Saturday, July 16, 2011

अभिमान म्हणजे काय ?

महाराणा प्रताप 

तुम्हाला तुमच्या महापुरुषाबद्दल किंवा मनात आदरणीय स्थान असलेल्या इतिहास पुरुषाबद्दल-स्त्रीबद्दल प्रेम आहे का, अभिमान आहे का ?

या प्रश्नाचे उत्तर आपण सर्वजण बहुतेक पुढीलप्रमाणे देतील.

का नाही..
आहे की अभिमान..
हे काय सांगायची गोष्ट आहे..
सिद्ध करण्यासाठी काय करुन दाखवू..
पुण्यतिथी / जन्मदिन / जयंती / वाढदिवस दरवर्षी धुमधडाक्यात साजरा करतो की..
त्यांची आठवण म्हणुन समाजपयोगी कामे करतो की...सोशल वर्क करतो की....
घरात त्यांचा फोटो-तसवीर आहे ना..
कोणी त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोललं तर कानफटात मारु..
त्याची बदनामी कोणी केली तर आमच्या स्टाईलने धडा शिकवू...

मग हे महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, सावरकर किंवा कुठल्याही विशिष्ट जातीचे, धर्माचे, विशिष्ट विचारांचे महापुरुष असतील. पण खरंच त्यांच्याबद्दल आपल्या मनात, अगदी मानाचे स्थान असलेल्या आदरणीय व्यक्तिबद्दल जाज्वल्य अभिमान, स्वाभिमान, प्रेम मनात आहे का, त्यांचे विचार आपल्या रक्तांत भिनले आहे का. त्यासाठी दोन उदाहरणे देतो.

2000 व्या वर्षी डोंबिवलीतील आमच्या के.व्ही.पेंढारकर महाविद्यालयाने दिल्ली ते डोंबिवली अशी सायकल मोहिम आयोजित केली होती. फिरण्याची आवड असलेले, उत्साही असे आम्ही 20 विद्यार्थी, साथीला आमचे मार्गदर्शक कवठेकर सर, त्यांचे तीन सहकारी असे यामध्ये सहभागी झालो होतो. दिल्लीला तेव्हाचे केंद्रीय पेट्रोलियन मंत्री राम नाईक ह्यांनी मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. दलमजल करत दिल्ली, नोएडा, हरियाणामार्गे राष्ट्रीय महामार्ग NH -8  ने राजस्थानमध्ये दाखल झालो. नोव्हेंबर महिना असला तरी रात्री थंडी आणि दिवसा ऊन याचा मारा सहन करत राजस्थानमधून आमचा प्रवास सुरु होता.

प्रसंग पहिला
राजस्थानमध्ये चित्रगड ( चित्तोड / चित्तोर ) जिल्ह्यात प्रवेश करतांना महामार्गावरच मोठी कमान असलेला महाराणा प्रताप की चित्तोड नगरी में आपका स्वागत है  .... असा बोर्ड वाचत आम्ही चित्रगडमध्ये प्रवेश केला. राजस्थान म्हटले  की राजपूत, शूरांची भुमि, जौहार ( शत्रुच्या हाती पडू नये यासाठी अग्निकुंडात स्त्रीयांनी केलेले बलिदान ), किल्ल्यांची अत्यंत आपूलकीने घेतलेली काळजी वगैरे आठवते. मात्र त्यापेक्षा बाहेरुन येणा-या नागरिकाला त्या ठिकाणचे महत्व कळण्यासाठी, त्यांच्या इतिहासपुरुषाची ओळख करुन देण्यासाठी रस्त्यापासून अशा कमानी उभारुन केलेली धडपड चटकन नजरेत भरते.

जेव्हा सायकलवरुन प्रवास करत पुढे जेव्हा गुजरातमधून महाराष्ट्रात प्रवेश केला तेव्हा महामार्गावर महाराष्ट्रात स्वागत, महाराष्ट्र राज्य सुरु, महाराष्ट्र हद्द सुरु, महाराष्ट्रात प्रवेश या व्यतिरिक्त कुठलीही ओळ दिसली नाही, वेगळी कमान दिसली नाही.

उलट संताच्या भूमीत स्वागत, ( संपुर्ण महाराष्ट्राचे भूषण असलेल्या ) छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या राज्यात स्वागत, घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या महाराष्ट्र राज्यात स्वागत अशी खास महाराष्ट्राची ओळख करुन देणारी कुठलीही कमान दिसली नाही.


ते तर सोडाच, जेव्हा आपण रायगड जिल्हात प्रवेश करतो किंवा छत्रपतींची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याकडे जातो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत स्वागत वगैरे असा कुठलाही मोठा बोर्ड किंवा कमान दिसुन येत नाही. आणि आजही ती परिस्थिति तशीच आहे .

प्रसंग दुसरा
मोल बादशहा अकबर आणि महाराणा प्रताप ह्यांच्यातील हळदी / हल्दी घाटातील लढाई सर्वांनाच माहित आहे. या लढाईत महाराणा प्रताप ह्यांना वीर मरण आले. मात्र ह्या आधी एक लढाई दोन राजांमध्ये झाली होती आणि त्यात महाराणा प्रताप ह्यांचा विजय झाला होता. कदाचित ही गोष्ट फार कमी लोकांना माहित असेल. तर ज्या ठिकाणी ही लढाई झाली त्या भागातून आमची सायकल मोहिम सुरु होती. ( त्या भागाचे नाव आता काही आठवत नाही ). रस्ताच्या बाजूला तशा आशयचा एक बोर्ड दिसल्याने आम्ही सर्वजण थांबलो. त्या विजयाच्या आठवणी निमित्त तिथे एका विजयस्तंभाचे काम सुरु असल्याचेही तिथे लिहिण्यात आले होते.  

काही मित्र चटकन सायकल बाजूला लावत विजयस्तंभाचे काम सुरु असल्याच्या ठिकाणी गेले. तर आम्ही काही जण पूढे गेलेले मित्र आल्यानंतर जाऊ असा विचार करत रस्ताच्या बाजूला असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलो. चहावाला एकदम बडबड्या होता. आम्ही महाराष्ट्रातले आहोत, सायकलने दिल्लीवरुन आलो आहोत वगैरे माहिती बोलत त्याला सांगितली, अवघ्या दोन मिनिटांत जणू त्याच्याशी आमची चांगली ओळख झाली.

चहा पितांना चटकन एकाने महाराणा प्रताप ऐवजी प्रताप आणि तोही एकेरी उच्चार केला. तेव्हा ताबडतोब चहावाल्याने जी प्रतिक्रिया दिली त्यावर आम्ही थक्क झालो, त्यापेक्षा आमच्या कानफटात मारल्यासारखे आम्हांला झाले. तो चहावाला म्हणाला हम आपके शिवाजी महाराज को छत्रपती शिवाजी महाराज कहेके पुकारते है, आप भी महाराणा प्रताप कहीये  . अर्थात आम्ही त्यावर मान डोलवली आणि चूक मान्य केली.

एक साधा ( साधा कशाला स्वाभिमानी-अभिमानी ) चहावाल्याने आम्हाला असा सणसणीत अभिमानाचा धडा दिला. महापुरुषाबद्दलचा स्वाभिमान कसा असावा, अभिमान रक्तात असावा म्हणजे काय, फक्त आपल्याच नाही तर दुस-या ( राज्याच्या, प्रांताच्या, देशाच्या ) महापुरुषांबद्दलचा किंवा व्यक्तिंबद्दल आदर कसा राखावा हे तो चहावाला आम्हाला शिकवून गेला.

असा अभिमान आहे का आपल्यामध्ये, एवढा अभिमान आहे का आपल्याला आपल्या आवडत्या महापुरुषाबद्दल, आदरणीय व्यक्तिबद्दल. तो कसा असावा, कशा प्रकारे दिसुन आला पाहिजे यासाठी राजस्थानमधील हे दोन प्रसंग बहुदा पुरेसे होतील. हे दोन प्रसंग गेले काही दिवस पुन्हा पुन्हा आठवत होते. कारण दादोजी कोंडदेव वादापासून छत्रपती वड्यापर्यंत अनेक घटना मनाला अस्वस्थ करत होत्या.

राज्यातील अनेक ऐतिहासिक ठिकाणे मग ते किल्ले असो, मंदिरे, स्मारक, शिलालेख, लेणी , वास्तू, जुनी हस्तलिखिते, वस्तू यापासून ते महापुरुषांच्या विचारांबद्दल, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, वाद निर्माण केले जात आहेत, त्यांची हेळसांड होत आहे, अनेक गोष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

महाराष्ट्रातील अनेक महापुरुषांचा मान तर नाहीच पण विविध प्रकारे अपमान करण्याची एकही संधी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था , जातीवर आधारीत संस्थांनी सोडली नाहीये. एखाद्या महापुरुषाबद्दल आम्हाला किती अभिमान आहे हे दाखवण्याची जणु स्पर्धाच सर्वांमध्ये लागली आहे. तो अभिमान दाखवतांना कुठल्याही थराला ही लोकं पोहचत आहेत. अशा अतिउत्साही लोकांच्या कृत्यातून महापुरुषांचा अपमान जेवढा महापुरुषांच्या काळात ( त्यांच्या शत्रूंकडून ) झाला नसेल तेवढा आत्ता ह्या लोकांकडून केला जात आहे. मात्र याची जाणीव कोणाला नाहीये, किवा माहित असून सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळे सुरुच ठेवले जात आहे. विविध पुस्तके, उत्सव, कार्यक्रमांद्वारे या वादात भर टाकली जात आहे.

महापुरुषांच्या नावाने वाद थांबत नाहीयेत. तेव्हा किमान त्यांचा मान तरी सर्वांनी राखावा, त्यांच्याबद्दल आदर कृतीतून दिसून यावा असे वर उल्लेख केलेल्या दोन प्रसंगावरुन मनापासून सांगावसे वाटते. 


Sunday, July 10, 2011

साधना ताईंची आठवण




बाबा आमटेंना प्रत्येकक्षणी साथ देणा-या साधना ताईं आता त्यांच्याबरोबर कायम सहवास रहावा यासाठी आपल्या सर्वांना सोडून निघून गेल्या. या निमित्ताने 2002च्या डिसेंबर महिन्यात पूर्व महाराष्ट्रातील सायकल मोहिमेतील आनंदवनमधील त्यांच्या भेटीच्या आठवणी ताज्या झाल्या.

सायकल मोहिमेत नागपूर-भंडारा-गोंदिया-गडचिरोली-चंद्रपूर असा प्रवास करत आम्ही पाच सायकलस्वार आनंदवनमध्ये एका दुपारी आम्ही दाखल झालो. सायकल प्रवासाने बिघडलेला आमचा अवतार ठिकठाक करत विकास आमटे ह्यांची वाट बघत आम्ही आनंदवनच्या कार्यालयात थांबलो. थोड्याच वेळात विकास आमटे आले आणि आमच्याशी 40 मिनिटे गप्पा मारल्या. सायकल प्रवासाचा हेतू, प्रवासातील अनुभव, आनंदवनची उभारणी, आनंदवनातील सोयी, तेथील विविध उद्योग यावर भरपूर चर्चा त्यांनी केली, माहिती सांगितली. बाबा आणि ताई तुम्हाला थोड्याच वेळात भेटतील, तोपर्यंत तुम्ही आनंदवन बघा असं सांगत विकास आमटे ह्यांनी आमचा निरोप घेतला.

आनंदवनमध्ये फेरी मारतांना तिथला अद्भुत असा चमत्कार बघत आम्ही अक्षरशः भान हरवून गेलो होतो. तेथून पुन्हा कार्यालयाजवळ आलो, बाबा आमटे ह्यांना त्यांच्या गाडीतून बाहेर येतांना बघितलं आणि आम्हाला फक्त वेड लागायचं बाकी होतं. आत्तापर्यंत विविध व्यक्तिंकडून, पुस्तकांतून, वर्तमानपत्रांमध्ये येणा-या बातम्यांमधुन ऐकलेला देव माणुस चक्क आमच्या समोर उभा होता. हसत हसत त्यांनी आमच्याशी शेकहँड केलं. एकाच्या खांद्यावर हात ठेवत त्यांनी आमच्या सायकल प्रवासाबद्दल माहिती विचारली, अनुभव विचारले. मी मनाने अजुनही तरुण आहे, पण शरीर साथ देत नाही, नाहीतर तुमच्याबरोबर सायकलने आलो असतो असे ते म्हणाले.

तेवढ्यात मुलांनो तुम्ही कुठुन आलात  ? ” अशी प्रेमळ हाक आमच्या मागे ऐकु आली. बघतो
तर काय साधनाताई समोर उभ्या होत्या. आम्ही आमच्या सायकल मोहिमेची माहिती सांगितली. कल्याण-डोंबिवलीची तरुण मुलं तीही या भागात सायकलने फिरत आहेत याचं त्यांना भारी आश्चर्य वाटत होतं. तुम्हाला कुठे त्रास तर झाला नाही नाही, लागल नाही ना ? अशी आपुलकीने चौकशी केली.  असाच प्रवास करा, खुप अनुभव मिळेल, तुम्ही अनुभवाने श्रीमंत व्हाल अस बहुमुल्य सल्लाही ताईंनी दिला. ताईंनी त्यांचे “  समिधा  हे पुस्तकसुद्धा आम्हाला भेट दिले. सायकल प्रवासात आम्ही ज्या ठिकाणी जात होतो, तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया लिहुन घेत होतो. बाबा आमटे ह्यांनी स्वतः आणि साधानाताईंच्या वतीने पाच ओळींचा संदेश लिहीला. आजही तो कागद जपून ठेवला आहे. 

खरं तर तेव्हा आमच्याकडे दोन कॅमेरे होते. मात्र या देव माणसांच्या भेटीने आम्ही इतके भारावून गेलो होतो की फोटो काढण्याचे भानसुद्धा राहिले नाही. भेट फक्त 1 मिनीटांची झाली. मात्र मनाने तरुण असलेल्या बाबांचे शब्द आणि साधनाताईंचा सल्ला आजही मनात घर करुन आहे, भेट अगदी कालपारवा झाल्यासारखी मनात आजही एकदम ताजी आहे.

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...