Sunday, November 1, 2020

विमानवाहु युद्धनौका


#कुतुहल  #curiosity 

विमानवाहु युद्धनौका

ज्या देशाच्या सीमेवर अथांग समुद्र आहे आणि ज्या देशाला राजकीय महत्वकांक्षा या संरक्षण क्षेत्राच्या माध्यमातून राबवायच्या आहेत त्या देशाला विमानवाहु युद्धनौकांशिवाय पर्याय नाही. किंबहूना अशा देशाच्या संरक्षण क्षेत्रातील ताकदीचे जे अनेक मापदंड त्यापैकी एक म्हणजे त्या देशाच्या नौदलाकडे किती विमानवाहु युद्धनौका आहेत ते.

विमानवाहु युद्दनौकांवरील लढाऊ विमानांच्या सहाय्याने विस्तृत समुद्राच्या भागावर वर्चस्व ठेवता येते. म्हणजे समजा विमानवाहु युद्दनौकेवरील लढाऊ विमानाचा युद्ध क्षमतेचा पल्ला - 'लढाऊ पल्ला ' हा जास्तीत जास्त 1000 किमी आहे, ( म्हणजे 500 किमी अंतर कापत, हल्लाच्या ठिकाणी जात कसरती करत, हल्ला करत विमानवाहु युद्धनौकेवर परतायचे ). तेव्हा विमानवाहु युद्धनौकेच्या 500 किमी परिघात असलेल्या समुद्रात किंवा किनाऱ्यापासून आत जमिनीवर खोलवरच्या भागापर्यंत वर्चस्व ठेवता येते. त्यामुळे विमानवाहु युद्धनौकांना अनन्य साधारण महत्व आहे.

ज्या देशांकडे अनेक विमानवाहु युद्दनौका आहेत त्या देशांना ' ब्लु वॉटर नेव्ही ' म्हणुन ओळखले जाते. म्हणजेच स्वतःच्या देशापासून कित्येक हजार किलोमीटर दूरवर मुक्तपणे संचार करत दबदबा ठेवणे, वर्चस्व गाजवणे हे विमानवाहु युद्धनोकांमुळे शक्य होते. म्हणुनच अमेरिका ही सध्याच्या काळांत खऱ्या अर्थाने  ' ब्लु वॉटर नेव्ही ' ओळखली जाते. अर्थात अणु पाणबुड्यांची साथही आवश्यक ठरते.

दुसऱ्या महायुद्धात जपानला नमवण्यात जेवढे अणु बॉम्बचे महत्व आहे तेवढेच विमानवाहु युद्धनौकांचेही. विमानवाहु युद्धनौकांमुळे जपानच्या नौदलाचे कंबरडे अमेरिकेने मोडले होते. 1982 च्या फॉकलंड बेटांच्या युद्धात इग्लंडकडे असलेल्या विमानवाहु युद्धनौकांमुळे हजारो किलोमीटर दूरवर जात अर्जेटिनाला नमवण्यात इंग्लडला यश आले होते. 1991 पर्यंत रशिया - अमेरिका यांच्यातील शीतयुद्धात विमानवाहू युद्धनौकांमुळेच अमेरिकेचा रशियासमोर दबदबा कायम राहिला होता. एवढंच काय 1971 च्या भारत पाक युद्धात तेव्हाच्या पुर्व पाकिस्तानच्या बंदरांची - चितगांवच्या नाकेबंदीमध्ये आयएनएस विक्रांतने महत्त्वाची भुमिका बजावली होती हे कसं विसरुन चालेल. म्हणून विमानवाहु युद्धनौकांना नौदलात अनन्य साधारण महत्व आहे.

सध्या कोणत्या देशांकडे किती विमानवाहू युद्धनौका आहेत आणि किती बांधल्या जात आहेत ( ही माहिती कंसामध्ये ) हे बघुया

अमेरिका - 11 (2),चीन - 2 (1), इटली - 2 (1), इंग्लंड- 2, फ्रान्स - 1, भारत - 1 (1), रशिया -1, स्पेन -1, थायलंड -1, जपान - 0 (2)

ढोबळपणे विमानवाहु युद्धनौकांचे 3 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. हलक्या वजनाच्या, मध्यम आकाराच्या आणि मोठ्या ( Super carrier ).

आपल्याकडे असलेली विक्रांत - विराट या हलक्या वजनातील विमानवाहु युद्धनौका होत्या, ज्याचे वजन अनुक्रमे 22,000 टन आणि 27 हजार टन एवढे होते. साधारण 30 हजार टन वजनापर्यंतच्या विमानवाहु युद्धनौका या हलक्या वजनाच्या समजल्या जातात. तर मध्यम आकाराच्या विमानवाहु युद्धनौका या ढोबळपणे या ३० हजार ते ७० हजार टन वजनांत मोडतात. सध्या आपल्याकडे असलेली विमानवाहु युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यचे वजन हे सुमारे ४५ हजार टन एवढे आहे. अमेरिकेकडे असलेल्या सर्व विमानवाहु युद्धनौका या तब्बल 90 हजार ते एक लाख टन वजनाच्या आहेत.

जेवढा वजनाचा आकडा साधारण तेवढी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर हे त्या विमानवाहू युद्धनौकांवर असतात. म्हणजे 45 हजार टन वजनाच्या विक्रमादित्यवर सुमारे 40 - 45 पर्यंत लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर ठेवता येऊ शकतात.

सर्वसाधारणपणे विमानवाहु युद्धनौका या अत्यंत उच्च दर्जाच्या डिझेल इंजीनावर किंवा तत्सम इंधनावर चालतात. फक्त अमेरिका आणि फ्रान्स या देशांच्या विमानवाहु युद्धनौका या अणु ऊर्जेवर चालतात. म्हणजेच या दोेन देशांच्या विमानवाहु युद्धनौकांमध्ये असलेल्या अणु भट्टीत एकदा इंधन भरले की पुढील काही वर्षे इंधन भरण्याची आवशक्यता नाही.

विमानवाहू युद्धनौका म्हणजे एक छोटेसे स्मार्ट शहरंच. जे स्मार्ट शहरांत असतं ते सर्व या विमानवाहू युद्धनौकांवर बघायला मिळतं. बाजारपेठ सोडली तर अनेक सुविधा उपलब्ध असतात. शुद्ध पिण्याचे पाणी, ATM, जीम, सिनेमागृह, इंटरनेट, सांडपाण्याचा पुर्नवापर, वीजेची बचत होईल अशी उपकरणे....अगदी काही ठिकाणी तरणतलाव सुद्धा उपलब्ध आहे. अर्थात ही युद्धनौका असल्यानं चैनीच्या गोष्टींना मर्यादीत स्थान ठेवले जाते.

विक्रमादित्यवर एका वेळी 1600 जण कार्यरत असतात, तर अमेरिकेच्या निमिट्झ वर्गातील विमानवाहु युद्धनौकांवर तर तब्बल 6000 जण कार्यरत असतात, एवढा राबता या युद्धनौकांवर असतो.

दिशादर्शन विभाग, हवामान विभाग, संदेश देवाणघेवाण विभाग, हेलिकॉप्टर - लढाऊ विमानांशी संबंधित यंत्रणा, अन्नधान्य प्रक्रियेसंदर्भातला विभाग, logistic संदर्भातला विभाग, इलेक्ट्रिक - इंजिनाशी संबधित अभियांत्रिकी विभाग असे विविध विभाग हे विमानवाहु युद्धनौकेवर कार्यरत असतात.

विमानवाहु युद्धनौकांचा आकार मोठा असल्यानं रडारने सहज त्यांना शोधता येते. त्यामुळे संरक्षणासाठी विमानवाहु युद्धनौका ही इतर युद्धनौका, पाणबुड्या यांच्या संरक्षणात संचार करते.

विमानवाहु युद्धनौका बांधणे, बाळगणे हे अत्यंत खार्चिक आणि आव्हानात्मक असते. त्यामुळे जगात नौदल असलेल्या सर्वच देशांना या विमानवाहू युद्धनौका बाळगणे परवडत नाहीत.

विमानवाहु युद्धनौकांच्या बाबतीत निर्विवादपणे सध्या अमेरिकेचे वैशिष्ट्य आहे. तर अमेरिकेबरोबर रशिया, फ्रान्स, इंग्लंड देशांच्या विमानवाहु युद्धनौकांचेही तंत्रज्ञान हे पुढारलेले आहे. भारतही आपले स्वतंत्र स्थान निर्माण करत आहे. तर विमानावहु युद्धनौका बांधणीचा सपाटा सुरु केलेला चीन हा भविष्यात अमेरिकेपुढे आव्हान निर्माण करणार यात शंका नाही.

विमानवाहु युद्धनौका आतुन बाहेरुन बघता येणे, त्यावर एक दिवस का होईना रहायला मिळणे हे संरक्षण विषयक रुची असणाऱ्यांचे स्वप्न नक्कीच असेल. माझे स्वप्न, bucket list मधील ही गोष्ट माझी केव्हाच पुर्ण झाली आहे. 2012 च्या फेब्रुवारीत मला आयएनएस विराटवर मुक्काम करण्याची संधी मिळाली. एवढंच नाही तर साधारण गोवा ते मुंबई असा स्वप्नवत प्रवासही करायला मिळाला.

विमानवाहु युद्दनौकांवर खुप सुंदर, माहितीपुर्ण असे माहितीपट यु ट्युबवर उपलब्ध आहेत. त्यापैकी काहींची लिंक पुढे देत आहे.

https://www.youtube.com/watch?v=LhqLn1wKJAw&t=1605s

https://youtu.be/c0pS3Zx7Fc8

3 comments:

  1. काही प्रश्न
    १. विमानवाहू युद्धनौकेवरील विमानांची क्षमता किती किमीपर्यंत उड्डाण करुन परत येण्याची असते. सर्वसाधारणपणे सांगितले तरी चालेल. विक्रमादित्यवरील विमानांची क्षमता किती आहे.
    २. विमानवाहू युद्धनौका बांधणीचा खर्च किती असतो. सर्वसाधारण रेंज सांगावी.
    ३. बाजारपेठ नसेल तर एटीएम कशासाठी, म्हणजे पैसे काढून कुठे खर्च करतात.

    ReplyDelete
    Replies
    1. 1..विक्रमादित्यवर मिग -29 के ही लढाऊ विमााने आहेत. कोणत्याही लढाऊ विमानाचा पल्ला हा ते विमान किती उंचीवर उडत आहे त्यावरुन ठरतो. कमी उंचीवर या मिगचा पल्ला हा सुमारे 800 किमी, तर high altitude वर याचा पल्ला हा 1500 किमी आहे. असं का तर कमी उंचीवर वाऱ्याचा अडथळा जास्त - घर्षण मोठं असते, तर खुप उंच गेल्यावर वाऱ्याचा अडथळा नसल्याने सहाजिक पल्ला वाढतो. लढाऊ पल्ला ही वेगळी गोष्ट आहे, कारण लढाऊ विमानाला संबंधित ठिकाणी हल्ला करतांना अनेकदा उंची,मार्ग बदलावे लागतात, कसरती कराव्या लागतात. मिग -29 के चा लढाऊ पल्ला हा सुमारे 800 किमी एवढा समजला जातो.

      2.. 40 हजार टन पेक्षा जास्त वजनाच्या आयएनएस विक्रांतची बांधणी कोचीमध्ये सुरु आहे. तयार होईपर्यंत यावर अंदाजे एकुण २3 हजार कोेटीपर्यंत खर्च होण्याची शक्यता आहे. 

      3.. युद्धनौकेवर वैयक्तिक खरेदीसाठी काही गोष्टी उपलब्ध असतात यासाठी ATM असते. तसंच जेव्हा युद्धनौका नौदलाच्या बंदरावर असते, तेव्हा तिथे खरेदी करता यावी यासाठी एटीएमची सुविधा उपयुक्त ठरते. 

      Delete

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...