विमानात असायचं. यामुळं विमानाचं वजन आकार मर्यादीत ठेवता येणं कठीण व्हायचं. मुख्य म्हणजे एखाद्या वायरचं काही नुकसान झालं तर ते शोधणं डोकेखाऊ काम असायचं.

मात्र Fly By Wire मध्ये या वायरींचं काम दोन टोकांवर बसवलेले सेंसर संदेशवहनाचं काम करतात. विशिष्ट उंची गाठायचे निर्देश देण्यासाठी बटन दाबल्यावर विमान आपोआप उंची गाठते. या काळाता वैमानिकाला पुढची व्युहात्मक रचना करायला वेळ मिळतो आणि वैमानिक उंची गाठल्यावर क्षेपणास्त्र डागतो आणि पुढचं लक्ष्य शोधायला सुरुवात करतो.



सुखोईची कोब्रा फाईट

सुखोईला हवेतल्या हवेत दुस-या लढाऊ विमानाशी लढतांना ‘ दादा ’ समजलं जातं. याचं कारण वेगानं जात असतांना हवेतल्या हवेत काही सेकंद सरळ उभं रहाण्याची सुखोई असलेली क्षमता.
या लढण्याच्या पद्धतीला “ Pugachev's Cobra “ असं म्हणतात. नागाच्या फण्यासारखं काही काळ सुखोई उभं राहत शुत्र पक्षाच्या विमानाला चकवू शकतं किंवा होणारा हल्ला टाळु शकते. सुखोई विमानाच्या ही कसरती शक्य झालीये ती Al-31FP turbofans या जगातील शक्तीशाली इंजिनामुळे.
काही संकेदात वेग शुन्य करण्याची आणि क्षणभरात ध्वनीचा वेग पकडण्याची सुखोईची क्षमता या इंजिनामुळं शक्य झालीये.


सध्या भारतीय वायू दलाच्या ताफ्यात 120 सुखोई-30 MKI आहेत. काही सुखोई-30 चं रुपांतर सुखोई-30 एमकेआय मध्ये करण्यात येत आहे. 2014-15 पर्यंत अशी एकुण 280 सुखोई ताफ्यात दाखल करुन घेण्यात येणार आहेत. सध्या ‘ हिंदूस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड ‘ ( HAL) दरवर्षी 18-20 सुखोई बनवत आहे.
चीनकडे अशा दर्जाची एकुण 100 पेक्षा सुखोई कार्यरत आहेत. तर सुखोई-30 एमकेआय पेक्षा कमी क्षमतेची सुखोई-27 लढाऊ विमानं 100 पेक्षा जास्त कार्यरत आहेत. दोन्ही प्रकारच्या सुखोईंची जास्तीत जास्त भर घालण्याचा प्रयत्न चीन युद्ध पातळीवर करत आहे. म्हणुनच भारतानं सुखोईच्या निर्मितीला वेग देण्याची गरज आहे.
जगातील सगळ्यात कठीण लढाऊ विमानांचा हवाई युद्ध-अभ्यास समजल्या जाणा-या अमेरिकेच्या ‘ रेड फ्लॅग ‘ युद्ध-अभ्यासात सुखोईची कामगिरी उत्कृष्ठ श्रेणीमध्ये गणली गेली. अशा तंत्रज्ञानात आणि लढाऊ क्षमतेत जगात उत्कृष्ट गणल्या गेलेल्या सुखोई-30 एमकेआय मधुन भरारी घेण्याचा मोह टेक्नोसॅव्ही असलेल्या राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ह्यांनाही आवरता आला नाही.

सुखोईला झालेला दोन अपघाताची निश्चितच गंभीर दखल घेतली गेलीये. काही चुका पायलटकडुन झाल्या असतील किंवा तंत्रज्ञानात काही उणीवा लक्षात आल्या असतील. मात्र या सर्वांवर मात करत सुखोईच्या भरा-या पुन्हा सुरु झाल्या आहेत. सुखोईच्या या सर्व गुणगोष्टींमुळे सुखोई भारतीय वायू दलाचं ब्रम्हास्त्र ठरले आहे. म्हणनुच एअर फोर्समध्ये सुखोईला “ A Special Baby “ म्हणुन एक मानाचं स्थान आहे.

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...