Saturday, May 5, 2012

अग्नी-५ , आता पुढे काय ?



19 एप्रिल २०१२ ला ओडिसा जवळील  व्हीलर बेटांवरुन आठ वाजून दोन मिनिटांनी अग्नि -५ या पहिल्या आंतरखंडीय मारा करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राने अवकाशात झेप घेतली. ५० टन वजनाचे अग्नि क्षेपणास्त्र  50 मीटर एवढा आगीचा झोत मागे सोडत गर्जना करत अरबी समुद्रातील नियोजीत लक्ष्याच्या ठिकाणी निघाले. 22 मिनीटात ते लक्ष्याच्या ठिकाणी अचूक पोहचले. या क्षेपणास्त्राची चाचणी म्हणजे Text Book Launch असे वर्णन डीओरडीओच्या शास्त्रज्ञांनी केली, म्हणजेच जशी चाचणीची आखणी केली होती अगदी तसेच घडले.

अग्नी -5 च्या चाचणीने काय साध्य झाले ?

1..... अग्नी -5 हे क्षेपणास्त्र 5000 किमी ते 5800 किमी एवढ्या अंतरापर्यंत मारा करु शकते. 
        यामुळे संपूर्ण चीन,  जवळपास सर्व रशिया ( उत्तरे-पूर्वेकडचा भाग नाही ) , इस्त्राईलच्या पुढचा सिरिया,
        अर्धा युरोप, आफ्रिकेचा केनिया, इकडे जपान , ऑस्ट्रेलिया पासून काही अंतरावरचा भाग एवढा 
        विस्तिर्ण भाग आवाक्यात आला. त्यामुळे  फक्त चीन नाही तर वेळ पडल्यास एवढ्या भागांतील देशांवर 
        वचक ठेवण्याची क्षमता यामुळे प्राप्त झाली. 

२..... अग्नी -५ हे क्षेपणास्त्र ५००० किमीचे अंतर गाठतांना साधारण मधल्या पल्ल्याच्या वेळी सुमारे 600 
        किमी एवढी उंची गाठते. अग्नी -५ च्या यशस्वी चाचणीमुळे Reentry Technology मध्ये आपल्याला यश
        आले. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जात पुन्हा वातावरणात प्रवेश करतांना क्षेपणास्त्राचा वेग प्रचंड असतो.
        यातच वातावरणाशी घर्षण झाल्याने क्षेपणास्त्र हवेतच जळुन नष्ट होण्याचा धोका असतो. मात्र आपण  
        ही अवघड चाचणी यशस्वी केली. क्षेपणास्त्राचा शेवटचा टप्पा 300 किमीच्या उंचीवर संपला. 
        स्फोटकं असलेला क्षेपणास्त्राचा भाग वातावरणातील उष्णतेचा कुठलाही परिणाम न होता नियोजित
        ठिकाणी कोसळला. वातावरणात प्रवेश करुन परत येतांना टिकून रहाणा-या विशिष्ट धातूंच्या निर्मिती 
        कसोटीला उतरली. या  धातूचा फायदा भविष्यातील मानवी मोहिमांकरता होणार आहे.

३..... गरज पडल्यास या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने आपण एक टन वजनापर्यंतचा छोटा 
        उपग्रह अवकाशात सोडू शकतो.

४...... अग्नी -५ क्षेपणास्त्र प्रवासादरम्यान ६०० किमी पर्यंतची उंची गाठते. या उंचीवर किंवा या कक्षेत 
         साधारण टेहळणी उपग्रह , पृथ्वीची छायाचित्र काढणारे उपग्रह, पृथ्वीच्या वातावरणाचा
         अभ्यास करणारे उपग्रह असतात. तेव्हा अग्नी -५ च्या चाचणीने या उंचीवरील एखादा उपग्रह
         नष्ट करण्याची क्षमता भारताला प्राप्त झाली आहे.

५.....अग्नी- ५ मुळे एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झालीये. कारण एक टन 
        वजनाची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमात अग्नी -५ ची आहे. म्हणजेच शेवटच्या टप्प्यात  ५० ते अगदी 
        २५०  किलोटन क्षमतेचे  एक ते चार अणु बॉम्ब ठेवू शकतो. हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर
        टाकलेल्या अणु बॉम्बची क्षमता प्रत्येकी १५ ते २० किलोटनच्या आसपास होती. यावरुन अग्नी- ५ ची 
        विध्वंसक  क्षमता किती आहे याचा अंदाज येऊ शकतो. मुख्य म्हणजे असा मारा हे  Multiple 
         Independently Targetable Reentry च्या तंत्रामुळे शक्य होतो. हे तंत्रज्ञान अग्नी -५ मध्ये वापरता 
        येऊ शकते. त्यामुळे गरज पडल्यास एकाच वेळी विविध शहरांवर मारा करता येऊ शकतो.

या गोष्टींमुळे अग्नी -५ ची यशस्वी चाचणी हा देशाच्या संरक्षण व्यवस्थेत एक मैलाचा दगड मानली गेली आहे. पुढील २- ते ३ वर्षात आणखी दोन -तीन चाचण्या अग्नी -५ च्या घ्याव्या लागतील.  म्हणजेच सर्व काही सुरळित झाले तर २०१५ पर्यंत अग्नी -५ चा भारताच्या संरक्षण दलामध्य़े समावेश व्हायला हरकत नाही. 


मात्र चाचणी यशस्वी झाली तरी भारतासमोरील आव्हाने अजुनही कायम 


१......भारताचा एक नंबरचा शत्रू म्हणुन ओळखल्या जाणा-या चीनकडे DF-41 हे १५,००० किमी पर्यंत मारा
        करणारे अति दिर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. यामुळे चीन जगाच्या कुठल्याही भागात यामुळे मारा करु 
        शकतो. पण त्याचबरोबर पाण्याखालून मारा करणारे JL-2 हे तब्बल ८,००० किमी पर्यंत मारा करणारे
        क्षेपणास्त्र आहे. आपण आत्ता कोठे ५,००० पर्यंत चाचणीच्या स्वरुपात मजल मारली आहे. त्यामुळे
        आपल्यासाठी दिल्ली अजुन दूर आहे असंच म्हंटलं पाहिजे.

२..... अणु पाणबुडीचा अभाव - भारत आणि चीनचे युद्धाची ठिणगी यापुढे समुद्रातल्या घडामोडींवरुन पडेल
        अशी म्हणण्य़ासारखी परिस्थिती पुढील काही वर्षात उद्भवू शकते. या लढाईत अणु पाणबुडी महत्त्वाची
        भुमिका बजावणार आहे. आपल्याकडे आयएनएस चक्र -२ ही १० वर्ष भाडेतत्त्वार वापरली जाणारी अणु
        पाणबुडी दाखल झालीये. चीनकडे विविध आकाराच्या १० पाणबुड्या आहेत. येत्या पाच वर्षात आणखी
        ६ पाणबुड्या चीन नौदलात दाखल करुन घेणार आहे. भारत आयएनएस अरिहंत या पहिल्या स्वदेशी
        अणुपाणबुडीची चाचणी घेत आहे. या चाचणींवर पुढील अणु पाणबुड्यांच्या बांधणी कार्यक्रम अवलंबून 
        रहाणार आहे.

३..... विमानवाहू युद्धनौका - भारताकडे एक आयएनएस विराट विमानवाहू युद्धनौका आहे, आयएनएस  
        विक्रमादित्य २०१२ च्या अखेरीस दाखल होत आहे. तर स्वदेशी बनावटीची युद्धनौका दाखल व्हायला 
        किमान २०१५ उजाडणार आहे,मात्र याबद्दल सुद्धा साशंकता आहे.उलट चीन एक विमाननावाहू युद्धनौका ,
       जी रशियाकडून विकत घेतली होती ती २०१३-१४ ला दाखल करणार आहे. तर चीन स्वदेशी बनावटीची 
        विमानवाहू युद्धनौका २०१५ पर्यंत दाखल करणार आहे. विशेष म्हणजे चीनच्या विमानवाहू युद्धनौका
        या भारतापेक्षा जास्त मोठ्या असणार आहेत. म्हणजेच विमाने, हेलिकॉप्टर वाहून नेण्याची क्षमता 
        चीनकडे जास्त असेल. मात्र चीनचा युद्धनौका बांधण्याचा वेग लक्षात घेतला तर २०२० पर्यंत भारत या 
        विमानवाहू युद्धनौकांच्या क्षमतेमध्ये आणि संख्येमध्ये मागे रहाणार आहे हे निश्चित.

४.....पुढील युद्धे ही उपग्रहांच्या क्षमतेवर, उपग्रह वापरण्याच्या कौशल्यावर लढली जाणार आहेत. तेव्हा 
       अवकाशातील उपग्रह नष्ट केला तर युद्धाचे पारडे सहज फिरवले जाऊ शकते. उपग्रह नष्ट करण्याची
       म्हणजेच उपग्रह विरोधी प्रणाली ही महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिका, रशिया आणि चीन या फक्त तीन
       देशांकडे ही यंत्रणा आहे. भारताच्या अग्नी -५ कडे ही क्षमता असली तरी त्याची चाचणी अजुन घेतली
       गेलेली नाही. तेव्हा या क्षमतेची चाचणी आवश्यक असून ही प्रणाली कार्यरतही होणे गरजेचे आहे.
       
तेव्हा अग्नी -५ ची चाचणी झाली म्हणजे आपण ( चीनपेक्षा ) अतिशय ताकदवान झालो असे काहीही नाही. संरक्षण दल मजबूत करण्यासाठी भारताला अजुन बरचा पल्ला गाठायचा आहे. कारण एकीकडे पाकिस्तानकडे लक्ष ठेवायचे आहे तर दूसरीकडे ( अमेरिकेशी टक्कर द्यायला निघालेल्या ) चीनसमोर दंड थोपटून भारताला उभे रहावे लागणार आहे. ( भारत - चीन ह्यांच्या संरक्षण दलाच्या सामर्थ्याची तुलना करणारा माझा ब्लॉग वाचावा ). चीनएवढी क्षमता नाही तर स्वतःचे संरक्षण करत चीनला टक्कर देण्याएवढे सामर्थ्य वाढवणे भारतासाठी येत्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताकडे विकसित होणारी क्षेपणास्त्र भेदी प्रणाली हीच एकमेव जमेची बाजु आहे. कारण ही यंत्रणा कार्यरत झाल्यावर शत्रू पक्षाचे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र हवेत नष्ट करणे भारताला शक्य होणार आहे. ( छुपे उद्योग करणा-या ) चीनकडे अजुन तरी ही क्षमता नाही आहे किंवा त्याने तसे दाखवण्याचा प्रयत्नही केलेला नाही. थोडक्यात अग्नी- ५ ची चाचणी हा प्रोत्साहन वाढवणारा एक टप्पा आहे. अग्नी - 5 ची नुसती चाचणी झाली असतांना भारताच्या ( छुप्या ) महत्त्वकांक्षी " सूर्या  " या प्रकल्पाबद्दल चर्चाही सुरु झाली आहे. सुर्या क्षेपणास्त्रचा पल्ला हा ८,००० ते १०,००० च्या घरात असेल अशी चर्चा आहे. असे असले तरी भारताला अजुन बराच पल्ला गाठायचा आहे............        

Friday, May 4, 2012

आता भारताची मंगळावर स्वारी



16 मार्च 2012 ला सादर झालेल्या अर्थसंकल्पात माझ्या मते जगाचे लक्ष वेधुन घेणारी गोष्ट कोणती असेल तर प्रणव मुखर्जी ह्यांनी इस्त्रोसाठी  6715 कोटी रुपयांची केलेली आर्थिक तरतूद. गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल २२८३ कोटी रुपये म्हणजे जवळपास ५० टक्के रक्कम वाढवून दिली गेलेली आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये मंगळ मोहिमेसाठी १२५ कोटी रुपये दिलेत. अर्थसंकल्पातील माहितीनुसार भारत २०१३ च्या नोव्हेंबरमध्ये मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी २५ किलो वजनाचा एक उपग्रह पाठवणार आहे.

खरं ही बातमी विज्ञान प्रेमींसाठी एक सुखद धक्काच आहे. कारण चांद्रयान-१ च्या यशस्वी मोहिनेनंतर २०१३-१४ वर्षासाठी चांद्रयान -२ मोहिमेची आखणी भारत म्हणजेच इस्त्रो-भारतीय अंतराळ संशोधन संस्था करत होती. यामध्ये चंद्राभोवती फिरणारा एक उपग्रह पाठवला जाईल. मग त्यामधुन एक रोवर म्हणजे छोटेखानी गाडी चंद्रावर फिरणार. दगड-मातीचे नमुने गोळा करणार आणि परत पृथ्वीवर आणणार. या मोहिमेबद्दल सर्वांना उत्सुकता असतांना इस्त्रोने मंगळ मोहिम गुपचूप अर्थसंकल्पातून जाहीर करुन सर्वांना सुखद धक्का दिला आहे. कारण 2014-15 नंतर मंगळ मोहिम करण्याचा विचार सुरु होता.

तेव्हा मंगळ मोहिमेचे एवढे महत्व काय, आपल्याला चंद्र फारसा माहित नसतांना आपण मंगळाकडे का वळत आहोत, नक्की कोणावर आपण कुरघोडी करणार आहोत, या मोहिमेचा आपल्याला भविष्यात काय फायदा होऊ शकतो या गोष्टी जाणून घेऊयात.

पृथ्वीसदृष्ट परिस्थीती मंगळावर

मंगळ आणि पृथ्वीचे वातावरण ह्यांच्यात थोडं का होईना साम्य आहे. मंगळावर वातावरण तेही विविध स्तरांचं असलेले अस्तित्वात आहे. मंगळाच्या वातावरणात ९५ टक्के कॉर्बन डायऑक्साईड, २.७ टक्के नायट्रोजन, ०.१३ टक्के ऑक्सिजन आहे. सर्वात मुख्य म्हणजे मंगळाच्या ध्रुवांवर गोठलेल्या अवस्थेत तसंच स्फटिकांच्या रुपात पाणी अस्तित्वात असल्याचं शास्त्रज्ञांचं ठाम मत आहे. या गोष्टी भविष्यात मानवी वस्ती मंगळ ग्रहावर करण्यास मोठ्या प्रमाणात अनुकुल आहेत. कारण आज ना उद्या पृथ्वीवरील वातावरण प्रदुषित झालेले असेल, अफाट लोकसंख्या झालेली असेल त्यामुळे पृथ्वीबाहेर वस्तीसाठी जागा शोधणे मानवासाठी अपरिहार्य असेल.


मंगळावरच्या मोहिमा

शीतयुद्धाला सुरुवात झाल्यावर सोव्हिएत रशिया आणि अमेरिका ह्यांचा सर्वच क्षेत्रात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा आटापीटा सुरु होता. रशियाने १९६० ला दोन कृत्रिम उपग्रह मंगळाकडे पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र अवकाशात झेप घेण्यापूर्वीच त्यांच्या रॉकेटचा स्फोट झाला. १९६२ च्या सुमारास एक उपग्रह मंगळाच्या जवळून गेला आणि अगदी थोडी माहिती पाठवली. मात्र ख-या अर्थाने मंगळाभोवती फिरणारा कृत्रिम उपग्रह पाठवला तो अमेरिकेने. १३ नोव्हेंबर १९७१ ला मरिनर-९ हा कृत्रिम उपग्रह मंगळाभोवती घिरट्या घालू लागला. तर बरोबर १४ दिवसांनी रशियाचा मार्स-२ हा उपग्रह मंगळाभोवती फिरु लागला.

तर २००१२ पर्यंत अमेरिकेच्या वायकिंग १ आणि २ , मार्स पाथफाईंडर, मार्स ओडिसी, स्पिरिट, ऑप्युचर्निटी, फोनिक्स अशा विविध मोहिमा यशस्वी केल्या. यामध्ये काही उपग्रहांनी मंगळाची छायाचित्रे घेतली, काही मोहिमांमध्ये मंगळावर छोटी चालणारी गाडी उतरवली गेली, मातीचे नमुने घेतले, असंख्य प्रयोग केले आणि प्रचंड माहिती मिळवण्यात अमेरिकेला म्हणजेच नासाला यश आले. मंगळावरच्या मातीचे प्रकार, मातीमध्ये आढळणारी खनिजे, वातवरणातील विविध वायुंचे अस्तित्व, वातावरणात होणारे बदल, ऊन-वारा याचे प्रमाण, धुळीचे वादळ अशी असंख्य माहिती मिळवली गेली. त्यामानाने रशियाची फक्त एकच मोहिम यशस्वी झाली. तर युरोपियन स्पेस एजन्सीला एका बहुउद्देशीय उपग्रह मोहिमेत 2007 ला मंगळाची छायचित्रे काढण्यात यश आले. जपानने मंगळाभोवती एक कृत्रिम उपग्रह पाठवला होता. मात्र मंगळाजवळ पोहचल्यावर काही तांत्रिक बिघाडाने ही मोहिम फसली. चीन, 2011 ला रशियाच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने एक कृत्रिम उपग्रह मंगळाकडे पाठवणार होता. मात्र रशियाचा प्रक्षेपक उड्डाण करताच कोसळल्याने चीनची मंगळ मोहिम पृथीवरच संपली.

भारताच्या मंगळ मोहिमेने काय साध्य होणार आहे ?

भारत जो उपग्रह मंगळाकडे पाठवणार आहे, तो उपग्रह नक्की कसा असेल, चांद्रयान प्रमाणे कोणत्या देशांची  कोणती उपकरणे उपग्रहावर असतील,  अशा अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. मात्र चांद्रयान- 1 प्रमाणे विविध देशांची उपकरणे असणार हे नक्की आणि मंगळावर भारताचे अस्तित्व उमटेल अशीच मोहिम असणार हे सुद्धा नक्की समजले जात आहे. मंगळ ग्रहाची छायाचित्रे घेण्याबरोबर, वातावरणाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न होईल असे उपलब्ध झालेल्या माहितीवरुन दिसत आहे.मंगळ मोहिमेमुळे पुढील काही गोष्टी साध्य होणार आहेत.

1.....चंद्रापेक्षा लांब, दुस-या भाषेत सांगायचे म्हणजे एखाद्या ग्रहावर कृत्रिम उपग्रह पाठवण्याचा अनुभव
       भारताला मिळेल. हे करतांना विविध उपकरणांची तयारी, त्याचा अनुभव आपल्याला मिळणार आहे.

2..... या अनुभवाचा उपयोग सुर्याचा अभ्यास करण्यासाठी " आदित्य " हा उपग्रह पाठवतांना होणार आहे.

3.....मोहिमेमुळे भारताचे जगात नाव होईलच आणि आपल्या तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढेल.

4.....मोहिम यशस्वी पार पडली तर जपान आणि चीनवर आपण कुरघोडी करण्यात यशस्वी होऊ.

5..... भारतात मंगळ किंवा त्यानंतर इतर ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी वेगळी शाखा तयार होईल. लोकांचा
        सहभाग वाढेल.

6.....चांद्रयान- 2 मोहिमेसाठी भारतीय अंतराळ शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास वाढेल.

7......सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारचा ( मठ्ठ राज्यकर्त्यांचा ) इस्त्रोकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल.
        आणखी कितीतरी पैसा भविष्यातील मोहिमांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल.

भारताला मंगळ लागू दे

अमेरिकेची म्हणजे नासाची  2020 ला चंद्रावर मानवी मोहिम, 2025 ला एखाद्या लघुग्रहावर आणि 2030 ला मंगळावर मानवी मोहिम आखण्याची तयारी सुरु आहे. अमेरिकेचा या क्षेत्रातील जोर बघता 4-5 वर्ष जास्त पकडली तरी ते सहज साध्य होईल. रशिया ही क्षमता बाळगुन आहे पण त्यांच्याकडे प्रश्न आहे पैशाचा. युरोपियन स्पेस एजन्सी, जपान आणि चीन ह्यांना या बाबतीत मोठा पल्ला गाठायचा आहे. मात्र या देशांनी त्या दिशेने प्रयत्नही सुरु केले आहेत.

तेव्हा या शर्यतीत भारत मागे रहायला नको. भारताच्या अंतराळ संशोधन शास्त्रज्ञांनी ही गोष्ट आधीच ओळखली आहे. म्हणून 2030 वर मंगळावर नासाचा अंतराळवीर उतरत असतांना भारत नुसत्या बघाच्या भुमिकेत नसेल. भारताकडे तोपर्यंत मंगळाबद्दल चांगली माहिती जमा झालेली असेल, या उद्देशाने आत्तापासून तयारी शास्त्रज्ञांनी सुरु केलीये.

पत्रिकांवर विश्वास ठेवण्या-यांच्या दृष्टीने पत्रिकेत मंगळ असणे ही गंभीर गोष्ट असते. ग्रहांची शांती करायला लागते, अनेक पथ्य, जप वगैरे करावे लागतात. मात्र भारताच्या पत्रिकेला हा मंगळ ग्रह मात्र जरुर लागू दे. तेव्हा ही मंगळ मोहिम यशस्वी होऊ दे अशी शुभेच्छा शास्त्रज्ञांना देऊया.  

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...