Saturday, October 3, 2020

आपलं विश्व केवढं मोठं आहे ?


#कुतूहल #curiosity 

पृथ्वीवर अंतरे ही किलोमीटरमध्ये मोजतात. सध्या तर गुगल मॅपमुळे आपला विश्वास किलोमीटरवर राहिला नसुन मिनीटे - तासवर राहिला आहे. म्हणजे गुगल मॅपवर किती किलोमीटर अंतर आहे यापेक्षा आपण किती वेळ दाखवलं जात आहे ते बघतो. म्हणजे 10 मिनीटे, अर्था तास.....किती वेळ लागणार यावरून आपण नियोजीत ठिकाणी पोचण्याबाबत अंदाज व्यक्त करतो. म्हणजेच आता आपण अंतर हे काळामध्ये - किती वेळ लागणार यामध्ये मोजायला सुरुवात केली आहे असं म्हंटलं तर चुकीचे होणार नाही. 

आता अवकाशात अंतरे मोजणाऱ्या अनेक एककांपैकी प्रकाशवर्षे हे एक प्रमुख एकक आहे. प्रकाशाने एका वर्षात केलेला प्रवास हा एक प्रकाशवर्ष एवढा मोजला जातो.  

प्रकाशाचा वेग हा निश्चित आहे, म्हणजे एका सेकंदात प्रकाश हा सुमारे 3 लाख किलोमीटर अंतर कापतो, नक्की सांगायचं झालं तर 2 लाख 99 हजार 792 किलोमीटर एवढे अंतर कापतो. एका प्रकाशवर्षात प्रकाश हा सुमारे 95 वर 11 शून्य एवढे किलोमीटर अंतर कापतो. ब्राम्होस क्षेपणास्त्र जे जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र समजलं जातं, ध्वनीच्या 2.8 पट वेगाने प्रवास करते. ते समजा non stop निघाले तर एक प्रकाशवर्षे एवढे अंतर कापायला ब्राम्होस क्षेपणास्त्राला सुद्धा कित्येक हजार वर्षे लागतील. 
 
असो... तर आता प्रकाशवर्ष हे नेमकं काय ते तुम्हाला समजलं असेल. आता या परिमाणचा - एककाचा वापर करत हे विश्व केवढं अजस्त्र आहे हे समजायला थोडी मदत होईल.  

आता पुढे काही उदाहरणे देतो म्हणजे विश्वाच्या पसाऱ्याची व्याप्ती समजण्यास मदत होईल.  

आपल्या सुर्याच्या सर्वात जवळचा तारा प्रॉक्सीमा सेंच्युरी हा 4.22 प्रकाशवर्षं अंतरावर आहे. 

आकाशात रात्री डोळ्यांनी दिसणारा सर्वात प्रखर तारा - व्याध तारा ( Sirius ) हा 8.6 प्रकाशवर्ष अंतरावर आहे.  

आपण आपल्या दीर्घिकेच्या म्हणजे ज्याला आकाशगंगा म्हणतात त्या आकाशगंगेच्या मध्यापासून सुमारे 26 हजार प्रकाशवर्ष अंतरावर आहोत. आपल्या आकाशगंगेचा व्यास हा व्यास हा अंदाजे 1 लाख 70 हजार ते 2 लाख प्रकाशवर्षं एवढा समजला जातो.  

आपल्या आकाशगंगेच्या जवळ सर्वात जवळची दीर्घिका ही Andromeda Galaxy जिला देवयानी आकाशगंगा या नावानेही ओळखले जाते ती आपल्या आकाशगंगेपासून सुमारे 2 लाख 40 हजार प्रकाशवर्षेपेक्षा जास्त अंतरावर आहे. 

माहीत असलेली सर्वात मोठी दीर्घिका म्हणून IC 1101 या ओळखली जाते जी आपल्यापासून तब्बल एक अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर आहे. या दीर्घिकेचा व्यास हा 50 लाख प्रकाशवर्ष एवढा समजला जातो.  

अवकाशात जसे ताऱ्यांचे समूह असतात तसे दीर्घिकांचेही समूह असतात. विविध दीर्घिकांच्या समूहांचे काही गट असतात. असे अनेक गट मिळून दीर्घिकांचा एक मोठा समूह बनतो. अशा अनेक समूहांचे अनेक समूह असतात. तर अनेक समूहांमध्ये मोठ्या अवकाश पोकळी आहेत, म्हणजे तिथे ना दीर्घिका आहे, ना तारे आहेत ना कृष्ण विवर आहे, अशा अवकाश पोकळीला Void म्हणतात. अशा पोकळीही या काही अब्ज प्रकाशवर्ष एवढ्या मोठ्या आहेत.  

अशा अनेक दीर्घिकांच्या समूहांचे, पोकळीचे हे विश्व बनले आहे. 

आपण अवकाशात विविध दिशांकडे जास्तीत जास्त 46.5 अब्ज प्रकाशवर्षे एवढ्या लांब बघू शकतो. म्हणजेच सर्व दिशांचा विचार केला तर आपल्याला दिसणारे विश्व हे 93 अब्ज प्रकाशवर्षे एवढे मोठे आहे.  

आता पुढचा प्रश्न हा की या दिसू शकणाऱ्या विश्वाच्या पुढे काय आहे ? तर उत्तर हे आहे की त्याच्या पुढे आपण बघू शकलेलो नाही. म्हणजे तेवढ्या क्षमतेच्या दुर्बिणी आपल्याकडे नाहीत. जेवढ्या शक्तिशाली अवकाश दुर्बिणी बनवू तेवढे आपण दूर बघू शकणार आहोत. अर्थात त्याच्या पुढे काय आहे, किती विश्व बाकी आहे हे प्रश्न अनुत्तरित आहेत.  

म्हणूनच हे विश्व अनंत आहे असं म्हंटलं जातं.  

विश्वाच्या पसाऱ्याबाबत माहिती सांगणारे विविध लेख, लघुपट - माहितीपट उपलब्ध आहेत. यापैकी पुढील एक व्हिडियो बघा आणि थक्क व्हा. ( अंतरांच्या बाबतील काही माहिती जरा वेगळी असेल पण अनंत विश्वाच्या व्याप्तीचा अंदाज लावता येईल ) 
 
https://www.youtube.com/watch?v=q1mkjkTqg0Y
 
https://www.youtube.com/watch?v=i93Z7zljQ7I 

https://www.youtube.com/watch?v=gIbfYsQfNWs

Sunday, September 20, 2020

पृथ्वीपासून सर्वात दूरवर मानवाने पाठवलेल्या वस्तु कोणत्या ?


#कुतूहल #curiosity 

सर्वात आधी यामागची पाश्वर्भुमी.  

अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्या शीतयुद्ध ऐन भरांत असतांना याचाच एक भाग म्हणून दोन्ही देशांमध्ये अवकाश स्पर्धाही( 1957 -1975 ) जोरात सुरु होती. यापैकी एक स्पर्धा म्हणजे वेगवेगळ्या ग्रहांजवळ कृत्रिम उपग्रह - यान पाठवण्याची स्पर्धा. यानिमित्ताने दोन महत्त्वकांक्षी मोहिमा नासाकडून आखल्या गेल्या, Pioneer आणि Voyager मोहिमा. 

Pioneer म्हणजे मुहुर्तमेढ रोवणारे. तर Voyager म्हणजे दुरचा प्रवास. 

Pioneer मोहिमा 1958 पासून चंद्रावर उपग्रह पाठवण्याच्या निमित्ताने सुरु झाल्या. या दरम्यान Pioneer - 10 ( मार्च 1972 ) आणि Pioneer - 11 ( एप्रिल 1973 ) ही दोन जुळी यानं ठराविक कालवाधीच्या अंतराने गुरु ग्रहाच्या दिशेने पाठवली गेली. गुरु ग्रहाजवळून पहिल्यांदा जाण्याचा मान जाणारा Pioneer - 10 ला मिळाला. तर Pioneer - 11 ने गुरु ग्रहाजवळ जात गुरुत्वाकर्षणचा फायदा घेत शनि ग्रहाच्या दिशेने झेप घेतली आणि शनी ग्रहाच्या जवळ जाणारा पहिले यान म्हणून मान पटकावला. नंतर हे दोन्ही यानं हीअवकाशाच्या अनंत अशा पोकळीत मार्गस्थ झाली. आता या प्रकरणावर इथेच थांबतो कारण यावर लिहिणे हा एक स्वतंत्र असा व्याप आहे. 

याच वेळी विविध ग्रहांजवळ जाणारा नासाचा Mariner कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमाद्वारे शुक्र आणि मंगळ ग्रहाजवळ पोहचण्याचा प्रयत्न नासा करत होती. या दरम्यान गुरु आणि शनी ग्रहाला भेटी देण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. याच कार्यक्रमा दरम्यान 1980-90 दरम्यान कधीही भेट ने दिलेले युरेनस आणि नेपच्युन हे दोन ग्रहांजवळ जाणे शक्य असल्याचं नासाच्या लक्षात आलं आणि Marinerया कार्यक्रमाचे नासाने Voyager Program असं नामांतर केलं.  

Voyager -1 ( सप्टेंबर 1977 ) तर Voyager -2 ( ऑगस्ट 1977 ) गुरु ग्रहाच्या दिशेने रवाना झाले. या दोन्ही यानांनी गुरु आणि मग शनी ग्रहाची जवळून अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रे काढली. दरम्यान शनि ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा फायदा घेत ( जसे गोफणीने दगड गोल फिरवून जोराने - वेगाने फेकला जातो ) Voyager -1 ने आणखी वेग पकडला आणि विश्नाच्या अनंत पोकळीत रवाना झाला. तर Voyager - 2 ने युरेनस, नेपच्युन या ग्रहाजवळून जात विश्वाच्या पसाऱ्यात रवाना झाले. आजही युरेनस, नेपच्युन या ग्रहांजवळून जाणारे Voyager - 2 हे एकमेव यान ठरले आहे हे विशेष.  

सुर्यमालेतील सर्वात दुरवरचा ग्रह - प्लुटो ग्रह याचा अभ्यास करण्यासाठी नासाने जानेवारी 2006 ला New Horizons ( नवी क्षितीजे ) नावाचा उपग्रह पाठवला. गंमत म्हणजे अर्धे अंतर पार केले असतांना प्लुटो ग्रहाची ग्रह म्हणून मान्यताच रद्द करण्यात आली होती. अर्थात यामुळे मोहिमेवर थोडीच फरक पडणार होता. तर जुलै 2015 ला प्लुटो ग्रहाजवळून जात त्याची उत्तम छायाचित्रे घेतली आणि New Horizons हे अनंत अवकाशाच्या पोकळीत मार्गस्थ झाले. 

तर Pioneer -10 आणि 11 , Voyager - 1 आणि 2, New Horizons ही मानवाने पाठवेली सर्वात दूरवरची यानं ठरली आहेत. तर यापैकी दुरवरचे यान कोणते. तुम्हाला वाटेल Pioneer याने, कारण ती सर्वात आधी रवाना झाली होती. तर याचे उत्त्र आहे Voyager - 1. कारण ग्रहांजवळून जातांना संबंधित ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा जास्तीत जास्त फायदा Voyager - 1 घेतला.  

तेव्हा सध्या वर उल्लेख केलेली यानं कोणत्या वेगाने अवकाशात प्रवास करत आहेत ते पुढीलप्रमाणे.......

Voyager - 1    17 किमी प्रति सेकंद  ( वेग अंदाजे  ) 
New Horizons 16 किमी प्रति सेकंद 
Voyager - 2     15 किमी प्रति सेकंद 
Pioneer -10     12 किमी प्रति सेकंद 
Pioneer -11      11 किमी प्रति सेकंद 

यापैकी किती यानं संपर्कात आहेत ? तर संपर्कात म्हणजे यानावर असलेल्या विविध उपकरणांद्वारे मिळणारे संदेश. तर सध्या फक्त Voyager - 2 आणि New Horizons ही दोन यानं संपर्कात आहे. बाकी सर्व यांनांचा संपर्क हा मोहिमेची सुरुवात झाल्यावर अगदी 20 -25 वर्षांपर्यंत किवा त्याअधिक काळ कायम होता, म्हणजेच मोहिमांचे उद्दीष्ट्य पुर्ण झाल्यानंतर सुद्धा होता. त्यामुळे या यानांची यापुढची वााटचाल कोणत्या दिशेने असेल हे खात्रीलायक सांगता येतं.  

अवकाशात ज्या दिशेने या यानांचा प्रवास सुरु आहे त्या मार्गावर लघुग्रह किंवा अन्य अडथळा येण्याची शक्यता नसल्याने यानांच्या वेगानुसार ते आपल्यापासून किती दूर असतील याचा अंदाज लावता येतो. तेव्हा वर उल्लेख केलेल्या पाच यानांपैकी सर्वात दुरवरचे कोणते किंवा ही यानं आपल्यापासून किती अंतरावर आहेत ? याची माहिती पुढीलप्रमाणे.... 

Voyager - 1     148 AU ( अंदाजे )  
Pioneer -10     125 AU 
Voyager - 2     123 AU 
Pioneer - 11     103 AU 
New Horizons   46 AU 

आता AU म्हणजे काय तर astronomical unit. अवकाशातील अंतरे मोजण्याची हे एकक आहे. सुर्य आणि पृथ्वी मधील अंतर हे एक astronomical unit ( 1AU ) समजलं जातं. किलोमीटरच्या भाषेत हे अंतर - 1 AU = सरासरी 14 कोटी 95 लाख 97 हजार 870 किलोमीटर, एवढे भरते. आता याची तुलना वर उल्लेख केलेल्या यानाच्या अंतराशी करा. तेव्हा करत बसा आकडेमोड.

तर सर्वात दुर अंतरावर पोहचलेल्या यानाचा मान हा Voyager - 1 कडे जातो. वर उल्लेख केलेल्या इतर चार यानांचा वेग लक्षात घेतला तर अंतराच्या बाबातीत Voyager - 1 ला मागे टाकणे हे शक्य नाही.  

आता या सर्वांचा फायदा काय ? तर New Horizons वगळता सर्व यानं ही सुर्यमालेच्या बाहेर, सुर्याच्या प्रभाव क्षेत्राबाहेर गेलेली आहेत. यामुळे सुर्यमालेच्या बाहेर क्षेत्र नेमकं कसं असतं ? सुर्य आणि जवळचा तारा यामधला अवकाश नेमका कसा असतो ? कोणते भाररहित कण असतात वगैरे.....अशी अवकाश संधोधनाच्या दृष्टीने अत्यंत मोलाची माहिती मिळाली आहे.  

अर्थात माणुस जसा आणखी प्रगती करेल यापेक्षाही वेगाने आणि अधिकचे अंतर अत्यंत वेगाने कापणारी यानं तयार होतील आणि वर उल्लेख केलेल्या यानानं सहज मागे टाकतील यात शंका नाही.  
 
जाता जाता........प्रकाशाचा वेग हा सेकंदाला सुमारे 3 लाख किलोमीटर आहे. सुर्यापासून निघालेला प्रकाश हा पृथ्वीवर साधारण 499 सेकंद म्हणजेच साधारण 8 मिनीटे 31 सेकंदात पोहचतो. तेव्हा सर्वात दूरवर असलेल्या Voyager - 1 यानाकडे आपल्या सुर्याचा प्रकाश पोहचायला जेमतेम 16 तास लागतात. सुर्य प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणारे यान जेव्हा तयार होईल तेव्हा कुठे माणसाचा खऱ्या अर्थाने विश्वात संचार सुरु होईल. तरीही विश्व एवढं मोठं आहे की प्रकाशाचा वेगसुद्धा कमीच पडेल. यावर नंतर कधीतरी......

तोपर्यंत Voyager, Pioneer, New Horizons वावात अधिकच्या माहितीसाठी पुढील माहितीपट बघा....  

Voyager मोहिमेला 40 वर्ष झाल्याच्या निमित्ताने 2017 ला बनवलेला माहितीपट - https://www.youtube.com/watch?v=US_byEAbXP0 

Pioneer 10-11 मोहिमेवर एक माहितीपट - https://www.youtube.com/watch?v=xpzTw0_hz7U 

New Horizons वर आधारीत एक माहितीपट - https://www.youtube.com/watch?v=xKBi2NhmO_4

Saturday, September 19, 2020

Ultra Deep Field Image या एका छायाचित्राने अवकाशाकडे बघण्याचा बदलला दृष्टीकोन


#कुतूहल #curiosity 

या एका छायाचित्राने अवकाश संधोधन क्षेत्रातील अभ्यासाची - संशोधनाची दिशाच बदलून टाकली. 

प्रसिद्ध अवकाश दुर्बिण 'हबल टेलिस्कोप'ने काढलेले छायाचित्र हे Ultra Deep Field Image या नावाने प्रसिद्ध आहे. हबल अवकाश दुर्बिण ही मे 1990 पासून पृथ्वीपासून सुमारे 540 किमी उंचीवरुन पृथ्वीभोवती फिरत आहे. या दुर्बिणीत विविध प्रकारचे, क्षमतेचे अत्यंत शक्तीशाली कॅमेरे बसवलेले आहेत. याद्वारे अवकाशाची वेगवेगळ्या तरंगलाबीद्वारे छायाचित्र काढून अभ्यास केला जातो. सप्टेंबर 2003 ते जानेवारी 2004 या काळात आपल्या दक्षिण गोलार्धातून दिसणाऱ्या अश्मंत - Fornax नावाच्या तारकासमुहातील एका भागाचे छायाचित्र हे हबलमधल्या Wide Field Camera ने काढले. खरं तर अभ्यास करायचा होता तारकासमुहाचा, तिथे ताऱ्यांची गर्दी एवढी का आहे यावर संशोधन करायचे होते. यासाठी तर 800 exposures एवढे ठेवण्यात आले. exposures चा कालावधी केवढा होता तर एकुण - तब्बल 11 दिवस 3 तास एवढा ठेवण्यात आला होता. या विशिष्ट दिशेने - कोनाने बघतांना हबलच्या 400 प्रदक्षिणा पृथ्वीभोवती झाल्या होत्या. म्हणजे संबंधित प्रतिमा - फोटो केवढा स्पष्ट असेल याची आपण कल्पना करु शकता. 

तेव्हा या फोटोचा अभ्यास करायला सुरुवात केल्यावर शास्त्रज्ञ - संशोधन हे जणू ह्रदय विकाराच्या धक्क्याने मरायचेच बाकी होते. कारण या फोटोमध्ये हजारो दिर्घिका सापडल्या. नेमक्या किती तर 10 हजार पेक्षा जास्तच. याबाबत अभ्यास केल्यावर लक्षात आलं की काही दिर्घिका या 5 अब्ज तर काही या चक्क 13 अब्ज वर्ष वयाच्या होत्या. म्हणजेच 13 अब्ज प्रकाश वर्षांनंतर संबंधित दिर्घिकेचा प्रकाश हा आपल्यापर्यंत पोहचत होता म्हणजे त्या दिर्घिका दिसत होत्या. असं समजलं जातं की विश्वाची निर्मिती ही 13.5 अब्ज वर्षांपूर्वी एका महास्फोटामुळे झाली. थोडक्यात या 13 अब्ज प्रकाशवर्षे दुर असलेल्या या दिर्घिकांकडे बघतांना आपण भुतकाळांत बघत असल्याचं स्पष्ट झालं. आता आज ती दिर्घिका अस्तित्वातसुद्धा नसेल किंवा आज तिथे जे काही उरलं आहे त्या भागातून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत पोहचेपर्यंत पृथ्वीच काय आपली दिर्घिका - आकाशगंगाच अस्तित्वात नसेल. 

नेमक्या त्याच भागाची नंतर काही वर्षांनी आणखी छाायाचित्रे काढण्यात आली आणि सखोल अभ्यास करण्यात आला आहे. आता अवकाशाच्या या एका भागाच्या दिशेने एवढ्या दिर्घिका असू शकतात मग संपुर्ण अवकाशात काय असेल याची आपण कल्पना करु शकता.....लाखो दिर्घिका या विश्वात आहेत. 

आपल्या दिर्घिकेला ज्याला आकाशगंगा या नावाने ओळखलं जातं यामध्ये अब्जावधी तारे आहेत असा अंदाज आहे. यापैकी काही लाख ताऱ्यांच्या भोवती पृथ्वीसदृश्य ग्रह असावेत असा अंदाज आहे. ( आत्ताशी आपल्याला सुमारे 3000 पृथ्वीसदृश्य ग्रह माहीत झाले आहेत ). म्हणजेच सजीवसृष्टी ही आपल्या आकाशंगगेत लाखो ठिकाणी आहे ज्याचा आपण शोध घेत आहोत. मग आपल्याला छोटसं दिसणाऱ्या Ultra Deep Field Image मधल्या दिर्घिकांमध्ये किती खर्व तारे असतील, किती ठिकाणी सजीवसृष्टी असू शकेल, मग संपुर्ण विश्वात किती दिर्घिका - तारे असतील, अब्जावधी ठिकाणी सजीवसृष्टी किती ठिकाणी असेल याचा अंदाज लावणेही पण कठिण आहे. 

हबलने सर्वात खोलवर - लांबवरच्या काढलेल्या Ultra Deep Field Image या एका छायाचित्राने विश्वाकडे बघण्याची दृष्टी आणखी व्यापक झाली. 

या Ultra Deep Field Image बद्दल थोडक्यात, सोप्या भाषेत माहिती ही पुढील लिंकवर मिळेल.

https://www.youtube.com/watch?v=WRHIGuoH6ic
 
https://www.youtube.com/watch?v=gu_VhzhlqGw

Saturday, August 8, 2020

बैरुतच्या स्फोटाच्या निमित्ताने.......

स्फोट या विषयावर ब्लॉग लिहिण्याचं निमित्त दोन कारणांनी आहे. एक बैरुत इथे झालेला, जगाने पाहिलेला शक्तीशाली स्फोट आणि 6 ऑगस्ट - 9 ऑगस्टला अनुक्रमे हिरोशिमा आणि नागसाकी इथे अणुबॉम्बच्या स्फोटाला 75 वर्षे झाल्याचं निमित्त. 

संरक्षण, अवकाश विज्ञान, अणु ऊर्जा हे माझे आवडते विषय. याबाबत वाचन करत असतांना या क्षेत्रातील विविध स्फोटांबद्दल माहिती वाचायला मिळाली. कारण या विषयांत स्फोट हा एक अनिर्वाय भाग आहे. म्हणूनच स्फोटाबद्दलची अशीच काही उत्कंठावर्धक माहिती लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.

तीव्रता आणि संहारकता यामुळे स्फोटाची ताकद समजून येते. स्फोटकामधील रसायन, स्फोट कुठे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये झाला आहे यावरही त्याचे परिणाम अवलंबून असतात. 

सगळ्यात आधी बैरुतच्या स्फोटाबद्दल. सुमारे 2700 टन पेक्षा जास्त साठा असलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याचं आता समोर आलं आहे. या स्फोटाचा आवाज 200 किमीपेक्षा जास्त अंतरापर्यंत जाणवला, एवढंच नव्हे तर या स्फोटामुळे ३.३. एवढी भुकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर नोंदली गेली. या स्फोटची क्षमता ही 2.9 kt ( Kilotonne ) एवढी समजली जात आहे. 

स्फोटाची तीव्रता ही TNT या स्फोटकाच्या ज्वलनाच्या क्षमतेमध्ये मोजली जातात. जसं आरडीएक्स हे एक शक्तीशाली स्फोटक ( संयुक्त रसायन ) समजलं जातं तसं TNT - trinitrotoluene  हे एक अत्यंत शक्तीशाली स्फोटक आहे. एक ग्रॅम TNT च्या ज्वलनाने जेवढी ऊर्जा फेकली जाते त्यानुसार स्फोटाचे मुल्यांकन केले जाते. तेव्हा  2.9 kt क्षमते एवढा स्फोट झाला म्हणजे 2900 टन वजनाच्या TNT च्या ज्वलनामुळे निर्माण झालेली ऊर्जा ही बैरुतमधल्या स्फोटामुळे बाहेर फेकली गेली. ही उर्जा ध्वनी लहरी, उष्णता ( आगीचा लोळ ) अशा स्वरुपात बाहेर पडली. उष्णता ही स्फोटाच्या जागेपुरती मर्यादीत राहीली असली तरी ध्वनी लहरींमुळे मोठं नुकसान झालं. 



तर हिरोशिमा इथे झालेल्य अणु स्फोटाची तीव्रता ही सुमारे 15 kt एवढी होती तर नागासाकी इथल्या अणु बॉम्बची क्षमता ही सुमारे 21 kt होती. या दोन्ही अणु स्फोटामुळे निर्माण झालेली उष्णता आणि ध्वनी लहरींच्या लाटांमुळे तात्काळ अनेक इमारती, बांधकामे नष्ट झाली, हजारो जण तात्काळ मृत्युमुखी पडले. या स्फोटामुळे या परिसरांत पसरलेल्या किरणोत्सारामुळे कालांतराने अनेक जण मृत्युमुखी पडले, अपंग झाले, कॅन्सरसारखे आजार अनेकांना झाले. 

स्फोट हे मानवनिर्मित असतात, अपघातामुळे झालेले असतात तर निसर्गनिर्मितही असतात. तेव्हा प्रमुख स्फोटांचा ओझरता हा आढावा....

1..अणुस्फोट - अण्वस्त्र स्पर्धा ही 1945 पासून जगांत सुरु झाली. काही देश स्वतःकडे शक्तीशाली अण्वस्त्र - अणु बॉम्ब बाळगायला लागले, त्याच्या चाचण्या करु लागले, थोडक्यात अणु स्फोट घडवू लागले. आत्तापर्यंत जगांत 8 देशांनी 2000 पेक्षा जास्त अणु बॉम्बच्या चाचण्या केल्या आहेत. यापैकी अमेरिकेने तब्बल एक हजार पेक्षा जास्त तर रशियाने 700 पेक्षा जास्त, फ्रान्सने 200 पेक्षा जास्त, इंग्लंड आणि चीनने 40 पेक्षा जास्त अणु बॉम्बच्या चाचण्या केल्या आहेत. भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया यांनीही अणु बॉम्बच्या चाचण्या केल्या आहेत. तर इस्त्राईल आणि दक्षिण आफ्रिका हे दोन असे आहेत की ज्यांनी अणु बॉम्बच्या चाचण्या केल्या नाहीत पण त्यांच्याकडे अणु बॉम्ब आहेत.

अणु बॉम्बच्या चाचण्या या हवेत, पाण्यात, जमिनीखाली घेतल्या गेल्या. हे सर्व अणु स्फोट वेगवेगळ्या प्रकाराचे, वेगवेगळे किरणोत्सारी मुलद्रव्य वापरुन केले होते. यामध्ये तीन स्फोट हे अत्यंत शक्तीशाली होते ज्याची नोंद घेतलीच पाहिजे. 

अमेरिकेने १ मार्च १९५४ ला castle bravo नावाने एक अणु बॉम्ब फोडला. या चाचणीची क्षमता होती 15 MT ( Mega Tonne ). म्हणजेच हिरोशिमावर पडलेल्या अणु बॉम्ब पेक्षा castle bravo हा बॉम्ब तब्बल एक हजार पटीने शक्तीशाली होता. हा स्फोटामुळे निर्माण झालेला प्रकाश हा तब्बल 400 किमी अंतरावरुन बघता आला. तर या स्फोटामुळे तयार झालेला ढग ज्याला mushroom cloud ( अळंबीच्या आकारचा ढग ) म्हणतात, त्याने 40 किमी पर्यंत उंची गाठली होती. 

अमेरिकेच्या अणु बॉम्बच्या चाचण्यांना सोव्हिएत रशियाही उत्तर देत होता.  
रशियाने ३० ऑक्टोबर १९६१ ला Tsar bomb या अणु बॉम्बची चाचणी घेतली. ही आत्तापर्यंत सर्वात शक्तीशाली अणु बॉम्बची चाचणी समजली जाते. या अणु बॉम्बची क्षमता होती तब्बल 50 MT. म्हणजेच हिरोशिमाच्या तब्ब्ल 3 हजार 300 पट जास्त. या शक्तीशाली अणु स्फोटामुळे तयार झालेला प्रकाश हा एक हजार किलोमीटर अंतरावरुन सहज बघता आला. 270 किमी अंतरावरुन या स्फोटाचे निरिक्षण करणाऱ्या लोकांच्या डोळ्यापुढे गॉगल असतांनाही काही सेकंद अंधारी आली होती म्हणे. या स्फोटाच्या ध्वनी लहरी या 700 किमीपर्यंत जाणवल्या. एवढंच नाही या स्फोटामुळे तयार झालेल्या ढगाने तब्बल 62 किमी एवढी उंची गाठली होती. हा ढगच विविध ठिकाणी 40 ते 95 किमी एवढा रुंद होता. या अणु स्फोटाच्या हादऱ्यामुळे 5 रिश्टर स्केल एवढ्या भुकंपाची नोंद झाली. 

तर 24 डिसेंबर 1962 ला रशियाने Test 219 या सांकेतिक नावाने 24.2 MT क्षमतेच्या अणु बॉम्बची चाचणी घेतली.

थोडक्यात काय अणु बॉम्ब हे एक भयानक अस्त्र आहे. अणु बॉम्बवरचे संशोधन, त्याच्या चाचण्या, या चाचण्या घेण्यासाठी घेतलेले श्रम, चाचण्यांनतर आलेले अनुभव, अणु बॉम्ब तयार करणे, त्याची निगा राखणे, सेवेतून बाद करणे, अणु बॉम्ब टाकण्यासाठी वेगवेगळी माध्यमे, या सर्वांवर झालेला - होत असलेला खर्च अफाट आहे....... अणु बॉम्ब हा एक स्वतंत्र, कुतुहल चाळवणारा, मन सुन्न करणारा, चिड आणणारा विषय आहे. 

अणु बॉम्ब या विषयांवर पुर्णविराम देतांना एक माहिती.....असं समजलं जातं की दुसऱ्या महायुद्धात जेवढी एकुण एक स्फोटकं वापरली गेली ( अणु बॉम्ब सकट ) त्यांची एकुण क्षमता होती 5 MT. सध्या तर एका क्षेपणास्त्रात एकाच वेळी ( लहान आकाराचे ) 4-5 अणु बॉम्ब टाकण्याची क्षमता असते. ( multiple independent reentry vehicles - MIRV ) ज्याची क्षमता ही 5 MT पेक्षा जास्त आहे. काही अणु ऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या अशा आहेत की ज्यामध्ये २४ एक क्षेपणास्त्र सामावु शकतात. तेव्हा एका अण्वस्त्रधारी पाणबुडीमध्ये जग नष्ट करण्याची क्षमता आहे. असो...

२..अपघाताने, युद्धामध्ये, खाणकामानिमित्ताने, दारुगोळा साठवण्याच्या निमित्ताने, इतर रसायने साठवण्याच्या निमित्ताने ( अणु स्फोटा व्यतिरिक्त ) मोठे विस्फोट झाल्याच्या घटना अनेक आहेत. यापैकी काही प्रमुख घटना पुढीलप्रमाणे...

Wanggongchang चा स्फोट - 30 मे 1626 ला बिजिंग शहारागत असलेल्या लष्करी दारुगोळ्याच्या साठ्याला आग लागून हा स्फोट झाला. हा स्फोट एवढा शक्तीशाली होता की तत्कालिन नोंदीनुसार 20 हजार पेक्षा जास्त नागरिक या स्फोटात मृत्युमुखी पडले. अभ्यासकांच्या मतानुसार हा स्फोटाची तीव्रता 10 kT एवढी होती, म्हणजेच हिरोशिमा इथल्या अणु बॉम्बपेक्षा जरा कमी. यामुळे झालेल्या उलथापालथीमध्ये तत्कालिन चीनवर राज्य करणारी मिंग घराण्याची सत्ता संपुष्टात आली हे विशेष. 

पहिल्या महायुद्धात इंग्लंड आणि जर्मनी यांच्यामध्ये झालेल्याा नाविक युद्धात ( Battle of Jutland ) जर्मनीच्या युद्धनौकेने केलेल्या हल्ल्यात इंग्लंडच्या एका युद्धनौकेवरील दारुगोळ्याचा स्फोट झाला, यामुळे आणखी दोन युद्धनौकांनामध्ये स्फोट झाले. यामध्ये एका तासात तब्बल 3000 पेक्षा जास्त नौसैनिक मारले गेले. 

पहिल्या महायुद्धात बेल्जियममध्ये Messsines या खाण परिसरांत इंग्लड आणि जर्मन फौजा आमनेसामने तळ ठोकून लढत होत्या. 7 जुन 1917 ला या खाणीमध्ये 19 स्फोट घडवून आणत इंग्लडने जर्मनीचे कंबरडे मोडले होते. या स्फोटात जर्मनीचे तब्बल 10 हजार पेक्षा जास्त सैनिक मृत्युमुखी पडले होते. 

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या अंमलाखाली असलेल्या सर्बियातील Smederevo शहरातील किल्ल्यात स्फोटकांचा साठा केला जात असे. 5 जुन 1941 ला या ठिकाणी  झालेल्या स्फोटामुळे अर्धे शहर उध्वस्त झाले होते आणि 2000 पेक्षा जास्त सैनिक - नागरीक मृत्युमुखी पडले होते. 

कॅनडात 6 डिसेंबर 1917 ला झालेल्या स्फोटाची तीव्रता ही 2.9 kT -  बैरुत स्फोटाएवढी होती. Halifax नावाच्या बंदरात फ्रान्स देशाच्या मालवाहू जहाजाची नॉर्वे देशाच्या प्रवासी बोटीशी टक्कर झाली. मालवाहू जहाजात असलेल्या ज्वलनशिल रसायनांचा स्फोट झाला. यामुळे झालेल्या स्फोटात 1900 पेक्षा जास्त लोकं मृत्युमुखी पडले होते तर 9000 पेक्षा जास्त जखमी झाले होते. 

मुंबई व्हीक्टोरीया डॉकमधील स्फोट. ( नौदल गोदीमधील स्फोट ) - 14 एप्रिल 1944 ला इंग्लंड नौदलाच्या SS Fort Stikine या मालवाहू जहाजात असलेल्या 1400 टन दारुगोळ्याचा स्फोट झाला. या स्फोटात एक हजार पेक्षा नौसेनिक, कामगार, सर्वसामान्य नागरीक ठार झाले, कित्येक हजार जखमी झाले. कित्येक हजार घरांचे नुकसान झाले. मुंबई बंदर हे जवळपास नव्याने उभारावं लागलं. या स्फोटाचा आवाज म्हणे 80 किमी दुरपर्यंत ऐकायला गेला होता. 

सोव्हिएत रशियाची अमेरिकेशी चांद्रस्पर्धा 1960 च्या दशकांत सुरु होती. 3 जुलै 1969 ला म्हणजे अपोलो 11 मोहिम सुरु होण्याच्या काही दिवस आधी रशिया N 1 या अत्यंत शक्तीशाली रॉकेटद्वारे चंद्राकडे अपोलो सारखे यान पाठवण्याच्या प्रयत्नात होती. रात्री 11.18 मिनीटांनी N 1 रॉकेटने उड्डाण करताच त्याचा स्फोट झाला. 2300 टन वजन असलेले इंधन या रॉकेटमध्ये होते. हा स्फोट इतका शक्तीशाली होता की 35 किमी दूर अंतरापर्यंत याचा प्रकाश सहज बघता आला. यामुळे प्रक्षेपण स्थळ पुर्णपणे नष्ट झालं. 

गेल्या 70 एक वर्षात आधुनिक तंत्रज्ञानामुळे जलवाहतुकीकरता समुद्रात, नदीत तसंच खाण कामाकरता, विविध प्रकल्पांकरता कितीतरी मोठे असे नियंत्रीत स्फोट जगभरात आत्तापर्यंत करण्यात आले आहेत. अर्थात हे सर्व स्फोट नियंत्रित असल्यानं त्याने मनुष्यहानी किंवा आर्थिक नुकसान झाले नाही. 

3.. नैसर्गिक स्फोट - 

ज्वालामुखीचे स्फोट हे पृथ्वीवर झालेले सर्वाधिक क्षमेतेचे स्फोट म्हणायला हवेत. अख्खे खंड - प्रदेश - भुभाग तयार होण्यास किंवा नष्ट होण्यास ज्वालामुखीचे स्फोट कारणीभूत ठरले आहेत. अणु बॉम्ब क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त पट क्षमता - ताकद ही या ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये होती. 

भूकंपामध्येही अणु बॉम्बच्या स्फोटाच्या कितीतरी पट ताकद आहे, विध्वंसक क्षमता आहे. भुकंपामुळे नवीन प्रदेश तयार होण्यास, नष्ट होण्यास हातभार लागला आहे. भुकंपामुळे प्रस्तर रचना वरखाली होत असल्याने ज्वालामुखी, त्सुनामी तयार झाले आहेत. 

भुकंप, ज्वालामुखी या नैसर्गिक घटना गेली लाखो - कोट्यावधी वर्षे सातत्याने पृथ्वीवर सुरु आहेत. 

अशनी आघात - अशनी आघातामुळे सुद्धा प्रचंड, संहारक स्फोट पृथ्वीवर झाले आहेत. सहा कोटी वर्षापूर्वी अशनी आघातमुळेच डायनॉसोरचे साम्राज्य संपुष्टात आले आहे. पृथ्वी 4.5 अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली असावी असा अंदाज आहे. आत्तापर्यंत पृथ्वीने कितीतरी विविध क्षमतेचे अशनीचे आघात झेलले आहेत. अनेकांची संहारक क्षमता भयंकर होती. आपल्याा सर्वांच्या परिचयाचे लोणार सरोवर अशाच एका अशनी आघातामधून सुमारे 47 हजार ते 5 लाख 70 हजार वर्षा दरम्यान तयार झाले असावे असा अंदाज आहेत. या आघातामुळे निर्माण झालेल्या स्फोटाची क्षमता ही काही kT होती असा अंदाज आहे. जून 1908 ला रशियातील Tunguska इथे उल्कापात झाला. म्हणजे 100 मीटर परिघ असलेली महाकाय उल्का Tunguska च्या आकाशात जमिनीपासून 5 ते 10 किमी उंचीवर नष्ट झाली. पण यामुळे निर्माण झालेल्या उष्णता आणि ध्वनी लहरीमुळे 2150 चौरस किमी आकाराचे जंगल नष्ट झाले. या स्फोटाची तीव्रता ही 20 MT असल्याची मानली जाते. हा स्फोट 200 किमी अंतरापर्यंत स्पष्ट ऐकायला गेला. एवढंच नव्हे तर या परिसरांत 5 रिश्टर स्केल भुकंपाची नोंद झाली. 

असे अनेक नैसर्गिक स्फोट आपण पृथ्वीवरचे अनुभवले, बघितले, भूतकाळाचा अभ्यास केल्यावर माहित झाले आहेत. यामुळे जीवसृष्टी नष्ट होण्यास, नव्याने जीव तयार होण्यास मदत झाली आहे. 

पण या पेक्षा शक्तीशाली स्फोट या अनंत विश्वात सातत्याने सुरु असतात. आपल्या सुर्यावरच महाकाय स्फोट हे सातत्याने सुरु असतात. अगदी दोन-चार पृथ्वी सहज मावेल एवढ्या आकाराचे स्फोट सुर्यावर सातत्याने सुरु आहेत. याचे परिणाम आपल्या पृथ्वीच्या वातावरण कमी जास्त प्रमाणात होत असतात.

जुलै 1994 मध्ये शुमेकर लेवी नावाचा धुमकेतू तुकड्यांच्या स्वरुपात गुरु ग्रहावर धडकला. यामुळे गुरु ग्रहावर मोठाले स्फोट झाले, अर्थात हे स्फोट हे महाकाय गुरु ग्रहाने सहज पचवले असले तरी या स्फोटाची क्षमता ही तब्बल 60 लाख MT एवढी समजली गेली.  

विश्वात ताऱ्यांची निर्मिती, आंतर बदलाने तारे नष्ट होणे, ताऱ्यांचे स्फोट, ताऱ्यांची टक्कर, कृष्ण विवर एकमेकांच्या प्रभावाखाली येणे यांमुळे महाकाय ऊर्जा प्रक्षेपित केली जात असते, फेकली जात असते. 

साधारण एक हजार वर्षापूर्वी म्हणजे साधारण 1054 या वर्षी एका ताऱ्याच्या 
स्फोटाची नोंद जगभरातील खगोल अभ्यासकांनी करुन ठेवली आहे. या ताऱ्याचा स्फोट एवढा मोठा होता त्याचा प्रकाश पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा काहीसा कमी होता पण हा  प्रखर प्रकाश सुमारे 2 वर्षे दिसत होता. हा तारा आता SN1054 या नावाने ओळखला जातो आणि त्याचे राहिलेला अवशेष हे आता Crab Nebula या नावाने प्रसिद्ध आहेत. आकाशात खगोलप्रेमींनी सर्वात जास्त अभ्यासलेली गोष्ट म्हणूनही Crab Nebula प्रसिद्ध आहे. सांगायचा हेतू हा की Crab Nebula हा पृथ्वीपासून तब्बल 6,500 प्रकाशवर्ष दुर आहे. थोडक्यात स्फोटामुळे तयार झालेला प्रकाश हा 6500 वर्षांनंतर 1054 ला पृथ्वीपर्यंत पोहचला आणि हा प्रकाश दिसला तोही स्पष्टपणे. म्हणजे बघा किती शक्तीशाली स्फोट होता तो. 

अनेक स्फोट हे फक्त दुर्बिणीतून बघितल्यावर जाणवतात, कळतात, झाल्याचं समजून आलं आहे. 

तेव्हा हजारो आकाशगंगा, अब्जावधी शब्द कमी पडेल एवढे तारे - धुमकेतू, कृष्णविविर असलेलं हे अनंत असं विश्व अशा महाप्रचंड स्फोटांनी खचाखच भरलेलं आहे. बैरुत, हिरोशिमा, नागासाकिचा स्फोट हे त्यापुढे काहीच नाही.

Wednesday, July 29, 2020

'राफेल' ने किती फरक पडेल ?





सध्या राफेलचा गाजावजा सुरु आहे. 'राफेल' ने किती फरक पडेल ? याबाबतील लिहिण्यापूर्वी काही गोष्टींवर मत व्यक्त करतो. मग मुळ मुद्द्याकडे जाऊ.

1997 ला सुखोई -30 हे लढाऊ विमान भारतीय वायु दलांत दाखल झाले. त्यानंतर तब्बल 23 वर्षांनतर राफेल च्या रुपाने परदेशातील तंत्रज्ञान असलेले नवे लढाऊ विमान दाखल झाले हे विशेष. खरं तर 2006 पासून देशाची गरज लक्षात घेता 126 लढाऊ विमानांची आवश्यकता होती. मात्र निविदा - चाचण्या - निवड करण्यात गेलेला वेळ यामुळे खर्च वाढला आणि शेवटी 126 नाही तर 36 लढाऊ विमानांवर प्रकरण थांबलं तेही राफेलची निवड केल्यावर. अखेर 2016ला करार झाला आणि पहिली पाच लढाऊ विमाने वायू दलाला मिळाली, 2021 च्या अखेरीपर्यंत सर्व 36 लढाऊ विमाने मिळणर आहेत. 

या राफेलबाबत तंत्रज्ञान हस्तांतराचा करार करत बसलो असतो तर प्रचंड वेळ लागला असता. कारण देशांत सध्या HAL या सरकारी कंपनीकडेच लढाऊ विमाने बनण्याचा अनुभव आहे, पण याचा वेगाने उत्पादन करण्याचा रेकॉर्ड खराब आहे. तेव्हा नव्या कंपनीला पायावर उभं रहायला मोठा वेळ लागला असता. म्हणुन ही लढाऊ विमाने तयार करुन भारताला सोपवली जाणार आहेत, यामुळे ही लढाऊ विमाने लगेच वापरायला मिळणार आहेत हे विशेष. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असं तंत्रज्ञान एवढ्या सहजासहजी कोणताही देश दुसऱ्या देशाला ( कितीही मित्रत्वाचे संबंध असले तरी ) द्यायला तयार होत नाही.   

2014 पर्यंत विमानांचा करार करण्याच धाडस युपीए सरकारने केलं नाही ते पंतप्रधान मोदी यांनी केलं. पण त्यापेक्षा एवढे आरोप होऊनही करार रद्द केला नाही हे अधोरेखित करण्यासारखे आहे. यामध्ये कोण खरं, कोण खोटं वगैरे हे स्वतंत्र विषय आहेत, प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात, त्याबद्दल आदर आहे. पण असेच आरोप जर 2014च्या आधी झाले असते तर करार अर्धवटच राहिला असता कारण अंगावर डाग लागू न देण्याची तशी मनोवृत्ती होती. 

हे सर्व लिहायचे कारण देशाची संरक्षण निकड लक्षात घेता अनेकदा संरक्षण करार होणे अत्यंत आवश्यक असतात, मात्र वादामुळे - आरोपांमुळे, भ्रष्टाचारामुळे अनेक करार मागे पडले आहेत, हे अनेकदा दिसून आलं आहे. त्यामुळे आपलं संरक्षण दल काही बाबतीत शत्रु पक्षाच्या तुलनेत काहीसं कमकूवत असलेलं दिसून येतं. 

आता या 'राफेल' ने किती फरक पडेल ? या बाबतीत दोन पातळीवर विचार करावा असं माझं मत आहे. पहिली गुणवत्ता पातळी तर दुसरी संख्यात्मक.

गुणवत्ता - राफेल हे सध्या भारतीय वायू दलातील सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान आहे यात शंकाच नाही.  याच्या तोडीस तोड लढाऊ विमान पाकिस्तानकडे नाही. तर चीनकडे Chengdu J -20 हे 5th Generation वर्गातील ( जगातील लढाऊ विमानांची सध्याची सर्वोत्तम श्रेणी ) स्टेल्थ लढाऊ विमान आहे जे राफेलच्या कितीतरी पावले पुढे आहे. 

राफेल हे एक multi-role combat aircraft आहे. म्हणजे हवाई क्षेत्रात वर्चस्व गाजवण्याची, दुसऱ्या लढाऊ विमानाशी लढण्याची, जमिनीवर हल्ला करण्याची, टेहळणी करण्याची, इतर विमानांना संरक्षण देण्याची क्षमता राफेलमध्ये आहे. थोडक्यात राफेल हे सुखोई -30 एमकेआय प्रमाणे विविध भुमिका बजावू शकते. तुलनेत काहीशा मोठ्या आकाराच्या सुखोईला राफेलच्या रुपाने नवा साथीदार मिळाला आहे. 

संख्या -  आता राफेल समावेशामुळे संख्यात्मक पातळीवर किती फरक पडणार आहे तर त्याचे उत्तर आहे ' काहीच नाही '. कारण देशाची लढाऊ विमाने निवृत्त होण्याचा - बाद होण्याचा वेग हा नव्याने दाखल होणाऱ्या लढाऊ विमानांपेक्षा कितीतरी जास्त आहे. 

देशाची सामरिक गरज लक्षात घेता भारतीय वायु दलाकडे किमान 42 लढाऊ विमानांचे ताफे - Squadron असणे आवश्यक आहे, असं संरक्षण तज्ज्ञांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे. म्हणजे चीन आणि पाकिस्तानने एकाच वेळी आगळीक केली, त्यांच्याशी एकाच वेळी युद्ध करण्याची वेळ आली तर त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी - दोन्ही बाजूंवर  लढण्यासाठी तेवढा लढाऊ विमानांचा ताफा असणे आवश्यक आहे. 

पण वस्तुस्थिती ही आहे की वायु दलाकडे तेवढा ताफा उपलब्ध नाहीये. मग सध्या किती लढाऊ विमानांचे ताफे उपलब्ध आहेत तर हा आकडा 30 ते 32 असावा असा अंदाज आहे. 36 राफेल विमाने दाखल झाल्यावर राफेलचे एकुण 2 Squadron तयार होतील. 

एका Squadron मध्ये साधारण 16 - 20 लढाऊ विमाने असतात. लढाऊ विमानांच्या मारक क्षमतेनुसार ही संख्या कमी जास्त  असते.      

सध्या भारतीय वायु दलाकडे 272 सुखोई 30 ( एम के आय), 100 पेक्षा जास्त जग्वार, 60 पेक्षा जास्त मिग -29, 50 पेक्ष जास्त मिग -21 ( Bison ) , 40 पेक्षा जास्त मिराज -2000 , अंदाजे 16 तेजस अशी एकुण 550 च्या घरांत लढाऊ विमाने आहेत. ( खरा आकडा कधीच सांगितला जात नाही ).

यापैकी पुढील 6 एक वर्षात मिग-21 तर पुढील 10-12 वर्षात जग्वार ही लढाऊ विमाने टप्प्या टप्प्याने सेवेतून निवृत्त केली जाणार आहेत. म्हणजेच तब्बल 150 लढाऊ विमाने ही 2032-34 पर्यंत कमी होणार हे नक्की.  

सध्या स्वदेशी बनावटीचं तेजस लढाऊ विमानाचे उत्पादन जोरात सुरु आहे. त्याच्या नव्या आवृत्तीचे उत्पादनही लवकरच सुरु होईल अशी अपेक्षा आहे. अशी एकुण 120 तेजस भारतीय वायु दलाला हवी आहेत. Hindustan Aeronautics Limited हे तेजसचे उत्पादन करते. वर्षाला 12 पेक्षा जास्त तेजस लढाऊ विमाने तयार करण्याची HAL ची क्षमता आहे. उत्पादनाचा वेग जरी HAL ने वाढवला तरी HAL चा आत्तापर्यंत इतिहास लक्षात घेता तेजसची मागणी पुर्ण करायला 8 ते 10 वर्षे सहज लागू शकतात.  

संरक्षण विभागाने नुकतंच 12 सुखोई - 30 MKI आणि 21 मिग -29 विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष करार होत हे पुर्णत्वास जाण्यास  4 ते 6 वर्षे सहज लागतील असा अंदाज आहे. 

5th Generation ची दोन लढाऊ विमाने बनवण्याचे भारताचे प्रयत्न सध्या कागदावर आहेत. म्हणजेच HAL मार्फत स्वबळावर Advanced Medium Combat Aircraft चा आराखडा बनण्याचे काम सध्या सुरु आहे. तर रशियाच्या मदतीने Fifth Generation Fighter Aircraft बनवण्याबाबत कागदावर चर्चा सुरु आहे. आता या दोन विमानांचा आराखडा नक्की होणं, त्याला मान्यता मिळणं, याबाबात करार होणं, प्रत्यक्ष लढाऊ विमान तयार होणं आणि मग चाचण्यांचे सोपस्कार पुर्ण होत उत्पादन व्हायला सुरुवात होणं यामध्ये कितीही वेग घेतला तरी 10 वर्षे सहज निघून जाणार आहेत. आणि त्यापुढे अशा विमानांची मागणी पुर्ण करेपर्यंत आणखी 8 वर्ष लागतील, 10 लागतील 15 लागतील का नेमकी किती लागतील हे आत्ता सांगणे मुर्खपणाचे ठरेल. 

थोडक्यात वरील सर्व बेरीज - वजाबाकी लक्षात घेतली तर पुढील 10 -15 वर्षात भारतीय वायु दलांच्या लढाऊ विमानांच्या संख्येत फारसा फरक पडणार नाहीये. 

त्यामुळे राफेलच्या तातडीच्या समावेशाने भारतीय वायु दलाची सामरिक गरज पुर्णत्वास जात नाहीये हे नक्की. 

ताज्या दमाचे, जगातील एक अत्याधुनिक लढाऊ विमान 'राफेल' दाखल झाल्यानं वायु दलाला एक उभारी मिळाली आहे एवढंच समाधान सध्या मानायला पाहिजे असं मला वाटतं. 

जाता जाता शेवटचं. लढाऊ विमान कोणतंही असो पायलट हा संबंधित लढाऊ विमान हाताळण्यास किती सक्षम आहे त्यावर लढाऊ विमानाचे यश अवलंबून असते. बघा ना तंत्रज्ञानाच्या बाबातीत कितीतरी वरचढ असलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 ला तुलनेत काहीसे जुने तंत्रज्ञान असलेल्या आपल्या मिग-21 ने धडा शिकवलाचा ना. 

तेव्हा आपले राफेल हे चीनवर भारी पडू शकते, आपले पायलट तेवढे सक्षम आहेत यात शंका नाही. 





















  

Sunday, July 26, 2020

26 जुलै 2005 च्या पावसाच्या आठवणी......


26 जुलै म्हटलं की सर्वांना मुंबईतील ढगफुटी, मुंबई उपनगर ते पालघर - डहाणू - कसारा -कर्जत -पनवेल पट्ट्यात ढगफुटीने झालेला मुसळधार पाऊस हे सर्व आठवतं. पण त्याच्या दोन दिवस आधी कोकणात बक्कळ पाऊस झाला होता. 24-25 जुलैला. यामुळे कोकणात विशेषतः रायगड -रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या, पूराचा फटका बसला होता. तेव्हा मुंबई आणि परिसराएवढे कोकणाचेही नुकसान झाले होते.

2005 ला मी ई टीव्ही मध्ये होतो. 26 जुलैला तेव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी एका टर्मिनलचे उद्धाटन होणार होते , साधारण दुपारी एक किंवा दोन चा कार्यक्रम होता. मी दहा वाजता डोंबिवली रेल्वे स्टेशन वर आलो. अर्थात पाऊस बऱ्यापैकी त्यावेळी पडत होता. जवळपास पाऊण तासानंतर दादर सीएसटीच्या दिशेने जाणारी लोकल प्लॅटफॉर्मवर आली. मात्र पावसाचे स्वरूप बघता अनेकांनी परत घरी जाणे पसंत केलं, त्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी फारशी नव्हती.

लोकल कशीबशी तब्बल पाऊण तासाने ठाण्याला पोचली आणि तेथे ऐकलेली अनाउन्समेंट ऐकून धक्काच बसला. ठाण्याच्या पुढे एकही लोकल कल्याणच्या दिशेने जाणार नसल्याचं रेल्वेने जाहीर केलं म्हणजेच ठाण्याला पोचता पोचता मागे केवढा पाऊस झाला असावा याची आपण कल्पना करू शकता.

तोपर्यंत आमच्या लोकलने वेग घेतला होता आणि मी मी साधारण तासाभरात दादरला पोचलो. माझी टीम ही भेट मला अंधेरीला भेटणार होती म्हणून मी पश्चिम रेल्वेची लोकल पकडली अंधेरीच्या दिशेने रवाना झालो. तोपर्यंत पाऊस दणादण कोसळत होता, भर दुपारी दाट अंधार झाला होता. तेवढ्यात आमचे बॉस सर राजेंद्र साठे सरांचा फोन आला " अमित कुठे आहेस  ? ", म्हटलं बांद्राला पोहोचत आहे,  ते म्हणाले की बांद्र्याला थांब, तुला फोन करतो. 

मी ताबडतोब बांद्राला उतरलो आणि सरांच्या फोनची वाट बघत होतो. 

तेवढ्यात सरांचा फोन आला, सर म्हणाले ताबडतोब ऑफिसला परत ये, तुला कोकणात जायचे आहे. ई टीव्हीचे ऑफिस नरिमन पॉइंटला होते. तेव्हा ताबडतोब मी चर्चगेट कडे जाणारी जलद लोकल पकडली.

माहिमची खाडी पार करताना आजूबाजूला असलेले पाण्याचे रौद्र रूप बघता रेल्वे सेवा कधीही बंद पडणार अशी परिस्थिती होती. आणि चर्चगेटला उतरतांना लोकल सेवा बंद करत असल्याची घोषणा झालीच.

साधारण अडीच पर्यंत मी ऑफिसला पोहोचलो , तोपर्यंत माझा सहकारी श्रीरंग खरे तिथे हजर होता. आम्हाला साठे सरांनी बोलावलं आणि स्पष्ट सूचना दिल्या की दोन दिवस कोकणामध्ये मुसळधार पाऊस झाला असल्याने तिकडे जाऊन कवरेज करायचे आहे, लगेच निघा, लवकरात लवकर पोहचा. वाटेतल्या मुंबईतल्या कव्हरेजमध्ये वेळ दवडू नका, बाकीच्या टीम आहेत.

तेव्हाचे आमचे ऑफिस ॲडमिन शंकरन जे आता टीव्ही नाईन ला आहेत त्यांनी प्रत्येकी पाच पाच हजार रुपये दिले आणि आम्ही दोघे जण टीम घेते दोन ओम्नी गाडीने दादर मार्गे निघालो.

मग माटुंगा सर्कलच्या इथे येऊन नाईलाजाने थांबावं लागलं कारण माटुंगा सायन दरम्यान प्रचंड पाणी रस्त्यावर भरलं होतं. खरंतर रस्त्यावरून पाण्याचे वेगवान असे अक्षरशः लोट वाहत होते. अवघ्या काही मिनिटात सायन दिशेला ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेल्या अनेक गाड्या पाण्याखाली जात असताना स्पष्टपणे आम्ही बघत होतो. अर्थात हा नेहमी सारखा पाऊस नाही जरा जास्तच पाऊस पडतोय याची जाणीव व्हायला सुरुवात झाली होती. तेव्हा ढगफुटी हा शब्द ऐकला सुद्धा नव्हता किंवा असं काही असेल याचा काहीच अंदाज आला नाही. मग आम्ही वडाळा मार्गे जाण्याचा निर्णय घेतला तिकडे आम्ही गाड्या वळवल्या तिथेही पुढे कमरेभर पाणी होतं. मग आम्ही पुन्हा आमच्या गाड्या फिरवल्या आणि पुन्हा आम्ही माटुंगासर्कलपाशी आलो. 

संध्याकाळी साधारण सहा ते रात्री बारा एक वाजेपर्यंत आम्ही तिकडेच होतो. पावसाचा जोर हा 6 नंतर खूप कमी झाला होता. हजारो लोक चालत आपल्या घरी निघाले होते. मोजके व्हिज्युअल्स घेतले कारण कॅमेरा बॅटरी पण वाचवायच्या होत्या.

आता पुढे काय करायचं असा आम्हाला प्रश्न पडला होता. मोबाईल नेटवर्क तर दुपारनंतर ठप्प झालं होतं. लँडलाईन फोन च्या ठिकाणी तोबा गर्दी होती. शेवटी रात्री माटुंगा - सायन परिसरात साचलेलं पाणी बऱ्यापैकी कमी झाल्याचं जाणवल्यावर आम्ही गुडघाभर पाण्यातून गाडी पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

अर्थात तेव्हा आत्ताचा माटुंगा फ्लायओव्हर , सायन हॉस्पिटल समोरील फ्लायओव्हर काही झाले नव्हते. या सर्व मार्गावरून गाडी रेटत आम्ही कसेबसे सायन फ्लायओव्हरवर पोहचलो आणि आमची गाडी ट्राफिक जाम मध्ये अडकली. ब्रीजच्या खाली सुद्धा ट्रॅफिक जॅम होते, रस्त्यावर भरपूर पाणी होते.

एव्हाना रात्रीचे दोन वाजले होते, आजूबाजूला अंधार होता, आम्ही तशाच ओल्याचिंब अंगाने रात्र ही गाडीमध्ये काढली आणि सकाळी सहाच्या सुमारास उजाडल्यावर आम्ही गाडी सोडण्याचा निर्णय घेतला. ड्रायव्हरला पाच पन्नास रुपये दिले आणि सांगितले की जेव्हा मार्ग मोकळा होईल तेव्हा तुम्ही ऑफिसला जावा. आता फोनही लागायला सुरुवात झाली होती.आम्ही कॅमेरा युनिट घेऊन पुढे निघालो आणि सायनचा ब्रीज असा उतरायला सुरुवात केली आणि समोरचे दृश्य बघून धक्काच बसला.

समोर अथांग समुद्र पसरला होता. 

सायन ब्रिज उतरल्यावर दोन्ही बाजू असलेला मैदानी परिसर पाण्याने भरला होता गाड्या - रिक्षा तरंगत होत्या. रस्त्याच्या मध्ये डिव्हायडर वरून हजारो लोक ये-जा करत होती, तीसुद्धा कमरेपेक्षा जास्त पाण्यातून. कित्येक ट्रक या रस्त्यावर उभे होते आणि या ट्रकवर हजारो लोकांनी रात्र कशीबशी काढली होती. आम्ही तिथून चालायला सुरुवात केली ते थेट गोवंडी पर्यंत. रात्रभर झोप नाही, पाय तुटायची वेळ आली होती. आम्ही चालत आमचा सहकारी कॅमेरामन मणी पिल्ले यांच्या घरी साधारण 11 च्या सुमारास पोहचलो. त्याच्या घरी गरमागरम पोहे - चहा नाश्ता केला. अर्थात आम्हाला अचानक कोकण दौऱ्यावर पाठवलं असल्याने आम्ही एक्स्ट्रॉ कपडेसुद्धा बरोबर घेतले नव्हते. मणिने त्याच्या घरी असलेले टी शर्ट आणि हाफ पॅन्ट आमच्यासमोर टाकले, ज्याला जसं होतं तसे त्याने ते कपडे पटापट घातले आणि आम्ही श्रीरंग वगैरे सर्वजण नवी गाडी शोधायला बाहेर पडलो, कारण कोकणात पोहचायचे होते. 

पावसाच्या दणक्यामुळे बहुतेक सर्व दुकाने बंद होती, अखेर आम्हाला एक कॉलिस चालक भेटला, आमच्या बरोबर यायला तयार झाला. हे सर्व सोपस्कार करता करता तीन वाजले होते.

चारच्या सुमारास आम्ही पनवेल पार करत होतो आणि पावसाच्या धुमाकूळ मुळे उध्वस्त झालेला परिसर बघून आम्ही अक्षरशः हादरून गेलो होतो.

पनवेल पार केल्यावर वाटेत नदीवर असलेल्या ब्रिजच्या कठड्यांवर तर अक्षरशः हजारो झाडे अडकून पडली होती. असं वाटत होतं की आम्ही जंगलातून प्रवास करत आहोत.

पळस्पे फाट्याला पोहोचलो, तेथे असलेल्या वाहतुक चौकीतल्या पोलिसाला विचारले की कोकणातला रस्ता मोकळा आहे का ? तो म्हणाला रस्ता मोकळा आहे, काही अडचण नाही. पळस्पे फाट्याच्या परिसरात पाणी ओसरल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. आम्ही पोलिसाला विचारले की किती पाणी होते ? तर तो आम्हाला पोलिस चौकीत घेऊन गेला आणि लोखंडी कपाटाच्या वर त्याने पाण्याची रेषा दाखवली. तेवढं पाणी होतं आणि तो म्हणाला मी त्या कपाटावर बसून रात्र काढली.

पळस्पे फाटा सोडला आणि आम्ही महाडच्या दिशेने वेगाने निघालो. महामार्गावर फारशी अडचण आली नाही, कुठेही क्षणभर देखील थांबलो नाही. साधारण सातच्या सुमारास दासगाव गावाजवळ आलो. तीथे रस्त्याच्या उजव्या हाताला अनेक लोक काहीतरी जाळत असल्याचं आम्हाला दिसलं. जवळ जाऊन बघतो तर काय चक्क रस्त्याच्या बाजूला अंत्यसंस्कार सुरू होते आणि मागे वळून गावाकडे बघितलं तर हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दासगावावर दरड कोसळली होती. हिरव्यागार डोंगराचा एक भाग खरवडून खाली आला होता आणि गावातील काही घरांना कवेत घेऊनच थांबला होता.

अंत्यसंस्कार सुरू असलेल्या ठिकाणी कॅमेरा काढण्याचे धाडस झाले नाही, लोकांचा आक्रोश - दुःख बघून पुढे पाऊल टाकता आले नाही. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जर अशी परिस्थिती असेल तर गावात काय असेल ? त्यामुळे दासगावचे दृश्य दुरूनच कॅमेऱ्यात टिपत पुढे महाडच्या दिशेने रवाना झालो. 

आम्ही महाड गावात संध्याकाळी साधारण साडेसात आठच्या सुमारास पोचलो. महाड गांव जवळपास तीन दिवस पाण्याखाली होते. आम्ही पोचलो ( 27 जुलै ) तेव्हा काही तास आधी पुराचे पाणी ओसरले होते, गावातील लोक घरातून - दुकानातून चिखलगाळ बाहेर काढत होते. 

अख्खा गाव अंधारात होता. मग आम्ही महामार्गालगत असलेल्या हॉटेलमध्ये राहिलो. दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 जुलैला श्रीरंग खरे ने महाड गाव आणि परिसरात कव्हरेज करायचे ठेवले, तर मी दरड कोसळलेल्या जुई गावाकडे जायचे ठरवले.

छोटेखानी जुई गाव हे अर्धेअधिक दरडीखाली गेले होते. एव्हाना दरड कोसळून चार दिवस झाले होते,  एक पोकलँड मशीन गावात दरड दूर करण्याकरता पोहचलं होतं. 

गावाच्या सुरुवातीला एक शाळा होती. तिथे गावकऱ्यांनी आश्रय घेतला होता. शाळेतून हंबरडा फोडण्याचा आवाज येत होते. माझी शाळेत पाऊल टाकण्याची हिम्मतच झाली नाही. कॅमेरामनला म्हणालो तूच जा आणि शक्य तेवढे दुरून व्हिज्युअल्स घे.

त्यानंतर आम्ही गावात पोहोचलो. खरं तर गाव असं काही दिसतच नव्हतं. दगड - माती - चिखल याचे ढिगारे सगळीकडे दिसत होते. प्रचंड दुर्गंधी सगळीकडे पसरली होती. 

रिमझिम पावसात शक्य होईल तसा आमचं कव्हरेज सुरू होतं. गावकऱ्यांकडून माहिती घेत होतो. पोकलँड मशीन एक ढिगारा अलगदपणे बाजूला काढत होतं, तेव्हा मृतदेहाचा अर्धा भाग या ढिगार्‍यातून बाहेर मशीनच्या त्या फावड्याबरोबर आला आणि ते दृश्य बघून आम्ही अक्षरशः तिथून धूम ठोकली.

तिथे उभे राहून आणखी कवरेज करणे निव्वळ अशक्य झालं होतं, तरीही कामाचा भाग म्हणून शक्य होईल तेवढ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया - शासकीय कर्मचारी किंवा पोलीस यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि पुन्हा वेगाने महाडला पोचलो. 

आमच्याकडे फीड अपलिंक करण्यासाठी कोणतेही साधन अर्थात नव्हते. मोबाईल तर अर्थात प्राथमिक अवस्थेत ला होता ज्यात फोटो काढण्याची पण सोय नव्हती.

तेव्हा आम्ही कव्हरेजची टेप घेऊन भोरला पोहचलो. तिथून टेप ही भोर हून पुण्याला जाणाऱ्या एसटीच्या ड्रायव्हर कडे दिली आणि कंट्रोल रूम मध्ये त्याला द्यायला सांगितली. तिथून टेप मग पुणे ऑफिसला नेली जाणार होती.

अशा रीतीने पुढील तीन दिवस कव्हरेजची टेप पुण्याला पाठवत होतो. महाड, पोलादपूर आणि त्या परिसरातील पुराचं पावसाने केलेल्या नुकसानीचा कव्हरेज करत होतो. दरम्यान श्रीरंग खरे रत्नागिरीला रवाना झाला होता. तर पुण्याहून अभिजित कांबळे, तर कोल्हापूरहून दीपक शिंदे हे सहकारी महाडमध्ये भेटले.

अखेर महाड - पोलादपूर मधील काही कपड्यांची दुकाने सुरू झाल्यावर आम्ही आमच्या मापाचे टी शर्ट आणि हाफ पॅन्ट विकत घेतल्या आणि उरलेले दोन दिवस तेथे काढले.

साधारण सहाव्या दिवशी मी , माझी टीम आणि श्रीरंग खरे आम्ही मुंबईला परतलो. येताना श्रीरंगने पनवेलला थांबून तिथली दुर्दशा कव्हर केली. 

या सर्व ठिकाणी फिरतांना पहिल्यापासून घरच्यांना वेळोवेळी कुठे जात असल्याची कल्पना देत होतो.  त्यामुळे घरच्यांचा जीव टांगणीला लावला नाही.

तोपर्यंत मुंबई कशी तीन दिवस पाण्यात बुडालेली होती , वाहतूक सर्व ठप्प होती हे सर्व टीव्हीवरून बघत होतो. मुंबई आणि परिसराला मदत करणे आवश्यक असले तरी ग्रामीण भागाकडे त्यातही कोकणातील गावांकडे खूपच दुर्लक्ष झाल्याचे स्पष्टपणे अनुभवायला मिळाले होते.

अर्थात मुंबईत ठिकठिकाणी भरलेलं पाणी, यामधून लोकांची होणारी पळापळ, सायन ते कुर्ला पाण्याखाली गेलेले रस्ता, परिसराला आलेले समुद्राचे स्वरूप, सायन पुलावर काढलेली रात्र, दरड कोसळलेल्या जुई गावाची अवस्था, लोकांचे भेदरलेले चेहरे, शाळांमधला अक्रोश, रस्त्याच्या बाजूला पाहिलेले अंत्यसंस्कार...... ही सगळी दृश्य याच काय पण पुढील जन्मीदेखील आठवतील एवढी मनावर कोरली गेली आहेत.

Thursday, July 23, 2020

मंगळ मोहिमा जोरात


अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या मंगळ ग्रह चर्चेत आहे. कारण विविध तीन देशांच्या तीन मंगळ मोहीमा सुरू आहेत.  

1...UAE 


दोन दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिरात - UAE ने ' होप मार्स मिशन ' अंर्तगत 1350 किलो वजनाचा उपग्रह मंगळ ग्रहाच्या दिशेने धाडला आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहचण्याचे नियोजन असून या उपग्रहाद्वारे मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. खरं तर विज्ञान क्षेत्रात ( खरं तर कुठल्याच बाबतीत ) जात - धर्म याचा उल्लेख करणे चुकीचे आहे. तरी पण अरबी देशात ( एका मुस्लिम राष्ट्राने ) असे पाऊल उचलणे कौतुकास्पद आहे. जपानच्या रॉकेटच्या सहाय्याने हा उपग्रह अवकाशात धाडला गेला आहे.

2...चीन


असं असतांना काही तासांपूर्वी चीनने Tianwen - 1 नावाचा 5 हजार किलो वजनाचा उपग्रह मंगळ ग्रहाच्या दिशेने धाडला. चीनची ही दुसरी मंगळ मोहीम आहे. 2011 मध्ये एक उपग्रह मंगळ ग्रहाच्या दिशेने पाठवण्याचा चीनने प्रयन्त केला होता. मात्र ज्या रशियाच्या रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण केले जात होते ते रॉकेट तांत्रिक बिघाडाद्वारे हवेत नष्ट झाले होते. 

यावेळी स्वतःच्या शक्तिशाली लॉंग मार्च - 5 या बलाढ्य - शक्तिशाली रॉकेटद्वारे उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण चीनने केले आहे. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे मंगळ ग्रहाभोवती पोहचतांना पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहावर रोव्हर उतरवण्याचे चीनने नियोजन केले आहे. साधारण फ्रेब्रुवारी 2021 मध्ये या रोव्हरला घेऊन चीनचा उपग्रह मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहचण्याचे नियोजन आहे. तर 23 एप्रिल 2021 च्या सुमारास मंगळ ग्रहावर रोव्हर उतरवण्याचा चीनचा प्रयत्न असेल. हे सर्व जर यशस्वी झालं तर पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहावर पोहचत रोव्हर उतरवणारा पहिला देश म्हणून चीनच्या नावावर विक्रम जमा होणार आहे. 

3...नासा


तर येत्या 30 जुलै ला नासा ही ' MARS 2020 ' नावाचा आत्तापर्यंतचा सर्वात अत्याधुनिक रोव्हर ज्याचे वजन सुमारे एक हजार किलो आहे, हा मंगळ ग्रहाच्या दिशेने पाठवणार आहे. 18 फेब्रुवारी 2021 ला मंगळ ग्रहावर उतरण्याचे नियोजन आहे. आत्तापर्यंत नासाने मंगळ ग्रहावर एकूण 4 रोव्हर यशस्वीरित्या उतरवले आहेत. यापैकी Mars 2020 हा सर्वात अत्याधुनिक रोव्हर असणार आहे. या रोव्हरमध्ये विविध प्रकारचे कॅमेरे, माती - हवा यांचे विश्लेषण करणारी उपकरणे आहेत. विशेष म्हणजे फक्त 1.8 किलो वजनाचे छोटेखानी हेलिकॉप्टर या रोव्हर सोबत असणार आहे. हे उडवल्याने मंगळ ग्रहावर जमिनीलगत असलेल्या हवेचा दाब - घनता याचा अभ्यास करता येणार आहे.

थोडक्यात जुलै महिन्यात 3 मंगळ ग्रहावरील मोहिमा मार्गी लागत आहेत. पण हाच का कालावधी ? कारण पुढील काही महिन्यात म्हणजेच 2021 फेब्रुवारीपर्यन्त मंगळ ग्रहाच्या कक्षेत सर्वात कमी अंतर पार करून पोहचता येणार आहे. तेव्हा जुलै महिना मंगळ ग्रहावरील मोहीम आखण्यासाठी lauch window ठरला आहे. 

तेव्हा 2021 चा फेब्रुवारी महिना अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात रुची असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. 

https://twitter.com/globaltimesnews/status/1285465704934694912?s=19

https://twitter.com/NASAJPL/status/1255501030906834948?s=19

https://twitter.com/EvanKirstel/status/1198712898102673408?s=19

Sunday, May 31, 2020

'स्पेस एक्स' च्या हनुमान उडीचे महत्व........


अंतराळ क्षेत्रात रुची असणाऱ्यांसाठी 30 मे शनिवार हा एक ऐतिहासिक दिवस ठरला. या दिवशी अमेरिकेच्या 'स्पेस एक्स' या खाजगी कंपनीने दोन अंतराळवीरांना अवकाशात यशस्विरित्या धाडले.

आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष ? कारण अंतराळवीरांच्या अवकाश वाऱ्या तर गेली अनेक वर्षे नित्यनियमाने सुरु आहेत की....

मात्र 'स्पेस एक्स' या खाजगी कंपनीच्या समानवी अवकाश उड्डाणाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.  

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अवकाश वारी मग ती कृत्रिम उपग्रहाची असो, दुसऱ्या ग्रहाच्या दिशेने पाठवलेल्या यानाची असो वा मानवाची....अवकाश वारी ही काही सोपी गोष्ट नाही. अत्यंत खार्चिक, तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्यंत क्लिष्ट अशा या मोहिमा असतात. 

खार्चिक या अर्थाने की एक किलो वजानाची गोष्ट जर अवकाशात पाठवायची असेल तर किमान 20 हजार डॉलर्स पेक्षा कितीतरी जास्त एवढा खर्च येतो. तर तंत्रज्ञान अत्यंत अवघड - गुंतागुंतीचे असल्याने प्रशिक्षित मनुष्यबळाची अक्षरशः फौज लागते, मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे या भानगडीत खाजगी कंपनीने पडण्याचा प्रश्न येत नाही.

म्हणूनच आत्तापर्यंत जगात अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात ज्या काही मोहिमा सुरु आहेत त्या सरकारी आशिर्वादानेच. म्हणजेच बघा ना...अमेरिकेची नासा, भारताची इस्त्रो, रशियाची Roscosmos, जपानची Japan Aerospace Exploration Agency, चीनची China National Space Administration (CNSA), 22 देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली युरोपियन स्पेस एजन्सी  European Space Agency, कॅनडा स्पेस एजन्सी या प्रमुख अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्था....या सर्व संस्था सरकारी मालकीच्या आहेत. म्हणजेच सरकारने निश्चित केलेली सामरिक गरज लक्षात घेऊन या संस्था काम करतात, संस्थेच्या खर्चाचा भार संबधित सरकार उचलते. 

मात्र अमेरिकेत गेल्या काही वर्षात वेगळी पावले उचलली गेली. नासाचा व्याप वाढत असल्याने उपग्रह बनवणे, रॉकेट तयार करणे, अवकाश तंत्रज्ञानाशी संबंधित उपकरणांची निर्मिती करणे अशी कामे खाजगी कंपन्यांवर सोपवायला सुरुवात केली. यामुळेच अमेरिकेत बलाढ्य बोईंग, नॉर्थन ग्रुमॅन, लॉकहिड मार्टिन, स्पेस एक्स, ब्लु ऑरिजिन, वर्जिन गॅलॅक्टिक अशा काही खाजगी कंपन्या अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात उभ्या राहू लागल्या. यापैकी काही कंपन्यांनी विविध उपग्रह, याने तयार केली, रॉकेट तयार केले, मात्र समानवी मोहिम कोणी करु शकलं नव्हतं, ते स्पेस एक्सने करुन दाखवलं. 

याचे महत्व काय ?....यासाठी आपल्या देशातील काही उदाहरणे पाहू. 1991 पर्यंत देशात दोनच दूरसंचार कंपन्या होत्या.....बीएसएनएल, एमटीएनएल...सरकारी कंपन्या. या क्षेत्रात खाजगी कंपन्यांना सरकारनेच वाट करुन दिली. या क्षेत्रातील स्पर्धेने सर्वसामान्याला किती फायदा झाला आहे हे मुद्दामून लिहायची गरज नाही. तेच दुचाकी-चारचाकी गाड्यांना लागू पडते. आज विविध कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमुळे दुचाकी-चारचाकी गाड्या या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. चार चाकी गाडी, दुचाकी गाडी या काही आता चैन राहिली नसून गरजेची गोष्ट झाली आहे. पुर्वी सरकारचे दुरदर्शन हेच दृकश्राव्य माध्यम होते, आता चित्र किती आमुलाग्र बदललं आहे हे आपण बघतोच.

असाच बदल भविष्यात स्पेस एक्स च्या 30 मे च्या मोहिमेच्या नांदीमुळे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात होणार आहे.

स्पेस एक्सने ड्रॅगन - 2 या अवकाश कुपीतून डग्लस हुर्लेय, रॉबर्ट बेहकेन हे दोन अंतराळवीर अवकाशात यशस्वीरित्या पोहचवले. ही अवकाश कुपी 31 मे ला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला यशस्वीरित्या जोडली गेली. आता हे दोन अंतराळवीर या अवकाश स्थानकात असलेल्या 3 अवकाश अंतराळवीरांबरोबर 3 महिने रहातील. 3 महिन्यानंतर याच ड्रॅगन -2 मधून हे दोन अंतराळवीर पृथ्वीवर परत येतील असे नियोजन आहे. 

समानवी अवकाश मोहिमेत स्पेस एक्सच्या प्रवेशाने या क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार आहेत. जे जपान, युरोपियन स्पेस एजन्सी, कॅनडा, भारत या बलाढ्य देशांच्या अवकाश संस्थांना जमले नाही ते अमेरिकेतील एका खाजगी कंपनीने करुन दाखवले. लवकरच या रांगेत बोईंग कंपनी जाऊन बसणार आहे. यामुळे भविष्यात अवकाश सफर ही नाविण्यपुर्ण गोष्ट रहाणार नाही. 

जसं कृत्रिम उपग्रहांमुळे मोबाईल, इंटरनेट, दुरचित्रवाणी सेवा यामध्ये काहीही नाविण्य असं राहिलं नाहीये, उलट याचा वारेमाप फायदा आपण रोजच नकळत उपभोगत आहोत, तसंच भविष्यात अवकाश वारीचे होणार आहे.

जसं थोडेसे पैस साठवून आपण जशी युरोप, लडाखची टूर सहज करतो तसं भविष्यात अवकाश वारीचे होणार आहे. स्पेस एक्स सारख्या खाजगी कंपन्यांमुळे भविष्यात अवकाश वारीही शक्य होणार आहे. जरा जास्त पैसे भरुन तुम्हाला पृथ्वीच्या दोन -चार फेऱ्या मारुन पृथ्वीवर परत आणण्याची सोय स्पेस एक्स किंवा या क्षेत्रात भविष्यात उतरणाऱ्या खाजगी कंपन्या करु शकतात. अर्थात ही परिस्थिती तयार व्हायला आणखी काही वर्षे जावी लागतील, पण हे सहज शक्य आहे. स्पेस एक्सने याचा पाया रचला आहे. 

काही वर्षांनी समानवी अवकाश मोहिमेत जेव्हा भारतासारखे इतर देश उतरतील तेव्हा स्पेस एक्स सारख्या कंपनीने आपले बस्तान याआधीच बसवलेलं असेल. 

उपग्रह सोडणाऱ्या, अवकाश स्थानकात आवश्यक सामान वाहून नेणाऱ्या स्पेस एक्स कंपनीकडे आता समानवी मोहिम आखण्याची क्षमता आल्याने ही स्पेस एक्स कंपनी भविष्यात चीन, रशिया सारख्या देशांनाही टक्कर देऊ शकणार आहे. 

आता स्पेस एक्स बद्दल थोडंसं. स्पेस एक्स कंपनीच्या या वाटचालीमागे आहेत कंपनीचे सर्वेसर्वा - संस्थापक, अब्जाधीश उद्योगपती 48 वर्षाचे एलॉन मस्क. नुसता पैसा असुन चालत नाही, तर वेगगेवळ्या संकल्पना राबवण्याची धमक, मोकळेपणा, दुरदृष्टी पण त्यापेक्षा तंत्रज्ञानावर अचाट प्रेम या गोष्टी  एलॉन मस्कमध्ये असल्यानेच स्पेस एक्सची वाटचाल जोरात सुरु आहे. आत्तापासूनच नासाला समांतर चांद्र - मंगळ ग्रहावरच्या अवकाश मोहिमेबाबत स्वतंत्रपणे काम करायला स्पेस एक्स कंपनीने सुरुवातही केली आहे. 

रॉकेटचा पुर्नवापर ही संकल्पना प्रत्यक्षात आणत अवकाश मोहिमांचा खर्च कमी करण्याचे श्रेय स्पेस एक्स कंपनीला जाते. म्हणजे काय तर जेव्हा रॉकेट अवकाशात झेप घेतो तेव्हा विविध टप्प्यांवर त्याचे भाग वेगळे होतात आणि पृथ्वीवर येऊन किंवा पृथ्वीच्या वातावरणात घर्षणाने जळून नष्ट होतात. तेव्हा या रॉकेटच्या पहिल्या टप्प्यातील भाग पृथ्वीवर सुरक्षित परत आणून त्याचा पुर्नवापर करण्याचा चमत्कार हा स्पेस एक्सने प्रत्यक्षात केला आहे. या साठी हि लिंक जरुर बघावी... https://www.youtube.com/watch?v=sSF81yjVbJE  

ध्येयवेडेपणा असलेल्या 'एलॉन मस्क'चे आणखी काही उद्योग पुढीलप्रमाणे....

Tesla कंपनी - वीजेवर चालणाऱ्या कारचे जगात सर्वाधिक उत्पादन करणारी कंपनी.
सोलरसिटी - घरगुती आणि व्यापारी क्षेत्रात सोलर पॅनलद्वारे वीज निर्मिती करणारी जगातील एक अग्रगण्य कंपनी.
हायपरलूप - या संकल्पनेचे जनकच एलॉन मस्क हे आहेत. प्रायोगिक तत्तावर विविध ठिकाणी प्रयोग सुरु.
The Boring Company - भुमिगत बोगद्यांचे नेटवर्क तयार करत शहराखाली रस्ते वाहतुक अबाधित ठेवण्याची संकल्पना मस्क यांनी मांडली असून या कंपनीद्वारे वॉशिग्टन, शिकागो, लास वेगास इथे प्रकल्पांनाही सुरुवात. 
Starlink - सुमारे 250 किलो वजनाच्या उपग्रहांचे एक जाळे पृथ्वीभोवती तयार करण्याची संकल्पना आहे, यामध्ये तब्बल 12,000 उपग्रह असतील. उपग्रहांचे हे जाळं अशा पद्धतीने असेल की यामुळे पृथ्वीवरचा सर्वचा सर्व भाग हा इंटरनेट आणि उपग्रह फोनने व्यापता येणार आहे.   

अशा विविध संकल्पना राबवत एलॉन मस्क यांनी जगात दबदबा निर्माण केला आहे. एवढंच नाही कृत्रिम बुद्धीमत्तेवरही मोठं काम हाती घेतलं आहे. 

याआधी सुद्धा जगात विविध क्षेत्रातील प्रगतीमध्ये एखाद्या उद्योगपती किंवा त्यांच्या कंपनीने मोठी कामगिरी बजावल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. तेव्हा अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या बदलाची - प्रगतीच्या आणखी एका धक्क्याची सुरुवात स्पेस एक्सने केली आहे असं म्हंटलं तर जराही अतिशयोक्ती ठरणार नाही. 




Sunday, May 10, 2020

एक आचरट ट्रेक.....


आचरट ट्रेक...मुलुंड ते कान्हेरी लेणी व्हाया भूत बंगला-तुळशी तलाव



वर्ष नेमके आठवत नाही, बहुदा 2006 असावे, दिवस मात्र बुद्धपौर्णिमेचाच होता एवढं नक्की.

सलग तिसऱ्या वर्षी बुद्धपौर्णिमेला होणाऱ्या प्राणीगणनेसाठी मी मचाणावर जाणार होतो. यावेळी बातमीसाठी नाही तर स्वतःसाठी, निसर्गात रहाण्याची आवड जपण्यासाठी जाणार होतो.

आम्ही तिघे जण होतो, मी, वामन कदम काका ( बीएआरसीमधून रिटायर्ड झाल्यावर किल्ले भ्रमंती करत नव्या आयुष्याला सुरुवात करणारे ) आणि आणखी एक सहकारी होता, नेमकं कोण होतं ते आठवत नाही.

एक वन कर्मचारी मुलुंडपासून कान्हेरी लेणीपर्यंतच्या ट्रेकला तयार झाला, या छोट्या ट्रेकनंतर तो स्वतः प्राणी गणने मोहिमेच्या ड्युटीवर जाणार होता. एव्हाना बातम्या करता करता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सर्व प्रमुख अधिकारी - कर्मचारी यांच्याशी ओळख झाली होती. तेव्हा या ट्रेकसाठी रितसर परनावगीचे सोपस्कार सहज पार पाडले गेले होते. मचाणावर रात्र काढायची असल्याने मी आधीच्या अनुभवाच्या आधारे तयारी केली होती. थोडक्यात मोहिमेसाठी सज्ज झालो होतो.

बुद्धपौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुलुंडच्या श्रीनगर भागातून योगी हिलला आम्ही तीघे पोहचलो. मात्र सुरुवातीलाच अडचण आली. संबंधित वन कर्मचारी काही कारणामुळे येऊ शकणार नसल्याचा त्याचा फोन आला, तो थेट ड्युटीवर हजर होणार होता. तेव्हा आता जायचं कसं असा प्रश्न पडला. तेव्हा योगी हिलपासून जंगलात उतरणारी पायवाट पकडून चाला, तुम्ही सहज पोहचाल अशी माहितीही त्याने दिली. अर्थात डोंगर किंवा किल्ला डोळ्यासमोर ठेवून नेणारी चांगली मळलेली पायवाट आणि जंगलातील पायवाट यामध्ये जमिन अस्मानच फरक असणार होता. 

सकाळी साधारण 7.30 ला ट्रेकला सुरुवात केली. योगी हिलमधून जंगलात शिरणारी चांगली पायवाट पकडली. सुदैवाने ही पायवाट मस्त मळलेली असल्यानं आमचा प्रश्न सुटला. डोंगर उतरातच झाडाखाली कुठलं तरी छोटेखानी देऊळ लागलं. नमस्कार-चमत्कार करत देव नेमका कोणता आहे हे ओळखण्याचा प्रयय्न केला, पण नंतर तो प्रयत्न सोडून दिला. घनदाट जंगलातून आमची तंगडतोड सुरु केली. लगेचच उद्धवस्त केलेली हातभट्टी लागली. काही दिवसांपुर्वीच वन कर्मचाऱ्यांनी हातभट्टी उद्ध्वस्त केली असल्याचं स्पष्टपणे समजत होतं. असो.....

सुर्य आणि दिशेचा अंदाज घेत आमची वाटचाल बरोबर आहे ना याची मी अधुनमधून खात्री करत होतो. सुदैवाने पायवाट एकच असल्यानं म्हणजेच फाटे न फुटल्यानं आमची चाल निर्धास्त झाली होती. 

वाटेत बिबट्या दर्शन देईल का, भेटेल का याची भिती म्हणण्यापेक्षा उत्सुकता जास्त होती. आपल्याला आठवत असेल 2004-2006 या काळात बिबट्यांच्या हल्ल्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान देशभर पर्यावरणप्रेमींमध्ये चर्चचा विषय होते. तेव्हा बिबट्य़ा भेट बाबा असं सारखं मनात येत होतं.

साधरण 9.30 च्या सुमारास आमची मळलेली पायवाट एक टेकाड चढायला लागली. मनांत म्हटलं की च्यायला चुकलो की काय ? तर नंतर पटकन लक्षात आलं अरे ही पायवाट भूत बंगल्याकडे चालली आहे. भूत बंगला हे नाव लोकांसाठी. आपल्यासाठी थोडा वेळ बुड टेकवायचं ठिकाण. दम लागत शेवटी टेकाडावर पोहचलो आणि जो काही थोडा थकवा आला होता, तो कुठच्याकुठे गायब झाला, टुणकण उडीच मारली म्हणा. भूत बंगल्याच्या समोर खाली तुळशी तलाव, त्याच्यापुढे विहार, त्याच्यापुढे पवई तलाव आणि त्याच्यापुढे इमारतींचे जंगल. हे सर्व एका मागोमाग एक स्प्ष्ट दिसत होतो. मुंबई मायानगरीतील, देशाच्या आर्थिक राजधानीमधील, या जागतिक (?) शहरामधील माझ्या मते सर्वोत्तम दृश्य असावं. बराच वेळ हे दृश्य मनात साठवत होतो. इथली एक भयाण पण मन सुखावणारी शांतता यालाही तोड नव्हती.

भुत बंगला खरं तर इंग्रजांच्या काळांत विश्रांतीकरता उभा केला होता. आता सर्व ढासळत्या अवस्थेत होतं. बाथटबही बघायला मिळालं. मनोसोक्त आतुनबाहेरुन भूत बंगला बघितला. 

एवढा वेळ जपून ठेवलेलं पाणी घशाखाली ओतलं आणि शांत डोळे मिटून पडून राहिलो. थोडी पेटपुजा करत तुळशी तलावाच्या दिशेने आम्ही उतरायला सुरुवात केली, अर्थात हे करतांना पायवाटेचा मार्ग पक्का लक्षात ठेवला होता. मनांत धाकधुक होती की तुळशी तलावाच्या काठावर कोणातरी दर्शन देईल. पण छे...कसलं काय...आमच्या अत्यंत शांतपणे सुरु असलेल्या चालीची चाहूल बहुदा आसपास परसली असावी. साधं माकडंही तलावाच्या जवळ दिसलं नाही.

म्हटलं जाऊ दे....एवढं भटकायला मिळतंय हेही काही कमी नाही. तलावातील पाणी तोंडावर मारलं आणि पुन्हा पायवाटेला येऊन मिळालो, म्हंटलं घेऊन चला आम्हांला लेण्यांकडे.

ऊन चांगलंच जाणवायला लागलं होतं. जंगलातून जरी फिरत असलो तरी उन्हाळा असल्यानं बहुतांश झाडांनी पानं खाली ठेवली होती, त्यामुळे सलग अशी मोठी सावली क्वचितच अनुभवायला मिळत होती. मात्र जंगलातून चालण्याचा मनोसोक्त आनंद लुटत होतो. 

मध्येच कुठल्या तरी प्राण्याच्या स्पष्ट आवाज ऐकल्यासारखं झालं, आम्ही सावध झालो. नेमका आवाज कुठुन आला याचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. म्हटलं कोणता प्राणी असावा ? पाच दहा मिनीटं नजरेला येईल त्या दिशेने जंगलाकडे डोळे ताणून बघत होतो, कोणता प्राणी नजरेला पडत आहे का ? कदाचित camouflage झाला असावा. कसलं काय...घंटा...काय पण दिसलं नाही...मात्र सुरुवातीला आवाज आला हे मात्र नक्की. शेवटी आम्ही प्रयत्न सोडून दिला, कारण अजून पल्ला गाठायचा होता.

आमची मातीची पायवाट दगडी झाली तेव्हाच लक्षात आले की आपण लेण्यांच्या परिसरांत आलो आहोत. एव्हांना 12.30 झाले होते. कातळावर अर्थात झाडं नसल्यानं उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. लेणी जवळ आल्या असं म्हणता म्हणता दोन चार मोठ्या चढ उताराची टेकाडं कधी पार केली समजलंच नाही. मात्र लेणी काही जवळ यायचं नाव घेईनात. शेवटी एका पाडलेल्या मंदिराजवळ पोहचलो. म्हटलं चला आलो तर अखेरचं. कारण एकदा लेणींच्या मागे असलेल्या या मंदिरापर्यंत येऊन गेलो होतो. कोण्या एका बाबाने मंदिराच्या मार्फत प्रस्थ निर्माण केलं होतं. अर्थात बरीच आरडाओरड झाल्यावर ते मंदिर जमिनदोस्त करण्यात आलं, बाबाला हाकलून लावण्यात आलं.

तरीही 15 एक मिनीटांची तंगडतोड झालीच, शेवटी घाम पुसत लेण्यांच्या इथे पोहचलो एकदाचे. ऐरवी पर्यटकांच्या वर्दळीने गजबजलेला हा लेण्यांचा परिसर निर्मनुष्य होता. त्यामुळे लेणी भयंकर भीतीदायक वाटत होती. अख्ख्या लेण्यांच्या परिसरांत आम्ही तिघेच. तेव्हा थोडं घाबरायला नक्की झालं. पण मुलुंड ते कान्हेरी लेणी हा पल्ला गाठल्याचा खुप आनंद झाला होता. 

भुका लागल्या होत्या, बांधून आणलेला शिधा आम्ही तिघांनी सोडला आणि ताव मारायला सुरुवात केली. म्हंटलं माकडं नक्की त्रास द्यायला येतील. मात्र सकाळपासून हा परिसर निर्मनुष्य असल्याने बहुदा माकडांनीही इथून जाणे पसंद केले असावे. इथल्या टाक्यातील मनोसोक्त थंड पाणी प्यायलो. आलेला थकवा आणि भरलेलं पोट यामुळे आम्ही तिघांनी चक्क अर्धा तास या शांत लेण्यांच्या ठिकाणी झोप काढली. 

पण पुढे मात्र काही वेगळंच घडले.

मी मचाणावर जाणार होतो आणि सोबतचे दोघे सहकारी बोरीवलीमार्गे घरी जाणार होते. ठरल्याप्रमाणे गाडी कान्हेरी लेणींपर्यन्त यावी यासाठी फोनाफोनी करायला सुरुवात करणार होतो तेवढ्यात घरून फोन आला. काही घरगुती कारणामुळे मला घरी परतावं लागणार होतं, तेव्हा मचाणाचा बेत लगेच रद्द केला. आता घरीच जायचं आहे तेव्हा गाडीने कशाला ? परत आल्या त्याच मार्गाने जाऊया की असा विचार आला.....आणि ठरले की परत मुलुंडला जंगलातूनच जायचे. 

लगेच लेण्यातील पाण्याच्या टाकीतील पाणी भरून बाटल्या फुल्ल केल्या. निघण्याची तयारी करतांना 4 वाजले होते. साडे सात पर्यन्त अंधार पडणार असल्याने हाताशी 3.30 तास होते. तरीही परतीचा प्रवास कुठेही न लांबवता, कुठेही न रमता तडक योगी हिल गाठायचा निर्णय घेतला. 

आता पायवाट पक्की लक्षात असल्याने झपाझप पावले टाकायला सुरुवात केली. भूत बंगल्याला वळसा घालत, तुळशी तलावाजवळ न फिरकता वाटचाल जोरात सुरू होती, आम्ही चांगला वेग पकडला होता. आजूबाजूच्या जंगल सौंदर्याचा आनंद घेत आम्ही जात असलो तरी एक भीती मनात होती. सकाळी ऊन वाढल्यावर सहजा प्राणी बाहेर पडत नाहीत, आता संध्याकाळ झाली होती, हवेतील उकाडा चांगलाच कमी झाला होता, जंगल असल्याने अर्थात हे सहज जाणवत होते, तेव्हा प्राणी बाहेर पडणे सहाजिक होते, आमची किमान दुरून भेट होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. तेव्हा सकाळ पेक्षा आमची नजर चालतांना आजूबाजूला जरा जास्तच वेगाने भिरभिरत होती.

पण प्राणी दर्शन वगैरे काही झाले नाही. 6.30 वाजता आम्ही तिघे सुखरूप योगी हिलला पोहचलो. एक वेगळा ट्रेक केल्याचे नक्कीच समाधान मिळाले होते, मुंबईतल्या या जंगलातून मस्त पायपीटही झाली होती. हे जंगल वेगळ्या नजरेतून बघता आले होते. भूत बंगला, तुळशी आणि इतर तलावही बघता आले होते. आत्मा सुखावला होता. 

अर्थात सलग तिसऱ्यांदा मचाणावर बसण्याची संधी मात्र हुकली होती याची रुखरुख होतीच.

Wednesday, April 22, 2020

अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसरी महत्त्वाची घटना - उपग्रह इंधन पुनर्भरण तंत्रज्ञान


अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसरी महत्त्वाची घटना' - उपग्रह इंधन पुनर्भरण तंत्रज्ञान

दुचाकी किंवा चार चाकी गाडी चालवतांना इंधन कमी
झाले की आपण लगेच पेट्रोल पंपावर जाऊन टाकी फुल्ल करतो आणि उरलेलं अंतर कापतो. जे जमिनीवर शक्य आहे ते आकाशात आणि पाण्यावरही शक्य आहे. हवेतल्या हवेत इंधन भरत लढाऊ-मालवाहू विमाने, हेलिकॉप्टर त्यांचा पल्ला वाढवतात. भर समुद्रात युद्धनौका दुसऱ्या जहाजातून-टॅकरमधून इंधन भरत समुद्रातील संचार कायम ठेवतात. एवढंच काय आपण आपल्या मोबाईलची बॅटरी डाऊन होत आली तर ती रिचार्ज करतो, थोडक्यात एकप्रकारे इंधनच भरतो. 

आता असं इंधन भरणं अवकाशात म्हणजे पृथ्वीच्या बाहेर शक्य झालं आहे. यामुळे कृत्रिम उपग्रहांची कालमर्यादा वाढवणे शक्य झालं आहे.

कृत्रिम उपग्रह हे अर्थात महागडे असतात आणि त्यांना अवकाशात पाठण्यासाठीही तेवढाच खर्च करावा लागतो. उदा.. भारताने 11  डिसेंबर 2019 ला PSLV C 48 या रॉकेटच्या सहाय्याने RISAT 2BR1 हा उपग्रह प्रक्षेपित केला. या उपग्रहाची किंमत अंदाजे 350 कोटी एवढी आहे, तर प्रक्षेपणाचा खर्च हा 250 कोटींच्या घरांत आहे. 628 किलो वजनाच्या या उपग्रहाचा कार्यकाल हा 5 वर्ष निश्चित केला आहे. पाच वर्ष का तर या काळांत उपग्रहामधील इंधन ( जे  उपग्रहाच्या वजनाच्या साधारण 80 टक्के असतं ) संपणार आहे. समजा या उपग्रहांमध्ये अकाशातच इंधन परत भरलं तर याचा कार्यकाल आणखी काही वर्ष सहज वाढवता येणार आहे. म्हणजेच एका महागड्या उपग्रहाकडून आणखी काम करुन घेता येणार आहे.

एप्रिल महिन्यात अवकाशात नेमकं हेच 'करुन दाखवलं' गेलं आहे. 

अमेरिकेतील Intelsat नावाची खाजगी कंपनी विविध देशांमध्ये विविध उपग्रहांच्या सहाय्याने दळणवळण सेवा देत असते. म्हणजे टीव्ही, इंटरनेट, सॅटेलाईट फोन सुविधा देत असते . या कंपनीने  Intelsat-901 नावाचा 4,723 किलो वजनाचा उपग्रह जून 2001 मध्ये अवकाशात साधारण 35,000 किमीपेक्षा जरा जास्त उंचीवर पाठवला होता. त्याचा कार्यकाल सुरुवातीला 13 वर्षे निश्चित होता. मात्र अधिकचे इंथन उरल्याने या उपग्रहाने 2019 पर्यंत व्यवस्थित काम केले. आता इंधन संपत आलेला उपग्रह हा सर्वसाधारण परत पृथ्वीच्या कक्षेत आणून नष्ट केला जातो, नाहीतर तो कचरा म्हणून पृथ्वीभोवती फिरत रहायचा आणि अन्य अवकाश मोहिमांसाठी धोकादायक ठरायचाय. तेव्हा कंपनीने या उपग्रहाला graveyard orbit मध्ये पार्क करुन ठेवले. म्हणजे 36,000 किमीच्या आणखी वर आणून ठेवले. त्यानंतर या उपग्रहाला पृथ्वीच्या वातावरणात आणायचे नियोजित होते. 

तोपर्यंत कृत्रिम उपग्रहात इंधन भरून त्याचा कार्यकाल वाढवता येईल का.....अशी चर्चा अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात सुरु झाली होती.

अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य Northrop Grumman या अमेरिकेतील कंपनीने मग उपग्रह इंधन पुनर्भरण तंत्रज्ञानाचे शिवधनुष्य उचलले. या कंपनीने Mission Extension Vehicle -1  ( MEV -1 ) हा साधारण 2000 किलोपेक्षा जास्त वजनाचा उपग्रह रशियाच्या प्रक्षेपकांच्या सहाय्याने अकाशात सोडला. या  MEV -1 ची कक्षा वाढवत नेत हा उपग्रह Intelsat-901 मागे यशस्वीपण आणला गेला. मग या  MEV -1 उपग्रहाने हळुहळु जागा बदलत तो Intelsat-901 च्या मागे पोहचला आणि यशस्वीपणे त्याला जोडला गेला. मग सुमारे 6 तासांच्या प्रक्रियेनंतर  MEV -1 मधील इंधन साठा हा Intelsat-901मध्ये भरला गेला. अर्थात किती इंधन हे  Intelsat-901 मध्ये भरले गेले हे जाहिर करण्यात आलेले नाही. असं असलं तरी  Intelsat-901 चा कार्यकाल हा चक्क पाच वर्षांनी वाढवण्यात आल्याचं नंतर जाहिर करण्यात आलं. 2 एप्रिलला  Intelsat-901ने पूर्वीप्रमाणे काम करणे सुरुही केले. या यशस्वी प्रक्रियेमुळे Intelsat कंपनीने आणखी एका उपग्रहात इंधन भरण्याची ऑर्डरही Northrop Grumman कंपनीला देऊन टाकली आहे. 

( Northrop Grumman कंपनीने या घडामोडीचे एक सुंदर ऐनिमेशन तयार केले आहे. ते जरुर बघावे...

अर्थात ही प्रक्रिया म्हणावी तेवढी सोपी नाही. कारण मुळातच सुमारे 36 हजार किमी एवढ्या उंचीवर सेकंदाला काही किलोमीटर वेगाने जाणाऱ्या उपग्रहाबरोबर प्रवास करणे, त्याच्याशी जोडणे, इंधन भरणे हे अत्यंत आव्हानात्मक होते. जराशी चुक उपग्रह निकामी करण्यास कारणीभूत ठरु शकली असती. किंवा हा सर्व खटाटोप करतांना जर उपग्रहांची कक्षा आणि दिशा बदलली गेली असती तर इतर कृत्रिम उपग्रहांना धोका निर्माण झाला असता. 

उपग्रह इंधन पुनर्भरण तंत्रज्ञान हे अवकाश तंत्रज्ञान
क्षेत्रात ही एक क्रांतीकारी घटना आहे. अर्थात हे तंत्रज्ञान पुढील काही वर्षात आणखी सोपे होईल यात शंका नाही. मात्र या घटनेमुळे कृत्रिम उपग्रहांचा वापर करण्याची संकल्पनाच आमुलाग्र बदलून जाणार आहे. अत्यंत महागडे ठरलेले कृत्रिम उपग्रहांचे क्षेत्र स्वस्त होईल. ही संकल्पना अधिक व्यापक करत अवकाशात इंधन साठा करत वेळोवेळी उपग्रहांचा कार्यकाल वाढवता येतील. काय माहिती या तंत्रज्ञानामुळे उपग्रहांचे भविष्य किती आणि कसे बदलून जाईल ते. 

या घटनेचा आणि सर्वसामान्यांचा तसा काहीही संबंध नाही. पण अशी घटना दुरगामी बदलांची नांदी ठरणार आहे यात शंका नाही. या घटनेचे महत्व माहित व्हावे म्हणून लिहिण्याचा हा नसता खटाटोप.......


Tuesday, April 21, 2020

अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील एक महत्त्वाची घटना

अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात एक खाजगी कंपनी अवकाशात पाठवणार अंतराळवीर......

सध्याच्या कोरोनो व्हायरसच्या संकटात या बातमीचे
महत्व अत्यंत दुय्यम आहे यात शंका नाही. मात्र ही घटना भविष्यातील अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलांची नांदी ठरणार आहे म्हणनू त्याची नोंद घेणे आवश्यक आहे. तेव्हा अवकाश तंत्रज्ञनात सक्रीय असलेली खाजगी कंपनी अवकाशात पाठवणार अंतराळवीर...... म्हणजे काय....

तर असं क्षणभर गृहीत धरा की आपल्या देशातील अंतराळवीर आपण म्हणजे इस्त्रो संस्था ही स्वबळावर पाठवत आहे. समजा अंतराळवीर पाठवण्याचे काम इस्त्रोने सरकारी नाही तर एका खाजगी कंपनीला दिले तर काय होईल....म्हणजे टाटा, एल अन्ड टी वगैरे अशा एखाद्या कंपनीला दिले तर काय होईल.

तेच सध्या अमेरिकत सुरु आहे.

एकतर अवकाश तंत्रज्ञान हा अत्यंत महागडा विभाग. हा विभाग देशाच्या दळणवळण, संदेशवहन, इंटरनेट, टेलिमेडिसिन अशा अनेक विभागांशी जरी संबंधित असला तरी संरक्षण क्षेत्राशी थेट संबंधित असल्यानं हा विभाग थेट संबंधित सरकारच्या ताब्यात असतो. म्हणूनच अमेरिका, रशिया या प्रमुख देशांनी अवकाश तंत्रज्ञान विभाग सुरुवातीपासून स्वतःच्या ताब्यात ठेवत दमदार पावले टाकली.

अर्थात जसा जसा व्याप वाढत गेला तसा अमेरिकेने खाजगी कंपन्यांना उभं करायला सुरुवात केली आणि अनेक रॉकेट्सची - उपग्रह वाहून नेणाऱ्या प्रक्षेपकांच्या निर्मितीचे कामे, उपग्रह निर्मितीची कामे, अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक तांत्रिक गोष्टीची कामे हे खाजगी कंपन्यांना दिली. अर्थात अमेरिकेतील कंपन्यांकडे असलेली व्यावसायिक वृत्ती, प्रशिक्षित मनुष्यबळ यामुळे नासाचे काम बरेसचे हलके झाले. असं असलं तरी अवकाशात अंतराळवीर पाठवणे ही अत्यंत खार्चिक, क्लिष्ट तंत्रज्ञान असलेली गोष्ट असल्यानं अंतराळवीर अकाशात पाठण्याचे शिवधनुष्य हे अमरिकेतील एकही खाजगी कंपनी पेलू शकली नाही. सोव्हिएत रशिया आणि आता रशिया या देशाकडे कम्युनिस्ट दृष्टीकोन कायम असल्यानं या देशाच्या अवकाश विभागात खाजगी कंपनीचा शिरकाव झालेला नाही किंवा तशी कंपनी त्या देशांत उभी राहू शकलेली नाही. चीनकडेही हाच दृष्टीकोन आहे. तेव्हा चीन काय रशिया काय अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रावर मुख्य नियंत्रण हे तिथल्या सरकारचेच राहीले आहे. युरोपियन देश, जपान ह कितीही प्रगत असले आणि विविध उपग्रह, अवकाश मोहिमा राबवू शकत असले तरी या देशांमध्ये या क्षेत्रातील खाजगी कंपनी काही उभी राहू शकली नाही.

तर आत्तापर्यंत अमेरिका,रशिया आणि चीन या तीन देशांनीच त्यांचे ( किंवा सामुहिक अवकाश मोहिमांसाठी इतर देशांचे सुद्धा ) एकुण 300 पेक्षा जास्त अंतराळवीर स्वबळावर अवकाशात पाठवले आहेत. 

आता भारतही या स्पर्धेत उतरला आहे. 'गगनयान' मोहिमेअंतर्गत आपणही - इस्त्रोही देशाचा अंतराळवीर 2022 पर्यंत स्वबळावर अवकाशात धाडणार आहे. अर्थात भारत काय, अमेरिका काय, रशिया आणि चीन काय....अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची जवाबदारी तिथल्या सरकारशी संबंधित संस्थेने - सरकारी कंपनीने घेतली आहे.

 मात्र आता अमेरिका वेगळं पाऊल टाकत आहे. 

अत्यंत कल्पक ,विविध कल्पना धडाक्यात राबवत यशस्वी करणाऱ्या अमेरिकेतील  'स्पेस एक्स' या अंतराळ क्षेत्रात कार्यरत खाजगी कंपनीचे संस्थापक 'ऐलॉन मस्क' यांनी अंतराळवीर अवकाशात पाठण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. अर्थात यामध्ये काही तांत्रिक सहाय्य नासाने केलं असलं तरी बहुतांश कामगिरी स्पेस एक्सनेच बजावली आहे.

येत्या 27 मे ला स्पेस एक्सच्याच 'फाल्कन 9' या अतिविशाल रॉकेटच्या सहाय्याने, स्पेस एक्सनेच बनवलेली 'ड्रॅगन 2' ही अवकाश कुपी दोन अंतराळवीरांना घेऊन अवकाशात झेप घेणार आहे. काही तासांचा प्रवास करत ही कुपी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला जोडली जाईल. जोडल्यानंतर दोन अंतराळवीर अवकाश स्थानकात प्रवेश करतील, तिथे सुमारे 3 महिने राहील आणि मग तीचअवकाश कुपी अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीवर परतेल. 

थोडक्यात 27 मे हा अवकाश तंत्रज्ञान क्षेत्राच्या दृष्टीने एक ऐतिहासिक दिवस असेल. कारण एक खाजगी कंपनी स्वबळावर अंतराळवीरांना अवकाश सफर घडवून आणणार आहे. 

2024 पासून 'नासा'ने चंद्रावर मानवी वस्ती करायला सुरुवात केलेली असेल, एवढी जय्यत तयारी सध्या नासा करत आहे. 2024 पासून नासाच्या चंद्र आणि पृथ्वी दरम्यान नियमित वाऱ्या सुरु झालेल्या असतील. तेव्हा नासाचा अवकाशातील कामाचा पसारा वाढला असेल. म्हणूनच स्पेस एक्स सारख्या कंपन्या भविष्यात अमेरिकेचा अवकाश क्षेत्रातील भार हलका करणार आहेत. स्पेस एक्स पाठोपाठ बोईंग कंपनीही पुढील काही महिन्यात अवकाशात अंतराळवीर पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे. 

एवढंच नाही तर 'स्पेस एक्स'च्या सारख्या खाजगी कंपनीच्या
अवकाश तंत्रज्ञानातील विविध कामगिरींमुळे सध्या भारतामधील इस्त्रोच्या गोटात चिंतेचे वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली आहे. कारण भारत जगात सर्वात स्वस्तात उपग्रह अवकाशात पाठवतो, स्पेस एक्सने याआधीच याबाबत अप्रत्यक्ष आव्हान द्यायला सुरुवात केली असतांना आता ही कंपनी अंतराळवीर पाठवण्यासाठीही सज्ज झाली आहे.

थोडक्यात अत्यंत महागड्य़ा, आव्हानात्मक, क्लिष्ट तंत्रज्ञान असलेल्या अवकाशत तंत्रज्ञान क्षेत्रात 'स्पेस एक्स' च्या रुपाने, खाजगी कंपनीचे 'वामन' रुपी महाकाय असं पाऊल पडणार आहे. म्हणून 27 मे ला होऊ घातलेली घडामोड ही लक्षवेधी ठरते.  

( 'स्पेस एक्स'  च्या या समानवी अवकाश मोहिमेचे ऐनिमेशन पहायला विसरु नका...https://www.youtube.com/watch?v=sZlzYzyREAI )

Sunday, March 1, 2020

ट्रम्प तात्यांच्या भेटीचे 'लष्करी' महत्व....

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याचा फायदा कोणाला राजकीय झाला/होणार, किती शो गिरी झाली, किती खर्च झाला वगैरे मुद्यांची चर्चा सुरू आहे. मात्र या दरम्यान काही महत्त्वाचे संरक्षणात्मक करार झाले ज्याचा फायदा मोठा आहे. 

१..नौदलासाठी हेलिकॉप्टर करार 

नौदलाच्या वापरासाठी तयार करण्यात आलेली MH - 60R नावाची २४ हेलिकॉप्टर आता अमेरिकेकडून भारतीय नौदलाला मिळणार आहे. ही हेलिकॉप्टर का महत्त्वाची आहेत ? 

सध्या आपण म्हणजे भारतीय नौदल 'सी किंग' ही बहुउद्देशीय हेलिकॉप्टर वापरतो. या हेलिकॉप्टरचा वापर शोध, सुटका मोहिमांसाठी, गस्त घालण्यासाठी, कमांडो कारवाई साठी, आवश्यक मालवाहतुकीसाठी, पाणबुडीविरोधी कारवाई.....अशा विविध कारणांसाठी केला जातो. हेलिकॉप्टर शिवाय युद्धनौकेची कल्पनाही करता येणार नाही, हेलिकॉप्टर हे युद्धनौकेचं अविभाज्य अंग आहे. 

सध्याची नौदलाची क्षमता, व्याप्ती, भविष्यातील गरज लक्षात घेता अशा किमान १०० एक हेलिकॉप्टरची आवश्यकता आहे.  १९९० च्या दशकापासून दाखल झालेली सध्या जेमतेम ३० एक 'सी किंग' हेलिकॉप्टर नौदलकडे आहेत, जी अगदी पुरवून पुरवून वापरली जात आहोत.

म्हणूनच अमेरिकेशी MH-६० R चा झालेला करार अत्यंत महत्वपुर्ण आहे. आपण थेट तयार स्वरूपातील २४ हेलिकॉप्टर विकत घेणार असून २०२१ पासून नौदलाच्या ताफ्यात दाखल व्हायला सुरुवात होणार असून २०२३ पर्यंत ही सर्व हेलिकॉप्टर नौदलाच्या सेवेत दाखल होतील अशी अपेक्षा आहे.

Sirkoski / सिर्कोस्की या कंपनीने हेलिकॉप्टरची निर्मिती ही १९७९ पासून केली आहे. अर्थात वेळोवेळी या हेलिकॉप्टरमध्ये सुधारणा करण्यात आली असून सध्या १४ देशांतील नौदल ही हेलिकॉप्टर वापरातात. एका दमात जास्तीत जास्त ८०० किमी अंतर कापण्याची या हेलिकॉप्टरची क्षमता असून ३ टन वजन वाहून नेऊ शकते. Night vision क्षमतेमुळे रात्रीही सहज संचार करणं या हेलिकॉप्टरला शक्य आहे. पाणबुडी विरोधी कारवाईसाठी, समुद्रात गस्त घालण्यासाठी, शोध-सुटकेच्या महिमांसाठी, कुठल्याही वातावरणात संचारासाठी MH-६०R हेलिकॉप्टर ही सध्या जगात सर्वोत्कृष्ट समजली जातात. 

अर्थात भारतीय नौदलकडे सुपूर्त करतांना भारतीय नौदलाच्या गरजेनुसार त्यामध्ये आवश्यक बदल केले जाणार आहेत, भारतीय यंत्रणा बसवल्या जाणार आहेत.

एवढंच नाही तर हा करार करतांना आणखी दुपटीपेक्षा जास्त हेलिकॉप्टर विकत घेण्याची तरतूद करून ठेवली आहे. त्यामुळे भविष्यात आणखी MH - ६० R हेलिकॉप्टर दाखल होतील यात शंका नाही.  

या करारामुळे भारतीय नौदलाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. कारण येत्या काळांत नवे तंत्रज्ञान असलेल्या अत्याधुनिक विविध युद्धनौका या भारतीय नौदलात दाखल होण्यासाठी रांग लावून उभ्या आहेत. मात्र हेलिकॉप्टरची कमी होणारी संख्या ही नौदलाची मोठी डोकेदुखी ठरत होती. मात्र या नव्या हेलिकॉप्टरच्या कराराने नौदलाची सामरिक क्षमता भविष्यात निश्चित वाढणार आहे यात शंका नाही.


२ .. लष्करासाठी लढाऊ हेलिकॉप्टरचा करार

दुसरा जो करार झाला आहे तो एका अर्थाने संरक्षण दलाबद्दल काहीसा रंजक करार ठरला आहे. दुसऱ्या करारानुसार भारतीय लष्कराला ६ 'अपाची' ही जगातील सर्वोत्कृष्ट लढाऊ हेलिकॉप्टर मिळणार आहेत. आता यामध्ये रंजक गोष्ट काय ती? तेव्हा आधी रंजक गोष्ट मग हेलिकॉप्टरच्या क्षमतेबद्दलची माहिती...

भारतीय वायू दलाकडे कालपर्यंत फक्त Mi -२४ ही रशियन बनावटीची लढाऊ हेलिकॉप्टर होती, आजही आहेत. तर गेल्या वर्षभरापासून 'अपाची' ही अमेरिकन बनावटीची लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाली आहेत.

गेली अनेक वर्षे लढाऊ हेलिकॉप्टरच्या वापराबाबत भारतीय वायू दल आणि लष्कर यांच्यामध्ये एक वाद आहे तो म्हणजे लढाऊ हेलिकॉप्टर ' Operate ' कोण करणार ? प्रत्यक्ष युद्धात लष्कराकडे विविध उपकरणे असतात ज्याचा वापर करत जमिनीवरील सैनिक हे आगेकूच करू शकतात. उदा.. रणगाडा, तोफा, चिलखती वाहने,  multi barrel rocket launcher, drone, लहान पल्ल्यांचे रडार..... यांमुळे लष्कराला जमिनीवर पाय रोवणे शक्य होते. आता यामध्ये लढाऊ हेलिकॉप्टची भूमिका आणखी महत्त्वाची ठरते. आता भारतीय लष्कराकडे वर उल्लेख केलेल्या सर्व उपकरणांचे नियंत्रण असते, थोडक्यात 'मालकी' असते, फक्त लढाऊ हेलिकॉप्टरची मालकी नाहीये. 

तर लढाऊ हेलिकॉप्टर हे भारतीय वायू दल हाताळते, याचे संपुर्ण नियंत्रण हे वायू दलाकडे असते. लष्कराचे गेल्या काही वर्षांपासून म्हणणे आहे की लढाऊ हेलिकॉप्टरची मालकी स्वतःकडे - लष्कराकडे असावी म्हणजे प्रत्यक्ष युद्धात लष्कराला परिणामकारकरित्या कामगिरी ही आणखी चांगल्या प्रकारे साधता येईल. मात्र आत्तापर्यंत भारतीय वायू दलाने लढाऊ हेलिकॉप्टरची मालकी लष्कराकडे देण्यास साफ नकार दिला होता. मग आता लष्कराने काय केलं वायू दलाकडे हेलिकॉप्टर मागत बसण्यापेक्षा ६ अपाची नवी हेलिकॉप्टर थेट ताफ्यात दाखल करून घेण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात हा करार करण्यात आला. 

अर्थात लढाऊ हेलिकॉप्टरच्या मालकी हक्कावरून भारतीय लष्कर आणि वायू दल यांच्यामध्ये असलेला वाद हा एक तांत्रिक मुद्दा आहे. अशा वादामुळे कोणीही एकमेकांना कुठल्याही पातळीवर कोणतेही सहकार्य करण्याचे कधीच नाकारलं नाही ही सर्वात जमेची बाजू आहे. 

अपाची ही लढाऊ हेलिकॉप्टर जगात सर्वात्कृष्ठ लढाऊ हेलिकॉप्टर समजली जातात. त्याला 'उडता रणगाडा' म्हणूनही ओळखलं जातं. रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र, जमिनीवर मारा करणारी अत्याधुनिक गन, रात्रीच काय प्रतिकूल वातावरणात उड्डाण करण्याची क्षमता....अशी विविध वैशिष्ट्ये या अपाची हेलिकॉप्टरची आहेत. अर्थात ६ हेलिकॉप्टर लष्कराला काही पुरेशी नाहीत. म्हणनूच लष्कराने सुमारे १०० पेक्षा जास्त लढाऊ हेलिकॉप्टरची मागणी हिंदुस्थान एरोनॉटिक्स कडे नोंदवली आहे, जी स्वदेशी बनावाटीचे लढाऊ हेलिकॉप्टर तयार करत असून सध्या चाचण्या सुरु आहेत.   

तेव्हा 'अपाची' या लढाऊ हेलिकॉप्टरमुळे लष्कराला लढण्यासाठी एक नवं परिमाण मिळणार आहे. 

तेव्हा भारतीय दौऱ्याचा डोनाल्ड तात्यांना किंवा मोदींना किती राजकीय फायदा होईल ते काळ ठरवेल. मात्र तात्यांच्या भारत भेटीमुळे ( जाहिर झालेले ) दोन महत्त्वाचे लष्करी करार मार्गी लागले हे नक्की. ( जाहिर न केलेल्या संरक्षणात्मक चर्चा अजून उघड व्हायच्या आहेत. ).

मात्र या दोन करारांमुळे भविष्यात लष्कर आणि खास करुन नौदलाची ताकद निश्चित वाढणार आहे हे नक्की. 

  

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...