Friday, April 3, 2015

कडोंमपा, आहे तिथेच...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आले आहे. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष आपला मोर्चा नवी मुंबई, औरंगाबाद, अंबरनाथ , बदलापुर वगैरे अशा ठिकाणी प्रचारासाठी वळवतील. 23 एप्रिलला निकाल लागतील. मग त्यांनतर चार महिन्यांत राज्यात त्यातल्या त्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची म्हणजेच कडोंमपाची निवडणूक असल्याने या महानगरपालिकेच्या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झालेले असेल.

त्यामुळे एप्रिलनंतर कडोंमपातील विविध भागांची पायधुळ विविध पक्षांचे नेते, राज्याचे मंत्री झाड़तांना दिसायला लागतील. याची झलक मात्र दिसायला सुरुवात झालेली आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कारणांनी का होईना तीन वेळा कडोंमपात येऊन गेले आहेत. राज्यात 27 महापालिकांपैकी काही प्रमुख पालिका वगळता मुख्यमंत्र्यांच्या कडोंमपाच्या फे-या सर्वात जास्त झाल्या आहेत. तसंच गेल्या काही दिवसांपासून कडोंमपाचे प्रश्नही जोराने पुढे येऊ लागले आहेत.

पण मुळात असे प्रश्न उद्भवण्याची वेळ का येते ?. त्यात उद्भवलेले प्रश्न पुन्हा तेच ते आहेत. कारण गेल्या 5 वर्षात कडोंमपा केवढी बदलली आहे असा प्रश्न विचारला तर आहे ती आहे तिथेच आहे, समस्या काही सुटल्या नाहीत असं म्हंटल तर ते चुकीचे होणार नाही.

त्यामुळे सत्ताधारी नगरसेवक आणि सत्ताधारींना धाकात ठेवण्याची क्षमता असणारे विरोधक नगरसेवक ( अशी किमान अपेक्षा विरोधकांकडून असते ) यांनी काय केले असा प्रश्न पडतो.

काही सन्माननीय नगरसेवक - लोकप्रतिनिधींनी त्यांच्या वॉर्डमध्ये खुप चांगली कामगिरी केली आहे. पण जेव्हा संपुर्ण कड़ोंमपाकड़े बघतांना काही प्रश्न जरूर पडतात ज्याची उत्तरे राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींनी द्यावीत.

1..श्रीनगर ते कन्याकुमारी असा मोठा चारपदरी रस्ता बांधायचा झाल्यास जसा वेळ लागेल तसा कडोंमपातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला का वेळ लागला आणि लागत आहे ? एवढा वेळ लागूनही काँक्रीटीकरणाबद्दलच्या दर्जाबद्दल का तक्रारी आहेत ? इतर काही ठिकाणी रस्त्यांची अवस्थाही वाईटच आहे.

2..आजही सर्वसामन्यांना आरोग्य सेवेसाठी खाजगी सेवेवर किंवा मुंबई - ठाणेवर अवलंबून रहावे लागते. कड़ोंमपाची आरोग्य सेवा का सक्षम झाली नाही ?

3..आजही कडोंमपामध्ये रस्त्यावरील गर्दी टाळता यावी यासाठी चालण्याजोगे फुटपाथ का नाहीत ?

4.. कडोंमपातील वाहतुक कोंडीवर उपाय शोधण्यात लोकप्रतिनिधींना का अपयश आले ?

5..ठाकुर्लिजवळ पूर्व - पश्चिम भागाला जोड़णा-या उड्डाणपुलाचे काय झाले ?

6..रिक्शा चालकांच्या दादागिरीशी नगरसेवकांचे ( आणि प्रशासनाचेही ) काहीच देणंघेणं नाही का ? रिक्षाचालकांकडून होणारा त्रास कधी कमी होणार ?

7..भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता जादाचे 140 mld पाणी कधी कडोंमपाला मिळणार ?

8..घरी पाहुणे आल्यावर किंवा संध्याकाळी फॅमिलीला फिरवण्यासाठी - निवांत वेळ घालवण्यासाठी कडोंमपात मनोरंजनाचे ठिकाण मग ते मोठी बाग - उद्यान, vidyaan केंद्र, एखादे माहिती केंद्र, ( एखाद्या शहराच्या तोडीस तोड़ असा ) सुशोभित घाट, ( राजकीय पक्षांना निवडणुकीत घोषणा करण्यासाठी आवडणारे) एखादे मोठे स्मारक का विकसित झाले नाही ?

9..कड़ोंमपाला लागून सर्वात प्रदूर्षण करणारी डोंबिवली MIDC यामधल्या प्रदूर्षणावर का अजूनही नियंत्रण ठेवता आलेले नाही ?

10..डंपिंग ग्राउंडचा प्रश्न आजही का सुटलेला नाही ?

11.. अनेकदा निवडणुकीवर बहिष्कार टाकणा-या वेशीवरच्या गावांत सोयीसुविधा पाच वर्षांनंतरही का झाल्या नाहीत ?

12.. आधीच कड़ोंमपात सोयीसुविधांचा अभाव असतांना 27 गावांना सामावून घेत त्यांचे असे कोणते भले पालिका करणार आहे ?

या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राजकीय पक्षांनी द्यावीत. दर तीन महिन्यांनी येतो असे म्हणणारे राजकीय नेते खरेच किती वेळा आले हा संशोधनाचा विषय आहे.

राज्यातील सर्व अवैध बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेणा-या फडणवीस साहेबांनी आपण इतर पक्षांपेक्षा कमी नसल्याचे स्पष्टपणे दाखवत या पालिकेतील अवैध बांधकामांचा प्रश्न एका फटक्यात निकाली काढला आहे.

डोंबिवलीत नववर्षानिमित्त नववर्षाचे स्वागत करणारी शोभायात्रा पहिल्या वर्षापासून प्रसिद्ध आहे. असं असलं तरी गेल्या 5 वर्षात कड़ोंमपाची किती शोभा वाढवली असा प्रश्न सर्वसामान्यांनी आत्तापासूनच लोकप्रतिनिधींना आणि त्यांच्या राजकीय पक्षांना जरूर विचारला पाहिजे. कारण तेच पक्ष, तेच चेहरे घेत, पुन्हा तेच प्रश्न मांडत, त्याच प्रश्ननांवर, तीच आश्वासन देत मतांसाठी पुन्हा एकदा तुमच्या पुढे उभे रहाणार आहेत.

#KDMC

#kalyan

#dombivali

Thursday, April 2, 2015

मेट्रो - 3चा जांगडगुंता....


मेट्रो 3 वरुन सध्या जोरदार वाद त्यापेक्षा राजकारण सुरु झाले आहे. एका राजकीय पक्षाने आघाडी उघडली म्हणून आपण मागे राहु नये यासाठी दुस-याने यामध्ये उडी घेतली असल्याचं चित्र आहे.  गिरगाव - काळबादेवी इथल्या लोकांचे होणारे विस्थापन आणि आरे कॉलनी यावरून सध्या वादप्रतिवाद होत आहेत. नशीब अजुन आणखी नव्या वादाची भर पडली नाही. एखाद्या मुद्द्यावर वाद होणे, विरोध करणे एकवेळ मान्य, मात्र मेट्रो 3 नकोच अशी भूमिका घेणे किंवा असा विचार करणे म्हणजे कपाळकरंटेपणाचे लक्षण आहे.

मेट्रो 3 मुळे वर्षानुवर्षे एका जागी राहिलेल्यांचे विस्थापन होत असेल तर त्याच जागी त्यांचे पुनर्वसन व्हायलाच हवे याबाबत दुमत नाही. म्हणून आंदोलन करुन हव्या त्या मागण्या, पाहिजे ते आपल्या पदरात पा़डून घेणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे,. 

मेट्रोच्या कारशेडमुळे आरे कॉलनी धोक्यात आली म्हणून सर्व राजकीय पक्ष बोंब ठोकत आहेत. मात्र हेच सर्व राजकीय पक्ष जीवघेण्या लोकल  प्रवासाच्या विरोधात, मुंबईतील वाढत्या प्रदुर्षणाविरोधात, अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांच्या विरोधात कधी एकत्रिरित्या आवाज उठवतांना कधी दिसले नाहीत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या भोवती बांधकामे वाढत असतांना, अतिक्रमण होत असतांना हे राजकीय पक्ष गप्प होते. मात्र आरे कॉलनी मध्ये झाडे तोडली जाणार म्हणून सर्वजण दंड थोपटून उभे आहेत. किमान आरे कॉलनीच्याबाबतीत तरी हा प्रकार हास्यास्पद आहे. 
  
म्हणूनच मेट्रो ३ ला विरोध न करता भविष्यातील मुंबईची वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेता त्याचे स्वागतच करायला पाहिजे. त्यामुळेच कधी नव्हे ते MMRC किंवा MMRDA चे अधिकारी मोठ्या प्रमाणात लोकांशी थेट संवाद साधतांनाचे चित्र बघायला मिळत आहे.   

मेट्रो ३ का महत्त्वाची...

1..मुंबईतील लोकल ट्रेन, बेस्ट बस, रिक्षा -टॅक्सी यांसारख्या सार्वजनीक वाहतूक व्य़वस्था क्षमतेपलिकडे प्रवाशांचा भार झेलत आहेत. यामध्ये  आणखी वाढ करणे अशक्य झाले आहे. म्हणूनच मेट्रोसारख्या आणखी एका सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा पर्याय निवडणे त्यापेक्षा तो उभा करणे अत्यंत आवश्यक आहे. 

२.. मेट्रो ३ चा मार्ग भुयारी असल्याने काही निवासी आणि व्यावसायिक ठिकाणे सोडली तर बांधकाम करतांना रस्ते आणि लोकल वाहतूकीला कुठलाही अडथळा येणार नाही.

३.. कफ परेड, नरीमन पॉईंट, फोर्ट, काळबादेवी-गिरगांव, वरळी, प्रभादेवी, वांद्रे-कुर्ला कॉम्पेल्क्स, विद्यानगरी, दोन्ही विमानतळ, सीप्झ असे  भाग जे रेल्वेशी-लोकल ट्रेनशी जोडले गेलेले नाहीत ते भाग मेट्रोने जोडले जाणार आहेत.   

४.. मेट्रो ३ चा मार्ग मध्य रेल्वच्या सीएसटीला, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, ग्रॅन्टरोड, मुंबई सेंट्रल, पहिल्या मेट्रोच्या मरोळ नाका,  प्रस्तावित मेट्रो २ च्या बीकेसीला आणि मोनोरेलच्या जेकब सर्कलला जोडणारा आहे. त्यामुळे  मुंबईच्या एका भागातून दुस-या भागातील प्रवास हा जलद होणार आहे. 

आधीच मोठ्या विलंबानंतर पहिल्या मेट्रो आणि मोनोचा मार्ग हे सुरु झाले, खरं तर मुंबईची गरज लक्षात घेता मेट्रोचे जाळे २००० पर्यंत प्रत्यक्ष वापरात येणे आवश्यक होते. मात्र जी चूक आधीच्या राजकीय पक्षांनी - नेत्यांनी, प्रशासन, शहररचनाकार यांनी केली ती आता करू नये किंवा आता तिच चुक होऊ नये असे वाटते. त्यामुळे मेट्रो -३ ला विरोध होत असला सर्वसामान्यांना विश्वासात घेऊन या प्रकल्पाचे काम सुरु करणे हे मुंबईकरांच्याच आणि मुंबईत पोटापाण्यासाठी येणा-या सर्वसामान्यांच्या हिताचे आहे. या मेट्रोचे काम सुरळित सुरु झाले तर पुढील मेट्रोचे आऱाखडे प्रत्यक्षात येतील, त्यांचा मार्ग मोकळा होईल.

#shivsena  
#mns  
#bjp  
#metro3 
#mmrda 
#mmrc
#mumbai


इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...